२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग १ : डाग
पुणे-मुंबई शहरी भागात कुठेही महागड्या सोसायटी मध्ये किंवा स्वतः ची जागा घेऊन राहणं शक्य असतानाही कबीर ने खंडाळ्यात एकाकी बंगलो घेऊन राहणं पसंत केलं. प्रोफेशनने सी.ए. होता शिवाय कमी वयातच त्याने मार्केट मध्ये स्वतःचं स्थान कमावलं होतं. एक ऑफिस पुण्यात स्वारगेट ला तर दुसरं नवी मुंबईत पनवेल ला. दोन्ही कडे त्याचे आठवड्यातले वार देखील ठरलेले होते. दोन्ही ऑफिसेस मध्ये मोजकाच काही स्टाफ कामाला होता. एकंदर त्याचं प्रोफेशनल करीअर व्यवस्थित चाललं होतं.
कबीर आणि माया दोघेही कॉलेज मध्ये होते खरे पण एकमेकांपासून तसे अलिप्तच. माया त्याला दोन वर्षे ज्युनियर. हा कॉलेजचा टॉपर असल्याने सर्वांच्या ओळखीचा. याचा मित्र परिवार भरमसाट तर दुसरीकडे माया तिच्या मोजक्याच मैत्रिणींमध्ये इतर सामान्य मुलीं सारखी. काही योग जुळून आले आणि मायाच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिच्या घरच्यांनी कबीर च्या घरच्यांशी संपर्क साधून दोघांच्या गाठी जोडल्या. कबीर आणि माया दोघांकडून विरोध करण्याचे काही कारण नसल्याने लग्न देखील लगेच यथासांग पार पडलं. कबीर चं करिअर लौकर सुरू झाल्याने एकमेकांना लग्नाआधी भेटणं वगैरे सोपस्कार त्यामानाने कमीच. वैवाहिक जीवनात दोघेही एकमेकांना भरपूर प्रेम, मान-सन्मान, आदर द्यायचे. 'यांचं कॉलेज पासूनच काहीतरी असावं' असा संशय यावा इतकं ते एकमेकांवर प्रेम करायचे.
लग्नानंतर एका वर्षात पाळणा हलला आणि त्या गोंडस बाळसेदार मुलीचं नाव उत्तरा ठेवण्यात आलं. कबीर आणि मायाच्या आनंदाला काही सीमाच उरली न्हवती. एकंदर कबिरचं खाजगी आयुष्य ही मस्त चाललं होतं.उत्तरा ला तिच्या आजी आजोबांकडे पुण्यातच शिकू द्यावं म्हणून अगदी पहिलीपासून च पाठवण्यात आलं. हा निर्णय पूर्णपणे कबिरचा होता. माया खूप भांडली पण कबिरपुढे तिचं चालेना.
गेले काही दिवस कबीर विक्षिप्त वागत होता. खंडाळ्याला राहायला जाण्याचा निर्णय देखील त्याचाच. तो रात्री बेरात्री कुठे जातो हे मायाला देखील माहीत नसायचं.
त्याच्यावर संशय यावा असा तो स्त्री-लंपट नक्कीच न्हवता पण त्या दिवशी सकाळी मायाला त्याच्या सफेद शर्टावर लिप्स्टिकचे वाटावेत असे लालसर डाग दिसले.
क्रमशः
प्रतिक्रिया
7 Jan 2024 - 10:56 am | कानडाऊ योगेशु
सुरवात छान.पण मोठे भाग लिहिले तर उत्तम.
8 Jan 2024 - 12:19 pm | सतिश पाटील
इतका छोटा भाग ? आणि पनवेल हे नवी मुंबईचा भाग न्हवे.
8 Jan 2024 - 12:38 pm | रंगीला रतन
पनवेल हे नवी मुंबईचा भाग न्हवे.
काय सांगता :=)
17 Jan 2024 - 2:46 pm | शित्रेउमेश
छान सुरवात... पुढचा भाग लवकर येवुदे....