अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन's picture
डॅनी ओशन in जनातलं, मनातलं
8 Sep 2020 - 8:53 am

अचुम् आणि समुद्र (भाग १)
मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे.

मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला:

“अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे,
शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे.
ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे,
तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.”

मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात.

यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता.

असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ?

मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो :
मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे !

हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

१.सुगम सत्यार्थी आणि बहुरुपी

स्मृतीसागरावर जरी सर्वस्वी माझी सत्ता असली तरी नावीकांच्या समुद्रात मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली जहाजे गोळा होत. त्यांच्यात सतत खडाजंगी होत असे. माझ्यासोबतच्या स्मृतीसुध्धा अश्याच. घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा. स्मृती हटकूनच मूठ पाणफुलाकडे जात. आणि ह्या चर्चेचा शेवट मूठ पाणफुलांच्या नशेत असलेल्या एखाद्या नावीकाचे रक्त सांडण्यात हमखास व्हायचा.

अर्थात सगळ्याच स्मृती यात हातभार लावीत, पण बहुरुप्यांचा पंथ यामध्ये अगदी पुढाकार घेई. बहुरुप्यांना नावेत येण्यापासून थांबवणे अशक्यच, कारण लोण्यासारखे स्वतःला आत सरकावण्यामध्ये यांचा पंथ अनेक युगांपासून पारंगत होता. बहुरुपी हे सुरुवातीला ओळखण्यास जरी अवघड असले तरी ते नंतर बखुबीने मिसळून जायचे. नावीकांच्या मनामध्ये थोडीजरी निर्धास्तपणाची भावना जागी होताच ते आपले खरे रुप दाखवत. त्यांचे अस्तित्व मुळात नसेच ! असे ती केवळ मूठीची छाया ! या मूठीशिवाय त्यांचे काहीही व्यक्तीत्व नसे, आणि असल्यास ते नावीकांना दाखवण्यास त्यांची तयारी नसे. ११८ भगवंतांचा विसर पडून केवळ मूठीच्या दोर्यांवर हे अडकले होते.

बहुरुप्यांशी लढणे हे जीवनाचे एकमेव ध्येय असलेले बरेच नावीक होते. अनेकांनी शौर्याची शर्थ करत या अनाहत ऊपद्रव करणार्या पंथाशी लढा दिला. मात्र याचा एक परिणाम होत असे. बहुरुपी पकडण्याची दृष्टी आली की ती एखाद्या वाईट सवयीसारखी चिकटून बसते. बहुरुप्यांशी लढणार्या नावीकांना जळी स्थळी काष्ठी केवळ मूठींचे सापळेच दिसत. एकेकाळचे मित्र सुध्धा बहुरुपी वाटत. तसेच, बहुरुप्यांशिवाय जरी कोणी मूठीवर विश्वास ठेवणारा आला, तर त्याचा शिरच्छेद करण्यास या योद्ध्यांची मनगटे सळसळत.

पाणफूल आणि फूलनरेशाची प्रतिमा रक्षण्यासाठी या सर्व योद्ध्यांना मोठ्ठे नाक मिळाले होते. फूलनरेशाची न दिसणारी अवहेलना हे योद्धे अगदी बेमालूम पणे शोधून काढत. सुगम सत्यार्थी (सुस) हा असाच एक मोठा महारथी होता. सुसचे नाक सर्वात मोठ्ठे होते. अगदी १८०० सोडा, १८००० पानांच्या पुस्तकात जरी एखादी ओळ फूलनरेशांच्या विरुद्ध मताची असली तरी त्याला ती लगेच समजत असे.

सुसने बराच वेळ ज्ञानचक्षूवर हातोड्यांचे आघात करण्यात घालवला आहे. त्यामुळे नाही म्हणले तरी सुसमध्ये ज्ञानचक्षूचे काही गुण पाझरले होते. सुस कडे स्वतःपुरते सत्य बदलण्याची अतिशय ताकदवान शक्ती होती. आणि सूस ज्या पातळीवर फूलनरेशांची रक्षा करायचा, त्याचा विचार करता ही अतिशय गरजेची शक्ती होती.

उदा. पकडलेल्या माश्यांच्या वाढीच्या दरात किती टक्के घट झालीये याची चर्चा काही स्मृती करत होत्या. सुसला लगेच वास आला, आणि हातातले काम पटकन संपवून आणि तो घटनास्थळी अवतरीत झाला. लागलीच तलवार काढून तो स्मृतींवर चालून गेला :

“ घटघट पिऊनी गटकन् घटिका, आलो मी रक्षणार्थ,
वाढ असे की घट असे ते वदतो मी सत्वर !
पाहत नसशी का मीन किती ते पडती जाळ्यामधुनी,
वाढ नसे तर झंप्या ती का घट असे तव नयनी ?
फुलनरेशाचा तिटकारा भरला तुमच्या मनी,
करतो तुमचे मगज नीट मी देतो त्यासी धुनी ! ”

असो.

२. शावक, धनुर्धारी आणि कपि.

शावक मलूल चेहेर्याने बसून होता. किती दिवस तर्काचा अर्क नाही पिला आणि जबरदस्तीने कोणाच्या घशात निष्कर्ष नाही कोंबला. शावकाला अशा संवादांचा धक्का आवडत असे. अशा धक्क्याने तरतरी येउन कित्येक दिवस निघत. गुद्दा खाण्यास शावक कधीच भिला नाही. आपल्याला पण ५-६ गुद्दे लगावता आले ना ? मग बास. शावकास असे खाद्य बर्याच दिवसांपासून मिळाले नव्हते.

एके दिवशी अचानक शावकाला घबाड मिळाले.

सुशिरा नावाच्या एका सुप्रसिद्ध साहित्यीकाच्या आत्महत्येची बातमी जहाजावर येउन धडकली. जहाजावरचे सगळे हळहळले.

मात्र एका धनुर्धार्यास लक्षात आले, की ही काही शोकाची वेळ नव्हे ! ही तर वेळ सरसावण्याची, अन्यायावर मात करण्याची ! लागलीच त्याने आपले चिलखत, कवच, ढाल काढून फेकून दिले आणि समाज वठणीवर आणण्यासाठी त्याने समुद्राच्या अगदी खोल आणि अंधार्या जगात बुडी मारली.

धनुर्धारी बराच वेळ पोहत राहीला. तळ लागेपर्यंत पोहला. अर्थात यात काही नवीन नव्हते त्याचासाठी. जगाची गरज भागवणे का त्याने आज सुरु केले ? आजिबात नाही. जेव्हा मातृभुमीवर चिंकदेशाच्या ड्रॅगनस्वार ...

(अचानक ११८ प्रभूंची सावली अवतरून “ड्रॅगन नसतो आणि कुनि ब्घितला पण नसेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला आम्ही काय moorkh आहो काय....” वैगेरे वैगेरे. प्रभो, नमन असो.)

... योद्ध्यांनी आक्रमण केले, तेव्हा कोणी तळागाळात जाऊन मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबच्या सर्व महितीसंबंधीत गरजा भागवलेल्या ? अर्थातच धनुर्धराने. आज तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रश्न अगदीच ऐरणीवर आला आहे ! आपल्या लाडक्या सुशिराला न्याव मिळालाच पाहीजे. तळ गाठल्यावर धनुर्धार्याला सागराच्या तळाशी माहितीचा सागर मिळाला. काय नेऊ आणि काय नको असे त्याला झाले. सरळ कुदळ फावड घेउन येऊ असा विचार करुन तो पुन्हा वर निघाला...

कपि बर्याच प्रयत्नांअंती मिळवलेल्या शिडावर बसला होता. चांगला छान दिवस होता, सूर्याच्या किरणांची त्वचेवर बौछार घेत कपि आज शांत होता.
तेव्हढ्यात त्याच्या नाकपुड्या विस्फारल्या...

कपिचे नाक काही सुस इतके ताकदवान नव्हते तरी त्याला येत असलेला वास मात्र कपिने स्वप्नात सुध्धा ओळखला असता. कपि ताडकन ऊठुन बसला. पाहातो ते काय ! धनुर्धारी टोपल्या टोपल्या भरुन कचरा जहाजात टाकत होता !

(इथे माझे स्पष्टीकरण गरजेचे आहे. हा कचरा होताच असे नाही. आठवतीये का खासीयत/ऊणीव ? होते ते समुद्रातले गोटेच ! पण कपिला वाटला बुवा कचरा.)

कपि चित्कारत धावून गेला. तसेही ही सार्वजनिक नाव नाही त्यामुळे कोणतेही बंधन नसावे असे कपिचे स्पष्ट मत होते. त्यामुळे आपण आपला हक्क बजावत आहोत हे त्याला पूरेपूर ठाउक होते.

धनुर्धारी आणि कपि काही वेळ झुंजले.

कपि वदतसे-

“काय आणीशी रे कसली कसली शी,
गोस्वामीच्या रुदनाला रे कसा तू भुललाशी”
तो कडाडला; “रे कपिऊत्तमा हो रे तू बाजू,
राजदीप तर तुमचा घेई फक्त पोळी भाजू !
ज्यास म्हणीशी ‘शी’ ते असे जीवनाचे सार,
वाच ही कात्रणे, शिक जरासा, उघडी मनाचे दार.”

त्यांची झुंज आकारास येती न येती तोवर तिथे शावक आणि सुप्रसिद्ध गुप्तहेर, सत्यांवेषी, सत्यशोधक हेरलॉक श्लोम्स चे खरेखुरे वारसदार श्री. लापै (French- La Pierre) आले. श्री. लापैंनी काही पुरावे आभ्यासले आणि अगदी सुसंगत घटनाक्रम ठरवून सुशिराच्या खूनाच्या काही शक्यता मांडल्या. त्यांचा पण जोर सुशिराची मैत्रीण रिंकी हिच्यावर होता, त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते.

इतक्यातच शावकपण सरसाऊन आला. अचानकच, काहीही पूर्वसूचना न देता. पाठीमागूनच.

तो म्हणाला-

“ का करीशी रे रिंकी रिंकी,
टाकीत राहाशी पिंकी पिंकी,
मिडीया ट्रायल बास रे sss
प्वोरीच्चा नाद सोड रे sss”

धनुर्धारी आता मात्र खरच संतापला. त्याने कप्तानाच्या सांगण्यावरुन आपले दुकान दुसरीकडे हलवले होते, तरी या नैतिक पोलिसाने का बरे दंगा करावा ?

तो म्हणाला:

“पोर कसली आहे कुलटा,
गुन्हा करुन वर कांगावा ऊलटा,
पैसे खाउन फुगलाय टोळ,
तुझ्या बोल्ण्याला दाखवतो बोळ.”

शावकाचे पोट एव्हाना भरले असल्यामुळे त्याने पण नाद सोडून दिला.
असो.

एव्हाना माझे डोके गरगरायला लागले होते. त्यामुळे मी स्मृतींच्या जंजाळातून बाहेर पडलो.

ज्ञानचक्षू आता फक्त ठिपका न दिसता खुप मोठा दिसत होता. जवळ आलो तर.

-क्रमशः (कदाचित.)

हे ठिकाणविडंबनसमाजप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनसमीक्षामाध्यमवेधमतशिफारससल्लावादआरोग्य

प्रतिक्रिया

मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का.
_/\_

मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का.
अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते.

त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते.
कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

आनन्दा's picture

8 Sep 2020 - 10:05 am | आनन्दा

बाबाजी, जय हो!!

आता फक्त अचुंबीत कुंबन तेव्हढेच घ्यायचे राहणार बहुतेक..

शा वि कु's picture

8 Sep 2020 - 10:34 am | शा वि कु

लिहिलय तर एकदम भारी.
पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय.

:(

हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली!

वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते.

आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही.

कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे!

बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2020 - 3:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ.
मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे.

बाप रे...! पुलेशु..... :)

-दिलीप बिरुटे

डॅनी ओशन's picture

12 Sep 2020 - 11:43 am | डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे.
चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.

– डॅनी.

डीप डाईव्हर's picture

12 Sep 2020 - 12:42 pm | डीप डाईव्हर

मी उत्सुक आहे. पुढचा भाग येउद्या तो पर्यंत मागच्या भागांचे संदर्भ शोधतो.

संजय क्षीरसागर's picture

12 Sep 2020 - 2:00 pm | संजय क्षीरसागर

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.

पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही.

तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

विजुभाऊ's picture

12 Sep 2020 - 12:45 pm | विजुभाऊ

डोकं पूर्ण बधीर झालंय.