काही लोक खरोखरीचे पुरोगामी असतात. काही नसतात. काही दिशा भरकटलेले असतात. म्हणजे त्यांची इच्छा शुद्ध पुरोगामी असायची असते पण त्यांना पुरोगामीत्वाची दुसरी बाजू माहितच नसते. त्यांचे मते 'पारंपारिकतेला बदडणे' हीच काय ती पुरोगामीता. भारताच्या दृष्टीकोनातून पाहता अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या पारंपारिक नाहीत, पण प्रतिगामी आहेत. मी इथे त्यांची यादी बनवायचा प्रयत्न करत आहे. सखोल विश्लेषण अर्थातच मी दिलेले नाही.
१. घटना. आपल्याला 'घटनेने' अधिकार दिलेले आहेत असे मानणे. मग एका राजामधे आणि घटनेत फरक काय? राजाच्या बोलण्यात किमान थोडी फ्लेक्सिबिलिटी असू शकते, घटना एकादा लिहिली कि फिक्स. घटना नव्हती तेव्हा बोलण्या-चालण्यावर पूर्ण बंदी होती का? राष्ट्राच्या १२० कोटी लोकांच्या (सरकारचा नव्हे) जीवनात काय योग्य आणि काय अयोग्य हे एका पुस्तकात शोधणे किती योग्य म्हणावे? हे नवे ग्रंथप्रामाण्य नव्हे काय? वेदांचे अर्थ लावणारे ब्राह्मण आणि घटनेचे अर्थ लावणारे वकिल यांत अर्थाअर्थी फरक नसावा.
२. राष्ट्रपिता. एखाद्या व्यक्तिस राष्ट्राचा पिता मानणे. हे नाव बदलावे (राष्ट्रनेता करावे, इ) असे कोणास वाटत नाही का? मागच्या काळी माता, पिता, गुरु यांना इश्वर मानत (कशाला काहीही मानत)तसे आजही कशाला काही म्हणणे, मानणे चालूच आहे.
३. शपथविधी. माणसाने शपथ घेतली म्हणजे तो पुढे नीट वागेल असे मानणे मूर्खपणाचे आहे. कितीतरी मंत्री, शिपाई, पोलिस असे शपथेप्रमाणे प्रत्यक्ष चांगले वागत नाहित हे माहित असूनही त्यांना शपथ दिली जाते.
४. रिबन. एखादा प्रकल्प चालू करताना रिबन का कापावी? कोणी पुरोगामी तिथे आरडाओरडा करताना का दिसत नाही? रिबनचे ते काय मूल्य असे म्हणता येणार नाही. तो समारंभ खर्चिक असतो. कधीकधी तर एवढ्याच कारणासाठी (उद्घाटनासाठी) पूर्णत्वास गेलेला प्रकल्प कितीतरी दिवस तसाच ठेवतात.
५. पदांचा क्रम. सगळ्या लोकांचे समान महत्त्व असताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, इ इ असा क्रम लावायची काय गरज आहे. हे पद आणि ही कामे. माझ्या शहरातल्या एका माणसाला महापौर म्हणणे आणि मला साधा पौर म्हणणे अपमानास्पद नाही का?
६. राष्ट्रगीत. देशाला निवडलेल्या एका गीताची काय गरज आहे? सर्वांना तेच गाणे का आवडावे? त्याचा गुणात्मक दर्जा काय? त्याला उभे राहून का ऐकावे? आपल्या देशाच्या लोकांवर, इ प्रेम व्यक्त करणारे अजून कोणते गाणे सरस वाटले तर?
७. राष्ट्रध्वज. एका कापडी डिझाईनला सूल्यूट करणे, सर्वोच्च स्थानी मानणे, खाली न पडू देणे, सर्वात उंच जागीच फडकावणे याला काही तांत्रिक अर्थ नाही. देशाच्या लोकांचा सन्मान कापडी फडक्यात गोळा झालेला नसतो. शिवाय राष्ट्रध्वजाची थिम फार सर्वसुयोग्य आहे का?
८. ब्रीदवाक्य - सत्यमेव जयते हे वाक्य तांत्रिक दृष्ट्या चूक आहे. सत्य आणि असत्य यांचीच लढाई असेल असे नाही आणि असलीच तर सत्यच जिंकते असा अनुभव नाही. हे वाक्य नक्की कोणत्या संघर्षाच्या संदर्भात आहे हे ही नीट कळत नाही. असो. कर्माचे फळ आपल्या हातात नसते हे जसे गीतेत अर्थहिन वाक्य आहे किमान तितकेच हे ब्रीदवाक्य देखिल आहे.
९. राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल, फळ - बाकीच्या पक्षांनी, प्राण्यांनी, फूलांनी, फळांनी कोणाचे घोडे मारलेत? ही निव्वळ विकारण (random) चयने आहेत. तरीही ती श्रेष्ठ मानायची?
१० स्वातंत्र्य, समता, बंधुता - हे लोकगुण आहेत कि शासनगुण हेच कळणे मुळी अवघड आहे (म्हणजे लोकांना सरकार समान मानणार आहे कि लोक एकमेकांना समान मानणार आहेत?). जर हे घटनेप्रमाणे लोकगुण आहेत तर ते पहिल्या 'स्वातंत्र्य' शब्दाच्याच आड येतात. म्हणजे या व्यवस्थेत मला स्त्री पुरुष 'समान' नाहीत असे मानण्याचे 'स्वातंत्र्य' कसे असेल? नक्की काय कसे समान मानायचे आणि कशाचे स्वातंत्र्य आहे कळण्यासाठी नवब्राह्मण वकील लागतातच. घटनेने दिलेले स्वातंत्र्य, आदर्श अंमलबजावणी आहे काय हे पाहिले तर, फारच कमी आहे. जमिन माझी पण तिच्यावर मी घर बांधायचं का फॅक्टरी हे सरकार सांगणार.
११. युनिफॉर्म - काळा डगला घातल्याशिवाय वकिल ओळखताच येत नाहीत असे मानले तरी पदवी स्वीकारताना विचित्र आकाराची टोपी घालणे गरजेचे नसावे. शोक करण्यासाठी पांढरेच कपडे गरजेचे नसावेत.
१२. रविवार - ज्या देशात रविवारी खूप कमी लोक चर्चमधे जातात तिथे रविवारी सुट्टी असणे अनुचित वाटते. दुसरा कोणता वार बरा वाटला असता.
१३. टाय - मुंबईत टाय घालावा असे वातावरण कदाचित वर्षात एखादा दिवसच असेल. तरी भर उन्हाचे किती लोक टाय आणि ब्लेझर घालतात, दुसरीकडे घामाच्या धारा गाळत असतात.
१४. इंग्रजी - जी भाषा खूपच कमी लोकांना येते (आणि त्यांनाही ती सहजतेने येत नाही)अशी साता समुद्रापलिकडील भाषा, लोक आपली भाषा निवडायला स्वतंत्र असूनही, प्रशासकिय व वाणिज्यिक व माध्यमांची व प्रतिष्ठीत भाषा म्हणून वापरली जाते. या गाढवपणावर गाढवपणा म्हणून कधी टिका होत नाही.
१५. न्यायालय. हाय कोर्ट एक निर्णय देते, सुप्रिम कोर्ट त्याच्या विरुद्ध देऊ शकते. वा रे न्याय!
१६. नोटरी. एखादा कागद ज्या प्रकारे नोटराईज केला जातो त्याने त्याच्या विश्वसनीयतेत फरक पडतो.
१७. न्यायदेवता. ही 'आजही' आंधळी आहे. अगदी मूर्तीरुप पाहिली आहे.
१८. बुके. पाच सेकंद हातात ठेवण्यासाठी बुके द्यायचा. स्वागत स्वीकारणारा मग तो लगेच मागे देतो.
१९. फॅशन. मॅचिंग सेट्स ठेवण्याच्या नादात अलमार्या भरून टाकायच्या. मूलतः कपडे घालणे ही कशाची गरज आहे हे इथे विसरायलाच होते. मग जुन्या कपड्यांच्या शैलीला ओंगळ म्हणायचे.
२०. ईश्वर - ईश्वर नाहीच हे छातीठोकपणे सांगणे. मग जगाचे सुसुत्र (आणि संपूर्ण) स्पष्टीकरण देताना काहीच्या काही विधाने करणे. बिग बँग पार्टिकल कसे निर्माण झाले आणि इश्वराने जग कसे निर्माण केले यात काहीच फरक न ठेवणे.
२१. निसर्ग - निसर्ग सम्यक (चांगले वा वाईट हे जाणणारा) नाही असे म्हणणे. हे लोक स्वतःच निसर्गाचा १००% भाग असतात. यातून जो circular reference बनतो तो फार गंमतशीर असतो.
२२. उत्क्रांती - उत्क्रांतीला दिशा असते असे मानणे. उत्क्रांतीतून काहीही शक्य आहे असे मानणे. उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या मर्यादा झाट माहित नसणे.
२३. विज्ञान - विज्ञानाला उद्या सगळे माहित होणार आहे, ते सगळ्या समस्यांमधून मानवतेला बाहेर काढणार आहे असे जणू माहित असणे. विज्ञानाचा आणि समाजशास्त्राचा अव्वाच्या सव्वा संबंध लावणे.
२४. पाश्चिमात्य विद्वान - पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा कोट खराच असतो असे मानणे.
ईश्वर, निसर्ग, उत्क्रांती, विज्ञान आणि मॉस्लो यांच्याबद्दलची विचारसरणी अर्ध्या पुरोगामीत्वाचा मूलाधार आहे. असो
प्रतिक्रिया
26 Dec 2013 - 3:40 pm | कवितानागेश
एकापुढचे एक निकष चढत गेलेत... शेवटचे ५ एकदम भारी आहेत. :D
26 Dec 2013 - 3:45 pm | प्रकाश घाटपांडे
अरुण जोशी तुमच्या लेखनावरुन मला निर्मुलनवाल्यांचे निर्मुलन हा अवधुत परळकरांचा लेख आठवला. तुम्हाला जाम आवडेल.
26 Dec 2013 - 4:16 pm | arunjoshi123
अज्ञान, अंधश्रद्धा, श्रद्धा, विश्वास, माहिती, ज्ञान, विज्ञान असा काळा ते पांढरा जाणारा वर्णपट (स्पेक्ट्रम) बनवला तर शास्त्रीय दृष्ट्या मानवाला पैकी प्रत्येकाचीच बरीच गरज असलेली भासेल.
निर्मूलनवाले पैकी केवळ घोर, मानवी जीवनाला शाप मानता येतील अशाच गोष्टींच्या मागे पडले आहेत. त्यांच्यातले काही दीडशहाणे वरील पैकी प्रत्येकच घटकाचे उपयूक्त जाणून नाहीत आणि ते नरबळी आणि नारळ फोडणे (नंतर खाणे) यांच्यावर एकत्र एकसमान टिका करतात. अशा दिडशहाण्या निर्मूलनवाल्यांचेही समाजास काही उपद्रव्यमूल्य नाही. परंतु चिकार शहाणे लोक, आधुनिक अंधश्रद्धांच्या जंजाळात अड्कून या घटकांचे संतुलन हरवून बसले आहेत. त्याचा सरळ सरळ परिणाम त्यांची मूल्ये आणि जीवन, वर्तन यावर झाला आहे. ते संतुलन रिस्टोअर करण्याचा हा प्रयत्न आहे.
26 Dec 2013 - 3:47 pm | साती
हा लेख सनातन प्रभेत छापायला द्या.
मस्तं वाटेल.
बाकी लेखकावर आरेसेस्चा प्रभाव घट्टं दिसतोच आहे वट्टात!
26 Dec 2013 - 4:05 pm | arunjoshi123
लेख पुरोगामी प्रभेत छापायचा आहे. पुनर्वाचन करावे अशी विनंती.
26 Dec 2013 - 3:53 pm | परिंदा
काही मुद्द्द्यांवर हे पटते.
26 Dec 2013 - 3:54 pm | यसवायजी
कसं काय सुचतं बुवा एवढं सगळं?
26 Dec 2013 - 4:19 pm | arunjoshi123
मी अत्यंत सामान्य बुद्धीचा माणूस आहे. हे सुचलेलं नक्कीच फार सोपं आहे असं वाटतं.
26 Dec 2013 - 4:13 pm | आतिवास
तुम्ही विचारलेल्या ब-याच प्रश्नांना एक इतिहास, त्यांच्या असण्याचा एक संदर्भ आहे - तो जाणला की बरीच उत्तरे मिळतील. उदाहरणार्थ 'घटने'बद्दलचा तुमचा पहिलाच मुद्दा घ्या. 'शोधा म्हणजे सापडेल' :-)
बाकी काही गोष्टी आता संदर्भहीन झाल्या असतील तर त्यात बदल करायला पाहिजेत - त्यासाठी थेट कृती करण्याची तयारी मात्र हवी आपली.
आणि काही लोकांच्या मान्यतांना अंतिम सत्य समजणे - हे तुम्हीही केले आहेच उदा.
२४. पाश्चिमात्य विद्वान - पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा कोट खराच असतो असे मानणे.
एक शंका - अगदी प्रामाणिक शंका. आंतरजालावर या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं तुम्हाला वाटतं काय? 'असं लोकांना कसं काय वाटतं?' हा २६ वा मुद्दा म्हणून जोडत येईल :-)
26 Dec 2013 - 4:24 pm | arunjoshi123
घटनाराजाचा ६५ वर्षांत एकच शब्द बदलला आहे. तो ही आणिबाणिच्या काळात घुसडला आहे - धर्मनिरपेक्ष. बाकी सारे बदल थातूर मातूर आहेत. त्यात तत्त्व्वात्मक काहीच नाही. ईतका कडक राजा पाहिलाच नाही असे म्हणायचे होते.
त्या तुलनेत राजा फार अॅडजस्टींग असतो.
तुमची शंका कळली नाही. माझा उद्देश फक्त आधुनिक अंधश्रद्धांची यादी द्यायचा आहे. मांडणी प्रश्नात्मक आहे.
26 Dec 2013 - 5:49 pm | पैसा
सगळ्या अंधश्रद्धा (पक्षी शंका) एकापेक्षा एक भारी आवडल्या आहेत. मला पण बरेचदा असले काही काही सुचत असते पण वाद घालायचा स्टॅमिना नसल्याने गप्प बसते. इथे मात्र काही "स्वघोषित पुरोगामी" लोक बाह्या सरसावून दोन हात करायला येण्याची शक्यता वाटते आहे! :D
26 Dec 2013 - 6:09 pm | arunjoshi123
धन्यवाद.
स्वघोषितांपैकी काही पुरोगामी सच्चे असू शकतात. त्यांच्याशी वैचारिक देवाण घेवाण झाली व्यक्तिचे/समाजाचे/राष्ट्राचे पुरोगामीत्व अधिक चांगल्या प्रकारे कळण्यास मदत होईल.
उदाहरणार्थ कोणी म्हणेल या अंधश्रद्धा नाहीत. ही प्रतिके, संकेत वा समाजाने स्वीकारलेली व्यवस्था आहे. मी म्हणेन कि शहाण्यांचा मूर्खपणा म्हणजे अंधश्रद्धा. शेवटी अशाच संकेतांना, इ रुढीचे रुप प्राप्त होते.
घटनेचे उदाहरण बर्याच जणांना पटलेले नाही. मी एक व्यक्ति म्हणून माझ्यावर घटनेचे वर्चस्व अमान्य केले तर? म्हणजे मला माझे तत्त्वज्ञान घटनेपेक्षा सरस वाटले तर? खोटा पुरोगामी हसण्यावारी नेईल. खरा पुरोगामी भारतीय संघराज्याशी मिळून मिसळून राहा असा प्रॅक्टिकल सल्ला देईल. या संवादात दोहोंचे भले आहे.
26 Dec 2013 - 6:13 pm | पैसा
साधी सोपी व्याख्या.
त्याचंही स्वातंत्र्य तुम्हाला आहेच की! मनातल्या मनात तुम्ही काहीही करू शकता. इव्हन बोललात तरी प्रॉब्लेम नाही. प्रत्यक्षात घटनेच्या बाहेर जाऊन काही कृती करत नाही तोपर्यंत सगळं चालतंय!
26 Dec 2013 - 5:53 pm | म्हैस
एकदम भारी
26 Dec 2013 - 7:23 pm | मूकवाचक
+१
26 Dec 2013 - 6:04 pm | प्रसाद गोडबोले
बाकीचे माहीत नाही , पण ह्या विषयावर आधीच राडा झालेला आहे आणि मॉबोक्रसीमधे घटनेपेक्षा मॉबच्या भावनांना जास्त महत्व असते तस्मात राष्ट्रपिता म्हणणे योग्यच आहे असा निष्कर्श निघालेला आहे . :D
26 Dec 2013 - 6:41 pm | arunjoshi123
प्रसादजी, ती चर्चा बहुधा मी ही वाचली. कदाचित २-३ मराठी संकेतस्थळांवर आणि १-२ इंग्रजी स्थळांवर वाचली आहे. पण संदर्भ तो नाही.
उत्तर भारतीय कायस्थ लोक आपला कुलमुख्य पौराणिक ग्रंथांतील चित्रगुप्ताला मानतात. कारण? हे ही कमाईसाठी हिशेब करतात आणि तो ही स्वर्गात हिशेब करतो. याला पहिल्यांदा प्रतिकात्मकता होती. नंतर लोक मानायला लागले कि त्यांचे कूळच मूळी चित्रगुप्तापासून चालू झाले आहे. (कोण्या कट्टर उ भा कायस्थाला विचारा). आमचे म्हणणे इतकेच आहे 'हिशेब करणारांनी जी मूर्ख प्रतिकात्मका वापरली' तीच आजही लोक सर्वत्र वापरतात. त्याने पुढे अन्याय होतो. सबब केवळ भूतकाळातली प्रतिके निवडून त्यांच्यावर पुरोगामी टिका करत असतात.
पटेलांना लोहपुरुष म्हटले जाते, पण १९७१ मधे सेनाध्यक्ष कोण होता हे नंतर कोणी पाहतच नाही.
बाकी बापूजींना राष्ट्रपिता म्हणा वा नको यात प्रतिकात्मकता हवी की नको इतकाच विषय मांडायचा आहे.
26 Dec 2013 - 6:32 pm | स्वप्नांची राणी
" वैचारिक उवा" ....प्रकाश सर, तुमच्या लिन्क मधला हा शब्दप्रयोग आवडला...
26 Dec 2013 - 8:10 pm | चित्रगुप्त
पांडुरंग आणि सुर्श्याचे संभाषण उदाहरणार्थ आठवले. उदाहरणार्थः
... त्याकाळी राष्ट्रपिता म्हणून एक थोर माणूस असे. त्याच्या नावाने सर्व शहरात रस्ते वगैरे असत. त्याचे चित्र एका रुपयाचे नोटेपासून हजाराच्या नोटेपर्यंत हुबेहुब छापलेले असे. आता नोटा म्हणजे काय, तर त्यावर संशोधन सुरु आहे...
त्याकाळी युनिफॉर्म म्हणून असे. वकिलांनी काळे कपडेच घालायचे, अमूक शाळेच्या मुलांनी अमूकच कापडाचे कपडे घालायचे, सैनिकांनी अमूक प्रकारचे कपडे घालायचे, वगैरे ठरलेले असे, अश्या ठराविक कपड्यांना युनिफॉर्म म्हणत...
26 Dec 2013 - 10:02 pm | arunjoshi123
मला या मटेरियलची लिंक द्या ना प्लिझ.
27 Dec 2013 - 12:19 pm | राजो
भालचंद्र नेमाडे यांच्या "कोसला" कादंबरीतील नायक पांडुरंग आणि त्याचा वर्गमित्र सुरेश यांच्यातील संभाषण आहे हे.
27 Dec 2013 - 11:53 am | मारकुटे
>>>उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या मर्यादा झाट माहित नसणे.
वाक्यातील काही शब्द रोचक आहेत. ते शब्द वापरण्याचा लेखकाला मक्ता मिळालेला दिसतो. कारण त्या शब्दाचा अर्थ विचारला असता तो प्रतिसाद उडाला. तत्सम अर्थाचा सभ्य शब्द (जो अभिजन नियमित आपल्या संभाषणात वापरत असतात) वापरला असता तो प्रतिसाद सुद्धा उडाला. मात्र लेखकराव किती सहज असे शब्द वापरत आहेत. अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
27 Dec 2013 - 12:33 pm | arunjoshi123
या संकेतस्थळावरील व्यवस्थापनाच्या वा वाचकांच्या रुचिस या शब्दाने क्षति पोहोचली असेल तर क्षमस्व. संपादकांनी तो काढून टाकावा अशी विनंती.
27 Dec 2013 - 12:43 pm | ज्ञानोबाचे पैजार
आपल्याला या २४ मुद्यातल काही झाट कळल नाही त्या मुळे आपला पास.
27 Dec 2013 - 12:49 pm | नाखु
सगळे धागे कळतात हीच मोठी "अंधश्रद्धा" आहे..प्यारे बुवा यावर काही उपाय करा
अज्ञ बालक
27 Oct 2017 - 12:54 pm | arunjoshi123
खास यनावालांसाठी धागा वर काढत आहे.