Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Sun, 09/04/2011 - 12:17
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत...... प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का? घटना १: माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे. घटना २: माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे. घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला. "वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
  • Log in or register to post comments
  • 164014 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रशांत on Sun, 09/04/2011 - 13:06

Permalink

अतिशय चांगल्याप्रकारे (सचित्र) अनुभव मांडले..

अतिशय चांगल्याप्रकारे (सचित्र) अनुभव मांडले.. conscious and subconscious mind असं काहि असावे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/04/2011 - 13:20

Permalink

घटना क्रमांक एक बद्दल माझं

घटना क्रमांक एक बद्दल माझं असं मत आहे की, वार्धक्यात माणसाची स्मृती कमी होत असलेली अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहात असतो. वय झालेल्या माणसांच्या बाबतीत ताज्या घटनांची साठवण करण्याकरिता मेंदूची कार्यक्षमता कमी होत असावी, मात्र पूर्वीच्या बालपणाच्या असंख्य गोष्टी स्मरणात असल्यामुळे तितकेच आठवत असावे असे वाटते. बाकी, अतर्क्य गोष्टीबद्दल ’सिद्ध’ करणे ही मोठी कठीण गोष्ट असल्यामुळे अशा गोष्टी केवळ चमत्कारिक म्हणून ऐकाव्या आणि पाहाव्या लागतात. विज्ञान आणि काळाच्या ओघात असे चमत्कार विसरावे ही लागतात. मृत्यूपूर्वी काही लोक बडबडत असतात तो संवाद म्हणजे मृत्यूशी चाललेला असतो असे म्हणतात. खरं खोटं देवाला माहिती. परंतु असे अनेक प्रसंग संत-महंताच्या, थोर विभूतींच्या तोंडून आपण ऐकत असतो. ”आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम” असे म्हणणारा तुकाराम कशाबद्दल बोलतो काही कळत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Mon, 09/05/2011 - 15:39

In reply to घटना क्रमांक एक बद्दल माझं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बराचसा सहमत ....

अशा काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. मृत्यू आणि त्यासंबंधानी अनेक गोष्टी ऐकण्या-वाचण्यात आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे सुप्रसिद्ध कलाकार आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याबद्दलची. असं ऐकलं आहे की त्यांच्या मृत्युच्या वेळी त्यांची पत्नी त्यांच्या जवळ नव्हती, पण तिला एक भयानक स्वप्न पडले आणि ती घाबरून जागी होऊन गुरुदत्त ह्यांची भेट घ्यायला गेली .... पण तोवर त्यांचा मृत्यू झालेला होता! दुसरी गोष्ट ही अमेरिकेचे जगप्रसिद्ध माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांची. त्यांना म्हणे त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच एक स्वप्न पडले होते, त्यात त्यांचा स्वतःचा मृतदेह एका मोठ्या हॉलमधे ठेवला होता वगैरे वगैरे. त्यांनी ते स्वप्न फक्त आपल्या पत्नीला सांगितले होते असं ऐकण्यात आहे. पण नंतर त्यांचा मृतदेह जिथे ठेवण्यात आला होता तेथील एकून वर्णन हे खरोखरच लिंकन ह्यांनी आपल्या स्वप्नात पाहिलं होतं तसंच होतं म्हणे. 'व्हाईट हाउस'मधे लिंकन ह्यांची खोली अजूनही राखून ठेवली आहे आणि काही लोकांना तिथे खरंच लिंकन वावरत आहेत असा भास होतो ... असं म्हणे .... खरं-खोटं त्या लिंकन महाशयांना आणि आता ओबामा महाशयांना(पण) माहिती
  • Log in or register to post comments

Submitted by Jabberwocky on Sun, 02/12/2017 - 14:33

In reply to घटना क्रमांक एक बद्दल माझं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

”आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम”

संत हे जन्म तसेच मृत्यूच्या पुढे गेलेले असतात. त्यांनी ऐहिक सुखांचा त्याग केलेला असतो, किंवा त्यापेक्षाही असं म्हटलं तर योग्य होईल कि ते परमात्म्याशी म्हणजेच स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. जेंव्हा देहाला हि अवस्था प्राप्त होते त्यावेळी माणसामध्ये असलेले काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, संशय, चिंता आदी विषयही नाहीसे होतात. मनुष्य आत्मज्ञानाने ओतप्रोत भरून जातो. मला वाटत संत तुकाराम, "आपुले मरण पहिले म्या डोळा", म्हणजेच त्यांच्यातील नाहीशा झालेल्या विषयांच्या बद्दल सुचवत असावेत, तसेच " तो जाहला सोहळा अनुपम" म्हणजेच त्यांना प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाबद्दल सुचवत असावेत. अर्थात संतांनी लिहिलेल्या एका शब्दात देखील अनेक अद्वैत अर्थ असतात, तसेच या ओवीचे देखील अनेक अद्वैत अर्थ असू शकतील.....असतीलच. तूर्तास माझ्या तोडक्या बुद्धीला जेवढं झेपलं तेवढं लिहिलं.
  • Log in or register to post comments

Submitted by Jabberwocky on Sun, 02/12/2017 - 16:01

In reply to ”आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम” by Jabberwocky

Permalink

एक शब्द गुरुदेव का, ताका अनंत

एक शब्द गुरुदेव का, ताका अनंत विचार | थके मुनि जन पंडिता, वेद न पावे पार ||
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 09/04/2011 - 13:28

Permalink

हम्म थोडक्यात मेलेले लोक्स

हम्म थोडक्यात मेलेले लोक्स दिसू लागले की दीस भरले समजून जायचं तर.... मला तूमच्या अनूभवांवर विश्वास आहे पण अनूमानावर तितकासा नाही, खरं खोट देवा़क काळजी - (काळजीवाहू) जिवनशून्य
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/04/2011 - 13:42

In reply to हम्म थोडक्यात मेलेले लोक्स by आत्मशून्य

Permalink

:)

थोडक्यात मेलेले लोक्स दिसू लागले की दीस भरले समजून जायचं तर.... मेलेले लोक दिसू दे नाही तर थेट मृत्यू आपल्याशी संवाद साधू दे. तसाही, मृत्यू आपल्या शेजारीच असतो. भरधाव जाणारी ट्रक आपल्या अगदी जवळून जाणे, दुकानाच्या पाट्या वाचत आपली बाईक चाललेली असतांना आपल्या समोर करकचून मोठ्या कंटेनरने लावलेला ब्रेक असू दे. बस मधे बसलेलो असू तर मोबाईलवर बोलत गाडी चालवणारा ड्रायव्हर अचानक ब्रेक लावतो तेव्हा आणि अशा अनेक प्रसंगात आपण मृत्यूच्या अगदी जवळ असतो. तर- संत-महंताप्रमाणे आपण मृत्यूला म्हणायचं की, अजून मानवलोकात माझ्या हातून भरीव असे खूप कार्य होणे बाकी आहे. कृपया मला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह धरु नये ही नम्र विनंती. आत्ता येतो म्हणायचं आणि तिथून कटायचं. :) असो, विषयांतराबद्दल क्षमस्व. अवांतर : 'मरणात खरोखर जग जगते' या बाळ सामंतांच्या पुस्तकात चित्रगुप्त लिहितात तसे अनेक प्रसंग आहेत. एकदा हे पुस्तक सर्वांनी वाचायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sun, 09/04/2011 - 22:30

In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

जेंव्हा डॉक्टर आपल्या बर्थ

जेंव्हा डॉक्टर आपल्या बर्थ सर्टिफिकिट वर सही करत असतो ना, तेंव्हाच आपण मरणाबरोबर एका करारावर सही करत असतो, त्यानं बोलावलं की विनातक्रार निघायचं अश्या आशयाचा करार असतो तो, त्यात अगदी व्यवस्थित तारीख वार वेळ पण टाकलेली असते, पण होतं काय आपण या जगात आल्याचा आनंद एवढा असतो की आपण ती तारिख वेळ लक्षातच ठेवत नाही, आणि मग निवांत जगत राहतो, ती तारीख ती वेळ फार लांब असल्याची स्वप्नं पाहात. पण एखादे वेळी स्वच्छ पाण्याच्या सरोवराचा तळ दिसावा तसं ते करारपत्र नजरेसमोर येतं अन लक्षात येतं की फार तास पण उरलेलं नाहीत आता, मरणाच्या आसपासच्या वेळचं संदर्भ आणि घटना विशेषतः म्हातारपणी मरण येत असेल तर, लक्षात ठेवणं शक्य असलं तरी विसराव्या अशाच असतात , त्यामुळं त्यातल्या त्यात ब-या गोष्टी आठवत असाव्यात. विझताना दिव्याची वात मोठी होते, त्या मोठं होण्यात जे चमकते ते समईचं पितळ अन वातीवरचं तेल, वातीच्या टोकाची काळजी दिसली काय अन नाहि काय, काही फरक पडत नाही. तसेच याक्षणी कशाला ते काळे क्षण आठवायचे, पितळयासारखी चमकणारी अन तेलासारखी मायेची माणसं आठवली म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by अनंत छंदी on Sun, 09/04/2011 - 13:29

Permalink

जुने विचित्र विश्वचे अंक पहा

विचित्र विश्व हे मासिक पूर्वी पुण्यातून प्रसिद्ध होत असे त्यात मृत्यूनंतरचे जीवन आहे तरी कसे? या नावाची लेखमाला प्रसिद्ध होत होती. त्यात या विषयावर प्रकाश पडू शकेल असा मजकूर प्रसिद्ध झाला होता असे आठवते.
  • Log in or register to post comments

Submitted by धष्टपुष्ट on Sun, 08/09/2020 - 12:51

In reply to जुने विचित्र विश्वचे अंक पहा by अनंत छंदी

Permalink

ते अंक अजून मिळतात का?

कुठे मिळतील याची कल्पना आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by विनीत संखे on Sun, 09/04/2011 - 13:43

Permalink

याचि देहि याचि डोळा

माझा 'याचि देहि याचि डोळा' अनुभव... माझ्या आईची मावशी जर्जर म्हातारपणी तिच्या गावी मृत्यूघंटेसमीप होती. तिला काही तासांत अग्निवश व्हावे लागणार हे अगदी तय होतं. माझ्या आईचं मावशीआजीशी मायेचं नातं होतं. कधीही आईला तिने फटकारलेलं किंवा ओरडलेलं आठवत नाही. स्वत:च्या मुलांवर मात्र तिची शिस्तीची वेसण होती. तरीही आईसारखी आईच ती. मावशीला तीन मुलं. सर्वात लहान मुलगी नर्मदा डोक्याने अधू. म्हणूनच मावशी आजीचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. नर्मदा मावशीला शहरात मोठ्या मामाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून ठेवलेलं. गावी सतराव्या वर्षी तिची कूस उजवली गेली होती. कुणी केली काय केलं काहीही माहित नाही. गर्भारपणात काळजी न घेतल्या कारणाने सातव्या महिन्यात अर्भक दगावलं. तेव्हापासून मावशी आजीने मोठ्या मुलाकडे, मामाकडे तिला ठेवलं होतं. मामाकडचे तिची 'त्यांच्या सोयीनुसार' काळजी घेत होते. आजी निर्वतली तेव्हा मी पंधरा वर्षांचा असेन. गावी सगळे मे महिन्यामुळे सुट्टीवर आलेले असल्याने आजीकडे तिला शेवटचं पाहायला म्हणून आलेले. दहा बारा लोकांचा गोतावळा तिच्या खोलीबाहेर होता. मधली मावशी बाजूच्या गावी दिली होती. तिच इतकी दिवस सांभाळ करत होती आजीचा. मोठा मामा गावी येण्याच्या मार्गावर होता. नर्मदा मावशीसहित सगळ्यांना घेऊन येत होता तो. संध्याकाळचे सात वाजले असतील. आई आणि मी आजीला बघायला खोलीत शिरलो. आजी जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत होती. आईला बाजूला बसून काहीच क्षण लोटले असतील तोच आजी किंचाळली.... "नमू नमू अगं पाय बघ. ट्रक बघ ट्रक बघ", आणि तशीच नर्मदा मावशीच्या नावाने असंबद्ध बरळू लागली. आईने गोंधळून मला विचारलं तर मीही जे ऐकलं तेच तिला सांगितलं. अर्थातच मर्त्यक्षणाला निकट असणार्‍या व्यक्तीचे बोलणे नेहेमीच लक्षात घेतले जात नाही. म्हणून मी आणि आईने तिच्या बडबडण्याकडे जास्त लक्ष दिले नाही. थोड्याच वेळात मामी आली. एकटीच मुलांसोबत. आईने विचारलं तर अगदी चिंतीत सुरात म्हणाली, "अगं रेल्वेस्टेशनाकडे हे आणि नर्मदा आमच्या मागून रस्ता क्रॉस करत होते. कडेला थांबलेले तर उलट्या बाजूने ट्रक आला आणि नर्मदेच्या पायाच्या बोटांवरून गेला. कळेचना काय करावं. मग तातडीन हे तिला हॉस्पिटलात घेऊन गेले. मला मुलांसोबत इथे पाठवलं. आठच्या एस्टीने येतील. बिचारी नर्मदा आईंच्या नावाने पाय पकडून बेंबीच्या देठापासून ओरडत होती. रडत होती. फ्रॅक्चर झालीच असणार बोटं..." ते ऐकून मी आणि आई अगदीच भेदरून गेलो.... नऊ वाजता नर्मदा मावशी आली तेव्हा आजीने प्राण सोडले. आईने नंतर हा प्रकार मामाला सांगितला तर तो घाबरून कोड्यातच पडला. ह्यापूर्वी कधीही नर्मदेला पायाला किंवा ट्रकने कुठलाही अपघात झालेला त्याला आठवत नव्हता की जेणेकरून आजीची ती स्मृती अशीच चाळवली गेली असेल. दहा मिनिटांपूर्वीची ही आपत्ती आपल्या मायेच्या लेकरावर कोसळलेली ह्या मृत्यूशय्येवरील आईला कशी कळली असेल? त्या काळी तर गावात फोन, मोबाईल वगैरे काहीच नव्हतं.... आजही आठवलं की तो अनुभव मन शहारून जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवट on Sun, 09/04/2011 - 13:53

In reply to याचि देहि याचि डोळा by विनीत संखे

Permalink

आयला

आयला
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sun, 09/04/2011 - 13:56

In reply to याचि देहि याचि डोळा by विनीत संखे

Permalink

यावरुन

बिकाकाकांची फेड.. कथाआठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by विनीत संखे on Sun, 09/04/2011 - 15:38

In reply to यावरुन by सहज

Permalink

ओएमजी. :-०

ओएमजी. :-०
  • Log in or register to post comments

Submitted by क्राईममास्तर गोगो on Sat, 09/10/2011 - 13:32

In reply to यावरुन by सहज

Permalink

कथा मस्तच आणि विनीतभाऊंचा

कथा मस्तच आणि विनीतभाऊंचा अनुभवही...
  • Log in or register to post comments

Submitted by बावळट on Sat, 05/11/2013 - 15:22

In reply to याचि देहि याचि डोळा by विनीत संखे

Permalink

बापरे

बापरे. असे आहे होय. कल्पनाही केली नव्हती कधी हे जर सर्व खरे असेल तर फारच आश्च्र्याचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 09/04/2011 - 17:46

Permalink

वरचे चित्र आवडले

वरचे चित्र फारच आवडले. विषयाला अगदी चपखल आहे. लहानपणी एकदा, हवायन जमातीतील वृद्ध मरणाची वेळ जवळ आली की होडक्यात बसून बुडत्या सूर्याच्या दिशेने समुद्रात प्रवास करतात असे वाचले होते. (खरे खोटे माहित नाही) पण या चित्रात प्रवाश्याला घेऊन जाणारा जो नावाडी आहे तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. डिस्क्लेमरः खालील विधाने ही माझी श्रद्धा नाही परंतु मी ती वारंवार ऐकली आहेत. खाली जी गोष्ट देत आहे ती खरीच असेल असे मी सांगत नाही, त्यावर माझा खूप विश्वास आहे असेही नाही पण ज्यांनी मला ती सांगितली त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अनेकांच्या मते मृत्यूच्या वेळेस तुमचे मृतआप्त तुम्हाला न्यायला येतात. त्या जगात किंवा ट्रान्झिशनच्या काळात तुम्हाला भीती, एकटेपणा किंवा गोंधळल्यासारखे होऊ नये म्हणून. यावर माझा फारसा विश्वास नसला तरी कल्पना अतिशय रोचक आहे हे मी आवर्जून नमूद करेन. आमच्या कुटुंबातील एकजण जे शिक्षणक्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत होते त्यांचे वडिल (जे प्रथितयश डॉक्टर होते) त्यांच्या मृत्यूसमयी घडलेली ही घटना आहे. स्थळ कोकणातले. वडिलांचा मृत्यू जवळ आला आहे हे कळल्याने हा मुलगा त्यांच्या जवळच बसला होता. पहाटेची वेळ होती. वडिलांचा हात मुलाच्या हातात होता. वडिलांची मती उत्तम कार्य करत होती पण ते अचानक हात सोडवून म्हणाले, "अरे, भाऊसाहेबा आलेत. तयार आहेस ना विचारताहेत." मुलगा चक्रावला कारण भाऊसाहेब हे त्याच्या वडिलांचे मित्र होते आणि ते वर्ष-दोन वर्षांपूर्वीच निवर्तले होते. थोड्याच वेळात वडिलांचा मृत्यू झाला. याच वेळी त्यांचे तिसरे मित्र मुंबईत राहत. ते पेशाने किर्तनकार होते (बाबाबुवा नाहीत). ते त्याच दिवशी पहाटे झोपले होते आणि अचानक पलंगावरून तोल जाऊन पडले. त्यांना विशेष लागले नाही परंतु ते आपल्या भाच्यासमवेत राहत (हा भाचा एक प्रसिद्ध लेखक आहे) तो उठून त्यांच्याकडे आला आणि विचारू लागला की 'असे कसे पडलात?' तेव्हा हे मित्र म्हणाले की "स्वप्नात भाऊ आले होते, म्हणाले 'अरे उठ उठ! झोपतोस काय? डॉक्टर येताहेत!' काहीतरी घडले आहे. मन धास्तावते आहे." त्यांनी आग्रहाने भाच्याला चौकशी करायला सांगितली असता काही काळाने (तो फोन वगैरेचा जमाना नव्हता) त्यांना वरली गोष्ट कळली.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 09/04/2011 - 21:00

Permalink

वरील चित्राविषयी माहिती

हे चित्र 'Isle of the Dead ' नामक असून 'Arnold Böcklin' या चित्रकाराचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 09/04/2011 - 23:21

In reply to वरील चित्राविषयी माहिती by चित्रगुप्त

Permalink

धन्यवाद

माहितीबद्दल अतिशय आभारी आहे. फारच सुरेख चित्र आहे. मोहवून टाकणारं. मला मिळालं तर मीही नक्की घरात लावेन. वरील धाग्यात म्हटल्याप्रमाणे मलाही आधी ग्रीक पुराणांतील केरन हा मृतात्म्यांना पाताळाकडे नेणारा नावाडी वाटला पण त्याच्यासोबत असणारे मृतात्मे वरील चित्रातील मृतात्म्याप्रमाणे निर्धास्त दिसत नाहीत. वरील चित्रातील मृतात्म्याची जी स्थिती आहे ती डुचमळणार्‍या होडक्यातही अतिशय सहजपणे आणि निर्धास्त असणारी आहे. केवळ नावाड्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारी व्यक्तीच त्या होडक्यातही इतक्या शांत आणि धीरगंभीर अवस्थेत उभी राहू शकते. अप्रतिम! फारच आवडले मला हे चित्र.
  • Log in or register to post comments

Submitted by ईश आपटे on Sun, 09/04/2011 - 22:46

Permalink

हॅरी पॉटर मध्ये डेथ्ली हॅलोचा

हॅरी पॉटर मध्ये डेथ्ली हॅलोचा दगड अशाच प्रकारे मेलेल्या पूर्वजांना जवळ आणतो. व मृत्युची तयारी करतो...
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 09/05/2011 - 07:22

In reply to हॅरी पॉटर मध्ये डेथ्ली हॅलोचा by ईश आपटे

Permalink

उत्तम निरीक्षण..

मृत्यूच्या भेटवस्तूंमूळच असं घडत हे काही माहीत नाही पण हॅरी जेव्हां मरणाला सामोरा जायला तयार होतो तेव्हां त्याचे (मेलेले) आइ, वडील, गॉडफादर व आवडते शिक्षक समोर अवतरतात व त्याच्याशी संभाषण करतात हे मात्र खरयं. ते बघता आपण मरण्यापूर्वी आधीच मेलेले लोक्स दिसू शकतात म्हणायला जागा आहे ;) बाकी पितृपंधरवडा वगैरे बाबतही माहीती मिळाली तर बरं होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 04/23/2012 - 08:50

Permalink

ह्ही...ह्ही...हा...हा....हा..

ह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू.....................त ;-) अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार.... सुरवात-नेहमी स्वतःपासून करायची असते,असे म्हणतात ना कायसे? म्हणून पहिला खेळ आमचा--- स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घर हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक येते) काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... ही:हा... :-) चला........सगळी पूर्व तयारी तर ठीक झाली अता आपण शरीराची त्वचा,....त्वचाच म्हणतात ना तीला? :-p स्वारी त्याला?...अं...अं...हं....तर त्वचा थरथरे पर्यंत त्या वातावरणात राहू.चला तर मग त्या ऐतीहासीक पडवीत,,पडवीच्या मागे १ 'आड' आहे,त्यामागे वाडी...आज कुणाचं तरी वर्षश्राद्ध झालेलं आहे आणी वाडीचा नैवेद्य कुत्र्यानी वगैरे खाल्लेला नसून तो आपोआप गायब झाल्याची वदंता आहे,,,या पार्श्व-भूमीवर काही स्त्रीया गुप्त खलबंतं केल्याप्रमाणे पडल्या/पडल्या सुरू होतात... स्त्री १-काय गं झोप लागत्ये? स्त्री २- नाय बा,,,लागेल कशी?तुला कळ्ळ नाय? स्त्री१- (दबक्या आवाजात) का$$$$य? ते पान ना? त्यात काय कळायचय मेलं? अत्रुप्ती हो...दुसरं काही नाय स्त्री२-मला वाट्टं,पलीकडचे मामा स्त्री१- कोण? गेल्या आषाढात गेले ते? स्त्री२-नाय तं काय? इतका अत्रुप्त दुसरा होता का तरी कोणी गावात? स्त्री१-हो बाई,ती पलीकडची कुमुद आहे ना,ती म्हणत होती दुपारी शेणकीत शेण टाकायला आली तेंव्हा तीला हे आपण वाडीला ठेवलेलं पान हलताना दिसलं म्हणे... स्त्री२-होय की काय? आणी गं म ? स्त्री१- तिचं तेच म्हणण हो,,,मामांचं त्यांच्या पोरांनी काही मंजे का...ही केलन नाई ना,त्याचा परिणाम स्त्री२-जळो मेलं,तरीच मी म्हण्ट्ये...स्वतःचा चहा ढोसल्यावर सुधा,दुसय्राच्या कपावर मेल्याची भारी नजर असायची,,,माणसं जगतात ती जगतात आणी मेल्यावर सुद्धा स्वभाव जरा देखिल बदलत नाही हो... एवढ्यात स्त्री क्रमांक-१ चा दिवटा (वय-साधारण-८/९) ''आई पोटात मळमळतय...'' म्हणुन रडत उठतो.. स्त्री१- जरा मेलं निजल्ये नाई त आली ही ब्याद ...पोराला - काय रे मेल्या,काय झाल?वावडींग घातलवतं ना संध्याकाळी तूला? पोरगा-आई,,उलटी होत्ये...वळचणीचा लाइट लाव ना..आणी तू पण ये...हो... मला भीती वाट्टे एकट्याला...स्त्री१ पोराच्या पाठीत धपाटा घालत...'चल हो पुढे'....बाहेर जाऊन पोर बकाबका ओकतं....आणी स्त्री१ला धक्का बसतो.... स्त्री१-(मोठ्यांदी ओरडते)काय कार्ट आहे मेलं स्त्री२-(लगबगीनं बाहेर येउन)- काय गं आता उलटी झाली त पोरावर चिडत्येस कसली? स्त्री१-अगो...काल पासून पोट दुखत होत म्हणून लंघन करायला भाग पाडल ना याला,,,आणी उलटी मधे हे भरड्याच्या वड्याचे भरा भरा खाताना अर्धे चावलेले तुकडे पडलेत...अगो ते पान दुसय्रा कुणी खाल्लन नाइ...हाच आमचा मेला भस्म्या...अता गोठ्यात डांबते...आणी चांगलं २/४ दिवस ठेवते हो उपाशी.....वगैरे वगैरे..... देन चिंटू, ट्येल मी,,,व्हाट इज दी मॉराल आफ श्टोरी...?--- खय्रा गोष्टी जो पर्यंत उजेडात येत नाहीत तोपर्यंत खोट्या गोष्टीच खय्रा असतात ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अगोचर on Mon, 09/05/2011 - 00:45

Permalink

भूतकाळ की भविश्यकाळ

माझे आजोबा काही दिवसांपुर्वी वारले. जाण्यापुर्वी काही वेळ मी त्यांच्या जवळच आहे असे त्यांना जाणवत होते. प्रत्यक्षात मी त्या खोलीत सुमारे पंधरा दिवसांनी पोचलो. ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 09/05/2011 - 01:22

In reply to भूतकाळ की भविश्यकाळ by अगोचर

Permalink

त्यात कसा काय येणार भविष्य

त्यात कसा काय येणार भविष्य काळ?....अहो मरण समयी (आणी म्हातारपणी सुद्धा) माणसाची बुद्धी अपंग झालेली आणी भावनेच्या ताब्यात असते,,,त्यामुळे सारखी जवळची माणसं भेटावीत असं जे मनापासून वाट्टं ,त्याचाच तो परीणाम,की त्या व्यक्तीला वारंवार चिंतन केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आहेत असा भास होतो....हा सगळा विषय मानस शास्त्राचा आहे...आपण मन आणी मनाचे रोग/आजार यावरील पुस्तकं वाचा आपल्यालाही कळुन येइल... अवांतर-@- ''मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान '' हे तुमच आवडतं तत्वज्ञान आहे काय? मग त्याच्या विसंगत तुंम्ही स्वतः तरी का वागता? तर्काचा विचार ''यात'' चालत नाही असं म्हणता,तर मग तुमच्या बाबतीतल्या वरील घटनेचा अन्वयार्थ तुंम्ही ''ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?'' असा तर्क बांधुन का बंरं काढता?
  • Log in or register to post comments

Submitted by अगोचर on Mon, 09/05/2011 - 00:46

Permalink

भूतकाळ की भविश्यकाळ

माझे आजोबा काही दिवसांपुर्वी वारले. जाण्यापुर्वी काही वेळ मी त्यांच्या जवळच आहे असे त्यांना जाणवत होते. प्रत्यक्षात मी त्या खोलीत सुमारे पंधरा दिवसांनी पोचलो. ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 09/05/2011 - 04:15

Permalink

हे चित्र

या चित्राची आणखी एक आवृत्ती: Image removed. ही चित्रे इथे वा इथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 09/05/2011 - 07:09

Permalink

मृत्यु !

आपण जस जसे वाढत जातो तस तसे याचे अनेकविध अनुभव आपल्याला येतात अन हलकेच का असेना पण आपल वि़ज्ञान कर्मठ मन स्वतःलाच प्रश्नांची फैर झाडु लागत. माझ्या आज्जी वारल्या तो क्षण ! सकाळी अगदी संपल सार म्हणुन रडारड झाली पण बस एक मंद श्वास चालु होता. दुपारी अगदी रात्र असल्या सारख सार घरदार झोपी गेल, अर्थात त्यातच मीही. अचानक स्वप्न पडल, एक तुळशी वृंदावन फुटुन माझ्या हाती दागिन्यांची संदुक आल्याच , मी त्या स्वप्नातही त्या संदुकी पेक्षा वृंदावनाच्या फुटण्यान धसकले अन जागी झाले. तशीच वर, जेथे मोठ्या आईंना ठेवल होत तिथे गेले. खोलीत कुणीही नव्हत, सारे काका आत्या, अन वडील सार्‍या खोल्यां मधुन विखुरलेले. जाउन त्यांच्या कॉट च्या दांड्याला धरुन उभी होते अन बघता बघता आईंचा चेहरा बदलला, वार्धक्यान सुरुकुतलेला तो चेहरा बघता बघता तजेलदार, झर झर बदलत गेला, झटदीशी डोळे उघडले, ( त्या आधी त्या आठ पंधरा दिवस कोमात होत्या) मी पाहिलेले त्यांचे डोळे हे काहीसे पांढरट...पण हे डोळे अगदी ठसठशीत्...पण त्या कुणाकडेही वा कुठेही पहात नव्हत्या. नजर वर्...अन बघता बघता आ वासला गेला , शरीर थोडस वर उचलल्या सारख, छाती पर्यंत , अन त्या तोंडातुन एक दिर्घ श्वास वा आवाज, वा मला नेमक नाही सांगता येत, काही तरी , जणु कुणी त्या आ वासलेल्या तोंडातुन काही ओढुन घेत आहे. अर्ध्या मिनिटाचा खेळ असेल हा सर्व. मी अवाक ! अन त्या परत खाली होत्या तश्या बेडवर, मला आवाज फुटला, आईंनी डोळे उघडले, आईंनी डोळे उघडले ! सारे धावले, पण त्या गेल्या होत्या. का कुणास ठाउक पण अस वाटल नेणार कुणी तरी तिथे होत, अदृष्य ! तेंव्हा हा मनाचा खेळ मानावा की काय हा प्रश्न पडला, पण मग असाच एक प्रसंग पुन्हा आयुष्यात आला. माझ्या मोठ्या आत्या..ज्या रुईया कॉलेज मध्ये इतिहास शिकवत, ब्रेन हॅमरेज नंतर तश्या ठिक झाल्या होत्या. व्यवस्थित चालत बोलत, पण त्यांनी ज्या त्यांच्या एका मुला साठी हा जीव सांभाळला होता तो साधारण रिटार्ड मुलगा अचानक वारला. त्याच्या मृत्युच्या सोळाव्व्या दिवशी या अचानक कोसळल्या, मुंबई ती. लगेच अँब्युलन्स आली अन त्यांना अ‍ॅडमिट केल. मी ही तेंव्हा मुंबईतच अन भावाच्या मृत्यु मुळ त्यांच्या कड रहात असलेली, माझी त्यांच्या जवळ बसायला नियुक्ती. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी डोळे उघडले, अन मला म्हणाल्या शंकर मामा आलेत, मग म्हणाल्या सुशी मावशीच्या भाकरी वाजताहेत. आता हे सर्व जण मरुन साधारण दशक लोटलेल. मला भिती वाटली , मी म्हंटल, राहु दे तुम्ही पाणी घ्या थोड , मला म्हणाल्या अग आता नको पाणी ती लोक वरवंटा रेटताहेत. आता मात्र मी घाबरले. पण एव्हढ्या सकाळी घरुन कुणी आल ही नव्हत. त्या सारा वेळ ती दोघेजण वरवंटा रेटताहेत हे सांगत राहिल्या. आणि मग झोपुन गेल्या, सायंकाळी अक्षरशः पल्स नुसती खाली खाली जात राहिली, अन मग एका क्षणी स्थिरावली, तशीच लो पल्स रात्रभर, अन पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी माझी नेमणुक दवाखान्यात. आज त्यांनी डोळे उघडले अन ती सारी माणस कुठ गेली ? हा पहिला प्रश्न . त्या नंतर त्या दोन वर्ष राहिल्या, पण एकदाही बोलु नाही शकल्या. एकदाच, त्यांचे अजुन एक नातेवाईक वारले; जे आम्ही त्यांना सांगितल नव्हत, तेंव्हा ते बाहेरच्या खोलीत बसलेत अस म्हणाल्या. पण तिथुन पुढे कधीही वाचेने संभाषण झालच नाही. अर्थात हे कुठे ऐकिव अस नाही, जे अनुभवल, अन खरच अतर्क्य वाटल ते सांगायचा प्रयत्न.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 09/05/2011 - 09:54

In reply to मृत्यु ! by स्पंदना

Permalink

तुमचे अनुभव खरंच मनात रुतून राहण्याजोगे

आहेत. आपल्याला नजरेला दिसतं आणि तर्काने जाणता येतं त्यापेक्षा बरंच काही आजूबाजूला असू शकेल असं वाटत राहतं हे मात्र खरं आहे. -रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 09/10/2011 - 15:55

In reply to मृत्यु ! by स्पंदना

Permalink

खूप प्रयत्न करुनसुद्धा

खूप प्रयत्न करुनसुद्धा विश्वास ठेवता येत नाहीये. विशेषतः पहिल्या अनुभवाबाबत.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 09/10/2011 - 16:35

In reply to खूप प्रयत्न करुनसुद्धा by अप्पा जोगळेकर

Permalink

विशेषतः पहिल्या अनुभवाबाबत...

अपा जोगळेकर यांचा प्रतिसाद.... .......खूप प्रयत्न करुनसुद्धा विश्वास ठेवता येत नाहीये. विशेषतः पहिल्या अनुभवाबाबत..... कुणाच्या पहिल्या अनुभवाबाबत म्हणता ?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 09/05/2011 - 10:23

Permalink

यात काही गूढ असेलच असं नाही.

यात काही गूढ असेलच असं नाही. पण मरण्यापूर्वी काही लोक एकदम वेगळं काहीतरी बोलतात हे पाहिलेलं आहे. माझी आजी माझ्या घरीच असताना गेली. ती अनेक दिवस हाल सोसून गेली. शेवटी ती वेळ जवळ आली आहे असं आम्हाला नक्की कळलं होतं. तरीही त्यानंतर सात दिवस ती जगली. त्यावेळी तिच्या असंबद्ध बोलण्यात शेतजमिनीचे संदर्भ यायचे. चल लगेच तिकडे जाऊन येऊ शेतावर.. इथेच जवळच तर आहे गाव वगैरे असं ती म्हणायची. आमची शेतजमीन ३० वर्षे कोर्टप्रविष्ट होती आणि त्यामुळे ती आमची नव्हतीच. नंतर ती गेल्यातच जमा असल्याने तिचा नाद सर्वांनीच सोडून दिला होता. त्यानंतर वडील, आजोबा असे सगळेच स्वर्गवासी झाले. आजी एकटीच उरली होती. तिला बहुतेक त्या शेतजमिनीचं मनात राहिलं असावं. ती गेल्यावर एका वर्षातच त्या केसची तारीख पडल्याचं मला योगायोगाने कळलं.. (मूळ व्यक्तींपैकी कोणीच हयात नाही आणि पत्ताही सत्रांदा बदललेला). आणि एकाच तारखेत निकाल लागून जमीन परत मिळून गेली. आजी मात्र ते पहायला नव्हती. नंतर नंतर शेवटचे दोनतीन दिवस इथे अनेकांनी उल्लेख केल्याप्रमाणे तंतोतंत ती सर्व मृत लोकांशी तपशीलवार बोलत असताना ग्लानीअवस्थेत दिसायची. तिची दोन्ही मुले अकाली गेली होती. त्यांच्याशी म्हणजे माझ्या बाबा आणि काकांशी ती बोलत असायची. तू माझ्याआधी कसा गेलास रे वगैरे असं. आणखी कुणीतरी म्हटल्याप्रमाणे (मृत व्यक्तींपैकी पण तिच्या दृष्टीने सत्य) कोणीकोणी इथे आले आहेत, त्यांना चहा कर, भात टाक वगैरे असं बर्‍याचदा झालं होतं. हे सर्व मी पूर्वी इतरांबाबतीत ऐकलं पाहिलं असल्याने मला त्यात काही अनएक्स्प्लेनेबल वाटलं नाही. तिच्या मेंदूला रक्तपुरवठा अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे मेंदूचं काम बिघडून भास होणं ही सरळ शक्यता नाकारुन काहीतरी अतींद्रीय असेल असं मला त्यावेळीही वाटलं नाही आणि आताही वाटत नाही. शिवाय माझ्या आजीच्या दीर्घायुष्यामुळे (सुमारे ८५) तिच्या आठवणीतले आणि सोबतचे (अतएव भासांमधे जाणवू शकणारे) जास्त लोक ऑलरेडी मृत आणि फार कमी लोक जिवंत होते हीदेखील लक्षात घेण्याजोगी बाब आहे. साधारण मरणार्‍या व्यक्तीबाबत गूढ अनुभव यांच्याबाबतीत खालील गोष्टी होत असाव्यात: १) व्यक्तीच्या मरणाचा एक करुण पडदा या अनुभवकथनाच्या पार्श्वभूमीवर असल्याने त्याला एक सहानुभूती आपोआप मिळते २) आता ती व्यक्ती हयात नसल्याने तर्क/वाद/प्रतिवाद यांचा प्रश्नच नसतो. मृताविषयी जास्त विश्लेषण नकोच म्हणून. आपल्याला एक्स्प्लेन करता येत नाही अशा असंख्य गोष्टी जगात आहेत. देव, आत्मे वगैरे सगळं असू शकेल. पण हा प्रकार त्यातला वाटत नाही असं मत मांडू इच्छितो. त्यापेक्षा गूढ अशा अनेक गोष्टी आपल्या जिवंतपणीच घडत असतात, पण त्या किती विलक्षण गूढ आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही. आपलं जिवंत असणं आणि जिवंत राहाणं हे त्यापैकी एक. त्यामागे असलेली शरीरयंत्रणा. गर्भावस्थेत हृदयाची ठकठक पहिल्यांदा सुरु होते तो क्षण आणि त्यामागची प्रेरणा.. अशा असंख्य गोष्टी जास्त गर्द गूढ आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 09/10/2011 - 15:59

In reply to यात काही गूढ असेलच असं नाही. by गवि

Permalink

व्वा. तर्कशुद्ध प्रतिसाद

व्वा. तर्कशुद्ध प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sat, 09/10/2011 - 19:33

In reply to यात काही गूढ असेलच असं नाही. by गवि

Permalink

छान प्रतिसाद!

या निर्जीव विश्वात जिवंतपणा हाच चमत्कार आहे. पण आपण तो इतका गृहीत धरतो की त्यात काही विशेष आहे असे आपल्याला वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 09/10/2011 - 20:54

In reply to छान प्रतिसाद! by नगरीनिरंजन

Permalink

निर्जीव विश्व? ते कसं काय बॉ?

निर्जीव विश्व? ते कसं काय बॉ? निसर्गात तर सतत काही ना काही घडतच असते आणि ते निर्जीव असते तर काहीच घडले नसते...माणसाचा मेंदू जरा जास्तच काम करत असल्याने असले काय काय अनुभव येतात अन शिवाय ते असे दुसर्यांना सांगता येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sun, 09/11/2011 - 06:22

In reply to निर्जीव विश्व? ते कसं काय बॉ? by शिल्पा ब

Permalink

निर्जीवच.

पृथ्वी सोडून इतरत्र जिवंतपणाची खूण अजून सापडलेली नाही. अब्जावधी ग्रह-तार्‍यांमध्ये जिवंतपणाचे प्रमाण अतिनगण्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 09/11/2011 - 08:08

In reply to निर्जीवच. by नगरीनिरंजन

Permalink

<<<पृथ्वी सोडून इतरत्र

<<<पृथ्वी सोडून इतरत्र जिवंतपणाची खूण अजून सापडलेली नाही. अब्जावधी ग्रह-तार्‍यांमध्ये जिवंतपणाचे प्रमाण अतिनगण्य आहे. अजुन हा शब्द महत्वाचा आहे. विश्वाचा पसारा प्रचंड आहे आणि अजुन मानवाचे यान त्याच्या सुर्यमालेबाहेर गेले नाही; जिथे पृथ्वी अन त्यावरील जिवजंतु निर्माण करण्याची उर्जा आहे ते निर्जीव कसे?
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sun, 09/11/2011 - 14:47

In reply to <<<पृथ्वी सोडून इतरत्र by शिल्पा ब

Permalink

>>जिथे पृथ्वी अन त्यावरील

>>जिथे पृथ्वी अन त्यावरील जिवजंतु निर्माण करण्याची उर्जा आहे ते निर्जीव कसे? आपण रूढार्थाने ज्याला जिवंत असणे म्हणतो त्याबद्दल मी बोलतोय. सजीव निर्माण करण्याची ऊर्जा आहे म्हणून विश्व निर्जीव नाही असे म्ह्टले तर माणूस कधी मरतच नाही असे म्हणावे लागेल. कारण, त्याची ऊर्जा आणि शरीरघटक अस्तित्वात राहतातच. इतरत्र जीवसृष्टी सापडली तरी प्रत्येक ग्रहगोलावर सजीव नसल्याने विश्व हे मुख्यतः निर्जीवच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 09/11/2011 - 14:59

In reply to <<<पृथ्वी सोडून इतरत्र by शिल्पा ब

Permalink

ओ मॅडम!

अजुन मानवाचे यान त्याच्या सुर्यमालेबाहेर गेले नाही
सुर्यमालेची डेफिनीशन जरा प्राब्लेमाटिक आहे, पण आमचं पह्यलं वोयाजर गेलंकी कवाच प्लुटो फिटोच्या फुडं!! फकस्त निरीक्षण नोंदवून राह्यलो, बाकी ते तुम्हा दोघांचं चालूंद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Mon, 09/12/2011 - 00:02

In reply to ओ मॅडम! by Nile

Permalink

तुमचा नाय गेल

तुमचा नाय गेल भायेर ? आमचं तर गेला होतं की वो, पर दोन क्वाटर ज्यास मारायला लागलं इतकच.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 09/05/2011 - 10:36

Permalink

माझ्या आजीनं (आईची आई)

माझ्या आजीनं (आईची आई) होळीच्या दिवशी पुरणपोळी मन लावून खाल्ली आणि पुढच्या होळीला ती नसणार हे (तब्येत ठणठणीत असताना) जाहिर केलं होतं. पुढं दोनेक दिवसातच काहीही झालेलं नसताना अचानक गेली. ती गेल्या दिवशीचे सोपस्कार उरकून आई घरी आली आणि रात्रभर दोघी मायलेकी गप्पा मारत होत्या. मी शेजारीच झोपलेली असून काही समजले नाही पण आई जागी असल्याचे मात्र माहीत होते. दुसरी आजी मात्र हाल सोसूनच गेली पण माझ्या आईकडून खूप सेवा करून घेतली. काही काळजी वाटत असेल तर मला कधीही बोलव असं आईला निवर्तण्याच्या आधी सांगून गेली होती. एकदोन वेळा काही काळज्यांनी आई रात्री जागी असताना आजीची आठवण आली तर ही दाराशी बसून जप करताना आईला दिसली. मला सांगितल्यावर अंगावर सरसरून काटा आला. वरच्या दोन्ही घटनांमध्ये आधी गेलेल्या कुणाशी बोलणं झालं होतं की नाही हे माहित नाही पण हे अगदी घरात घडलेले प्रसंग आहेत. मला समजल्यावर अजूनही घाबरायला होते.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/05/2011 - 12:11

Permalink

धन्यवाद.

रोज तुमचा एकतरी विचार करायला लावणारा, एक वेगळीच दृष्टी देणारा लेख मिपावर येतोच. त्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Mon, 09/05/2011 - 16:30

Permalink

काहीतरी गुढ असावेच..

विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही.. माझ्या आई वडिलांबाबत असेच झाले. वडिल गेल्यावर १५ दिवसांत आई गेली. जायच्या आधी आई दोन दिवस ग्लानीतच होती. त्यावेळी मला म्हणायची की तुझे बाबा आहेत येथे..तसेच दादा (म्हणजे आईचे वडिल) पण आहेत.. त्यावेळी वाटत होते की तापातच बोलत असेल.. माझ्या आईला खुप स्वप्ने पडायची. दर महिन्या दोन महिन्यातून कोणतरी गेलेली व्यक्ती तिच्या स्वप्नात येऊन काहीतरी सांगायची..त्यामुळे मला आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिचे असे सांगणे म्हणजे नेहमीचाच प्रकार वाटला होता. थोडे अवांतर : माझ्या बाबांची आई माझे बाबा लहान असतानाच गेली. पण ती मात्र माझ्या आईच्या स्वप्नात यायची. माझ्या आईने तिचा (म्हणजे तिच्या सासूचा) फोटो पण पाहिला नव्हता पण त्या कश्या दिसतात हे सर्वांना सांगितले होते. असे बरेच गेलेले नातेवाईक आईच्या स्वप्नात यायचे आणि बरेच काही सांगायचे. जसा जसा मी मोठा झालो, तसे मला आईचे ते स्वप्नांबद्दल सांगणे या गोष्टी म्हणजे तिच्या मनाचे खेळच वाटायचे. . म्हणूनच आईच्या शेवटच्या दिवसात यावर विश्वास बसला नव्हता. पण आज इथे बाकीच्या लोकांचे अनुभव वाचून असे वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी...
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 09/05/2011 - 17:13

Permalink

अनुभव वाचून वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी...

आज इथे बाकीच्या लोकांचे अनुभव वाचून असे वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी... ------ मलाही असेच वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Mon, 09/05/2011 - 17:21

In reply to अनुभव वाचून वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी... by चित्रगुप्त

Permalink

सत्यासत्यता

अशा गोष्टींत तथ्य असते की नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही. कदाचित, वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ती केवळ मनाची स्थिती असेल. पण अशाप्रसंगी आपण दु:खी असतो. सारासार विवेक दूर ठेवलेला असतो. जाता जीव जातो पण विचार करायला आपल्याला मागे ठेवतो. अशावेळी, त्या जिवांना तारून नेणारे, सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे या विचाराने आपल्याला दिलासा मिळत असेल तर तो मिळवावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Mon, 09/05/2011 - 17:42

In reply to सत्यासत्यता by प्रियाली

Permalink

हे एकदम बरोबर

अशावेळी, त्या जिवांना तारून नेणारे, सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे या विचाराने आपल्याला दिलासा मिळत असेल तर तो मिळवावा असे वाटते. +१०००००००० या वरील वाक्याने मला खरोखर दिलासा मिळाला. असे कोठेतरी वाचले की गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते की आपण हे जग सोडले आहे. किंवा ती व्यक्ती हे मानायला तयार नसते की आपले निधन झाले आहे...त्यामुळे त्याला समजावयाला त्याचे जवळचे आधी गेलेले मित्र, नातेवाईक त्याला येऊन भेटत असावेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 09/05/2011 - 23:20

In reply to हे एकदम बरोबर by योगी९००

Permalink

गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते

गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते की आपण हे जग सोडले आहे.
हा हा हा तूम्ही नाइट शामलन चे चित्रपट फार मनावर घेता बूआ ;) तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते :) अवांतर:- जन्माला आल्यावर अस्तित्वात आलो आहोत याचीच मूळात जाणीव/स्मृती नसते. तसं काही मेल्यावर होतं काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 09/05/2011 - 23:23

In reply to गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते by आत्मशून्य

Permalink

वेलकम टू द मॅट्रिक्स!

वेलकम टू द मॅट्रिक्स! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 09/06/2011 - 17:25

In reply to गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते by आत्मशून्य

Permalink

@---''तस या न्यायाने

@---''तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते''---@ या टाकलेल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या ।ह्ही ह्ही ह्ही .....हा हा हा। (आसूरी आनंद झाल्याची स्माइली) :bigsmile: वाहव्वा,,,क्या विकेट निकाल्या है,आत्मशून्य .....वो मौके पे चौका मार रहे थे,लेकीन तुमने तो उनकी तीनो डंडीयां उडा दी...
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Tue, 09/06/2011 - 17:45

In reply to @---''तस या न्यायाने by अत्रुप्त आत्मा

Permalink

आत्म शून्य यांच्या प्रतिसादात

आत्मशून्य यांच्या प्रतिसादात खालील दोन्ही वाक्ये आहेतः ....तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते .... आणि ..... जन्माला आल्यावर अस्तित्वात आलो आहोत याचीच मूळात जाणीव/स्मृती नसते......
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 09/06/2011 - 19:59

In reply to आत्म शून्य यांच्या प्रतिसादात by चित्रगुप्त

Permalink

चित्र गूप्त साहेब, ती दोन

चित्र गूप्त साहेब, ती दोन वाक्ये जाणिवपूर्वक टाकली आहेत आणि समान वाटत असली तरी फरक आहेच. आणि कूठेतरी माझ्या मनातल्या शंकेला वाटही देतोय.... :) फरक हा की नवजात बालक स्वतःला मृत मानत/घोषीत करत नसतं(मृत प्रिटेंड करत नसतं) तर शारीरीक द्रूश्ट्याच त्याच मन कोणताही विचार करायला, समजायला वास्तवाचे संपूर्ण भान यायला अपरीपक्व व दूर्बळ असतं. पण मृत झालेल्या व्यक्तीच्या मनाचा आधीच पूरेसा विकास झालेला असेल तर तो मेल्या नंतरही स्वतःच जड शरीर तितकच जिवंत समजत असेल असं वाटत नाही. असं म्हणतात की मेल्या वर आधी बाकीचे सर्व सेन्सेस आणि कंट्रोल्स जातात... ही गंमत आहे खरी... म्हणजे असं बघा की तूम्ही स्वतः अद्रूश झालात तर तूम्ही आंधळेही बनणार. कारण नीयमच असा आहे की जर द्रूष्टी पटलावर प्रकाश कीरणे आदळतात व त्याचे ज्ञान आपल्या मेंदूला म्हणजेच आपल्याला होते. पण जर ही प्रकाश किरणे द्रूष्टी पटलाला न थडकता त्याच्या पलीकडे आर पार गेली तर आपल्याला काही दिसणारच नाही म्हणजेच आपण अद्रूश्य असू तर आंधळेही बनू. हीच गोश्ट मृत्यूमूळे इतर सर्व ज्ञानेंद्रीयांबाबत लागू पडते. आणि शंका ही की आता शरीर गेले तर आपण संवेदनाहीन बनणार यात संशय नाय.. पण जर जागृत मनाचं अस्तीत्व मृत्यूनंतरही रहात असेल तर असं काही घडायची शक्यता नाही कारण.. आपलं मन आपल्याला स्वप्नात गूंगवून ठेवायला पूरेसं आहे, जे आपण सत्यच मानत राहू वा थोडक्यात आपल्याला शरीर आहे असं भास निर्माण करायला पूरेसं आहे ... आपले मृत नातेव्वैक व इतर लोकही भेटवायला पूरेसं आहे... मग मृतच लोक का व कशाला ? जर खेळ केवळ मनाचा आहे तर ते जिवंत लोकही भेटवू शकेल ना... थोडक्यात बिकांनी मस्त प्रतीक्रीया लिहली आहे वेलकम टू द मॅट्रिक्स! :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com