मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे. आता ती दिडच दिवस का आहे??? आणखी खोलात विचार केला तर मूर्तीकारांनी नीट पेंटिंग करून तयार केलेल्या गणेशमूर्तींना हा दीड दिवसाचा नियमही व्यावहारिक कारणांनी गैरलागू होतो. पण मूळ पार्थिव गणेश व्रतापेमाणे व्रतकर्त्यांनी पहाटे उठून नदीवर जाऊन स्नान करून 2/3 ओंजळी चिकणमाती आणून स्वहस्ते तो गणपती तयार करायचा आहे. त्याला रंगरंगोटी इत्यादी काहीच करायची नाहीये,फक्त डोळ्यासारखे जे कोरलेले अवयव मूर्ती सुकायला लागल्यावर ढासळतील, ते मूर्ती तयार केल्यावर काही वेळात सूर्योदयाचे उन्ह येऊन वाळायच्या आत तूप लाऊन ते अवयव घट्ट करायचे आहेत.(म्हणूनच आजही रंगविलेल्या मूर्ती असल्या तरी पुरोहित, गुरुजी,भटजी लोक यजमानाला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मूर्तीच्या डोळ्यातून सुरमा लावल्या प्रमाणे तुपात भिजलेली दुर्वा फिरवायला सांगतात,ज्याची माझ्या मते आज काहीही आवश्यकता उरलेली नाही!असो!!!) आता असा स्वहस्ते केलेला गणपती नीट , न भांगता,न तडे जाता किती दिवस राहिल? एक ते दोन दिवस! म्हणून हे व्रतही दीड दिवसाचच आहे. धर्मशास्त्रातही सोईच्या ठिकाणी मानवी व्यवहारांची गणित पाळली(गेली) नाही तर ते धर्मशास्त्रदेखील मूर्तीसारखच पाण्यात मृत्तिका होऊन मूळ रूपात विसर्जित होत!..,असो! बोला...गणपती बाप्पा मोरया,दरवर्षी लवकर या! (आणि गणेश मंडळानमध्येच येणार असाल तर ,जा ही!..आंम्हाला म्हाइतिये की तुम्हालाही त्याचा त्रास होतोय गेली काही दशकं.. असो!) ====================== लेखक:- कुमार पराग दिवेकर गुरुजी. (धर्मशास्त्रांचा सावरकरी प्रेरणेने धांडोळा घेणारा एक उत्साही बाल लेखक!)

वाचने 16198 वाचनखूण प्रतिक्रिया 32

खटपट्या Wed, 09/12/2018 - 19:19
जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला!
टिळकांच्या आधिपासून ५ दिवसाचा गणपती आहे हो कोकणात जो गौरीविसर्जनाबरोबर विसर्जित केला जातो. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by खटपट्या

@
टिळकांच्या आधिपासून ५ दिवसाचा गणपती आहे हो कोकणात जो गौरीविसर्जनाबरोबर विसर्जित केला जातो. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
--- तसा इकडे घाटावरही 7व्या दिवशी मंजे गौरी बरोबर विसर्जित होणारा गणपतीही टिळकपूर्व'च आहे. पण ह्या सगळ्याला रूढी आणि परंपरा म्हणतात. मूलशास्त्र (शिल्लक) असतच. ते दिड"दिवसवालं आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आनन्दा गुरुवार, 09/13/2018 - 13:58
मूळ शास्त्रानुसार गणपती बहुधा 1 दिवसच होता असे ऐकून आहे.. सकाळी आणला, पूजा करून नैवेद्य झाला के विसर्जित केला.. पार्थिव शाडूच्या मूर्तीचे आयुष्य तितकेच असणं अपेक्षित आहे.

In reply to by anandkale

कंजूस गुरुवार, 09/13/2018 - 08:08
हो, हे केलं आहे लहानपणी. तीन चार इंच लांब रूंद आणि अर्धा इंच जाड असे गणपती ,मारुती केले होते. मातीत कापूस मळला होता आणि एक कीचेन घातली होती खिळ्यावर टांगायला. द्रोणागिरी नेणारा उडणारा मारुती करून त्याला पिवळा गेरू, गणपतीला लाल गेरूने रंगवले होते. नाग पंचमीसाठी नाग करून द्यायचो त्यास कोळशाने काळा रंग असायचा. त्याच्या मानेत घातलेल्या बॉलपेनच्या स्प्रिंगमुळे फणा डोलत राहायचा. '६५ नंतर प्लास्टिक खेळणी आली आणि मातीची चित्रं फिकी झाली.

खिलजि Wed, 09/12/2018 - 21:16
संत समर्थ रामदास आणि श्रीगणेशाचे अजोड नाते - सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास यांनी रचली आहे. गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. 4 ते भाद्रपद शु.14 हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !! समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथर घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा 1658 साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखाननावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी [अष्टविनायक|अष्टविनायकांतला]] पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो. वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ! हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!4 ते माघ शु.!! 5 गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली 121 खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो. समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !! आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!! घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना 11*11 म्हणजे 121 एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्यादिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा..... दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !! शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी 18 वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती 1658 ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन 1674 पर्यंत थांबले, नंतर 1675 ला गणेशोत्सव केला आणि 16 सप्टेंबर 1676 ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला. लेखक : अपूर्व हरिश्चंद्र पाटील सौजन्य : इ साहित्य

चामुंडराय गुरुवार, 09/13/2018 - 06:04
त्या प्रसिद्ध गायिकेने म्हटलेली बाप्पाची आरती आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकली आहे. कित्येक गणेश मंडळांची आरती तर या आरतीची सीडी लावल्या शिवाय पूर्णच होत नाही. हि आरती ऐकताना मला नेहमी एक गोष्ट खटकते. ती म्हणजे, गाताना "सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची" येथे तोडून "नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची" असे 'नुरवी पुरवी' एकत्र म्हटले जाते. मला हा प्रकार म्हणजे आरती गेयते साठी गाण्याच्या मीटर (poetic meter) मध्ये बसवण्यासाठी केलेली मोड तोड वाटते आणि ऐकताना नेहमी खटकते. मला नाही वाटत समर्थ रामदास स्वामींनी असे लिहिले असेल. आपण हि आरती इतक्या वेळी ऐकली आहे आणि म्हटलेली आहे त्यामुळे हे कदाचित आपल्या लक्षात देखील येत नाही. मूळची समर्थ रामदास स्वामी लिखित आरती अशी असावी का? सुखकर्ता दुःखहर्ता I नुरवी वार्ता विघ्नाची I पुरवी प्रेम कृपा जयाची I जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by चामुंडराय

तुषार काळभोर गुरुवार, 09/13/2018 - 19:39
जे तुम्ही कळफलकावर टायपालाही तयार नाहीत. उगाच यू-नो-हू असं बोलायचं!

माहितगार गुरुवार, 09/13/2018 - 08:13
...हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील...
स्त्रीयांना पळवून नेण्या एवढाच, पळवून लावण्याचा प्रश्नही व्यापक असावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/13/2018 - 12:15
दीड दिवसाच्या या पुरुषांच्या व्रताला काही धर्मशास्त्रीय संदर्भ आहेत की सांगोवांगीच्या गोष्टी आहेत ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@धर्मशास्त्रीय संदर्भ आहेत की सांगोवांगीच्या गोष्टी आहेत ? --- गणेश पुराण.

In reply to by यशोधरा

@फक्त पुर्षांनी का म्हणे करायचं व्रत? -- जशी मंगळागौरी सारखी काही व्रत स्त्रियांनि करण्याची आहेत,तसच हे पुरुषांनि करायचं व्रत आहे...,म्हणून!

In reply to by यशोधरा

@फक्त पुर्षांनी का म्हणे करायचं व्रत? -- जशी मंगळागौरी सारखी काही व्रत स्त्रियांनि करण्याची आहेत,तसच हे पुरुषांनि करायचं व्रत आहे...,म्हणून!

In reply to by अत्रुप्त आत्मा

यशोधरा Fri, 09/14/2018 - 17:26
मंगळागौर करावी की पुरुषांनी. कोणतंही व्रत असेना का, ते अमाक्यानीच करावं आणि तमक्यानी करू नये हे कशावरून ठरवलं जातं, हा प्रश्न आहे. तसंच धर्मग्रंथ वा कोणतेही धार्मिक पुस्तक कोणी वाचायचे हे कोण ठरवते? सर्वांभूती आत्मा एकच आहे ना? मग असा फरक का म्हणे? तुम्हांला त्रास द्यायचा म्हणून हे विचारत नाहीये, हे मला मनापासून पडलेले प्रश्न आहेत.

In reply to by यशोधरा

सस्नेह Fri, 09/14/2018 - 18:14
यशो सारखंच म्हणते. गणेश व्रत स्त्रियांनी आणि मंगळागौर पुरुषांनी केली तर काय बॉ फरक पडेल ? गुर्जींच्या एक्स्पर्ट ओपिनियन च्या विणम्र प्रतीक्षेत, स्नेहा

In reply to by सस्नेह

नाखु Fri, 09/14/2018 - 21:47
व्रत घेतल्यासारखा कडाडून विरोध करण्याऐवजी, सगळीच व्रतवैकल्ये सर्वांना करण्याचा समान हक्क असावा हा वसा आवडला, गुरुजी कुणाला करायचीय तर करु देत की,दयाळू बाप्पा (समोरच ठेवलेली पांच फळे सोडून) आणखी काही फळे देईल ,तुम्ही का धर्माची भिती घालता? पुराण ते पुरण एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परंपरा या शोधनिबंधातून साभार एकलव्रती नाखु बिनसुपारीवाला

In reply to by सस्नेह

@गुर्जींच्या एक्स्पर्ट ओपिनियन च्या विणम्र प्रतीक्षेत, स्नेहा --- वरील लेखातील धार्मिक बाबी हे माझे मत नाही. माझे धर्माच्या बाबतीतले मत असे की धर्म व्यवस्थेमधील सर्व बाबी,गोष्टी, नियम हे त्या त्या धर्माच्या अनुयायांनी आपल्यावर लादून घेऊ नयेत..त्यात हवे ते हवे तसे बदल करावे..कमी अधिक ही करावे..नाहीतर ज्याला हे नको त्याने आजूबात आचरू ,पाळू नये..भारतोय लोकशाहीने नागरिकांना धर्मपालनाच स्वातंत्र्य दिलेलं आहे,धर्माला नागरिकांना पळायचं,स्वतः च्या कह्यात ठेवायचं स्वातंत्र्य दिलेलं नाही..उलट ते धर्माकडून काढून घेण्यात आलेला आहे. समता,बंधुता,न्याय यांच्या विरोधी जाणारा आपल्या धर्माचा जो जो भाग असतील त्याला समता बंधुता न्यायाच्या पातळीवर आणून आचरावे. आणि धर्मातल्या सनातनी व विषमतावादाचा दारुण पराभव घडवून आणावा.. त्याची जोडबाजू म्हणून आमच्या सारखे पुरोहित सहाय्य करण्यास सदैव हजर असतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

उत्तम विचारप्रवर्तक लेख आणि त्यावरील संतुलित प्रतिसाद, याच कारणासाठी "आय लौ यू गुर्जी" पैजारबुवा,