देऊळ.!! तु झोप मी जागा आहे!!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
5 Nov 2011 - 4:34 pm

गेल्या आठवड्यात पाहिलेल्या रा-वण मुळे डोक्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळेच कि काय? किमान महिनाभर आता कोणताच सिनेमा पहायचा नाही असच ठरवलं होतं, पण गिरिश आणी उमेश कुलकर्णी या जोडीचा देऊळ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर मला माझा निर्णय बदलावाच लागला.

महाराष्ट्रातलं एक गाव, मंगरूळ!! ज्या गावात दळणवळाणासाठी चांगले रस्ते नाहीयेत, शेतीसाठी लागणार्‍या पाण्याची टंचाई मोठी आहे, चांगलं रुग्णालय नाही, विजेटंचाई अशा समस्या आहेत पण त्याबरोबरच या मागासलेल्या गावात मोबाईल फोन्स, संगणक, रंगीत दुरचित्रवाणी यासारखं तंत्रज्ञान मात्र पोहचलयं यातला विरोधाभास जाणवतो.

अशा त्या गावात राहणारा एक साधा-सज्जन देवभोळा तरूण केशा!! आपली हरवलेली 'करडी' गाय शोधता शोधता त्याला माळावर असलेल्या उंबराच्या झाडात त्याला गुरूदेव दत्त दिसतात आणी मग तो हि बातमी संपुर्ण गावभर करतो. तिथून पुढे एक साधं गाव ते एक मोठं तिर्थक्षेत्र असा त्या गावाचा प्रवास सुरू होतो. सुरूवातीला त्याच्या या बोलण्यावर काहिजण विश्वास ठेवतात तर काही जण त्याचं म्हणणं उडवून लावतातं. गावातल्या महिला मंडळात या गोष्टीची चवीचवीने चर्चाही होते.

काहितरी नविन करायचं या ध्यासातून तिथले तरूण कार्यकर्ते मग या बातमीचा उपयोग करून घ्यायचं ठरवतात, फोन मेसेजेस, वर्तमानपत्रातील बातम्या याद्वारे दत्तगुरूंच जागृत ठाणं असा आपल्या गावाचा ते व्यवस्थितरित्या प्रचार करतात, याबाबतीत महासंग्राम हा वृत्तपत्रकार त्यांना मदत करतो. सुरूवातीला या सगळ्या गोष्टींना विरोध दर्शवणारे गावाचे प्रमूख भाऊसाहेब वरिष्ठांच्या दबावापुढे झुकतात आणी देऊळ बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देतात.

केशा बरोबरच भाऊसाहेब आणी गावातल्या सगळ्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगणारे जेष्ठ आणी जाणकार अण्णा मात्र सुरूवातीपासूनच त्या सगळ्यांना समजवतात पण शेवटी त्यांचाही नाईलाज होतो.

""

पुढे काय होतं?? देऊळ बांधून होतं का?? भाऊसाहेब आणी अण्णांची नंतरची भुमिका काय असते??
या सगळ्या गोष्टींसाठी देऊळ हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहातच जाऊन पहायला हवा.

गिरिश कुलकर्णीने केशाच मद्ध्यवर्ती पात्र अगदी व्यवस्थितरित्या साकारलयं. चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यात त्याने त्याच्यातला अभिनेता अगदी समर्थपणे पेललाय. आतीशा नाईक, विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, ज्योती सुभाष, सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या भुमिकेप्रमाणे योग्य कामं केली आहेत.

ह्रषिकेश जोशी, महासंग्राम पत्रकार किशोर कदम, श्रीकांत यादव आणी त्यांच्याबरोबर असलेल्या अभिनेत्यांनी तरूण कार्यकर्ते धम्माल वठवलेत.

डॉ.मोहन आगाशेंचा साहेब अगदीच कमी वेळा समोर येतो. हिंदी अभिनेते नसिरूद्दीन शहा हे ही एका दृष्यापुरते अनपेक्षितपणे आपल्या समोर येतात.

सर्वात जास्त उत्सूकता होती ती नाना पाटेकरांचा भाऊसाहेब आणी अण्णा असलेल्या दिलीप प्रभावळकर या दोन दिग्गजांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची, पण शेवटी शेवटी अगदी छोट्या स्वरूपात का होईना माझी ती इच्छा पुर्ण झाली. अर्थात त्यांनी त्यांच्या भुमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने पार पाडल्याच ही गोष्ट वेगळी.

"अगदी शुन्य मिनिटात करतो" हा नाना पाटेकरांचा डायलॉग धम्माल आणतो.

कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना...
आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना....
आध्यात्माचा ताप भारी आनं केशाभोवती जमती नारी... यांसारखे चुरचूरीत संवाद मजा आणतात. कथा, पटकथा आणी संवादांच या तिन्ही आघाड्यावरचं काम गिरीश कुलकर्णीने चांगलच जमवलयं.

देवा तुला शोधू कुठं आणी तु झोप तुझा दत्त जागा आहे हि दोन्ही गाणी निदान श्रवणीय तरी आहेत पण त्यातलं आयटम साँग हे मात्र सहनशिलतेच्या पलिकडचं आहे. त्याचे नेमके शब्दचं कानावर पडत नाहीत. एखाद्या चांगल्या पुलाव भातामध्ये अचानक खडा लागावा तसं ह्या आयटम साँग बद्दल माझं मत झालयं अर्थात हे माझं स्वतःच वैयक्तीक मत आहे.

मंगेश धाकडेच पार्श्वसंगीत ठिक आहे.

सुरूवातीपासून चांगला चाललेला चित्रपट मध्ये थोडासा रेंगाळतो पण शेवट बघण्याची उत्सुकताही तेव्हढीच निर्माण करतो. उमेश कुलकर्णीच दिग्दर्शन वळूच्या तुलनेत थोडसं कमी पडलयं असं जाणवतं.

वळू या चित्रपटामुळे गिरिश आणी उमेश कुलकर्णी यांच्याकडून अपेक्षा खुप वाढलेल्या होत्या अगदी तेवढ्या नाही पण त्याच्यापेक्षा थोड्या कमी अपेक्षा या जोडीने नक्कीच पुर्ण केल्यात.

एकंदरीत काय तर, एकदा तरी सिनेमागृहात जाऊन देऊळ बघायला हरकत नाही.

*** (३/५)

कलासमाजजीवनमानमौजमजाचित्रपटविचारमाध्यमवेधआस्वाद

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

5 Nov 2011 - 4:47 pm | अमोल केळकर

मस्त परिक्षण. नक्की बघणार हा सिनेमा :)

अमोल केळकर

प्रचेतस's picture

5 Nov 2011 - 5:03 pm | प्रचेतस

सुरेख परीक्षण.
हा पिक्चर नक्कीच बघणार.
किसनद्येवांनी केलेलं हे बहुतेक पहिलेच परीक्षण असावे पण त्यांनी ते आव्हान सुरेखरित्या पेललेय यात शंकाच नाही.

स्पा's picture

5 Nov 2011 - 5:20 pm | स्पा

किसना झकास परीक्षण रे.. जमतंय जमतंय

रावणात पैसा उडल्या असल्या कारणाने टीवी वरच शिणुमा बघितल्या जाईल

धन्या's picture

5 Nov 2011 - 5:13 pm | धन्या

किसनदेवा, अभिनंदन. नाही म्हटलं पहीलटकरीन सुखरुप सुटली. :)

बाकी सिनेमा यथावकाश पन्नास रुपयाला चार सिनेमावाल्या डीव्हीडी मधून पाहण्यात येईलच.

मृत्युन्जय's picture

5 Nov 2011 - 5:23 pm | मृत्युन्जय

चांगले परीक्षण. चित्रपट बघेन म्हणतो.

मस्त लिहिलं आहेस परीक्षण.. सिनेमा बघणारच होतो. आता आणखी छान वाटेल..

अत्रुप्त आत्मा's picture

5 Nov 2011 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त हो किसनराव....अश्या सिनेमाच्या बाबतीत मी फस्ट डे,,,फस्ट शो वाला... खराखुरा आशयघन चित्रपट आहे...

पैसा's picture

5 Nov 2011 - 6:04 pm | पैसा

जमल्यास आयनॉक्समधे (स्पा, ऐकतोयस ना?) नाहीतर टीव्हीवर येईल तेव्हा!

सुहास झेले's picture

5 Nov 2011 - 6:24 pm | सुहास झेले

किसनराव, सुंदर परीक्षण... जातोय उद्या सकाळी देवळात :) :)

५० फक्त's picture

5 Nov 2011 - 6:52 pm | ५० फक्त

+१ टु धनाजीराव आता ती डिव्हिडि लावा बक्षिस म्हणुन

मी उद्याच जाऊन बघतो.

- पिंगू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2011 - 10:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसनराव, चित्रपटाची ओळख चांगली करुन दिली आहे. देऊळ च्या पेप्रात बातम्या वाचल्या होत्या. चित्रपट बीग बजेट आहे. (आपल्या मराठी चित्रपटाच बजेट किती असतं आणि बीग बजेट म्हणजे किती असो) मराठी चित्रपटातील सर्व उत्तमातले उत्तम कलाकार आहेत आणि एक वेगळ कथानकही देऊळचं आहे म्हणतात. थेट्रात नैच जमलं तर डीव्हीडीवर देऊळ नक्कीच पाहू. धन्यवाद.

आणि ते वळूचं कौतुक करु नका राव. मला तर लैच बोर झालं होतं.

-दिलीप बिरुटे

ते वळूचं कौतुक करु नका राव. मला तर लैच बोर झालं होतं.

+१ अगदी, अगदी!

मला तर त्या सिनेमात काय होते तेच कळले नाही :(

- (पोळ) सोकाजी

मदनबाण's picture

8 Nov 2011 - 9:58 am | मदनबाण

(पोळ) सोकाजी
खॅ खॅ खॅ... सोक्या चांगली दुभती गाय धर रे बाबा आता ! ;)

(पुर्वीचा मोकाट आणि सध्याचा वेसण घातलेला वळू) ;)

ते वळूचं कौतुक करु नका राव. मला तर लैच बोर झालं होतं.

हात्तिच्या मारी, हितंबी मज्या जोडीला मान्सं हैतच का?
मला वाटलं, मी यकटाच करंटा है काय जेला वळु आडौला न्हाइ ;)

नाही नाही तुला असं एकटं कसं सोडू आम्ही?;)
मलाही वळू फारसा आवडला नाही.
कथा राहू दे पण कोणाचा अभिनयही सहज वाटला नाही.

सगळीकडे एवढी छान छान परीक्षण येत होती या पिक्चरची , पण मला काहीच समजला नाही.
मला वाटल मीच येडी आहे, पण आता आनंद होतंय मी एकटीच नाहीये! ;)
मी पूर्ण पिक्टुरेभर ह्या रेड्याला हिरो म्हणून का घेतला हाच विचार करत होते!

परिक्षण छान लिहिलं आहे.
आपली मराठी डॉट कॉमवर येईल तेंव्हा पाहता येईल हा सिनेमा.

आशु जोग's picture

5 Nov 2011 - 10:29 pm | आशु जोग

विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, ज्योती सुभाष हे लोक आहेत अपेक्षेप्रमाणे

हा चित्रपट म्हणजे शहरी कुलकर्णीटाइप लोकांनी काढलेला ग्रामीण चित्रपट आहे का

कारण खरा खेडवळ माणूस त्यापासून दूरच राहतो असं निरीक्षण आहे

>> आणि ते वळूचं कौतुक करु नका राव. मला तर लैच बोर झालं होतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आपण पुण्यामुंबैकडचे नाही का

आमच्यासारखेच खेडवळ दिसताय !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2011 - 10:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आपण पुण्यामुंबैकडचे नाही का
आमच्यासारखेच खेडवळ दिसताय !

मी पक्का खेडवळ हाय. खेंडं सालं आपल्या हाडामासात रुतलेलं हाय बघा.
आता त्यो वळू धराला इतकं कुटं टैम लागतो का बघा. आन त्याच्यावर पीच्चर.
आपून खेड्यातलं लोक त्या वळुकंडं ढुकुन तरी पाहतो का ? म्हून
मला लय बोर झाल्तं बघा. :)

शासनानं वळु म्हणजे बैल नै म्हणलं ते कळ्ळ का तुम्हाला.

-दिलीप बिरुटे

यकु's picture

5 Nov 2011 - 11:17 pm | यकु

देऊळ म्हणजे काहीतरी चांगलं कथानक असेल असं वाटलं होतं.
पण किसनदेवांनी केलेल्या परिक्षणातून ती आशाही धुळीस मिळाली.
सबब आवर्जुन देवळात जाणे नाही.
पडलाच दृष्टीला तर पाहू म्हणे.

पिवळा डांबिस's picture

6 Nov 2011 - 9:33 am | पिवळा डांबिस

कुलकर्णीटाइप लोकांनी काढलेला ग्रामीण चित्रपट....
कुलकर्णीटाईप लोकांनी म्हणजे?
जोगटाईप लोकांनी स्वतःला ग्रामीण समाजाचा वकील समजावं हाच एक मोठा विनोद आहे....

"चिताभस्म सर्वांगासी, लिंपून राहे
माझ्याकडे देव माझा, पाहतो आहे...."
सुपर जोग#,
पिवळा डांबिस

कुलकर्णीटाइप म्हणजे काय ?
आणि जोगांचा कुठला टाइप असतो ( 'जोग'वा? )

आणि त्यात
शहरी कुलकर्णीटाइप आणि ग्रामिण कुलकर्णीटाइप असे प्रकार असतात का ??

सेन्सिबल लिहा कि काहितरी ..

आशु जोग's picture

15 Nov 2011 - 9:59 pm | आशु जोग

शाहीर नाव घेतलेला कुलकर्णीटाइप

*मिरची

दादा कोंडके's picture

5 Nov 2011 - 11:45 pm | दादा कोंडके

चित्रपट बघावाच लागेल.

मी-सौरभ's picture

5 Nov 2011 - 11:57 pm | मी-सौरभ

स्पा, समीर सूर, आणि ईतर परीक्षन लेखकांनो किसन द्येव आता तुमाला ट्फ फाईट देणार असं दिसतयं ;)

शिल्पा ब's picture

6 Nov 2011 - 2:35 am | शिल्पा ब

नक्की बघेन ( त्यावर दुसरा धागा मात्र काढणार नै, काळजी नसावी.

सध्या हा चित्रपट ‘फोडा दत्त नाम टाहो’ " या वादग्रस्त गाण्यामुळे चर्चेत आहे ! ( हेच जर इस्लाम विषयक गाणं असतं तर भावना दुखावल्या जातात म्हणुन आधीच बंदी आली असती... हिंदूंना भावना आहेत ?)
असो...
अधिक बातमी इथे :--- http://goo.gl/YSkXx

वरचा ट्रेलर पाहिला... "सो कूल" सोनाली ने उरोज प्रदर्शनाचा वसा घेतलेला दिसतोय ! (०:१९)
डर्टी चित्रपटातल्या विद्या बालन नंतर सोनाली ? असा उगाच प्रश्न मनात तरळुन गेला !
विडंबन असलेले गाणं काढल्या नंतरच हा चित्रपट पाहण्या बद्धल विचार केला जाईल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Nov 2011 - 10:48 am | विश्वनाथ मेहेंदळे

बातमी वाचली. निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. बातमीत म्हटले आहे, " श्री दत्तगुरूंचा ठिकठिकाणी एकेरी नावाने उल्लेख करून त्यांचा अवमानही केला. " या लोकांनी दत्ताची आरती वाचली आहे का कधी ? त्यात एकेरी उल्लेखच आहे. त्यातच कशाला, आपल्याकडे देवाचा उल्लेख एकेरीच करतात. हिंदूंनी पण उठसूट धार्मिक भावना दुखावून घ्यावात की काय ? त्या पण अशा निरर्थक कारणांसाठी? अशा वाय.... लोकांकडे लक्ष देता कामा नये.

हिंदूंनी पण उठसूट धार्मिक भावना दुखावून घ्यावात की काय ?
या गाण्यात असे काही शब्द आहेत म्हणे :--- ‘शॉलिंग दत्त’, ‘डार्लिंग दत्त’, ‘हाय हाय दत्त’, ही कुठल्या प्रकारची गीत रचना ?

जाता जाता :-- पैगंबरांचे व्यंगचित्र काढले म्हणुन harlie Hebdo नावाच्या वर्तमानपत्र कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला.
संदर्भ :---
http://www.reuters.com/article/2011/11/03/us-france-fire-magazine-idUSTR...

धर्मांधाच्या गोष्टी सोडा हो!! जनावरंच ती!!
बोललं की मग तोंड दिसतं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Nov 2011 - 11:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गाणे ऐकून प्रतिक्रिया देण्यात येईल.

शिन्देसरकार झक्कास परिक्षण. पिच्चर बघावाच लागेल.

दत्ता काळे's picture

6 Nov 2011 - 12:21 pm | दत्ता काळे

चित्रपट बघणार होतोच, आता तर लवकरच बघणार.

आशु जोग's picture

6 Nov 2011 - 1:52 pm | आशु जोग

हे ही पाहण्यासारखे आहे

http://tinyurl.com/gram01
http://tinyurl.com/gram02

छोटा डॉन's picture

6 Nov 2011 - 2:14 pm | छोटा डॉन

सिनेमा पहाणे ह भक्तिभाव मानला तर सिनेमा थेट्राला 'देऊळ' मानायला हवे आणि आपण ज्या श्रद्धेने ह्या देवळात 'सिनेमाची स्टोरी, चित्रण, गीत-संगीत, नावजलेले कलाकार अणि त्यांनी समर्थपणे पेललेल्या भुमिका' पहायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला जातो त्यांना 'देव'च म्हणायला हवे.
आपल्या अपेक्षांप्रमाणे सिनेमात सर्व काही असेल तर थेटररुपी देवळात साक्षात 'देवदर्शन' झाल्याचे समाधान लाभते व ह्या देवळाची वारी एक उत्सव होऊन जातो.

उमेश कुलकर्णींच बहुचर्चित 'देऊळ' हा सिनेमा खास थेट्रात जाऊन पाहिला असता आम्हाला 'देव नाही देवाळात' असा अनुभव आला. ज्या अपेक्षेने आम्ही देवाचे दर्शन घ्याला गेलो तो देवच तिथे नव्हते, बाकी मंदिराची दिव्यभव्यता आणि जाहिरातीद्वारे सुरु असलेला भक्तीचा जागर मात्र डोळ्यात मावेना इतका प्रचंड होता.
हे आमच्यासारख्य भक्तीभावाने सिनेमा पाहणार्‍या पटण्यासारखे नाही, म्हणुनच 'देऊळ'बद्दल आमचे हे ४ शब्द ....

’देऊळ’ हा सिनेमा लोकांना शक्यतो आवडणार नाही.
१. लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही.
२. तगडी स्टारकास्ट घेऊन उगाच शास्त्रापुरते सत्य दाखवणे त्याहुन आवडत नाही.

मला ’दुस-या कारणा’मुळे देऊळ तितकासा आवडला नाही. पिक्चर बर्‍यापैकी जमला नाही असे मला म्हणावेसे वाटते.
वलयांकित असे मोठ्ठे कलाकार घेऊन आणि त्याचा भरपुर गाजावाजा करुन शेवटी यथातथाच असलेला चित्रपट असे मी ह्याचे वर्णन करेन.
पुर्वार्धात हा चित्रपट भयंकर संथ आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर रटाळ वाटला.
गाजावाजा करुन मोठ्ठे मोठ्ठे कलाकार घेऊन त्यांना ह्या सिनेमात अक्षरशः वाया घालवले आहे असे वाटते. त्या त्या कलाकाराच्या क्षमतेला न्याय देणारे एकही पात्र ह्या चित्रपटात नाही ... अपवाद गिरीश कुलकर्णींचा केशा आणि दिलीप प्रभावळकरांचा अण्णा.
त्यांच्या पात्राची पार्श्वभुमी अथवा घडण चित्रपटात कुठेच ठळकपणे दिसत नाही. वातावरण निमिर्ती आणि पात्र ओळखीसाठी अत्यावश्यक असलेले डिटेलिंग इथे भरकटले आहे, उलट त्या नादात ह्या विषयाशी अगदीच अनावश्यक असलेले प्रसंग उगाच घुसडले गेले आहेत असे वाटले. मी तर असे म्हणेन की ह्या बड्या नावाऐवजी अगदी कुणीही त्या त्या भुमिका सहजपणे करु शकला असता, असे असताना उगाच मोठ्ठी नावे वापरुन, त्यांना यथातथा भुमिका देऊन उगाच 'बिग बजेट' अशी जाहिरात करणे हे पटले नाही.
नाना पाटेकर, मोहन आगाशे, किशोर कदम ह्यांना अक्षरशः वाया घालवला आहे.
सोनाली कुलकर्णी ह्यांची भुमिका खास आहे म्हणण्यात अर्थच नाही, इनफॅक्ट त्यांच्या व्यक्तिरेखेला तसा वावच नाही, हेच कारण बहुदा सर्वच बड्या नावांबाबत घडते.
नसरुद्दिन शहाचे पात्र ह्या सिनेमात 'उगाच' घुसडल्यासारखे वाटते, उगाच २-३ डायलॉक आणि अनावश्यक प्रसंग रचना ह्याने काय मिळाले ते कळत नाही. हां, बड्या नावांची जाहिरात करायची असेल तर मात्रचे आमचे मौन बाबा, त्यातले आम्हाला जास्त समजत नाही.
चित्रपटाचे संगीत, गाणी आदी बाबत न बोललेलेच बरे. सध्या जरा वादग्रस्त असलेले 'दत्ताचे गाणे' हे बर्‍यापैकी सत्यपरिस्थीतीच्या जवळ जाणारे आहे आणि नादमधुर नसले तरी गुणगुण्यासारखे वाटले.

सिनेमात काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्या पेलण्यात जरा गडबड झाली आहे.
'एका देवस्थानाचा जन्म' अशी एका व्याख्या करता येण्याजोगा हा चित्रपट आहे, विषयाच्या निवडीला आणि त्यात दाखवलेल्या बर्‍यापैकी डिटेलिंगला फुल्ल नसले तर उत्तम गुण.
मात्र ह्याच अनुषंगाने आम्ही वर केलेल्या 'लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही' ह्या विधानाबाबत २ शब्द न लिहणे हे ह्या सिनेमावर अन्याय ठरेल.
एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी जे जे घडते ते ते दिग्दर्शकाने जसे आहे तसे दाखवले आहे. स्थानिक ग्रामस्थांचा संपुर्ण बाजारपेठेवर कब्जा, देवस्थानाच्या निमित्ताने चालणारे अन्य उद्योग-धंदे व त्यालाही असणारी बरकत, सतत येणार्‍या पैशाचा ओघामुळे दिवसेंदिवस 'श्रीमंत' होत जाणारे देवस्थान आणि त्याचे व्यवस्थापक, ह्याच पैशाचा जोरावर देवळाला अजुन 'मोठ्ठे' करण्याची व त्यामार्गे अजुन पैसा कमवण्याची इच्छा, कालांतराने भक्तीभावाला बाजुला सारुन केवळ दिखावा, सारंजाम, भपकेपणा आणि त्यात कमी की काय म्हणुन स्थानिक राजकारणाचा हातभार आदी बाबींबर 'देऊळ' व्यवस्थित भाष्य करतो.
खरे तर हे सत्य सर्वांनाच माहित आहे, अशी 'उभारलेली' देवळंही अनेकजणांना माहित असतील, पण ही बाब स्पष्टपणे दाखवण्याचे धाडस केल्याचेही कौतुक आहे.
मुर्ती चोरीला गेल्यावर पहिल्यापेक्षा अधिक भारी मुर्ती आणुन येनकेनप्रकारे 'देऊळ' चालु राहिले पाहिजे हा सोसही मस्त दाखवला आहे.
ह्या निमित्ताने दिग्दर्शकाने 'देवस्थानाचे बाजारीकरण' ह्यावर बर्‍यापैकी कठोर भाष्य केले आहे असे म्हणायला हकरत नसावी. ह्याच्या जोडीला ग्रामीण भागातले राजकारण, लोकांच्यातला बेरकीपणा, मिडियाची ताकद, ग्रामीण जीवनातला एकंदरीत संथपणा आणि रिकाम्या हाताचे व निवांत डोक्याचे लोक वेळ घालवण्यासाठी काय काय करत असतात हे चांगले दाखवले आहे.

उपरोक्त बाबींमुळे चित्रपट बर्‍यापैकी पाहण्यासारखा होतो, पण हे आणि इतकेच दाखवण्यासाठी बड्या नावांची अजिबात गरज नाही हे सत्यही पुन्हा ढळढळीतपणे समोर येते.
'कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना... आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना....' सारख्या संवाद/काव्याची ह्या लेव्हलला आणि चित्रपटात एवढे बडे कलाकार असताना गरज नव्हती, असली स्ट्रॅटेजी बी ग्रेडी चित्रपटाने वापरायची असते, ती तिकडेच शोभून दिसते, अन्यथा उगाच हसे होते, असो.

तर एकंदरीत चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे, आवर्जुन थेट्रात पाहण्याची गरज नाही, मराठी चित्रपटसृष्टीला मदत करायची असेल तर पाहु शकता, यथावकाश टिव्हीवर येईलच.
माझे ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन .... बडा घर, पोकळ वासा. असो.

- (चित्रपटाबद्दल असामाधानी आणि स्ट्रॅटेजीवर नाराज) छोटा डॉन

रेटिंग वगैरे द्यायचे असल्यास : (विषयाची निवड आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग इत्यांदीमुळे राउंडफिगर ) २ स्टार **

स्वतन्त्र's picture

6 Nov 2011 - 3:55 pm | स्वतन्त्र

वेगळं काहीतरी (विशेषतः मोठे कलाकार असताना )पाहायला मिळालं नाही.पुढे काय होईल ते समजू शकतं.शिवाय अण्णांनी घेतलेली माघार अजिबात पटली नाही.

विनायक पाचलग's picture

12 Nov 2011 - 9:40 pm | विनायक पाचलग

परवा बझ वर तुझे देऊळ बाबतचे हे परिक्षण वाचलेले ...काल पिक्चर पाहिला ...
थोडक्यात सांगतो ...अपेक्षा ठेवला तर अपेक्षाभंग आणि काहीही अपेक्षा ठेवल्या नाहीत तर बेस्ट चित्रपट ...
सर्व मोठ्या कलाकाराना वाया घालवलेले आहे हे २०० % मान्य ..विभावरी तर २ सीन दिसली फक्त ...
पण , त्यानी हे सर्व कलाकार घेतले याचे मला बरे वाटले ..यापुर्वी खुपदा असे झालेले आहे की चांगले विषय असणारे सिनेमे आले ,पण ते क्राऊड पर्यंत गेलेच नाहीत ..जोगवा ,गाभ्रीचा पाऊस (अगदी गंध देखील ) ही त्याची काही उदाहरण .....
पण ,उमेश कुलकर्णीने हा महत्वाचा विषय व्यावसायिक वेष्टनात गुंडाळुन आणला याबद्द्ल त्याला धन्स ...
हे सारे लोक नसते तर देऊळ चा विषय बघायला कोण आले असते का ????

पण उपहासाने जावा वा आणखी कशाने ..
एकदा थिएटरात जाऊन देऊळ बघाच ..एवढे प्रामाणिकपणे वाटते ...

मदनबाण's picture

6 Nov 2011 - 4:22 pm | मदनबाण

डॉन रावांचे परिक्षण आवडले. :)
आज काल सर्वच गोष्टींचा बाजार मांडला जातो... त्यात देव सुटणार कसे ?

सुहास झेले's picture

6 Nov 2011 - 5:15 pm | सुहास झेले

आताच बघून आलोय देऊळ...

चित्रपटात गिरीश कुलकर्णींचा केशा फक्त आवडला, बाकी सगळं बिघडलंय. नाना आणि दिलीप प्रभावळकरांना अक्षरशः वाया घालवलंय. इतकी हाईप झाली होती ह्या सिनेमाची, म्हणून न राहवून एकटाच गेलो थेटरात... आणि एकटाच गंडलो ;)

माझीही शॅम्पेन's picture

6 Nov 2011 - 9:53 pm | माझीही शॅम्पेन

डॉन राव तुमच आणि आमच परीक्षण बर्‍याच प्रमाणात सारख आहे . मी किस्नाने लिहिलेल परीक्षण आणि एकही प्रतिकिया ना वाचता खाली लिहिलाय , आता तुम्ही लिहिलेल वाचल्या नंतर सम-विचारी प्रतिक्रियांनी आनंद वाटला.

रेटिंग वगैरे द्यायचे असल्यास : (विषयाची निवड आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग इत्यांदीमुळे राउंडफिगर ) २ स्टार **

+२.५ :)

छोटा डॉन's picture

7 Nov 2011 - 11:05 am | छोटा डॉन

एकदम करेक्ट बोललास सायबा.
ह्या विषयावर आपली मते तंतोतंत जुळतात हां, समविचारी प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.

अ‍ॅक्च्युअली इथे मी माझे परिक्षण टाकावे की नाही ह्या विचारात होतो, उगाच ते 'सत्यं ब्रुयात प्रियं ब्रुयात,अप्रियं सत्यं न ब्रुया'' आठवले, असो, बरे वाटले जरा ..

- छोटा डॉन

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Nov 2011 - 5:12 pm | निनाद मुक्काम प...

छोटा डॉन आणी कीसन शिंदे
ह्यानी एवढे चांगले लिहिले आहे की अजुन त्यावर काय लिहावे.

एवढेच वाटते की जर तुम्ही रा १ थिएटर मधे पाहतात व् पायातील खेटर पडद्यावर फेकून न मारण्या इतका सोशिक पणा अंगी असेल तर त्यामानाने हा मराठी सिनेमा बर्याच सुसह्य ठरावा.

सध्या सिनेमा विक्रीचे तंत्र बदलत आहे. भरपूर गाजावाजा करावा नी मल्टी फ्लेक्स मधे पहिल्या वीक मधे सिनेमात दम आहे का नाही हे रसिकांना समजन्या अगोदर गल्ला कमवावा
हा फंडा वापरला जात आहे .त्यात गैर काहीच नाही.

सीनयर कुलकर्णी सिनेमाची पूर्व प्रसिध्धि करताना एक वृत्तपत्रात काय म्हणते ते पहा

फार कमी वेळेला क्रिएटीव्ह प्रोसेस इतकी आनंददायी असते. सगळं जुळून येतं. कष्ट जाणवतही नाहीत. कुणाच्या मनात इगो बिगोचे प्रश्न डोकावत नाहीत. गैरसमज, भांडणं होत नाहीत. मजा येते फक्त कामाची. असं वाटतं.. ऑल इज फेअर इन लव्ह, वॉर अ‍ॅण्ड फिल्म्स लाइक देऊळ..

पुढे अजुन काय म्हणते ते पहा

एकटे नानासर म्हणजे अमेरिका असं धरलं. तर बाकीचे दिग्गज कलाकार मिळून आख्खा युरोप! वानगीदाखल नावं घ्यायची. तर दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, नासिरुद्दीन शहा, उषा नाडकर्णी.. कुणाकुणाच्या गुणवत्तेला सामोरं जायचं आम्हा पामरांनी. आमच्या आशिया खंडात भरले होते, किशोर कदम, हृषिकेश जोशी, आतिशा नाईक, विभावरी देशपांडे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, शर्वाणी, भक्ती, नेहा, स्मिता तांबे.. देऊळची कास्ट आणि क्रेडिट लिस्ट पाहिली नुसती की लक्षात येईल. हा सिनेमा म्हणजे नुसती मंगल दंगल नाही. तिसरं महायुद्धच आहे चक्क.

आता नाना हा अभिनयातील महासत्ता मानला तर आगाशे , शहा ह्यांना दुसर्या गटात मोडून वाद निर्माण करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे.

सगळ्यात शेवटी

पण महायुद् आगीत तेल ओतून जास्त भडकवण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रोडय़ुसर अभिजित घोलप यांच्या ‘देविशा फिल्मस्’नी. पहिलीच फिल्म म्हणून जरा मवाळ वगैरे वागतील. ते नाही. फिल्म उत्तम करण्याचा चंगच बांधला होता त्यांनी. तडजोड वगैरे शब्द त्यांच्या डिक्श्नरीतच नाहीत. स्वत:च रणशिंग फुंकलं त्यांनी. प्रेक्षकहो, आता तुम्हीच पाहा ही जुगलबंदी, लढाई. आम्हाला प्र.चं.ड. धमाल आली. ४ नोव्हेंबरला आम्ही तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येतो तेव्हा भेटूच.. आमच्या देवळात नक्की या . . .

आपल्याला आवडले बुवा

सोकु ( जेष्ट ) रोक्स

कनिष्ट ( तीचा समुद्र हा गहिरे ह्यांचा सिनेमा फक्त तीच्यासाठी पाहीला .)

आणी जातिवंत पुणेरी सौदर्य ( खुपते च्या भागात त्यांनी हा खुलासा केला ) तू नळी वर स्वामी च्या फिती पहायच्या नी जुने दीस आठवावेत.

एक प्रश्न मला नेहमी पडतो?

कुलकर्णी साच्यामधे ग्रामीण सिनेमे हे फक्त शहरी भागातील लोकांना आवडतात .

तर मग ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या साच्यातील सिनेमे आवडत असावेत ? हे पण जरा सांगावे .

कुबल ताई ह्यानी पुनरागम........ करावे का ?

मिलिंद गवळी ह्यांना घेउन सुपर चा हीरो सिनेमा काढावा का ?

८० चा दशकातील ( के साळ पोट दाखवत ) व् चट्टेरी पत्तेरी गणवेशात सुबल ह्यांचा तालावर उद्यानात कवायती करणारे विनोद वीर नव्या पिढीत शोधावेत का ?(

रंजना सारखे तर मराठीत ग्रामीण व् शहरी लोकांना एकाच वेळी भावलेले व्यक्तिमत्व शतका मधून एकदाच जन्माला येते .

श्रीरंग's picture

7 Nov 2011 - 12:32 am | श्रीरंग

<<तर मग ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या साच्यातील सिनेमे आवडत असावेत ? हे पण जरा सांगावे .

कुबल ताई ह्यानी पुनरागम........ न करावे का ?

मिलिंद गवळी ह्यांना घेउन सुपर चा हीरो सिनेमा काढावा का ?

८० चा दशकातील ( के साळ पोट दाखवत ) व् चट्टेरी पत्तेरी गणवेशात सुबल ह्यांचा तालावर उद्यानात कवायती करणारे विनोद वीर नव्या पिढीत शोधावेत का ?(

एक नंबर!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Nov 2011 - 12:54 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>एक नंबर!!
अगदी अगदी !!! निमुपोज रॉक्स ;-) चोख आणि नेमके सवाल विचारले आहेत.

तर मग ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या साच्यातील सिनेमे आवडत असावेत ? हे पण जरा सांगावे .

ग्रामीण भागातील लोकांना काय आवडत होते/ आवडत नाही ते सांगण्याचा मक्ता माझ्याकडे घेऊन काही गोष्टी सांगतो:-

१. ग्रामीण भागातील लोकांना मकरंद अनासपुरेचा अभिनय आवडतो. (कितीही गयागुजरा कथानक असो, त्याची मराठवाडी टोनिंग लोकांना आवडते)
२. ग्रामीण भागातील लोकांना निळू फुलेंनी रंगवलेले कित्येक पुढारी, खलनायक आणि सरपंच आवडतात.
३. ग्रामीण भागातील लोकांना श्रीराम लागूंचा पिंजरामधला मास्तर आवडतो ( सिंहासन मधला लागूंचाच अर्थमंत्री आवडत नाही.. हे आवडणे शहरी आणि त्यातल्या त्यात समुद्रपार वस्तीवाल्यांकडे.. अगदी तसंच सामनामधला श्रीराम लागूंचा मास्तरही आवडत नाही.. हां, त्यातच निळू फुलेंनी रंगवलेला हिंदूराव मात्र आवडतो..)
४. ग्रामीण भागातील लोकांना नटरंगमधला अतुल कुलकर्णींचा नाच्या (आणि त्याचा तो मुद्दाम काढलेला पिचका आवाज बिलकुल आवडला नाही) आणि 'वाजले की बारा' मध्ये रेडीमेड पदर, निर्‍या पाडलेली रेडीमेड साडी (पँटीसारखी इलॅस्टीक लावलेली!! ) घातलेलं आवडलेलं नाही.. हां, तिचाच मुरळी असतानाचा डान्स क्या कहने!

यात टुरिंग टॉकिजमध्ये ग्रामीण चित्रपटाच्या नावाखाली कसल्याही चित्रपटाला होणार्‍या गर्दीचा विचार केलेला नाही.
बाकी आजकालचे मराठी सिनेमे पहात नाही त्यामुळे ग्रामीण अभिनय करणार्‍या नट/नट्यांबद्दल अधिक काही माहित नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 3:39 am | निनाद मुक्काम प...

'वाजले की बारा' मध्ये रेडीमेड पदर, निर्‍या पाडलेली रेडीमेड साडी (पँटीसारखी इलॅस्टीक लावलेली!! ) घातलेलं आवडलेलं नाही.. हां, तिचाच मुरळी असतानाचा डान्स क्या कहने!

माझ्या मते तुम्हि ज्युनियर कुलकर्णी बद्दल बोलत आहात ती अप्सरा आली ह्या गाण्यात होती.

. कारण वाजले की बारा हे गाणे अमृता ने केले आहे व त्यात ती फक्त त्याच एका गाण्यात आहे.

लीलाधर's picture

6 Nov 2011 - 7:47 pm | लीलाधर

खुपच छान परीक्षण.....

दत्त दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध आणि दूधाची साय....

निव्वळ अप्रतिम...

आखीर वो किसना है....

माझीही शॅम्पेन's picture

6 Nov 2011 - 9:26 pm | माझीही शॅम्पेन

आज देऊळ चित्रपट पहिला , वरच परीक्षण मुद्दामन न वाचता काही तटस्थ मुद्दे मांडण्याचा प्रयत्न. चित्रपट तितकासा आवडला नाही हे आधी स्पष्ट करतो

१. सुरूवात अतिशय संथ , मधेच गतिमान आणि पुन्हा कथा परत रखडलेली वाटली
२. अतिशय पोटेन्षियल असलेली कथा असून त्याची मांडणी परिणामकारक वाटली नाही
३. श्रध्दा आणि सामाजिक जाणीव असा अतिशय परिणामकारक असा संघर्ष लेखकाला आणि दिग्दर्शकाला नीट मांडता आला नाही. त्यामुळे कथा अतिशाय एकांगी मार्गाने वाटचाल करीत राहते.
४. चित्रपटात खूप दिग्गज कलाकार असून ही एकही पात्र निटस उभ करता आल नाही. नाना पाटेकर , मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर याना अगदी वाया घालवल्या सारख वाटल.

आवडलेल्या गोष्टी
१. छान चित्रीकरण , यावर बरीच मेहनत घेतलेली वाटली
२ सर्व गाणी छान (फक्त एक आयटम गाण तर भलताच टुकार)

उपहासनी म्हणायाच तर फक्त मराठी चित्रपटाला प्रोत्साहन म्हणून जरूर बघा !
अवांतर :- जाता जाता हा चित्रपट गणेश थेटरात पहिला , त्याची अवस्था पार दयनिय झाली आहे , पण अस असूनही बाल्कनी चक्क हौसफुल होती ... पण त्या थेटराताला हा शेवटचा चित्रपट अस म्हणून कायमचा निरोप घेतला , ह्या चित्रपट गृहाशी काही आठवणी जुडल्या असल्याने अम्मळ हेलावून गेलो :(

किसन शिंदे's picture

7 Nov 2011 - 9:05 am | किसन शिंदे

जाता जाता हा चित्रपट गणेश थेटरात पहिला

बॉलिवूडचे तद्दन भंगार सिनेमे खिशाचा विचार न करता चांगल्या हायफाय थेटरात जावून पाहतो पण तेच मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र गणेश टॉकिज सारख्या कमी तिकीटातल्या रया गेलेल्या चित्रपट गृहाची वाट पकडतो.
परत आपणच मराठी चित्रपटांच्या नावाने शंख करायला मोकळे होतो.

माझीही शॅम्पेन's picture

7 Nov 2011 - 12:04 pm | माझीही शॅम्पेन

अरे मॉल्स आणि मल्टिप्लेक्स हुचभरू लोकांसाठी असतात , आम्ही स्वयॅंघोषित तथाकथित बुध्दीवादी आणि टिपिकल मध्यमवर्गीय असल्याने नेहमी मास म्हणूनच वावरतो :) असो चित्रपट गृहाच्या दर्जा आणि चित्रपटाचा दर्जा यात काही संबध असेल अस वाटत नाही

अवांतर : - जाता जाता अजुन महेश लंच होमच्या बिलाच्या धक्क्यातून सावरलो नाहीए त्यामुळे रस्त्यात मल्टिप्लेक्स लागल की आम्ही रस्ता बदलतो :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Nov 2011 - 2:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>अरे मॉल्स आणि मल्टिप्लेक्स हुचभरू लोकांसाठी असतात , आम्ही स्वयॅंघोषित तथाकथित बुध्दीवादी आणि टिपिकल मध्यमवर्गीय असल्याने नेहमी मास म्हणूनच वावरतो
तू हिंदी सिनेमे जनरली कुठे बघतोस ? गेल्या एका वर्षात जितके हिंदी सिनेमे पाहिलेस त्यातले किती मल्टिप्लेक्स किंवा तत्सम ठिकाणी होते ?

>>असो चित्रपट गृहाच्या दर्जा आणि चित्रपटाचा दर्जा यात काही संबध असेल अस वाटत नाही
असे कसे म्हणतोस भाऊ? चित्रपट बघणे एक अनुभव असेल तर चित्रपट गृहाच्या दर्जानुसार फरक नाही पडणार? उदा, चित्रपट गृहातील ध्वनीयंत्रणा चांगली असेल तर चांगले ऐकू येईल. प्रक्षेपण यंत्रणा चांगली असेल तर छान दिसेल.

>>अवांतर : - जाता जाता अजुन महेश लंच होमच्या बिलाच्या धक्क्यातून सावरलो नाहीए त्यामुळे रस्त्यात मल्टिप्लेक्स लागल की आम्ही रस्ता बदलतो.
च्यामारी, टीम बरोबर लंच ला जाता तेव्हा किती बिल होते रे? परवा आमची टीम पिझ्झा हट मध्ये गेली होती, ३००-४०० ला फोडणी बसली. तुम्ही आयटी वाले आणि असे रडता ? त्यातून १३xxxx वाल्यांनी असे रडणे शोभत नाही :-)

माझीही शॅम्पेन's picture

7 Nov 2011 - 11:15 pm | माझीही शॅम्पेन

तू हिंदी सिनेमे जनरली कुठे बघतोस ? गेल्या एका वर्षात जितके हिंदी सिनेमे पाहिलेस त्यातले किती मल्टिप्लेक्स किंवा तत्सम ठिकाणी होते ?

अरे मी हिंदी चित्रपट कुठेच बघायची वेळच येत नाही , कुठलाही चित्रपट हल्ली ६ ते ८ आठवड्यात टि.वी वर झळकतोय !! तरी पण बहुधा "जिंदगी ना मिलेगी दोबरा" मु.पो आनंद

असे कसे म्हणतोस भाऊ? चित्रपट बघणे एक अनुभव असेल तर चित्रपट गृहाच्या दर्जानुसार फरक नाही पडणार? उदा, चित्रपट गृहातील ध्वनीयंत्रणा चांगली असेल तर चांगले ऐकू येईल. प्रक्षेपण यंत्रणा चांगली असेल तर छान दिसेल.

शोले आणि शान सारखा चित्रपट अशोक सारख्या गेला बाजार चित्रपट गृहात बघुनही भयंकर आवडले. तसेच इतरही काही चित्रपट चक्क उभे राहून किवा गणपतीत पडद्यावर बघून "वसूल" केले आहेत.

परवा आमची टीम पिझ्झा हट मध्ये गेली होती

विमे काका झब्बा लेंगा आणि शबनम बॅग घेऊन विमे-काका तुम्ही पिझा चापतय अस दृष्य डोळ्यासमोर येऊन अंमळ गमंत वाटली. आणि बील द्यायच्या वेळी आतल्या बन्डितुन रूपडे काढून दिले वाटत :)

तुम्ही आयटी वाले आणि असे रडता

तुम्ही हा शब्द पाहून हसून मुरुकुटी वळली त्यामुळे पुढचा पास :)

सिनेमे पाहणे म्हणजे काय समाजसेवा आहे काय? पैसे कमवायला लोक सिनेमे काढतात. आणि बघणारा, वेळ, अंतर, सोबतचे लोक, सिनेमा लागलेली थिएटरं इ. यांचं गणित करून सिनेमे पाहतात. हिंदी सिनेमांचा उद्धार करायचा या हेतूने कोणी महागड्या थिएटरात जात असेल असे वाटत नाही. तेव्हा रडणे थांबवा..

आपणतर वर्षा दोन वर्षातून एकदा, तेही विद्यार्थी सवलत घेऊन थिएटरला जातो. भरत नाट्यमंदिरात फुकटात नाटकं पहायला मिळायची ती ही कधी चुकवायचो नाही. ;-)

किसन शिंदे's picture

8 Nov 2011 - 9:23 am | किसन शिंदे

सिनेमे पाहणे म्हणजे काय समाजसेवा आहे काय? पैसे कमवायला लोक सिनेमे काढतात. आणि बघणारा, वेळ, अंतर, सोबतचे लोक, सिनेमा लागलेली थिएटरं इ. यांचं गणित करून सिनेमे पाहतात. हिंदी सिनेमांचा उद्धार करायचा या हेतूने कोणी महागड्या थिएटरात जात असेल असे वाटत नाही. तेव्हा रडणे थांबवा..

बरं मग!!! पुढे??

Nile's picture

8 Nov 2011 - 11:11 am | Nile

बरं मग!!! पुढे??

बरं मग हा उद्गार आहे का? असेल तर अस्थानी आहे.

बरं मग हा प्रश्न असेल तर त्याच्या पुढे तीन उद्गार चिन्हं कशाला लावली आहेत?

बरं मग प्रश्नार्थी असेल तर मग त्याच्यापुढे पुढे हा प्रश्न पुन्हा कशाला विचारावा? ह्याला इंग्रजीत रीडंडट म्हणजेच मराठीत अनावश्यक, जरूरीपेक्षा अधिक म्हणतात.

असो, तुर्तास मराठीचा इतका उद्धार करुयात. थेटराचं नंतर पाहू.

किसन शिंदे's picture

8 Nov 2011 - 11:35 am | किसन शिंदे

हो का?

प्यारे१'s picture

8 Nov 2011 - 12:52 pm | प्यारे१

@ अरे किसनभाव,
कसाला उगीच तरास करुन घेते? चांगला काय नी भंकस काय हे बगायला थोडीच मोलमंदी जाते लोग? मोल मंदी जानेचा परपज येगळा असते ने लोकचा?

ऑन अ सीरियस नोट, मराठी चित्रपटांच्या/मालिकांच्या निर्मात्यांची नावे/ आडनावे + त्यांची कनेक्शन्स एकदा पाहणे (आर्थिक व्यवहार कुणाच्या ताब्यात आहेत हे समजण्यासाठी) आवश्यक आहे. एकता कपूर मराठी मालिका निर्मिती मधे उतरल्यापासून भरजरी साड्या, सणवार साजरे करणे वाढले आहे.
कधी कधी हे अमराठी निर्माते मराठी नायिकांबरोबर लग्न करतात ते पाहून तर अधिकच वाईट वाटते. ;)
पण जर खरेच मराठी निर्मात्याचा मराठी चित्रपट चांगला अथवा बरा असेल, तर एखादा 'रावण', 'रा-वन' बघण्यापेक्षा 'वळू' 'मॉलमध्ये जाऊन' बघणं शतपटीनं उत्तम. :)

बाकी, तू दिलेलं शीर्षक पुरेसं बोलकं आहेच. 'तू झोप, मी जागा आहे.' ;)

@नायल्या,
मोट्ठा झालास का काय रे? पंगा, धनंजय सारखा मराठीच्या अवतरण चिन्हांचा पण कीस पाडू लागला आहेस?
नायल्या मोट्टा झायला आमी नाय पायला.... ;)

Nile's picture

8 Nov 2011 - 8:30 pm | Nile

मोट्ठा झालास का काय रे?

तुम्ही तुमच्या बाल्यावस्थेतून बाहेर या म्हणजे कळेल. अधिक काही लिहीत नाही, कारणं दोन: १. उगाच वैयक्तीक अवांतरं करायची सवय नाही. २. तुम्हाला पुन्हा रडत संपादकांकडे जाताना पहायची इच्छा नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Nov 2011 - 1:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

जाऊ दे रे किसन. माणसाने अशा फालतू मुद्द्यावर चर्चा वळवली आणि कीस पाडला की समजावे की मूळ मुद्द्याचा प्रतिवाद करायला त्याला जमत नाही आहे. शिम्पल :-)

Nile's picture

8 Nov 2011 - 8:28 pm | Nile

माणसाने अशा फालतू मुद्द्यावर चर्चा वळवली

कुठल्या थेटरात जाऊन मराठी सिनेमा पहावा हा मुद्दा फालतू आहे यावर सहमती दर्शवल्याबद्दल धन्यवाद. मूळ मुद्दा काय आहे म्हणालात?

किसनाने दत्ताच्या देवळाची वाट दाखवली आता जावून दर्शन घेणे न घेणे आपल्या हाती आहे.

चिप्लुन्कर's picture

7 Nov 2011 - 9:58 am | चिप्लुन्कर

विषय चांगला आहे ..... चित्रपट पण ठीक वाटला.

मराठी_माणूस's picture

7 Nov 2011 - 10:22 am | मराठी_माणूस

कालच पाहीला.

१)केशाचा अभिनय अफलातुन. सगळ्या चित्रपट्भर तोच लक्षात रहातो. दिग्गजांचा प्रभाव जाणवत नाही. केशाचा निरागसपणा अत्यंत जिवंत वाटतो.

२)नानाचा आणि सोकु चा गजग्यांचा सिन आणि पोरांचा दुकानातला टिव्ही बघण्याचा सिन , कुटुंबासमवेत पहाणे खुप त्रासदायक होते.
३)अण्णां सारखी व्यक्ती जि उच्चशिक्षित आहे, इंटरनेट वापरते, ति त्या गावात कशी काय आहे त्याचे पुरेसे स्पष्टीकरण मिळत नाही.
४)नासिरुद्दिन चा उपयोग विक्रिमुल्य वाढवण्या व्यतरिक्त काही आहे असे वाटत नाही. मराठी उच्चार टिपिकल अमराठी आहेत. अर्थात चुक नासिरुद्दिनची नाही. ते पात्रच अनावश्यक होते.
५)भाउंचे मंदिराबाबतचे अण्णांना दिलेले स्पष्टीकरण अंतर्मुख करायला लावणारे, शहरी लोकाना खेड्याच्या वेगळ्या बाजुची जाणिव करुन देणारे आहे.
६)एखादे जागृत देवस्थान प्रसिध्द होण्यामागे काही वेगळे कारण अशु शकते ह्याची जाणीव करुन देणारा चित्रपट

एकट्या केशाचा अभिनय पहाण्यासाठी पहावा असा चित्रपट

अनुरोध's picture

8 Nov 2011 - 1:24 pm | अनुरोध

परवाच हे परीक्षण पहिले... लगेच ते बाजूला ठेवले... काल चित्रपट पाहून आलो आणि मगच वाचायला घेतले...

आपला(माझ) काय आहे ना त्या पु. ल. च्या असा मी सारखा सगळ्यांचेच विचार पटतात...

पण तरी मला कय वटते ते लिहतो...
चित्रपट तारा मला आवडला. केशा चा अभिनय एकदम सॉलिड वाटला. बाकी नाना एकदम सह्ज आणि नेहमीच्या शैलितला. त्याची एका पायावर उडी मारायची लकब मास्ता वाटली, घाशीराम च्या नाना(फडवणिस) ची आठवण करून देणारी वाटली.

तसा मी आजकाल जास्त अपेक्षा ठेऊन जाताच नाही चित्रपट बघायला पण तरी मोठे कलाकार वाया गेलेत अशी एक चुत्पूत लागूनच राहते... तसही हा चित्रपट पण उगीच जास्ता गाजावाजा केलेलच वाटला वळू छाप... नासिर तर उगीच भाव खायला कीवा बघा आमचा पी. आर. आमच्या चित्रपटात हिंदीतले द्दिग्गज पण काम करतात दाखवायला...

बाकी संवाद उत्तम तो एक सोडला "पर भाव मनी दाटना...." तर.
पार्श्वसीगीत उत्तम दत्त दत्त आणि देवा तुला शोधू कुठे एकदम मस्त पण त्याच तोडीचा फडतूस आईटम सॉँग.

बाकी मराठी चित्रपट म्हटला की डोळे झकून पोरा बाळा साहित जाव की नाही असा विचार आता करावा लागणार(सोकु नि नाना सीन आणि पोरा टी व्ही बघत आहेत तो सीन ) अस वाटतय आता....

तरी चित्रपट बघायचच होता म्हणून चांगला वाटला...

सूड's picture

8 Nov 2011 - 10:00 pm | सूड

कोणी काही म्हणेना का, आपल्याला पिक्चर आवडला ब्वॉ !! परिक्षणपण झकास झालंय.

कालच ऑफिस वेळेत ही आवर्जुन जावुन हा सिनेमा पाहिला ...
तुझा हा थ्रेड मी आज पाहिला.. नाहितर कदाचीत नसता पाहिला सिनेमा...
आज परिक्षण लिहायला आलो पण तुझा हा धागा दिसला ... सिनेमा बद्दल :

सुरवातीचे गावाचे चित्रण सुंदर आहे.. त्या नंतर चित्रपट विनाकारण वाढवल्यासारखाच भासतो अगदी शेवटा पर्यंत ...
मुळ नायक (पात्र केशा) ह्यानी वळु मधल्या कॅरेक्टर ची कॉपी केली आहे बोलणे वागणे सेम तसेच (बहुतेक तानाजी नाव होते का वळु मध्ये) .

उषा नाडकर्णी..नाना पाटेकर आणि दिलिप प्रभाळवकर यांसारखे दिग्गज कलाकार वाया घालवले आहेतच..
गाणी ही छानच म्हणता येतील अशी नाहीत ... मात्र दत्त दत्त ह्या गाण्याला विरोध व्हायला नको असे वाटते... कारण ते उपरोधीक गाणे आहे ..

जमेची बाजु ही की गावचे चित्रण सुंदर हुबेहुब उभे करण्यात दिगदर्शक यश्वस्वी झाले आहेत..
पण फक्त देवळाच्या गोष्टीसाठी २:३० तास खुप वेळ घेतला असे वाटते...
दिलिप प्रभाळकर यांची बाजु या चित्रपटात जास्त दाखवली असती.. रुग्णालय त्याची गरज गावाला कायम असते असले चित्रण काहीच नाही आहे..
सोनाली कुलकर्णी ला फक्त सुंदर दिसणारे कोणीतरी हवे म्हणुन निव्व्ळ नटवुन वापरलेली आहे असेच वाटते ,,,

सुरवातीला थोडे विनोदी टाळ्या घेणारे संवाद आहेत पण फक्त तेव्हद्याच साठी चित्रपट नाही..

असो मराठी चित्रपटाला जास्त नावे शक्यतो मी ठेवत नाही,...
पण तरीही जितक्या अपेक्षेने हा चित्रपट पाहिला त्या पुर्ण झाल्या नाहीत...

चित्रपटास रेटींग : २ /५

बाकी परिक्षणाबरोबर योग्य फोटो दिल्याबद्दल छान वाटले.

प्रमोद्_पुणे's picture

12 Nov 2011 - 6:58 pm | प्रमोद्_पुणे

चित्रपट अगदीच ठीक आहे.. खुप अपेक्षा होत्या बहुदा. बर्याच चांगल्या कलाकारांनी निराशा केली. प्रभावळकरांसारखा गुणी अभिनेता तर वाया घालवला आहे. सोनाली कुलकर्णीने सुद्धा फार निराशा केली आहे..दोघी आणि गाभ्रीचा पाउस मधे तिची ग्रामीण व्यक्तिरेखा आहे. कुठे त्या भूमिका आणि कुठे ही भूमिका...

असो, दोघी, वास्तुपुरुष, उत्तरायण, नितळ असे कित्येक उत्तम चित्रपट आज प्रदर्शीत झाले असते आणि त्यांची सुद्धा अशी पब्लीसिटी झाली असती तर असे वाटून गेले..

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2011 - 3:46 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रच्चंड उत्सुकता आहे हा चित्रपट बघायची! किसनाने छान लिहिले आहे. डान्या वगैरेंचेही मत वाचले. उत्सुकता वाढलेली आहे.

आवडला. आक्षेपार्ह काय आहे ते मात्र समजले नाही.बर्‍याच गोष्टी खटकल्या, तरी एकूणात "चांगला पिक्चर" हे लेबल तरी नक्कीच लावता येइल.

का बुवा का खटकले मन१ तुम्हाला

वरती आलेच काही मुद्दे. तेच.
नसीरुदीन शहा मुळात आणलाय कशाला काहीही समजले नाही. त्याला इथे आणणे म्हणजे बांधकामातले फावडे घेउन ते चमच्यासारखे वापरत खाण्याचा प्रयत्न करण्यासारखे वाटले. त्याच्या हस्ते चित्रपटात मराठीचा जाहिर खून करण्याच काय हशील होते?

चित्रपटात दिसणार्‍या सुंदर सुंदर गोर्‍या-घार्‍या (ग्रामीण साज्,ग्रामीण बाज नसणार्‍या)पोरी "आमच्यातल्या" आहेत हो; गावाकडल्या वाटल्या नाहित. मागे येशू ख्रिस्त ह्या जन्माने ज्यू व मागील पन्नास पिढ्या आशियात घालवलेल्या व्यक्तिवरील माहितीपटात तो चक्क निळ्या डोळ्याचा, युरोपिअन धाटणीच पाहून असाच त्रास झाला होता. असाच वैताग महेश मांजरेकरला छत्रपतींच्या भूमिकेत पाहून व त्याचे डोळे पाहून आला होता.(व्यावसायिक चित्रपट म्हनून "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" आवडला होता, तो भाग वेगळा.)
एकूण माझी तक्रार लक्षात यावी म्हणून हा इतका पसारा सांगतोय.

तो अण्णा(दिलीप प्रभावळकर) गावात काय करतोय तेही सांगितले असते तरे बरे झाले असते.

नानाचेही काम आवडले. पण यशवंत दत्तांनी "सरकारनामा" मध्ये रंगवलेला नेता किंवा "सामना" मधला निळू फुल्यांचा हिंदुराव ह्यांची उंची त्यात वाटली नाही.

शेवटच्या वीस मिनिटात माझे घद्याळाकडे लक्ष जात होते, "अजून किती वेळ"असे म्हणून.
पण तरीही चित्रपटातल्या चांगल्या आणि वाइट गोष्टी ह्यांची गोळाबेरीज केली तर शेवटी चांगल्या गोष्टी थोड्या अधिकच जाणवल्या.

आवडलेल्याही गोष्टी बर्‍याच आहेत, त्यातली एक महत्वाची म्हणजे ""देवा/द्येवा तुला शोधू कुठं" हे सुंदर, अस्सल काळ्या मातीतनं बनलेले शब्द, त्याला अनुरुप साज चढवणारं पारंपरिक ह्या मर्‍हाटी मातीचं संगीत. दुर्मिळ होत चाल्लय हो हे.

बादवे, कुलकर्णी टाइप लोकांनी काढलेले पिक्चर थोडेफार मिरासदारांच्या चित्रणाच्या वाटेवर वाटतात.
"मिरासदारटाइप" बद्द्ल तुमचे काय विचार आहेत?

आशु जोग's picture

22 Nov 2011 - 9:20 pm | आशु जोग

>> "मिरासदारटाइप" बद्द्ल तुमचे काय विचार आहेत?

मिरासदारटाइप चालेल कारण ते खरे खेड्यातले होते.

पण लई, कंच, आत्ता, आत्ता ग बया, व्हय व्हय, बिगी बिगी हे काही खरं नाही

आपली नैसर्गिक भाषा बोलावी

आशु जोग's picture

21 Nov 2011 - 12:21 am | आशु जोग

मन१

>>पण यशवंत दत्तांनी "सरकारनामा" मध्ये रंगवलेला नेता किंवा "सामना" मधला निळू फुल्यांचा हिंदुराव ह्यांची उंची त्यात वाटली नाही. <<

तुम्ही अगदी बरोबर बोललात. अलिकडे या लोकांनी जो ग्रामीण चित्रपटाचा गवगवा चालवलाय तो जरा अतिच झालाय.

महाराष्ट्राला ग्रामीण चित्रपट नवीन नाहीत. चंद्रकांत, सूर्यकांत यांचे चित्रपट आपण पाहिलेले आहेत. नंतरच्या काळातील निळू फुले यांचा सहज अभिनयही प्रेक्षकांनी पाहिला आहे.

ती सहजता ज्योती सुभाष, अमृता सुभाष, नंदू माधव यांच्या अभिनयात दिसत नाही.

आणि मग कृत्रिमता डोक्यात जाते.

-

मागे काही वर्षांपूर्वी 'वळू' पहायला गेलो. प्रचंड गर्दीचा ६ वा आठवडा इ जाहीराती पाहिल्या होत्या.

थिएटरात गेलो तर वर आणि खाली मिळून जेमतेम २० लोक.

प्रेक्षक नसतानाही चित्रपट काही आठवडेच्या आठवडे चालवणे शक्य व्हावे म्हणूनच
कधी ए बी सी एल, कधी मुक्ता आर्टस ला प़कडले जात असावे.

आत्मशून्य's picture

21 Nov 2011 - 1:12 am | आत्मशून्य

जाहीरात तर अशी केली होती की जणू वळू पकडण्यावर थ्रीलर चित्रपट बनवलाय. आता अगदीच मॅटॅडॉर्स नाही तरी तत्सम सिन असतील व एकूणच फास्ट पेस्ड थरारक काही असेल म्हणून गेलो तर , "लाइफस्टाइल दाखवणे" पध्दतीचा रटाळ (अर्थातच मराठी) चित्रपट निघाला. त्या वळूकड बघून किव येत होती, भिती अथवा थरार सोडूनच द्या.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Nov 2011 - 12:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कुठली जाहिरात बघून गेला होतात देव जाणे. युट्युब वर ५ प्रोमो आले होते. अजूनही असतील. त्यातला एकही बघून चित्रपट थरारक वगैरे वाटत नाही. विनोद ढंगाने जाणारा वाटतो, आणि तो तसाच आहे. उगाच चुकीच्या अपेक्षा ठेवल्या तर निराशा होणारच. आणि ते पोलिटीकल सटायर आहे. त्यात भीती किंवा थरार वाटावा अशी अपेक्षा नाहीच आहे मुळात.

(एकदाचा) देऊळ पाहिला. आवडला. गावाबद्दल स्वप्नाळू कल्पना बाळगणार्‍यांनी तर 'देऊळ' जरुर बघावा.

चित्रपटात भारतीय सवंग राजकारणावरही आणि तसे राजकारण करण्याच्या अपरिहार्यतेवरही चांगला प्रकाश टाकला आहे. समाज नेत्याला विकासाच्या राजकारणापासून कसा दुर घेऊन जातो आणि लोकशाहीत लोकांची इच्छा असल्याशिवाय विकासही कसा होऊ शकत नाही याचे चित्रण नेमके आहे. त्याही पेक्षा उत्तम टिपणी नाना करतो जेव्हा तो म्हणतो "शहरातल्या लोकांना गाव सतत छान, शांत हवं. ते मात्र तिथे बसून पैसा ओढणार!" हे या परिस्थितीचं मुळ नेमकं पकडलं आहे.

अण्णांचं पात्र मात्र अगदी तकलादू वाटतं, त्याहुनही ते निराशावादी (आणि पुचाट) वाटतं. "हे चक्र आता इतकं गतिमान झालं आहे की आता ते थांबणं तुम्हालाच काय कोणालाही शक्य नाही" म्हणून लेखक (आण्णांद्वारे) या परिस्थितीवर उतारा नाही हेच सांगतो. हे आहे हे असं आहे आणि असंच चालु रहाणार हा वास्तववादी दृष्टिकोन आहे का? यावर मात्र नकारात्मक प्रतिक्रीया देताना जीभ चाचरते हेही तितकच खरं! :(