✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/16/2016 - 19:57
॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥

ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥

गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥

तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥

इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥

गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥

सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥

                    - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६


प्रतिक्रिया द्या
5742 वाचन

💬 प्रतिसाद (19)

तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे

मितभाषी
Sat, 07/16/2016 - 22:54 नवीन
तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे तुकडोजी आहात.
  • Log in or register to post comments

संत होणे कठीण

गंगाधर मुटे
Sun, 07/17/2016 - 20:21 नवीन
माणसाला काहीही सहज होता येते. कवी, तत्वचिंतक, पुढारी, तज्ञ वगैरे. पण संत होता येत नाही कारण त्याला शुद्ध आचरण आवश्यक असते, जे आपल्याला शक्य नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

खूप छान लिहिलंय.

पद्मावति
Sun, 07/17/2016 - 20:28 नवीन
खूप छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

मस्त!!

चांदणे संदीप
Mon, 07/18/2016 - 08:58 नवीन
आवडेश! Sandy
  • Log in or register to post comments

अभंगाच्या नावावर विखार

झेन
Mon, 07/18/2016 - 21:52 नवीन
माझ्या विठ्ठलाचा | कैसा दुजाभाव गावच्याच चोरांनी | गाव चीत केलं रानातलं पाणी | उद्योगानं नेलं साखर सोडून बेण | मळी मागे लागलं धरणाचा साठा | शॉवरात गेला फोर्चुनर याची | धुतात लेकरं इथे पिण्यासाठी | मद्ययुक्त पाणी गढूळाचे धनी | होईनाका कुणी लक्ष अब्जावधी | करोडाचा धनी बाळीराज्याचे नाव | हाच खरा स्वामी ठेवूनिया कमी | शेतीमाल भाव ? घेतलीना डाळ | रु. दोनशे मोजून गावही भकास | भकास मारुती का बोलावे विठ्ठला | सुधारावी नीती इथे दारिद्र्याचे | सर्वत्र साम्राज्य जागा विकून | गुंठ्यावर माज त्याचा दिसतो आयोग | टॅक्स तोच भरी कोण राबील शेतात | बांधावर मारामारी माझा सहकार | माझा कारखाना पोर सातवी फेल | बसतो शिक्षणाच्या दुकाना गाव म्हंजे जनू | इनोसंट फार धाग्यावर धागा | जनरलायजेशन अपार जिथे तिथे माझा | छूपाच अजेंडा कधी तुका कधी विठू | दुकानी माझाच झेंडा सांगा अभयराया | झेन एवढे माज्या तुकयाने | काय केले वाकडे
  • Log in or register to post comments

असा गाव?

गंगाधर मुटे
Mon, 07/18/2016 - 23:06 नवीन
असा गाव आणि असा शेतकरी मी भारतात पाहिला नाही. एक मात्र खरं की या देशातले सारे भारतीय "मी शेतकर्‍याच्या बाजुचा आहे, शेतकरी गरीब आहे, त्याची आर्थिक स्थिती सुधारयला पाहिजे" असेच बोलतात. तुम्ही पहिल्यांदा खरंखूरं आणि तुमच्या मनातलं बोललात, याबद्दल अभिम्नंदन! पण स्वतःचे नाव लपवूनच बोललात. जरा इथे स्वतःचे खरे नाव आणि पत्ता जाहीर करा बघू. तसे झाले तर मी सर्वत्र अभिमानाने सांगेन की मनातल्कं खरंखूरं हिमतीने बोलणारा एक व्यक्ती मला गवसला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन

मुटे सर...

चांदणे संदीप
Tue, 07/19/2016 - 02:06 नवीन
तुम्ही शेतकऱ्यांचा कैवार घेतला आहे हे मी जाणून आहे. त्यासाठी तुम्ही कुणाकुणाचा रोषही ओढवून घेत असाल, इथे मिपावर तुमच्यामागे प्रश्न-प्रतिप्रश्नांचे भुंगे लागताना पाहिलेत मी. कुणीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने व्यवस्थेशी/परिस्थितीशी/ दैवाशी लढा देत ती मशाल सतत पेटती ठेवणं हे सर्व सर्व मान्यच. तुम्ही लिहिताही उत्तम. पेपरात वगैरे छापून येत. कुठल्या कुठल्या मासिकातूनही येत असेल. शेतकरी/ग्रामीण/वैदर्भीय साहित्य संमेलनंही तुम्ही तुमच्या कविता/गजलांनी दणाणून सोडता. त्याबद्दल तुमचे विशेष कौतुकही आहेच! पण म्हणून डोळ्यावर कातड ओढून घेणंही बरं नव्हे! तुमच्या या विधानावर मी केवळ
असा गाव आणि असा शेतकरी मी भारतात पाहिला नाही.
इतकच म्हणेन की, याचा अर्थ तुम्ही भारत सोडाच, महाराष्ट्र देखील नीट पाहिलेला नाही! शेवटी एवढीच विनंती आहे की, सरसकटपणे लोकांना दूषणे द्यायची थांबवा! प्लीजच! माझे नाव संदीप भानुदास चांदणे, मोशी, पुणे - ४१२१०५ आणि हो, मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे बरंका! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

सरसकटपणे लोकांना दूषणे

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 12:34 नवीन
सरसकटपणे लोकांना दूषणे द्यायची थांबवा! प्लीजच! कुठे दिली आहे सरसकटपणे लोकांना दूषणे??? हा मुद्दा वारंवार मिसळपावर का रेटला जातो, हे मलाही कळत नाही. किती वेळा या एकाच प्रश्नाचे उत्तर देत बसायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

झेन म्हणजे संदीप चादणे आहे का

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 12:35 नवीन
झेन म्हणजे संदीप चादणे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

झेन

कपिलमुनी
Tue, 07/19/2016 - 12:40 नवीन
तुम्ही फक्त पुणे - कोल्हापूर पट्ट्यामधली शेती पाहिली अहे का ? शहराशेजारच्या गावांमध्ये फक्त गुंठामंत्री आहेत. त्याच्या पलीकडे नाहीत. मुटे एक टोक असेल तर तुमची विचारसरणी दुसरे टोक आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन

मुटे साहेब, काव्य ठीक आहे पण

खटपट्या
Tue, 07/19/2016 - 04:47 नवीन
मुटे साहेब, काव्य ठीक आहे पण पाण्याच्या ओळी पटल्या नाहीत. शेतकर्‍याला स्वतःच्या शेतात शेततळी बांधून पाणी अडवायला कोणी रोखले नाही. धरणातून थेट शेतात पाणी आणण्यासाठी जेवढा खर्च आहे त्यापेक्षा कमी खर्चातच हे होइल. आणी धरणातून पाणी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यावर उपाय करण्यापेक्षा अशी कवने करुन काय होणार...असो.
  • Log in or register to post comments

एक साधा प्रश्न

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 12:39 नवीन
एक साधा प्रश्न महानगरातील नागरिकही "पाणी अडवा, पाणी जिरवा" कार्यक्रम राबवतात का? पावसाचे पाणी अडवून त्यावर भागवतात का? महानगरातला नागरीक आणि गावातला नागरिक अशा दोन मनुष्यजाती निर्माण केल्या आहेत का? तसे नसेल तर एकाला एक आणि दुसर्‍याला एक अशी फूटपट्टी का वापरावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

+१

कपिलमुनी
Tue, 07/19/2016 - 12:46 नवीन
पवना धरणामधील पाण्यावर सर्वांचा हक्क असताना ते पाणी बंद जलवाहिनीतून पिंचि मनपा ला देण्याचा घाट घातला आहे. ( सध्या पण दिले जातेच) . पाणी कालव्यातून आणले तर जमीनीत मुरते आणि आजूबाजूच्या शेतांना फायदा होतो . पण बिल्डर लॉबी मुळे बंद जलवाहिनी पाहिजे. कासारसाई धरणामधून कोलते पाटीलसाठी सेपरेट जलवाहिनी आहे. अशा टाउनशिपमधे प्रतिडोई पाणी वापर प्रचंड आहे. तेच पाणी जवळच्या खेड्यांमधे दिला जात नाही. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत आहे त्याचा वाटप समान व्हावा अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मुनीला सहमत

अभ्या..
Tue, 07/19/2016 - 13:15 नवीन
मुनीला सहमत ह्या मुद्द्यावर लिहायला हवेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

झेन म्हणजे संदीप चादणे आहे का

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 12:40 नवीन
झेन म्हणजे संदीप चादणे आहे का?
  • Log in or register to post comments

नाही....

चांदणे संदीप
Tue, 07/19/2016 - 13:05 नवीन
झेन म्हणजे संदीप चांदणे नाही. मला वाटले म्हणून मी तिथेच उपप्रतिसाद लिहिला. धन्यवाद, आता माझ्या विनंतीकडेही लक्ष द्या. सरसकटीकरण थांबवा. काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या. नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा. तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला. Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

झेन

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 13:44 नवीन
झेन म्हणजे नव्हे तर पत्ता सांगण्याची काय गरज होती. स्वतःचे नाव लपवून बोलणे आणि आपल्या अस्तित्वाच्या साक्षीने काय फरक असतो, हे तुम्हाला नाही कळायच. अज्ञात गुन्हेगारानाने केलेले गुन्हेही तुम्ही स्विकारण्याचे धैर्य दाखवणार का? माझ्यासोबत दाखवलेले धैर्य कायद्याला आणि पोलिसांनाही दाखवणार का? उत्तर होय असेल आज उत्तर देऊ नका. जेव्हा प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवाल, तेव्हा उत्तर द्या. मी संयम बाळगू शकातो. ************* <<< सरसकटीकरण थांबवा. >>> पुन्हा तेच. सरसकटीकरणचा अर्थ समजून घ्या. स्वतःला अर्थ समजला तरच मला सांगा. <<<< काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या. >>>> त्याविषयी तुम्ही लिहा. मला जे लिहिता येते तेच लिहू शकता. काव्य करणे म्हणजे "सांगकामे उद्योग करणे" नसते. <<< नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा. >>> कवितेचे अर्थ आणि भावार्थ समजून शिका. जे कविने लिहिलेच नाही तसा अर्थ काढण्याची ग्रहनक्षमता उपयोगाची नाही. <<< तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला. >>> तुमचे गाव भारतात नाही का? चंद्रावर वगैरे आहे का? भारतातली सारी गावे बहुधा सारखीच भासतात, असे मला दिसले म्हणून हा प्रश्न केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

झेन म्हणजे संदीप चांदणे नव्हे

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 13:49 नवीन
झेन म्हणजे संदीप चांदणे नव्हे तर पत्ता सांगण्याची काय गरज होती. स्वतःचे नाव लपवून बोलणे आणि आपल्या अस्तित्वाच्या साक्षीने काय फरक असतो, हे तुम्हाला नाही कळायच. अज्ञात गुन्हेगारानाने केलेले गुन्हेही तुम्ही स्विकारण्याचे धैर्य दाखवणार का? माझ्यासोबत दाखवलेले धैर्य कायद्याला आणि पोलिसांनाही दाखवणार का? उत्तर होय असेल आज उत्तर देऊ नका. जेव्हा प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवाल, तेव्हा उत्तर द्या. मी संयम बाळगू शकातो. *************
आता माझ्या विनंतीकडेही लक्ष द्या. सरसकटीकरण थांबवा.
पुन्हा तेच. सरसकटीकरणचा अर्थ समजून घ्या. स्वतःला अर्थ समजला तरच मला सांगा.
काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या.
त्याविषयी तुम्ही लिहा. मला जे लिहिता येते तेच लिहू शकता. काव्य करणे म्हणजे "सांगकामे उद्योग करणे" नसते.
नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा.
कवितेचे अर्थ आणि भावार्थ समजून शिका. जे कविने लिहिलेच नाही तसा अर्थ काढण्याची ग्रहनक्षमता उपयोगाची नाही.
तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला.
तुमचे गाव भारतात नाही का? चंद्रावर वगैरे आहे का? भारतातली सारी गावे बहुधा सारखीच भासतात, असे मला दिसले म्हणून हा प्रश्न केला
  • Log in or register to post comments

शहरात चेन्नईसारखे

नाखु
Tue, 07/19/2016 - 14:09 नवीन
पावसाचे पाणी जिरवणे आणि पुनर्भरण आवश्यक केले पाहिजे. (जे मगरपट्टा सिएटी व विलाज जावडेकरांच्या काही गृह्पक्ल्पात आहे)
कासारसाई धरणामधून कोलते पाटीलसाठी सेपरेट जलवाहिनी आहे. अशा टाउनशिपमधे प्रतिडोई पाणी वापर प्रचंड आहे. तेच पाणी जवळच्या खेड्यांमधे दिला जात नाही. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत आहे त्याचा वाटप समान व्हावा अशी अपेक्षा आहे.
सत्य आहे बहुतांश धरणाच्या जवळ असलेल्या गावांत त्या धरणाच्या पाण्याचा उपयोग्/विनिमय करू दिला जात नाही. कंपन्या काही प्रमाणात पाण्याचा पुनर्वापर करतात या संबधी एक उपयुक्त लिंक. नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा