Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रमताराम on Sat, 02/19/2011 - 22:12
आम्ही हल्ली विचार करतो. नाही म्हणजे मोठेमोठे विषय झेपत नसल्याने जे सहज जमेल अशा त्यातल्यात्यात साध्यासुध्या विषयावर जरा सराव करतोय. एकदा जमले की मग थोडे गंभीर विषयांवर ट्राय मारूया असा विचार आहे. चला नमनाला घडाभर तेल नको. तर आजचा विषय आहे 'क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?' थोडंसं इस्कटून सांगतो. क्रिकेटमधे तीन प्रकारचे खेळाडू असतात, किंवा यातले खेळाडू तीन प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडतात, ते फलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात किंवा गोलंदाजी करतात. यातले क्षेत्ररक्षण हे मैदानावर बहुसंख्येने असले तरी ते तुलनेने दुय्यम असतात, मूळ लढाई ही गोलंदाज नि फलंदाजात असते. पण मुद्दा असा आहे की हा खेळ या दोघांना समान संधी देतो की नाही. आम्ही जरा पटापट आठवतील तशा नोंदी केल्या. त्या इथे वटकावतो (कॉपीराईटः धमु) आहे.
  1. एखादा फलंदाज बाद आहे असे अपील झाले असता जर निश्चित निर्णय करता येत नसेल तर ’संशयाचा फायदा’ फलंदाजाला दिला जातो. (चला ठीक आहे, तो एकदा बाहेर गेला की त्याला दुसरी संधी मिळत नाही म्हणून हे योग्य म्हणूया.)
  2. हल्ली एकदिवसीय नि वीस-वीसच्या जमान्यात गोलंदाजाला लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याची सोय नाही, लगेच वाईड दिला जातो, ज्याचा अर्थ प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
  3. षटकात एकच बाउन्सर (डोक्यावरून जाणारा) टाकण्याची परवानगी आहे. दुसरा टाकल्यास तो नोबॉल ठरवून पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
  4. फलंदाजाच्या कंबरेच्या वर फुल्टॉस टाकल्यास नोबॉल दिला जातो नि यावर फलंदाज बाद दिला जात नाही. पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही. असे चेंडू एका सामन्यात दोनदा टाकल्यास पंच त्या गोलंदाजावर त्या सामन्यापुरती बंदी घालू शकतात. अशीच बंदी फलंदाजाच्या एखाद्या फटक्याबद्द्ल घातली जात नाही.
  5. याशिवाय पारंपारिक कसोटी क्रिकेटमधून आलेले नोबॉल नि वाईड आहेतच. जिथे पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
  6. आणखी एक जिझिया कर म्हणजे एकदिवसीय नि वीस-वीस क्रिकेटमधे क्रीजपुढे पाऊल आल्याने नोबॉल ठरलेल्या पुढच्या चेंडूवर फ्री-हिट बहाल केली जाते. म्हणजे नोबॉलवरच नव्हे तर पुढच्या चेंडूवरही फलंदाज बाद होऊ शकत नाही. हा अन्याय नव्हे काय?
  7. लेग-बिफोर अर्थात पायचीतचे अपील केलेला चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीबाहेर (पक्षी: लेगस्टंप) असेल तर भले चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळणार असेल तरी फलंदाजाला पायचीत दिले जात नाही.
  8. फलंदाजाला ’रनर’ अर्थात धाव-मदतनीस असतो. त्याच्या मदतनीसाने धावलेल्या धावा त्याच्या नावावर नोंदल्या जातात. क्षेत्ररक्षक देखील काही काळ मैदानाबाहेर जाऊन आराम करतो, ज्या काळात त्याच्याऐवजी बारावा खेळाडू क्षेत्ररक्षण करतो. म्हणजे या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या कामात दुस‌र्‍या व्यक्तिची मदत घेता येते, मग गोलंदाजाला अशी सुविधा का नसते?
  9. फलंदाज फलंदाजी करताना मधेच उलट्या दिशेने फिरून ’रिवर्स स्वीप’ किंवा तत्सम पलटी शॉट मारू शकतो, पण गोलंदाज मधेच हात बदलून उजव्याऐवजी डाव्या हाताने गोलंदाजी करू शकत नाही. किंवा गेला बाजार न सांगता ओवर द विकेटच्या ऐवजी अचानक राउंड द विकेट चेंडू टाकू शकत नाही.
  10. एवढेच नव्हे तर त्याने चेंडू टाकताना हाताची हालचाल कशी असावी यावरही काही निर्बंध आहेतच नि त्याअनुसार अधेमधे काही गोलंदाजांचे चेंडू अवैध ठरवले जाऊ शकतात व त्या गोलंदाजावर बंदीही येऊ शकते. फलंदाजावर एखाद्या नियमानुसार अशी बंदी घातली जाऊ शकते का? माझ्या ऐकिवात तरी असा काही नियम नाही.
  11. फलंदाज खेळी चालू असताना कितीही वेळा आपली बॅट वा अन्य साधने बदलू शकतो पण गोलंदाजाला मात्र ही सोय नाही. केवळ चेंडू फार खराब झाला असे पंचांचे मत झाले तरच त्याला नवा चेंडू मिळू शकतो.
  12. आपली बॅटला चिकटपट्ट्या लावून भक्कम करण्याची फलंदाजाला परवानगी आहे, पण एखाद्या गोलंदाजाने जरासे वॅसलीन लावले तर गदारोळ होतो नि त्याची कारकीर्द संपुष्टात येते.
  13. बॅटचे वरचे रबर खेळताना त्रास देत असेल वा बॅटचे गटिंग नको असेल तर फलंदाज ते कापून टाकू शकतो. पण गोलंदाजाला चेंडूची शिवण जरा उसवून सैल करावीशी वाटली की लगेच त्याच्या कारवाई होते.
वरील ढीगभर निर्बंध पाहिले नि फलंदाजांना जाचक असे काय नियम आहेत हे पहायला गेलो तर एक फुटकळ नियम सापडला तो म्हणजे फलंदाज एकदा आउट झाला की त्या इनिंगमधे तो पुन्हा खेळू शकत नाही, फुस्स. याशिवाय एखादा असा नियम आम्हाला काही नोंदवता आला नाही ज्यात एखाद्या चुकीबद्दल फलंदाजाला शिक्षा केली जाते नि गोलंदाजाला अप्रत्यक्ष फायदा होतो. तुम्हाला आठवतोय का एखादा नियम, पहा बरं जरा. हे सगळे नियम पाहता क्रिकेट हा फलंदाजांसाठी पक्षपाती खेळ आहे असे आमचे मत झाले आहे. हल्ली पद्धत आहे त्यानुसार 'मिपाकरांचे काय मत आहे?' असा प्रश्न घेऊन आलोय.
  • Log in or register to post comments
  • 32235 views

प्रतिक्रिया

Submitted by निखिल देशपांडे on Sat, 02/19/2011 - 22:20

Permalink

हल्ली पद्धत आहे त्यानुसार

हल्ली पद्धत आहे त्यानुसार 'मिपाकरांचे काय मत आहे?' असा प्रश्न घेऊन आलोय
. क्रिकेट आहे तसे आहे.. पटतं असेल तर बघा, अथवा चपला..... उगाच हे महावाक्य आठवुन गेले... सिरियसली सांगायचे झाले तर, क्रिकेट मधेही शेवटी नियम हे पॉप्युलॅरिटी कशाने टिकते आहे हे बघुनच ठरवले जातात... आता तुम्हीच सांगा एखाद्या मॅच मधे ५० ओव्हर्स मधे १०० रन्स निघाले आणि त्याचा पाठलाग करताना दुसर्‍या संघाला ४५ ओव्हर्स लागतात तर तुम्हाला असा सामना आवडेल का?????
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Sat, 02/19/2011 - 22:50

In reply to हल्ली पद्धत आहे त्यानुसार by निखिल देशपांडे

Permalink

+१

<<क्रिकेट आहे तसे आहे.. पटतं असेल तर बघा, अथवा चपला>> +१
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sat, 02/19/2011 - 22:26

Permalink

क्रिकेटकडे एक खेळ म्हणून न

क्रिकेटकडे एक खेळ म्हणून न बघता शो-बिझिनेस म्हणून पाहिलं की सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. विचार चांगला करता तुम्ही.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 02/19/2011 - 22:38

Permalink

क्रिकेट म्हणजे ..

क्रिकेट म्हणजे पुरुषप्रधाण संस्कॄतीचे द्योतक ( का काय ते ) आहे , बघा , बॅट्समन म्हणजे पुरुष आणि बॉलर म्हणजे म्हैला असतात , आता पुण्हा विचार करा ... म्हणजे तुमचे पिरेश्ण सुटतील :) - (बॅट्समन) टारेंद्र सहावाघ
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sun, 02/20/2011 - 07:56

In reply to क्रिकेट म्हणजे .. by टारझन

Permalink

बॅट्समन म्हणजे पुरुष आणि बॉलर

बॅट्समन म्हणजे पुरुष आणि बॉलर म्हणजे म्हैला असतात , आता पुण्हा विचार करा फलंदाजाला एकदाच संधी मिळते गोलंदाजाला वारंवार संधी मिळते........ हे वाक्य नव्या संदर्भाने विचारकरायला लावेल.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sun, 02/20/2011 - 08:02

In reply to बॅट्समन म्हणजे पुरुष आणि बॉलर by विजुभाऊ

Permalink

फलंदाजाला एकदाच संधी मिळते

फलंदाजाला एकदाच संधी मिळते गोलंदाजाला वारंवार संधी मिळते....... सहमत. फलंदाज आऊट झाला तर त्याला बाहेर जावे लागते मात्र गोलंदाज वेगवेगळ्या फलंदाजांना चेंडू टाकू शकतो पक्षी वेगवेगळ्या फलंदाजांबरोबर खेळ करू शकतो. आणि शिवाय त्याला इतर १० खेळाडूंचेही सहाय्य मिळते. चेंडू लांब गेला तर लगेच बाकीचे खेळाडू चेंडू आणून देतात. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sun, 02/20/2011 - 07:52

Permalink

खरे आहे हो. आणखी एक

खरे आहे हो. आणखी एक बघा. ब्याटिंग करताना फलंदाज अर्ध्या पीचपर्यन्त आला तरी ते चालते. पण गोलंदाज जरा थोडा पुढे आला तर तो नोबॉल ठरतो. गोलंदाजाना देखील अर्ध्या पीचपर्यन्त येवून गोलंदाजी करायल मुभा द्यायला हवी
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 02/20/2011 - 07:57

Permalink

अजाबात नाही!

वास्तवीक क्रिकेट हा आपला पारंपारीक, सांस्कृतिक खेळ. ह्या विषयांवर अनेक आपल्या मोठ्या संतांनी लिहलंय ते उगाच का? तर हे आपले सांस्कृतिक ग्रंथ चाळले तर लक्षात येईलच की हा खेळ साक्षात त्या खेळनियंत्यानेच निर्माण केलेला आहे, त्याच चुक असुच शकत नाही. ज्यांना चुका दिसतात त्यांना त्या खेळाकडे कसे पहावयाचे याचे ज्ञानच झालेले नाही. त्यांनी क्रिकेटपुराण, भगवतक्रिकेट वगैरे ग्रंथ वाचुन पहावे कदाचित मदत होईल. राहिला प्रश्न काही किरकोळ घटनांचा तर त्याचे कारण आपण माणसं, अनेकांना तो खेळ अजुन पुर्णपणे समजलेलाच नाही त्यामुळे असे होते. श्री श्री निळोबा महाराज सचिनभक्त, क्रिकेटधर्म, खेळमठ.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 02/20/2011 - 09:39

Permalink

ही क्रीकेट काय भानगड आहे?

ही क्रीकेट काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sun, 02/20/2011 - 12:03

In reply to ही क्रीकेट काय भानगड आहे? by शिल्पा ब

Permalink

बरं पण

आपण भारतात रहात नाही हे इथे सांगायची काय गरज होती. ;) (ह. घ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sun, 02/20/2011 - 13:58

Permalink

हा हा हा

म्हणूनच बहुतेक गोलंदाज कायम भयानक वैतागलेले, शिव्या देणारे असतात. प्रसंगी चेंडूने फलंदाजाचे डोके फोडू पहातात. फलंदाज मात्र शिव्या देताना, गोलंदाजावर बॅट फेकुन मारताना क्वचित दिसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sun, 02/20/2011 - 15:18

In reply to हा हा हा by सहज

Permalink

+१

अचूक निरीक्षण. बाचाबाचीची सुरवात गोलंदाजाकडूनच होते. फलंदाजाने प्रथम स्लेजिंग केल्याचे मी तरी अजून पाहिलेले नाही. (विकेटकीपर) रमताराम
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sun, 02/20/2011 - 21:43

In reply to +१ by रमताराम

Permalink

फलंदाजाने प्रथम स्लेजिंग

फलंदाजाने प्रथम स्लेजिंग केल्याचे मी तरी अजून पाहिलेले नाही.
किंचित असहमती. ९६ विश्वचषकामधील आमिर सोहेल-वेंकटेंश प्रसाद एपिसोड विसरलात का?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sun, 02/20/2011 - 21:56

In reply to +१ by रमताराम

Permalink

फलंदाजाने प्रथम स्लेजिंग

फलंदाजाने प्रथम स्लेजिंग केल्याचे मी तरी अजून पाहिलेले नाही.
किंचित असहमती. ९६ विश्वचषकामधील आमिर सोहेल-वेंकटेंश प्रसाद एपिसोड विसरलात का?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sun, 02/20/2011 - 22:06

In reply to फलंदाजाने प्रथम स्लेजिंग by कानडाऊ योगेशु

Permalink

अरे हो

खरेच की. आठवण दिल्याबद्दल धन्यवाद. आणखी एक महत्त्वाची घटना यावरून आत्ता आठवली. मियाँदादने बेडुकउड्या मारून किरण मोरेला डिवचले होते ती. पण यात गोलंदाज सहभागी नव्हता. अर्थात अशा घटना अपवादात्मकच.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 02/21/2011 - 11:10

In reply to +१ by रमताराम

Permalink

असहमत .जावेद मियांदाद ने

असहमत .जावेद मियांदाद ने मारलेल्या बेडुक उड्या विसरलात का
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sun, 02/20/2011 - 15:34

Permalink

फलंदाजाला बॅट, गोलंदाजाला उपकरण नाही

(२१) फलंदाजाला चेंडूला वेग देण्यासाठी बॅट हे तगडे उपकरण देतात. बिचार्‍या गोलंदाजाला उपकरण नाही - हातानेच जितका वेग देता येईल, त्या वेगाने चेंडू टाकता येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sun, 02/20/2011 - 16:29

In reply to फलंदाजाला बॅट, गोलंदाजाला उपकरण नाही by धनंजय

Permalink

+१

आणि वर त्यालाच सगळी संरक्षक आवरणे (हेल्मेट, पॅड, विविध गार्डस वगैरे). पण त्याने जर चेंडू परतपावली तडकावला तर बापड्या गोलंदाजाला संरक्षणाची काही तरतूद नाही. इ ना चॉलबे, इ ना चॉलबे.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Sun, 02/20/2011 - 16:49

Permalink

ब्येष्ट!

रमताराम अंकल, (मरतंय तिच्यायला आता मी! हे घरी येऊन जोड्यानं बडिवणार मला.) आम्ही तुमच्या मतांशी सहमत आहोत. तुमचे हे सुधारक विचार पुढे क्रिकेटक्रांतीचा पाया ठरो अशी सदिच्छा व्यक्त करतो. झालंच तर, काकांशी बोलून ह्या बाबतच्या सुधारणांसाठी बीशिश्यायमध्ये तुमचं 'आनररी कन्सल्टेशन' अ‍ॅरेंज करुन घेऊ का? :D
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sun, 02/20/2011 - 17:06

In reply to ब्येष्ट! by धमाल मुलगा

Permalink

अरे व्वा

झालंच तर, काकांशी बोलून ह्या बाबतच्या सुधारणांसाठी बीशिश्यायमध्ये तुमचं 'आनररी कन्सल्टेशन' अ‍ॅरेंज करुन घेऊ का? तसं झालं तर तू मला अंकल काय 'म्हातार्‍या' म्हटलंस तरी चालेल रे. फक्त बीसीसीआय पेक्षा 'आयसीसी'चे बघ ना,(साहेब तिथे आहेत ना सध्या) म्हणजे डॉलरमधे कमावता येईल, हिरवा माज करता येईल. मग बकार्डीचा एक खंबा माझ्याकडून भेट तुला.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Sun, 02/20/2011 - 17:12

In reply to अरे व्वा by रमताराम

Permalink

च्छ्या:!

मराठी मध्यमवर्गिय मानसिकतेचा आम्ही निषेध करतो. साला, डालरात कमवूनही बकार्डीच? अरे निदान म्हणताना तरी शिवास म्हणा, ग्लेन लिवेट/फिडीश म्हणा.. >>तसं झालं तर तू मला अंकल काय 'म्हातार्‍या' म्हटलंस तरी चालेल रे. :D :D :D छे छे! तसं कसं? असं कुणाला वाईट बोलु नये म्हणतात. :P
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sun, 02/20/2011 - 22:10

In reply to च्छ्या:! by धमाल मुलगा

Permalink

अरे बाबा

आम्हा मध्यमवर्गीयांना ही नावेसुद्धा ठाउक नसतात रे. बरं ब्रँड तू ठरव, मग तर झालं? (शेवटी ५०० रू. भागव म्हणजे झालं, क्काय?)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 02/20/2011 - 21:25

Permalink

+

बेसिक खेळच फलंदाजांचा आहे. विजय / पराजय ठरवण्यासाठी धावांचीच तुलना होते. भले मग कितीही विकेट गेल्या असोत. बाकी नव्याने जे पॉवरप्ले, फ्रीहीट, २०-२० वगैरे जे प्रकार आहेत ते क्रिकेटच्या खेळातली मूळ नजाकत न कळणार्‍यांनीही या खेळाला आश्रय द्यावा या दृष्टीने केले जातात. या लोकांना षटकार मारणे यातच आनंद मिळतो. एखाद्या गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकणे यात आनंददायक काही असू शकते हे यांच्या गावीही नसते. काही काळाने १०-१० किंवा ५-५ असे सामने होऊन त्यात चेंडू फुलटॉस न होता टप्पा पडला तरी नो बॉल ठरवला जाण्याची शक्यता आहे. आणि गुडलेंग्थ टाकला तर गोलंदाजाला तीन सामन्यांची बंदी घातली जाण्याचीही शक्यता आहे. एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून १००० धावा होत नाहीत तोपर्यंत तरी नियम बदलले जात राहतील.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Sun, 02/20/2011 - 21:57

In reply to + by नितिन थत्ते

Permalink

सहमत ..

(आयला थत्तेचाचांशी कधी सहमती होईल असे वाटले नव्हते बॉ ) ;)
काही काळाने १०-१० किंवा ५-५ असे सामने होऊन त्यात चेंडू फुलटॉस न होता टप्पा पडला तरी नो बॉल ठरवला जाण्याची शक्यता आहे. आणि गुडलेंग्थ टाकला तर गोलंदाजाला तीन सामन्यांची बंदी घातली जाण्याचीही शक्यता आहे.
संपुर्ण सहमत ! आजकाल गोलंदाजाची ( पब्लिकच्या लेखी ) लायकी किंवा त्यांच्या मैदानावरच्या उपस्थितीचे अपेक्षित कारण हे केवळ 'चौकार / षटकार मारण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक क्रिया ( पक्षी : सिंपल आणि निरुपद्रवी चेंडु टाकणे ) इथपर्यंत राहिले आहे असे वाटते. बाकी गोलंदाजाचा तशी काही किंमत नाही, बोलिंग मशिनच्या गोलंदाजीला चोपण्यात तशी "मज्जा" येत नाही म्हणुन आजकाल गोलंदाज असतात. बाकी काही काळाने बॉलिंग म्हणजे केवळ सरळ बॅटवर चेंडु टाकणे अशी व्याख्या झाल्यास ह्या प्रकारतुन गोलंदाज नावाची क्वालिटी हद्दपार होऊन सरळ ११ फलंदाज खेळवण्याचे दिवस येतील का अशी मला शंका आहे. गोलंदाज नसल्यावर विकेट्स तरी का काढा आणि त्यासाठे स्पेशॅलिस्ट किपर तरी का खेळवा ? त्यापेक्षा सरळ ११ फलंदाज खेळवायचे, एखाद्याला कामचलावु किपिंग आणि बाकी ४-५ जणांना कामचलावु बॉलिंग आली की काम झाले, अजुन काय पाहिजे ? ( तसेही सध्या भारतीय संघात युसुफ पठाण, रैना, युवराज सारखे फलंदाज २०-३० ओव्हर्स कोटा पुर्ण करतात ह्यावरुन काय ते समजा, बाकी असो ) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sun, 02/20/2011 - 22:02

In reply to + by नितिन थत्ते

Permalink

सहमत

पॉवरप्ले हा आणखी एक फलंदाजाला पक्षपाती प्रकार. पूर्वी १५ षटके असलेला पॉवरप्ले आता २० ओवरचा झालाय. पाच-सात वर्षांपूर्वी एकदिवसीय सामन्याच्या एका डावात सरासरी २००-२२५ धावा होत असत, पहिल्या डावात २७० पार झाल्या की दुसरा डाव खेळणार्‍यांना संधी कमी आहे असे मानले जाई. आता २० षटकांचा पॉवरप्ले, फ्री-हिट, लेग-स्टंपच्या बाहेर वाईड्चा कडक नियम हे सारे आल्यानंतर ३०० धावा सुद्धा धोकादायक मानल्या जात नाहीत. सव्वा-चारशे धावा करूनही ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झालेला आपण पाहिला. त्यानंतरही दोन संघांनी हा टप्पा ओलांडला आहे. जुन्या-नव्याची तुलना करणे अशक्य व्हावे इतके हे नियम आता बदलले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Sun, 02/20/2011 - 21:39

Permalink

उत्तर

क्रिकेट हा 'फलंदाजधार्जिणा' खेळ आहे, पक्षपाती नाही. याचे कारण- एक संघ फक्त फलंदाजी करतो, आणि दुसरा फक्त गोलंदाजी- असे होत नाही. मौका सभीको मिलता है ! दोन्ही संघाना सारखेच चेंडू फलंदाजी करायला मिळतात. त्यामुळे- क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय? उत्तर- नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sun, 02/20/2011 - 23:41

Permalink

र.राजी तुम्ही म्हणता तसा

र.राजी तुम्ही म्हणता तसा क्रिकेटचा फलंदाजधार्जिणेपणा हा फक्त एकदिवसीय आणि आता २०-२० साठीच वापरला जातो.पण कसोटी क्रिकेटमध्ये मात्र अजुनही गोलंदाजांची कत्तल होईल असे काटेकोर नियम तर अजुनपर्यंत बनवले गेले नाहीत. (आणि त्यामुळे बर्याच कसोटी रटाळ झाल्याची उदाहरणे आहेत. ह्या संदर्भात जुन्या जमान्यातील बापू नाडकर्णींचा बराच वेळा उल्लेख होतो. पण नक्की प्र्कार काय होता ते माहीती नाही.माझ्यामते अनेक षटके निर्धाव टाकण्याच्या बाबतीत त्यांचा विक्रम आहे असे वाटते. )
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Mon, 02/21/2011 - 17:33

In reply to र.राजी तुम्ही म्हणता तसा by कानडाऊ योगेशु

Permalink

त्यांचे एका सामन्यातील

त्यांचे एका सामन्यातील पृथक्करण होते ३२-२७-५-० अधिक माहिती http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 02/21/2011 - 00:12

Permalink

असंतोष दूर करायचा एक मार्ग

आणि मी म्हणतो केवळ गोलंदाजालाच का यष्ट्या उडवायला मिळाव्यात? फलंदाजानेही चेंडू मारून यष्ट्या उडवाव्यात... आणि यष्टीरक्षकालाच का फक्त विशिष्ट हातमोजे घालायला देतात? ते सर्वांनीच घातले पाहिजेत.... आणि अंपायरला सुद्धा हातात बॅट दिली पाहिजे असे नवीन सुचले आहे की क्रिकेटमधला पक्षपात कमी करण्यासाठी एकाच वेळी सर्व बावीस खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण आणि पंचगिरी करायची संधी मिळाली पाहिजे म्हणजेच व्यवस्थेविरुद्धचा एकूण असंतोष दूर होईल...
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 02/21/2011 - 02:57

In reply to असंतोष दूर करायचा एक मार्ग by भडकमकर मास्तर

Permalink

मास्तरांच्या या प्रतिसादासाठी

मास्तरांच्या या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 02/21/2011 - 13:29

In reply to असंतोष दूर करायचा एक मार्ग by भडकमकर मास्तर

Permalink

कै च्या कै

फलंदाजानेही चेंडू मारून यष्ट्या उडवाव्यात... हॅ हॅ हॅ. फलंदाजाने चेंडूला हात लावला तर तो आउट होणार नाही का? आणि अंपायरला सुद्धा हातात बॅट दिली पाहिजे अंपायर काय बॅटवर टेकून बसणार आहे का? करायचं काय त्या बॅटचं. का उगाचच अपील करणार्‍या गोलंदाजाच्या पाठीत दणका घालायचा अधिकार देणार आहात त्याला. आणि यष्टीरक्षकालाच का फक्त विशिष्ट हातमोजे घालायला देतात? ते सर्वांनीच घातले पाहिजेत.... प्रश्न सक्तीचा नाही हक्काचा आहे. क्षेत्ररक्षकांनाही ते मोजे घालण्याचा अधिकार देता येईल, पण गैरसोयीचे असल्याने वापरणार कोण? आमचे मुद्दे गोलंदाजावरच्या प्रतिबंधांमुळे त्यांचे जे तोटे होतात त्याबाबत आहेत. उगाचच नियमांची मोडतोड करण्याचे नाहीत. अवांतर: कालच आमच्या मित्राने त्याच्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो दाखवले. त्याला केक कापायला सांगितले तर त्याने एकामागून एक सुरीचे वार करून केकची खिचडी बनवली होती. चांगला झाला होता म्हणे तो पदार्थ. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 02/21/2011 - 09:41

Permalink

कालचा केनिया- न्यूझिलंड सामना

कालचा केनिया- न्यूझिलंड सामना आम्ही झोपेतून उठायच्या आधीच(सविस्तर सांगावे लागते हो) संपला. काय मजा आली नाय बगा.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 02/21/2011 - 11:15

Permalink

बारावा खेळाडू क्षेत्ररक्षण

बारावा खेळाडू क्षेत्ररक्षण करतो. म्हणजे या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या कामात दुस‌र्‍या व्यक्तिची मदत घेता येते, मग गोलंदाजाला अशी सुविधा का नसते? हे कसे जमणार हो. म्हणजे बघा इमॅजीन करा ( हो इमॅजीन करणंच शक्य आहे) गोलंदाजाने स्टार्ट घेतला आणि त्याच्या सोबत त्याच्या रनर ने स्टार्ठ घेतला दोघानी चेंडू टाकला आणि फलंदाज आणि त्याचा रनर या दोघानी त्यंच्या समोर आलेले सेम्डू मारले. एक सीमापार गेला दुसर्‍यावर विकेट गेली. निर्णय काय होईल... की रनर औट होईल?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 02/21/2011 - 11:46

In reply to बारावा खेळाडू क्षेत्ररक्षण by विजुभाऊ

Permalink

असं बघा

आता परवा गंभीर सेहवागसाठी रनर म्हणून धावत होता, धावा मोजल्या गेल्या सेहवागच्या खात्यात, का तर म्हणे फटका त्याने मारला. मग आता असं करतो, मला टीम मधे घ्या, मी रन-अपच्या सुरवातीला उभा राहतो. माझ्या ऐवजी बदली गोलंदाज म्हणून डेल स्टेनला बोलावतो. मी फक्त त्याला सांगेन की बाबा रे आता इन्स्विंग टाक नि टप्पा फुल्ल लेंग्थच्या आसपास टाक. प्रत्यक्ष गोलंदाजी तो करेल. त्या चेंडूवर फलंदाज बाद झाला तर विकेट माझी. जमेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Mon, 02/21/2011 - 11:59

Permalink

हम्म..चांगला विषय आहे. मला तर

हम्म..चांगला विषय आहे. मला तर एकदम लहानपणीचे दिवसच आठवले. आमच्या गल्लीत फ़क्त एकाकडेच बॆट होती. त्यामुळे तो आल्याशिवाय खेळच चालु व्हायचा नाही. अन त्यात परत त्याचीच बॅटिंग पहीली असायची. परत त्याला दोन जीवदाने असायची. बाकी जनतेला मात्र बॉलिंग फिल्डींग वर समाधान मानावे लागायचे. मला तर हा अन्याय वाटायचा. तेंव्हापासून मी क्रिकेटचा रामराम घेतला. ;) फारच पक्षपाती खेळ आहे बुवा हा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 02/21/2011 - 13:31

In reply to हम्म..चांगला विषय आहे. मला तर by अभिज्ञ

Permalink

आप्ल्याला तर बॉलींग जाम

आप्ल्याला तर बॉलींग जाम आवडायची बुवा !
  • Log in or register to post comments

Submitted by असुर on Mon, 02/21/2011 - 15:37

Permalink

शिंपल है ररा!!!

शिंपल है रराकाका!!! एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांना ३०० पैकी फक्त १० चेंडू व्यवस्थित टाकायचे असतात. त्याउलट फलंदाजांना ३०० चेंडूंपासून केवळ विकेट वाचवायच्या असे नाही तर धावाही करायच्या असतात. मग आता सांगा, ज्याची रिस्क जास्त, त्याला झुकते माप मिळाले तर काय हरकत आहे? :-) तुमच्या ष्टाटीष्टिक्ष (मायला काय औघड शब्द है) मध्ये ही रिस्क मोजता येते का?? ;-) --असुर
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Mon, 02/21/2011 - 18:06

In reply to शिंपल है ररा!!! by असुर

Permalink

पर इक्त?

मग आता सांगा, ज्याची रिस्क जास्त, त्याला झुकते माप मिळाले तर काय हरकत आहे? आरं व्हय की, पर इक्तं? ('वो तो ठीक है लेकिन इतना... इतना?' असे सख्ख्या बापाच्या सचोटीने पैसे कमावण्याच्या कुवतीवर शंका घेणार्‍या 'जिस देशमें गंगा रहता है' नावाच्या ढापू चित्रपटातल्या गोंद्याच्या चालीत विचारतो) आन् काका म्हनाय लाजायचं कशापाय, तुमी काय नारायणराव हैसा काय का आमी राघोबा व्हतोय, आं? आन् ष्टाटिष्टिक्श काय ओ, तुमी सांगाल ते मोजतंय, हाकानाका. फकस्त त्येच्यातून तुमी काय सम्जून घ्येता त्ये जेच्या तेच्या समजुतीवर हाय. तात्याराव (म्हंजी आपले मिपावाले) म्हंत्यात न्हवं का, 'जेची त्येची समज नि जेची त्येची जानीव' तसं.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com