डॅड म्हणतात, आयुष्य जगणं म्हणजे बासरी वाजविण्यासारख आहे, एका बाजुने मुख-रध्रांतून शेवटचा श्वास असेपर्यंत ते फुकायचेच असते आणि दुसर्या बाजुला स्वर-रध्रांची उघड-झाप करावी लागते, ही स्वर-रध्रं म्हणजे मनाची कवाडे आहेत, जर सगळी सताड ऊघडी सोडशील किंवा सगळी बंद करशील तर त्यातुन निर्माण होणार संगीत एकसूरी असेल. पण त्यातुन तुला अखंड श्रवणीय काही हवे असेल तर त्या मनाच्या कवाडांची योग्य ती ऊघड-झाप करावी लागेल, कदाचित असे ही होईल की जे दार आज, या क्षणी उघडे आहे ते धाडकन बंद करावे लागेल आणि दुसर्याच क्षणी उघडावे लागेल किंवा जे बंद आहे ते उघडावे लागेल...अगदी शेवटचा श्वास असेपर्यंत ..
बांधावर..बांधातिरी गेलो की माझे हे असेच होते ..विचार सुचतात, प्रश्न पडतात, ऊत्तर सापडतात, आणि पुन्हा नव्याने प्रश्न पडतात..पण सवय मात्र मोडत नाही, प्रश्न हे पडायलाच हवे, त्या शिवाय का उत्तरे सापडणार आहेत ? ( पुन्हा प्रश्न ) एकदा कुठल्याश्या कामानिमीत्त ईथे आलो आणी या जागेच्या प्रेमातच पडलो. ' एकांत ' या शब्दाचा खराखुरा अर्थ पटतो ईथे आल्यावर ! माझ्या काही शहरी मित्रांच्या मते बांध हा वेगळ्याच कामासाठी असतो, अर्थात ते गमतीने म्हणत असले तरी जेव्हा ते माझ्यासवे ईथे येतात तेव्हा परतताना एक वेगळाच चेहरा घेवून जातात. ;)
मी महिना-पंधरा दिवसातून अशी बांधावर एखादी चक्कर टाकतो. अगदी नॉट रिचेबल असतो ! हे ईंद्रायणी च पात्र सहसा, अगदी पाऊस असला, तरी संथ असते, माझ्यातल्या चंचलतेला क्षणभर का असेना क्लांत करेल असे ! कधे मधे माझ्या दिमतीला एखाद छानसं पुस्तकही असते. कधी कधी वाटत, हातात एखादा छानसा पेला असावा किंवा मग एखादी रेटुन बसणारी असावी..पण, त्या विश्रांत ठिकाणी, ती वा मद्य हे माझ्या लेखी जगातलं सगळ्यात डेंजर कॉम्बीनेशन असल्याने मी दोन पावले मागे सरकतो..
डॅड शी अश्या आणि अश्यात गप्पा मारुन खुप दिवस लोटले....किती सवय असते ना आपल्याला घराची..घरातल्या वस्तूंची ...घरातल्या खुर्चीपासुन ते रुमालापर्यंत सगळ्या गोष्टींची जागा माहीत असते, दिवसा उजेडी लख्ख प्रकाशात सहजा-सहजी सापडतील अश्या ..पण त्याच घरात, रात्रीच्या सुमारास वीज गेल्याने अंधारले की माणुस चाचपडायला लागतो, माचिस, मोबाईल चा प्रकाश शोधायला लागतो...डॅड ला विचारले तर म्हणतात " सवय तुला आहे उजेडाची, थोडीफार अंधाराची पण करून घे, आयुष्य च पण असच असते " " रात्रीचा अंधार जेव्हा गडद होतो तेव्हाच तर पहाट होण्याची चाहुल लागते.
माझी पुस्तक वाचण्याची ही जागा !
शांत नदीपात्र असलेल्या बांधावर, बांधातीरी बरेच जण भेटतात, किलबिल करणारे विविध पक्षी, पाण्यात मनसोक्त डुंबणार्या म्हशी, दिवसभर उन्हात नसुन नदीत गळ टाकुन बसणारे मासेमार, कोणाला शिंगाडा भेटतो, तर कोणी चिलप्यावर खुश असतो, खेकडे गळ तोडतात, शाळा सुटल्यावर, दप्तराच्या ओझ्याने दमलेली, पण त्याच वेळी शाळा सुटल्याच्या आनंद चेहर्यावर ठेवुन खेळत जाणारी चिल्ली-पिल्ली, पाणी प्यायला येणारी जनावरे, शेतात काम करणारे कष्टकरी...पण कोणीच शांतता भंग करत नाही, जी ती आप-आपल्या जागी असतात ..त्या निबीड जंगलमय परिसरात..निरव शांततेत ..
नदीचा तीर पकडुन मी देवदयेने लाभलेल्या माझ्या ठिय्यावर निघतो, शेतातल्या कोपर्याच्या पायवाटेवरून चालत चालत, काही दाटीवाटीने उभी राहिलेली झाडे आहेत, कुठे लवण तर कुठे घळ आहे, घळी ला विहीरीची जोड आहे, कमरेपर्यंत वाढलेली झुडपे आहेत, कुठे वाट चुकवणारी पायवाट आहे, ,मध्येच एखादे रान फुल माझ्याकडे डौलत येते , त्या समाधीस्त शांत पायवाटेला माझ्या पावलांची सवय झाली आहे असे वाटते.
माणुस म्हणे पंचतत्वांपासुन बनलेला आहे. कधी कधी वाटते की खरेच असावे कारण त्या पंचतत्वांकडे तो अतिशय सहजगत्या नैसर्गीक पणे आकर्षिला जातो. रणरणत्या उन्हात जरा पावसाळी हवा असो , गुलाबी थंडीमधील सकाळच्या सोनेरी सुर्यकिरणे असो, एखादा ट्रेकर्स ला चॅलेंज करणारा पहाड असो, रिमझिम पावसाची बरसात असो वा पहिल्या पावसातला मातीचा सुगंध असो...असाच काहीसा त्या पायवाटेने मी कणा-कणाकडे आकर्षित होत जातो. मी एकटा असलो तरी ती वाट मी तुडवतोच ...नदीच्या काठी एक डोंगर आणि थोडासा सपाट खडक आणि मी, जणु त्यांच्यातलाच एक !!
योगा-योगाने सहा-एक वर्षापुर्वी या जुजबी शहरीकरण झालेल्या पण ग्रामपचांयत आणि गावाच गावपण राखुन असलेल्या लोहगावात रहायला आलो, कमी-अधीक प्रमाणात नेतृत्व करण्याची संधी ही लाभली, मी त्या आधी औरंगाबादच्या माझ्या छोट्याश्या गावाशी शेती निमीत्त " टच " मध्ये असायचो, पण तिथले प्रश्न नीटसे कधीच समजु शकलो नाही. ईथल्या लोकांशी, वातावरणाशी हळु-हळु समरस होत गेलो. ईथल्या अडचणी, प्रश्न समजत गेलो, काही अंशी सोडवण्यात यशस्वी ही झालो असेल, पण प्रश्न अडचणी समजण्याकरिता ईथे रहावे लागते याची प्रकर्षाने जाणीव झाली.
मी ज्या बांधावर जातो त्या बांधापासुन ११ किमी दूर असलेले, पण ८ व्या किमी ला परिघ असणारे हे गाव मनपा हद्दीत गेले आहे. सपाट खडकाला टेकुन असलेल्या त्या डोगंराचा अर्धा भाग आधीच मनपा हद्दीत गेला आहे, या हद्दीत गेल्या मुळे त्या बाजुला झपाट्याने शहरीकरण झाले. ईतके की त्या अर्ध्या भागावरच्या एका कोपर्यात " वॉटर-पार्क " उभे आहे. या थोड्या पाश्च्यात्य संस्कृतीकडे झुकणार्या शहरीकरणाला माझा अशंता का असेना पहिल्यापासुन विरोध आहे. पण आधुनिक सुख-सोयी ही यावात असे ही नेहमी वाटते. आज ही थोड्या आलेल्या आहेत, पुढे चालुन कदाचित अजुन येतील , एखादा प्रशस्त मॉल उभा राहिल, ज्या बांधावर मी रमतो त्या जागी एखादा ब्रिज येईल, चार-पाच कॉलेजेस झालेलीच आहेत, त्याच ब्रिज चा कॉलेजियन्स " झेड ब्रिज " सारखा उपयोग करतील.
पण त्याच बरोबर तो ग्रामीण बाज तसाच टिकुन रहावा असे वाटते, बांधाशेजारी असलेल्या शिंदे वस्ती मध्ये शेणाने सारवलेल्या, कौलारू घराच्या, लाकडी चौकटीच्या दरवाजातुन " ओ सुहास भाऊजी ! " अशी डोक्यावर पदर असलेल्या काकडे वहिनींचा हाक यावी, 'आज जेवुनच जा' अशी आर्जव व्हावी, काकडें बरोबर लगेच बांधावर पळाव, काही खेकडे, काही मासे धरावे. असलीच मळ्यात तर , मेथी, भेंडी आणावीत. सोबतीला भुईमुगाच्या शेंगा वा हरबरा घ्यावा. लिंबाच्या झाडाखाली शेंगा खाता-खाता सांयकाळी मस्त गप्पा रमाव्यात, नंतर घरामधे चुलीवरच गरमागरम जेवण खावं आणि शांत मनान त्या गारव्यात चांदण्या बघत बघत चंद्रप्रकाशात झोपी झावे. काय पाहिजे अजुन श्वास घेण्याकरिता ?.
मुळात पेहराव आधुनिक असला तरी हा ग्रामीण बाजच माझ्यामध्ये खोलवर रूजलेल्या भारतीयत्वाचा श्वास आहे.....
बांधावरचा दिवस संपल्यावर, दुसर्या दिवशी सकाळी मी , चकचकीत " कॉर्पोरेट लाईफ " मध्ये शिरण्यासाठी, गळ्याभोवती टाय गच्च आवळत आरशासमोर उभा असतो. काही प्रश्न नव्याने पडलेले असतात, काही उत्तर सापडलेली असतात. तात्पुरती का असेनात काही कवाडे बंद झालेली आणि काही उघडलेली असतात..........
प्रतिक्रिया
26 Nov 2012 - 10:15 pm | जेनी...
" ओ सुहास भावजी , मस्त लिहिलय हं ! :) "
26 Nov 2012 - 10:37 pm | प्रभो
क ड क!!!
26 Nov 2012 - 10:46 pm | पैसा
खासच लिहिलंस! वा!
26 Nov 2012 - 10:51 pm | गोमट्या
आवडले
26 Nov 2012 - 11:02 pm | अमितसांगली
भारी लिहलय..
27 Nov 2012 - 12:14 am | सोत्रि
जबर्या! _/\_
- (ग्रामीण बाज असलेला) सोकाजी
27 Nov 2012 - 12:17 pm | मालोजीराव
..
27 Nov 2012 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा
व्वा...व्वा...झकास! ह्या लेखापुरते तरी आपल्या नावातले, डॉट..डॉट गेल्यासारखे वाटतात. ;-)
आणी लेखन थोडसं मिलिंद गुणाजीच्या (आवाजातल्या) भटकंतीच्या अंगाने गेल्यासारखं वाट्टय... :-)
27 Nov 2012 - 1:19 am | मोदक
मस्त रे...
27 Nov 2012 - 8:41 am | प्रचेतस
लेखन अगदी मनातून उतरलंय रे.
27 Nov 2012 - 8:53 am | किसन शिंदे
पहिला आणि शेवटचा पॅरा तु आधी ऐकवला होतास, आता वाचताना लय भारी वाटलं.
27 Nov 2012 - 8:53 am | स्पंदना
शेतावर गेलतास जणु?
असच होत त्या शेतावरच्या शांततेन, अन त्या रानहिरव्या गंधान.
पुढच्या टायमाला, भाकरी ने बांधुन , तीही नॅपकिनमध्ये, भाकरीवरच एखादी सुकी भाजी, अन कांदा. मग बघ कस सारा अंतरात्मा थंडावतो ते.
27 Nov 2012 - 9:12 am | स्पा
सहीच लिहल आहेस रे
एकदम आवडेश
27 Nov 2012 - 10:04 am | इनिगोय
वाचूनच निवांत व्हायला झालं. छान लिहिलंयस :)
27 Nov 2012 - 10:20 am | सस्नेह
उमलत्या वयात अशा जागा खूप धुंडाळल्या होत्या. तेव्हा निवांत जागांना तोटा नव्हता.
आता मात्र सगळं झकपक अन शहरी झालं आहे.
हम्म..!
27 Nov 2012 - 11:08 am | सुकामेवा
अप्रतिम
27 Nov 2012 - 11:20 am | गवि
सुंदर लिहीलंय. अजून दहाएक वर्षांनी अचानक याच जागी परत आलं की काळाचा भयानक वेग आणि त्याखाली गाडलं गेलेलं जगच्या जग जाणवतं.
27 Nov 2012 - 11:42 am | पाषाणभेद
एकदम झकास लेख आहे सुहास. फोटोही छानच. लिहीत रहा.
27 Nov 2012 - 12:33 pm | पिंगू
आता मी पण कुठेतरी जरा फिरून यावे असे म्हणतोय. कुठल्या खास स्थळी नाही, तर रान-शिवारातच..
- पिंगू
27 Nov 2012 - 1:39 pm | मी_आहे_ना
खरोखर सेंटी करणारे लेखन. -^-
27 Nov 2012 - 2:49 pm | पियुशा
अनुभवसिद्ध लेखन आवडले :)
27 Nov 2012 - 3:18 pm | आनंद भातखंडे
+१
27 Nov 2012 - 6:09 pm | प्यारे१
मस्तच रे...!
27 Nov 2012 - 9:30 pm | उत्तम चोरगे
बांधावरचा दिवस संपल्यावर, दुसर्या दिवशी सकाळी मी , चकचकीत " कॉर्पोरेट लाईफ " मध्ये शिरण्यासाठी, गळ्याभोवती टाय गच्च आवळत आरशासमोर उभा असतो. काही प्रश्न नव्याने पडलेले असतात, काही उत्तर सापडलेली असतात. तात्पुरती का असेनात काही कवाडे बंद झालेली आणि काही उघडलेली असतात..........
झक्कास लेखन
28 Nov 2012 - 9:53 am | श्री गावसेना प्रमुख
फोटो खुपच मस्त आहेत
28 Nov 2012 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास रे. बांधावरचा प्रवास आवडला. बाकी, जाळ्यातला गावरान 'राहु'च दिसतोय. चित्रही छान.
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
28 Nov 2012 - 12:58 pm | रुमानी
आवडले
लिखान व फोटो दोन्ही मस्त.......
28 Nov 2012 - 3:37 pm | मी-सौरभ
लै भारी रे वाश्या
29 Nov 2012 - 12:59 pm | चिगो
सुंदर लिहीलयंस, भाऊ..
29 Nov 2012 - 1:09 pm | ऋषिकेश
झक्कास!
29 Nov 2012 - 1:18 pm | चेतन माने
खूपच छान, आवडलं !!!
:)
29 Nov 2012 - 5:48 pm | कवितानागेश
छान
29 Nov 2012 - 10:31 pm | रश्मि दाते
छान आहे नेहेमी प्रमाणे,नागपुरला ये म्हणजे आम्च्या शेतावर जाऊ
30 Nov 2012 - 2:35 am | नंदन
फोटो आणि वर्णन - दोन्ही आवडले.
30 Nov 2012 - 10:35 pm | अन्या दातार
पूर्वार्धात रंकाळ्याची आणि चंबुखडीची आठवण आली बघ. सॊलिड लिवलयस
1 Dec 2012 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार
जितके सुंदर फोटो आहेत त्या पेक्षा सुंदर लिहीले आहेत. प्रत्येकाचा असा एक निवांत अड्डा असतोच. त्याला वारंवार भेट देणे जमले तर बंद झालेली बरीच कवाडे उघडतात आणि मग बर्याच गोष्टी सोप्या होतात.
(एकांडा कट्टेकरी)
1 Dec 2012 - 9:41 am | इरसाल
असाच एक बांध आणी अशीच एक नदी आठवली.