आषाढी किंवा कार्तिकी, एरवी ही जेव्हा येई विठूदर्शनाचा उमाळा
फक्त मिटा डोळे, आठवा अंतरी, तो राजस, सुकुमार, नीटस काळा
त्याचा रंग काळा, त्याला वाटे, भक्तांना सदैव दिसावा
जो रंग, प्रतीक उपेक्षितांचा, वंचितांचा, त्याचा कधी विसर न व्हावा
कधी कुणा भक्तांस वाटावे, हा विश्वाचा धनी कां स्वतः काळा
काय आहे त्याला सांगायचे, दाखवत आपुला अवतार काळा
त्याचा रंग काळा, असा रंग जो प्रतीक सर्व उपेक्षितांचा, वंचितांचा
तुडवले, लाथाडले, विसरले, गेले जे सदैव, इतर म्हणती हा दोष संचिताचा
तो असेल कदाचित सांगत, माझे खरे भक्त, तेच वारकरी किंवा संत
त्यांची भक्ती आगळी वेगळी, इतरांसाठी ते दयासागर ज्यासी नसे अंत
ज्ञानोबांनी चालवली भिंत, नका समजू फक्त एक आगळा चमत्कार
जरा करा विचार, शोधा अंतर्मनी, पटेल नसे कांहीच अगोचर
जे मात्र जड, मूढ आणि अचेतन, त्या सर्वांसी बनवले चर, सचेतन
ज्यांस लिहिणे वाचणे कठीण, त्यांस केले सुजाण, दिले सहज गीता ज्ञान
तुकोबा सुद्धा म्हणे, विठूभक्ती म्हणजे, करावे आपुले, जे रंजले गांजले
ज्यांसी नाही कोणी, जे उपेक्षित, त्या सर्वांसाठी सदैव करा काहीतरी चांगले
विठूभक्ती नव्हे फक्त नामाचा गजर, कुटणे टाळ किंवा पिटणे मृदंग
संतांसारखे अचलांसी करा चल, दूर करा अज्ञान, भरा वंचितांच्या जीवनी रंग
राखा विठू नेहेमी अंतर्मनी, म्हणजे राहील स्मरणी त्याचा काळा रंग
नका विसरू जे वंचित, मूढ आणि पीडित, जाणा उपेक्षितांचे अंतरंग
आषाढी किंवा कार्तिकी, जमविता आली अथवा नाही प्रत्येक वर्षी वारी
करा प्रयत्न समजण्या विठूचा रंग काळा, आगळा, विठू भक्ती तीच खरी
प्रतिक्रिया
4 Jul 2020 - 11:07 am | राघव
विचार आवडले. पुलेशु.
4 Jul 2020 - 9:07 pm | शेखरमोघे
धन्यवाद.