न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण२०-जागृती (Awakening)

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
8 Aug 2010 - 10:42 pm

न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण२०-जागृती (Awakening)

© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)
मूळ इंग्लिश आवृत्तीतील शब्दसंख्या: ८३८८ शब्द, मराठी रूपातरातील शब्दसंख्या ४९४४ शब्द. संक्षिप्तीकरण:५९ टक्के

(हे शेवटचे प्रकरण आहे. यानंतर एक छोटे "उपसंहार" (Epilogue/Afterword) जातीचे छोटेसे प्रकरण उरले आहे व तेही जवळ-जवळ संपत आलेले आहे.)

त्यांच्या पाकिस्तानला २००६च्या मार्चमधे दिलेल्या एकुलत्या एक भेटीत राष्ट्राध्यक्ष बुश-४३ म्हणाले होते कीं मुशर्रफना डावावर काय लावले आहे, त्यांची जबाबदारी काय आहे आणि शत्रूला हरविण्यासाठी काय डावपेच आखावे लागतील या सर्वांची पूर्ण माहिती आहे. अल कायदाला हरविण्यासाठी गुप्त माहितीची आपापसात देवाणघेवाण करून दहशतवाद्यांना शोधणे, पकडणे व त्यांना न्यायासनांपुढे खेचणे हेच मार्ग होते. आणि सरते शेवटी द्वेषभावनेच्या विचारसरणीची जागा आशेच्या विचारसरणीने घेणे हाच दहशतवादाला पराभूत करण्याचा योग्य मार्ग आहे हे मुशर्रफना नीट माहीत असून शेवटी दोघे मिळून (मुशर्रफ आणि ते स्वतः) विजय जरूर मिळवतील असेही ते पुढे म्हणाले होते.

पण बुश-४३ यांचे विमान उतरायच्या आधी अमेरिकन उपदूतावासातील (consulate) एक अधिकारी फॉय यांची गाडी स्फोटकाने भरलेली गाडी तिच्यावर आपटून आतील आणखी तीन माणसांसह कराचीतील अतिसुरक्षित समजल्या जाणार्‍या भागात उडवली गेली होती व सारे प्रणांना मुकले. अमेरिकेनेच दिलेल्या 'स्टिंगर' प्रक्षेपणास्त्राचा मारा होऊ नये म्हणून त्यांचे विमान दिवे न लावता उतरवले गेले[१]. लॉरा बुश आणि बुश-४३ विमानातून ३ मार्च २००६ रोजी उतरल्यावर त्यांच्या वधाचा प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून तयार ठेवलेल्या अनेक हेलीकॉप्टर्स आणि चिलखती गाड्यांच्या संरक्षणात ते अमेरिकन दूतावासाच्या आवारात पोचले. आजकाल या दूतावासात कांहीं कामासाठी जाणे म्हणजे एक 'प्रकल्प'च होता!
२४ तासांच्या त्यांच्या भेटीत बुश कुठल्याही आम पाकिस्तानी नागरिकाच्या जवळपासही जाऊ शकले नव्हते! गस्त घालायला हजारो पाकिस्तानी पोलीस, छत्रीधारी सैनिक, अमेरिकेची ब्लॅक हॉक हेलीकॉप्टर्स तैनात होती. इस्लामाबादवरील सर्व मुलकी विमान वहातूकही पूर्णपणे बंद होती. पण इतर शहरांत 'मद्रास्सा'च्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून धार्मिक पक्षांनी छोट्या-मोठ्या आगी लावून आपला निषेध व राग व्यक्त केला होता.

मुशर्रफ यांचाही या काळातील सारा वेळ स्वतःच्या समस्याबरोबर लठ्ठालठ्ठी करण्यातच गेला. पाकिस्तानला यायच्या आधी पाच दिवस बुश-४३यांनी करझाई यांच्या सरकारच्या समर्थनार्थ काबूलला भेट दिली होती. तालीबान्यांनी काबूलहून पळ काढला असला तरी त्यांचे अनुयायी अफगाणिस्तानच्या पश्चिम व दक्षिण भागात धारिष्ट्यपूर्ण व रक्तलांछित हल्ले करून सुधारणांच्या समर्थकांना आणि युतीच्या अफगाणी, ब्रिटिश आणि अमेरिकन सेनेला मदत करणार्‍यांना कंठस्नान घालू शकत होते. त्यावेळी करझाईंनी बुश-४३ना पाकिस्तानी लष्कर आणि ISI तालीबानला व अल कायदाला कसे आसरा व शस्त्रास्त्रे पुरवत होते याबद्दलच्या पुराव्याचे एक बाड दिले होते त्यात क्वेट्ट्याला एका पिक-अप व्हॅनमध्ये बसून सगळीकडे उजळ माथ्याने फिरणारे एकाक्ष मुल्ला ओमर व बिन लादेन यांच्यासकट पाकिस्तानात रहाणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि छोट्या सैनिकदलांच्या मुखियांच्या नावाची यादी होती. करझाईंचे म्हणणे किती सत्य होते याचा प्रत्यय १३ जानेवारी २००६ला आलाच होता. कारण त्या दिवशीच्या ड्रोन विमानांतून डागलेल्या 'हेलफायर' प्रक्षेपणास्त्रांच्या अफगाणिस्तानच्या सीमेपासून ५ मैलावर असलेल्या डामाडोला गावात केलेल्या हल्ल्यातून अल कायदाचे न. २ अयमान अल-जवाहिरी जरी वाचले असले तरी त्यांचे नरसंहारक्षम शस्त्रास्त्रविभागाचे प्रमुख अबू खबाब अल-मास्री मारले गेले होते.

पण मुशर्रफ गुर्मीतच होते. त्यांनी ८०,००० सैनिक अफगाणिस्तान सीमेवर तैनात करून त्यांना जवळ-जवळ पूर्णपणे नेस्तनाबूत केले होते असा दावाही त्यांनी केला व करझाईंच्या यादीतील ६६ टक्के नावे कालबाह्य होती असे सांगून तिची टर उडवली. बुश-४३ यांच्या आगमनाच्या आसपास २५ परदेशी दहशतवाद्यांना पाक लष्कराने ठार मारल्याची शेखी मिरवली पण ते सारे मृत मुले, स्त्रिया व विद्यार्थी होते असे पहाणार्‍यांनी सांगितले होते. बुश-४३ परत गेल्यावर "पाकिस्तानस्थित अल कायदा नेते इंग्लंडमधील व इतर युरोपमधील गंभीर व वाढत्या कार्यक्षमतेच्या दहशतवाद्यांच्या चिवट जाळ्यांचे संचलन करीत आहेत" असे अपूर्व असे जाहीर वक्तव्य एलीझा मॅनिंगम-बुलर या MI5च्या निर्देशिकेने केले. अमेरिकेचे ब्रूस रीडल[२] हेही त्याच मताचे होते. सरकारातून बाहेर पडल्यावर त्यांनी "अल कायदाचे प्रमुख पाकिस्तानात लपले आहेत" असे आपल्या पहिल्याच मुलाखतीत सांगितले. २००२ ते २००४च्या दरम्यान त्यांचे उद्दिष्ट जिवंत रहाणे व पाकिस्तानात क्वेट्टा व बलुचिस्तानात नवे तळ स्थापणे असे होते, २००५ साली त्यांचे पुनरुत्थान झाल्याची लक्षणे साफ दिसू लागली होती व २००६ साली ते बिन लादेन व अल-जवहिरी या नेत्यांच्या चित्रफितींच्या आक्रमक प्रचारासह व नव्या कारवायांसह सूडबुद्धीने प्रतिहल्ला करायला तयार झाले होते! त्यासाठी ते इंग्लंड व अमेरिकेत स्थायिक झालेल्या पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांना वापरून दहशतवादी हल्ले करायच्या योजना आखत होते[३].

पाकिस्तानातील मैत्रीपूर्ण वातावरणत अल कायदाने जोरदार पावले टाकून तथाकथित प्रतिबंधित LeT, JeM[४] सारख्या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले. मुशर्रफनीच उभ्या केलेल्या काश्मिरी दहशतवादी संघटना, अफगाणी समर्थक संघटना, तालीबान व बिन लादेन वत्यांचे सहकारी यांना आश्रय देणार्‍यांच्या कारवाया पाकिस्तान सरकार सहन करत होते अशीही ताकीद रीडेल यांनी दिली. निवेदनाचे समर्थन करण्यासाठीच जणू पाठोपाठ हेकमतयार[५] यांनी बिन लादेन व त्यांच्या सहकार्‍यांना तोरा बोरा पर्वतांमधून नोव्हेंबर २००१मध्ये कसे पाकिस्तानात सुरक्षितपणे पोचविले होते याबद्दल फुशारकी मारली. पाकिस्तानी लष्कर आणि ISIच्या छुपी मदत वापरून बलवान झालेले हेकमतयार हे कट्टर पाश्चात्यविरोधी मुजाहिदीन काबूलच्या पाडावात अल-जरकावी[५], अल-मकदीसी[५] यांच्याबरोबरीने लढले होते.

बुश-४३ परतल्यानंतर तालीबान व अल कायदाच्या पुररुत्थानाचे नेमके स्वरूप हे सुस्पष्ट होऊ लागले. उत्तर वझीरिस्तानमधील मिरामशहा नावाच्या एका दुर्गम गावातील हकीकत अंगावर शहारे आणणारी होती. विजेच्या खांबाना लटकवलेली बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण झालेली अनेक शरीरे, शिरच्छेदानंतर तोंडात नोटा कोंबून जमीनीवर भिरकावलेले डोके, बाजारात छिन्न-विछिन्न केलेल्या अनेक शरीरांवर फेकलेले एक मृत कुत्रे आणि "गुन्हेगारांची आणि देवाच्या आज्ञा न पाळणार्‍यांची हीच गत होईल" असे म्हणून त्यातल्याच एका शरीरावर बंदुकीच्या दस्त्याचा फटका मारणारा एक लांब दाढीवाला मुल्ला ही कथा "नरकातील एक दृश्य" म्हणून जाविद हुसेन नावाच्या एका बलदंड पत्रकाराने प्रसिद्ध केली.

या भागांत काळ्या रंगाचा फेटा बांधलेल्या मुल्लांचीच सत्ता चाले व पाकिस्तानी लष्करी आणि मुलकी अधिकारीसुद्धा जाहीर मृत्युदंडांसारख्या घटनासुद्धा प्रेक्षकांसारखे फक्त बघत असत. ज्येष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी तिथल्या मुलकी अधिकार्‍यांना 'नव-तालीबानीं'च्या हालचालींना अजीबात अडसर आणायचा नाहीं अशा आज्ञाच दिलेल्या होत्या असे सय्यद जहीर उल-इस्लाम नावाच्या मुलकी अधिकार्‍यानेच सांगितले. पुढे ही मध्यमयुगीन प्रथा टंक, डेरा इस्माइल खान, बन्नू व कोहातसारख्या आजूबाजूच्या शहरातही पसरू लागली. संगीत, टीव्ही, हजामतीची दुकाने वगैरेवर बंदी आणण्यात आली होती.

पण ही आणीबाणी थेट मुशर्रफ यांच्या सैन्यात पसरण्याइतकी खोलवर गेली होती. पाकिस्तानी लष्कराकडे 'नव-तालीबानीं'ना चिरडून टाकू शकतील इतकी भरपूर शस्त्रास्त्रें असूनसुद्धा त्यांच्यावर ते स्वामित्व प्रस्थापित करू शकत नसल्याची कबूली दिल्यामुळे त्या दोघांत एप्रिल २००४मध्ये एक 'शांती-करार' झाला होता. त्याच नोव्हेंबरमध्ये त्यांना खुष करण्यासाठी या असामान्य उपायांना मुशर्रफनी होकार दिला होता. पाकिस्तानवरील निष्ठेची प्रतिज्ञा घेणे आणि परदेशी दहशतवाद्यांना आसरा किंवा मदत देणे बंद केल्याच्या बदल्यात त्यांना मुशर्रफनी त्यांना अल कायदाचे झालेले कर्ज फेडण्यासाठी ५,४०,००० डॉलर्सची मदतही दिली! या पैशाच्या विनियोगावर नियंत्रण ठेवणे अशक्यच होते आणि कुणीही 'नव-तालीबानीं'ना हे कर्ज कसे झाले असले प्रश्न विचारायची सोयच नव्हती! हे पैसे मिळताच एका गटाचा म्होरक्या बाईतुल्ला मेहसूद भूमिगत झाला.

सररोघा येथे नव-तालीबानींबरोबर झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानी लष्कराने २००५च्या फेब्रूवारीत दक्षिण वझीरिस्तान सोडायचे कबूल केले होते. तशाच तर्‍हेचा करार उत्तर वझीरिस्तानवर सत्ता असलेल्या आणखी एका नव-तालीबानींबरोबरही २००६च्या सप्टेंबरमध्ये केला गेला. त्यानुसार तेथील पायदळाचे व हवाई हल्ले थांबविणे, कैद्यांची मुक्तता करणे, सैन्याने बराकीत परत जाणे, नव-तालीबानींना त्यांच्या हानीची नुकसानभरपाई देणे आणि टोळीवाल्यांना हत्यारे बाळगायची परवानगी देणे वगैरे अटीही सरकारने मान्य केल्या. मुशर्रफना विचारून किंवा परस्पर ते माहीत नाहीं, पण पाकिस्तानी जनरल्सनी मुल्ला दादुल्लाबरोबरही करार केले. मुल्ला दादुला हे एक पायाचे मुल्ला असून नाटोच्या फौजांविरुद्ध नैऋत्य भागातील कंदाहार व हेलमंद या प्रांतात[६] बंडाळी केल्याबद्दल व अनेक नाटो सैनिकांच्या मृत्यूबद्दल जबाबदार असल्यामुळे अमेरिकेच्या most-wanted list वर आहेत. सीमेपलीकडील उद्रेकापेक्षा या गुप्त करारामुळे खौस्त, पाक्तिया व पाक्तिका या अफगाणिस्तानच्या पूर्वसीमेवरील प्रांतांत अराजक माजले असे नाटोच्या सेनाधिकार्‍यांचे मत आहे. पाकिस्तानी लष्कर गेल्यावर या नव-तालीबान्यांनी निर्भयपणे शस्त्रें व सैनिक सीमेपलीकडे पाठवले आणि तिथल्या गांवांत व शहरात हिंसक अराजक माजविले आणि दबा धरून (ambush) नाटोच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातले. २००५मधील १६०० हल्ल्यांच्या तूलनेत २००६मध्ये ५००० हल्ल्यावर आकडा पोचला व आत्मघाती हल्ले २७ वरून १३९वर पोचले होते.

परिस्थिती इतकी बिघडली कीं सर्व स्थानीय अधिकार्‍यांनी मिळून ज्येष्ठ अधिकार्‍यांकडे अर्ज सादर केला. ६ मार्च २००७रोजी पाकिस्तानच्या बेशिस्त वायव्य सरहद्द प्रांताचे राज्यपाल ले.ज.अली महंमदअली औरकझाईंना एक अहवाल सादर करण्यात आला. त्यात अनेक मुद्दे होते: "कायदा, सुव्यवस्था राखणार्‍यांच्या औदासीन्यामुळे सरकारी पाऊल मागे पडले आहे, प्रत्येक दिवसागणिक सरकारचा वचक कमी होत चालाला आहे, ती पोकळी बिनसरकारी लोक व्याफून राहिले आहेत, सरकारी कर्मचार्‍यांचे आणि सरकारच्या समर्थकांचे मनोधैर्य खचलेले आहे, तालीबानीकरण, कायद्यांचा अभाव आणि दहशतवाद वाढत आहे हे ते मुद्दे होते.

नेहमी या भागाचा दौरा करणार्‍या एका वार्ताहाराने लिहिले होते कीं सरकारी धोरण पशुतुल्य लष्करी अत्याचाराच्या टोकापासून बंडखोरांपुढे शरणागती पत्करण्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत झुलले आहे. पेचप्रसंग सोडविण्याबद्दल विख्यात असलेला जागतिक विचारमंच 'आंतरराष्ट्रीय आणीबाणी गटा'ने[७] "असले करार करूनही बंडखोरी चालूच राहिली असून सीमेवरील घूसखोरीही कमी व्हायचे नांव फ़्हेत नाहीं. लष्करी मोहिमा 'अल कायदा'ची वरिष्ठ लक्ष्ये टिपण्यात यशस्वी होत नाहीं आहेत, आणि कित्येक बंडखोरांना इतरत्र आश्रय मिळाला आहे" असे लिहीत अतीशय गंभीर चिंता व्यक्त केली.

पण नवतालीबानी आणि त्यांचे अल कायदा समर्थक यांचा उत्कर्ष आपोआप नाही झाला. अमेरिकन गुप्तहेरखात्याच्या आणि भारतीय गुप्तहेरखात्यातील वरिष्ठ अधिकारी या दोघांनी पाकिस्तानी गुप्तहेरखात्यातील कांही घटकांवर नवतालीबानींबरोबर संबंध ठेवणे, त्यांना प्रशिक्षण आणि आसरा देणे असे आरोप केले. त्यात मुशर्रफ यांचे २००४पर्यंत CJCOS असलेले ज.मोहम्मद अजीज, ISIचे भूतपूर्व Director General आणि बिन लादेनच्या सहकार्याने बेनझीरबाईंना ठार मारण्याचा कट केल्याबद्दल बडतर्फ केलेले ज.हमीद गुल, स्टिंगर प्रक्षेपणास्त्रे परत मिळविण्याच्या CIAच्या प्रयत्नांना खीळ घालणारे ISIचे आणखी एक भूतपूर्व Director General ज.जाविद नासीर, FBIने ९/११ हल्ल्याबद्दलचे संशयित ISIचे आणखी एक भूतपूर्व निर्देशक ज.महमूद अहमद, १९९५मध्ये बेनझीरबाईंच्याविरुद्ध कुदेता रचण्याच्या कटात सामील असलेले व २००१साली मुशर्रफनी माफी दिलेले ज.जहीर-उल-इस्लाम, मुस्लिम अतिरेक्यांकडून मारले गेलेल्या डॅनियल पर्ल यांना त्यांच्या मारेकर्‍य़ांकडे घेऊन गेलेले स्क्वा.ली.खालिद ख्वाजा[८] यांचाही समावेश होता. (खालिद ख्वाजा तालीबानशी (आणि ISIच्या इस्लामाबादच्या मुख्यालयाशी) संलग्न जमीया हफसा मद्रास्साच्या विद्यार्थिनींना बिन लादेनच्या समर्थनार्थ चिथावल्याबद्दल तुरुंगात होते.) मुस्लिम अतिरेक्यांच्या असल्या चळवळी कुठल्या आदिजमातींच्या प्रदेशात होत नव्हत्या तर पाकिस्तानच्या ऐन राजधानीत होत होत्या व मुशर्रफ यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया नव्हती.

धर्म आणि सरकार यांच्यातील नेहमीच्या युद्धखोर संबंधांमुळे सापळे विखुरलेल्या आणि घसरत्या वाळूच्या परिस्थितीत मुशर्रफना फारच काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती. एका बाजूला धर्मांध अतिरेकी तर दुसर्‍या बाजूला नवी पाश्चात्य मित्रराष्ट्रें या दोघांत समतोल साधून त्यांना जगायचे होते. २७ मार्च २००७ला मोटरसायकलीवर स्वार असलेल्या आणि मुखवटे वापरणार्‍या बंदूकधारींनी पाकिस्तानच्या वायव्य भागातील FATAच्या बजौर भागात एका लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड फेकले त्यात ISIचे दोन (त्यातला एक उपसंचालकाच्या हुद्द्यावरचा) धरून पाच लोक मृत्युमुखी पडले. २९ मार्चला एका अज्ञात आत्मघाती बाँबरने इस्लामाबादच्या आग्नेय दिशेला असलेल्या एका लष्करी प्रशिक्षण मैदानावर स्वत:ला उडवून दिले त्यात तीन सैनिक मृत्युमुखी पडले. पण पाकिस्तानवर राज्य करणे किती कां अवघड होत असेना, पण मुशर्रफ पाश्चात्य राष्ट्रांना देलेली वचने पूर्णपणे पाळत नव्हते व स्वतःची तुंबडी भरू पहात होते याबद्दलचा सबळ पुरावा वाढत होता. पाकिस्तानी लष्कर अल कायदाचा आणि तिच्या सहप्रवाशांचा धुव्वा उडवायला नाखूष किंवा असमर्थ होती हे कळल्यावर पाश्चात्य राष्ट्रांना त्यांच्या अब्जावधी डॉलर्सच्या मदतीच्या बदल्यात काय मिळत होते याबद्दलचे गंभीर प्रश्न उपस्थित होत होते[९]. २००७ सालापर्यंत अमेरिकन सरकारला कळून चुकले होते कीं आजच्या सोयीसाठी लष्कराला मलमपट्टी म्हणून खानसाहेबांचा बकरा बनविण्याच्या आणि अण्वस्त्रांच्या सरकारी काळ्याबाजाराला लपविण्याच्या त्यांच्या कृत्याची जबरदस्त किंमत त्यांना भविष्यकाळात मोजावी लागणार होती!

दहशतवादाबरोबरच्या युद्धात यशस्वी होण्यासाठी आणि अल-सुरी, अल-झरकावी आणि अल-मक्दीसी[१०] यांच्या प्रबंधाला विकल्प देण्यासाठी "द्वेषभावनेच्या विचारसरणीची जागा आशेच्या विचारसरणीने घेणे" या बुश-४३यांनी त्यांच्या २००६मधील पाकिस्तानला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या वेळी सुचविलेला उपाय लागू करण्यासाठी मुशर्रफ कांहींच करत नव्हते. पूर्वी २००२मध्ये पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षानी मुस्लिम अतिरेकी आणि दहशतवाद यांना तोंड देण्यासाठी "कुठल्याही एका संघटनेला किंवा एका पक्षाला कायदा मोडू दिला जाणार नाहीं" या शब्दात एक योजना सरकारी चित्रवाणीवरून जाहीर केली होती. त्यात सर्व मद्रास्सांची नोंदणी करण्याचे, त्यांचा अभ्यासक्रम ठरविण्याचे, त्यांचा अतिरेक्यांची केंद्रे असा दुरुपयोग होऊ न देण्याचे, परदेशांतून येण्र्‍या देणग्यांवर नियमित करण्याचे आणि तिथे शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा घेतल्याशिवाय प्रवेश नाकारण्याचे वचन दिले होते. पण याबद्दलचे बिल पुढील तीन वर्षें रेगाळलेच होते. मार्गदर्शक म्हणून आदर्श मद्रास्सा स्थापण्याचे त्यांचे वचन नावापुरतेच राहिले. ३०० विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या अवघ्या तीन अशा मद्रास्सा अस्तित्वात आल्या. याविरुद्ध नोंदणी न केलेल्या इतर मद्रास्सांमधून लाखों विद्यार्थ्यांच्या मनावर जुन्या अभ्यासक्रमानुसार शिकवण बिंबविली गेली. लंडनमध्ये २००५साली मेट्रोवरील आत्मघाती बाँबहल्ल्यात स्वतःला आणि इतर सात जणांना मारून टाकणार्‍या शहज़ाद तन्वीरने लष्कर-ए-तोयबा चालवीत असलेल्या मद्रास्सामध्ये चार महिने प्रशिक्षण घेतले होते हे उघड झाल्यावर ब्रिटनने पुन्हा मुशर्रफ यांच्यावर दडपण आणले. मग मुशर्रफनी पुन्हा एकदा सर्व मद्रास्सांना ३१ डिसेंबर २००५च्या आत नोंदणी करा अन्यथा त्या बंद केल्या जातील हुकूम दिला. पण २००७ साली 'आंतरराष्ट्रीय आणीबाणी गटा'ने[७] केलेल्या पहाणीत हा हुकूम कागदावरच राहिल्याचे आणि मशीदींच्या व मद्रास्सांच्या जाळ्यांच्या आश्रयाखाली सांप्रदायिक आणि जिहादी गट सक्रीय राहिले. ८००० मद्रास्सांना २२ कोटी डॉलर्सची मदत देऊनही बहुसंख्य मद्रास्सांनी नोंदणीस नकार दिला होता आणि त्यांच्या अभ्यासक्रमातील बदलही करण्यात आले नव्हते. मुशर्रफनी पैसे परत मागितले पण कुणिच ते परत केले नाहींत आणि मुशर्रफनीही तगादा लावला नाहीं[११].

जिहादी मद्रास्सा तर चालू होत्याच पण जिहादी विचारसरणी बिंबवणारी केंद्रें आणि सरकारच्या पाठिंब्याने उभे केलेली प्रशिक्षणकेंद्रेही जोरात चालू होती-आधी अफगाणिस्तानात लढण्यासाठी, मग काश्मीरमध्ये लढण्यासाठी व अलीकडे आंतरराष्ट्रीय जिहादचा भाग म्हणून अल कायदामध्ये सामील झालेली! ज्यांच्यावर बंदी आली त्या संघटना नांवे बदलून पुन्हा कार्यरत झाल्या. सिपाह-ए-साहाबाचे नाव बदलून ते मिल्लत-ए-इस्लामिया झाले, तिचे प्रमुख मौलाना अझम तारीक कौदेतून मुशर्रफच्या मेहेरबानीने बाहेर आले. ते जरी विरोधकांच्या गोळीला बळी पडले असले तरी त्यांची मिल्लत-ए-इस्लामिया कार्यरतच राहिली.

२००२च्या जानेवारीत जैश-ए-महंमदवरही निर्बंध घातले गेले होते व तिचा प्रमुख मौलाना अझर मसूद[१२] सार्वजनिक शिस्तबद्धता टिकविण्यासाठी कैदेत होते. ते मुशर्रफ यांचे चेले होते आणि पूर्वी हरकत-उल-अन्सार नावाची दहशतवादी संघटना चालवीत असत व पाश्चात्य पर्यटकांना काश्मीरमध्ये पळवून नेण्यात त्यांचा हात होता. त्यातला एक पर्यटक मारला गेला. पण मसूद यांच्यावर कुठलाही आरोप ठेवला गेला नाहीं आणि ते मुक्तच राहिले आणि त्यांच्या संघटनेचे नाव त्यांनी खुद्दाम-ए-इस्लाम असे बदलले.

कांही महिन्यांतच कायद्यात अशा पळवाटा काढायचे पेवच फुटले. लंडन मेट्रो बाँबहल्ल्याशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या लष्कर-ए-तोयबाचे प्रमुख हाफीज मुहम्मद सईद यांनी त्यांच्या संघटनेचे नांव बदलून जमात-उद-दावा असे ठेवले. दोघेही उघडपणे जिहादसाठी चिथावण्या देत होते व असे करणे मुशर्रफनी बेकायदेशीर घोषित केले असूनही भरती करण्याचा प्रयत्नही करत होते. कांहींही कारवाई न झाल्यामुळे या बेकायदेशीर संघटना मद्रस्सा चालवीतच राहिले.

सिपाह-ए-सहाबा, जैश-ए-महंमद, हरकत उल मुजाहिदीन आणि हरकत-उल-जिहादी-इस्लामी या संघटनांशी थेट संबंध असलेली भरतीची आणि प्रशिक्षणाची नऊ केंद्रें कॉलेजप्रवेशासाठी असते त्या पद्धतीवर चालू होती. या केंद्रांतून अनुयायी भराभर बाहेर पडत होते आणि त्याचे परिणाम लगेच दिसू लागले होते. अमेरिकेच्या दूतावासातील अधिकारी फॉय यांच्या वधाचा आरोप असलेले दोघे या संघटनांच्या मद्रास्सात तयार झालेले जिहादी होते. एक महिन्यानंतर ११ एप्रिल २००६ रोजी झालेल्या एका प्रचंड नरसंहारात एका आत्मघाती बाँबरने कराचीतील निश्तार पार्कमध्ये प्रेषक महंमद यांचा जन्मदिन साजरा करणार्‍या धार्मिक मेळाव्यावर हल्ला केला. त्यात ४७ माणसे मृत्युमुखी पडली आणि शंभरहून जास्त जखमी झाली. सिपाह-ए-सहाबा आणि लष्कर-ए-झांगवी या संघटनांवर संशय होता.

तीन महिन्यांनंतर २१ जुलै २००६ रोजी एका एका आत्मघाती बाँबरने पाकिस्तानी इस्लामी तेहरीक या पाकिस्तानातील सर्वात मोठ्या शियाधर्मियांच्या पक्षाचे अध्यक्ष अल्लामा हसन तुराबी यांना ठार मारले. ६ एप्रिलला त्यांच्या जिवावर झालेल्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. सिपाह-ए-सहाबा आणि लष्कर-ए-झांगवी यांच्यावरच प्रामुख्याने संशय होता. ३० सप्टेंबरला एका पाकिस्तानी आत्मघाती बाँबरने बारा नागरिकांना काबूल येथील एका सरकारी इमारतीसमोर ठार मारले. या हल्ल्याची योजना आणि यात भाग घेतलेल्या लोकांचा मागोवा घेतल्यास त्यांचा संबंध कराचीतील मस्जिद-ए-नूर या मशीदीने चालविलेल्या मद्रास्साशी लागला. या योजनेत सहभागी असलेल्या व्यक्तीने सांगितले कीं या हल्ल्याला (आणि यापुढच्या हल्ल्याला) हरकत-उल-मुजाहिदीन या प्रतिबंधित संघटनेचे सक्रीय सभासद मौलवी अब्दुल शकूर खैरपुर यांनी मस्जिद-ए-नूर मद्रास्सात मंजूरी दिली होती

ज्यात ७५,००० लोक प्राणांना मुकले आणि तीस लाख लोक बेघर झाले त्या ऑक्टोबर २००५च्या भीषण भूकंपाने मुशर्रफ, अमेरिका व युरोपीय देशांनी बंदी घातलेल्या किंवा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवरील नजर ठेवायच्या यादीत नाव असलेल्या या सतरा दहशतवादी संघटनांना जणू संजीवनीच दिली. लष्कर आपल्या सुमार संघटनाशक्ती व सुमार नेतृत्वामुळे डोंगराळ विभागात साधनसामुग्रीसह पोचायचा अद्याप प्रयत्नच करीत असताना हे दहशतवादी गट त्यांची कार्यालये डोंगराळ भागात भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असल्यामुळे तिथे लगेच पोचले व त्यांनी अन्न, तंबू, आणि पांघरुणे लगेच वाटण्यास सुरुवात केली. त्यांनी तिथे आपले कापडी झेंडे आणि फलक उभे केले. प्रतिबंधित संघटना अल-बद्र अल-मुजाहिदीन या संघटनेच्या फलकावर "१०,००० मुजाहिदीनांच्या रक्ताचे रक्षक" अशी घोषणा होती. असेच अनेक ध्वज तिथे पाकिस्तानी लष्कराच्या डोळ्यासमोर फडकत होते.

'जमात उद-दावा'ने (आधीचे नाव लष्कर-ए-तोयबा) मुजफ्फराबादला डॉ. अमीर अजीज खान यांच्या नेतृत्वाखाली एक क्षेत्रीय रुग्णालय उघडले. यांना २००२साली त्यांच्या अल कायदा आणि ओसामांच्याबरोबरील असलेल्या संबंधासाठी अटक झाली होती. (ते ओसामांना भेटलेही होते.) मुशर्रफनी जमात-उद-दावाची भूकंपानंतरच्या पहिल्या कांहीं आठवड्यातील गंभीर परिस्थितीला लगेच 'ओ' दिल्याबद्दल आणि त्यांच्या अथक प्रयत्नांबद्दल प्रशंसा केली.

खालिद महंमद शेख या ९/११च्या योजकाला रहायला सुरक्षित जागा पुरविणार्‍या जमात-ई-इस्लामी या संघटनेने भूकंपग्रस्त बत्ताग्राम या गावात 'अल-खिदमत संस्थे'च्या नावाखाली (खिदमत=सेवा, service) तंबूमध्ये भरणारी एक शाळा काढली आणि शेकडो नव्याने अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना तिथे आसरा दिला. खुद्दाम-उल-इस्लाम (उर्फ जैश-ए-महंमद) या संस्थेनेही भूकंपग्रस्त भागात अल रशीद विश्वस्तसंस्थेच्या नावाने सेवाकार्य सुरू केले. जिहादाच्या तत्वावर चालणार्‍या आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने अल कायदाबरोबरच्य संबंधांमुळे निर्बंध घातलेल्या या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले[१३]. मुशर्रफ यांचे आवडते वाक्य होतेच "एका माणसाचे दहशतवादी दुसर्‍याचे स्वातंत्र्यसैनिक असतात" आणि त्यांच्या मतें अल कायदाशी जुडलेला काश्मीरमधील संघर्ष हे नेहमीच स्वातंत्र्ययुद्ध होते! हा शब्दच्छल फारच धोकेबाज होता कारण तशी भाषा वापरणार्‍यावर कुठलीच थेट जबाबदारी नव्हती आणि कट्टर इस्लामी लोकांना खुष ठेवायला असा शब्दच्छल उपयोगी होता!

भूकंपग्रस्त भागात भुकेचा प्रश्न तीव्र होणार होता. मद्रस्सांतील सुधारणांच्या बाजूने असणार्‍यांना वाटू लागले कीं या (असुधारित) मद्रास्सा नष्ट झालेल्या सिक्षणसंस्थापद्धतीची जागा घेतील. हा भाग जिहादीसाठी एक सुपीक जागा बनली होती. नव्याने अनाथ झालेल्या मुलांना विश्वासात घेणे व त्यांना कट्टर जिहादी दीक्षा देणे सोपे झाले होते. नंतर खरे आई-बाप त्यांच्याकडे मुले परत मागायला आले तेंव्हां जमात-उद-दावाच्या लोकांनी त्यांना परत द्यायला नकारही दिला.

पाकिस्तानमध्ये तालीबानी, नव तालीबानी, अल कायदा, सुन्नी पंथाचे नियमबाह्य स्वयंसेवक आणि कुणाशीच संलग्न नसलेले-लढण्यासाठी जगणारे-सटरफटर-'दादा'प्रवृत्तीचे, कधीही बॅग भरून व पवित्र कुराण ग्रंथाची एक प्रत घेऊन कुठेही लढायला निघू इच्छिणारे मुल्ला अशी अतिरेक्यांची रेलचेल होती. पाश्चात्य राष्ट्रांतील जुन्या पठडीतील विचारवंतांना मोठी भीती ही होती कीं पाकिस्तानातील अण्वस्त्रें या भिन्न अतिरेक्यांच्या हातात पडतील-मग ती परमाणूप्रकल्पातील त्रुटींमुळे असो किंवा परमाणूप्रकल्पातील असंतुष्ट शास्त्रज्ञांमुळे असो किंवा कहूता तंत्रज्ञान विकून पैसे मिळवायला तयार असलेल्या पाकिस्तानातील तत्वहीन निर्धन सरकारामुळे असो. पण बुश-४३ यांच्या नव्या पठडीतील विचारवंतांचे लक्ष इराक, उ.कोरिया व खास करून इराणमुळे इतके विचलित झाले होते कीं त्यांना या सर्व आपदांचे मूळ पाकिस्तान आहे याचेच विस्मरण झाले होते. २००६ साल आले तोवर परमाणूप्रकरणाला अडगळीत टाकण्यात आले होते. खानसाहेबांच्याबद्दल बाहेर पडणार्‍या बातम्यात फक्त त्यांच्या ढासळणार्‍या प्रकृतीबद्दल बातम्या असायच्या. पण त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबद्दल मात्र इशारा होता. म्हणजे मुशर्रफ-आर्मिटेज यांच्यातल्या करारालाही मुशर्रफनी धुडकावलेले दिसत होते. २४ ऑगस्टला पाकिस्तानी अणूबाँबचे पिताश्री प्रोस्ट्रेटच्या कर्करोगाने आजारी असल्याची बातमी देतांना त्यांचा अशक्त पण हसरा चेहेर्‍याचा फोटो जाहीर करण्यात आला. सौदी अरेबियाच्या मशीदींतून त्यांच्या झटपट बरे होण्यासाठी खास प्रार्थनाही झाल्या. ७ नोव्हेंबरला खानसाहेबांची स्थानबद्धतेतून तात्पुरती मुक्तता करण्यात आली आणि त्यांना कुटुंबीय आणि वैयक्तिक डॉक्टर ज.चोहान यांच्यासह सरकारी विमानातून कराचीला आणण्यात आले व तिथे ते कांहीं दिवस राजिया हुसेन या आपल्या बहिणीकडे कांहीं दिवस राहिले आणि मगच आगा खान विश्वविद्यालय रुग्णालयाच्या खासगी विभागातील १३० नंबरच्या खोलीत दाखल झाले. तीन दिवसानंतर त्यांची प्रोस्ट्रेट ग्रंथी काढून टाकण्यात आली. १६ सप्टेंबरला तारखेला रुग्णालयातूनही ते पुन्हा आपल्या बहिणीकडे कांहीं आठवडे राहिले. खानसाहेबांच्या जवळच्या वर्तुळांतून सांगण्यात आले कीं या काळात कहूता, परमाणू उद्योग आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका पोचवणार्‍या घटनांच्या मालिकेनंतर मुशर्रफ त्यांचे मन वळविण्याचे खूप प्रयत्न करत होते.

पहिली घटना होती ११ महिन्यांपूर्वी! ऑक्टोबर २००५च्या भूकंपामुळे काश्मीर भागात नुकसान झाले होते असे नाही पण कहूतालाही झाले होते, पण ते गुप्त ठेवण्यात आले होते. खानसाहेबांच्या जवळच्या सहकार्‍यांचा दावा होता कीं भूकंपामुळे त्यांच्या पायाच्या काँक्रीटला चिरा पडल्यामुळे एकूण सेंट्रीफ्यूजेसपैकी एक तृतियांश सेंट्रीफ्यूजेस नष्ट झाल्या होत्या आणि त्या भूकंपाच्या वेळेला फिरत होत्या त्यामुळे त्यातले भाग चोहीकडे फेकले गेले. १९८३च्या भूकंपानंतर पायाचे काँक्रीट बळकट करण्यात आले होते तरीही २००५चा भूकंप इतका जोरदार होता कीं त्याने गदारोळ माजवला कारण एका क्षणात हजारों सेंट्रीफ्यूजेस भग्न होऊन त्यांचे भाग वाकडे-तिकडे झाले होते आणि कच्चा माल भरण्याची आणि काढायची यंत्रणा तुटली होती आणि UF6चे लोट आणि अंशत: शुद्धीकृत युरेनियम सगळीकडे पसरले होते. पाकिस्तानी सरकारने आणि लष्कराने चुप्पी साधली होती. पण कहूताप्रकल्पातील उत्पादन ताबडतोब बंद केले गेले होते आणि अनेक तज्ञांचे गट सर्वनाश आणि राजनैतिक नुकसान थांबविण्यासाठी पाठविले गेले होते. कुठलीही बातमी बाहेर जाऊ दिली गेली नव्हती! एकाच माणसाला अशा परिस्थितीत काय करायला हवे ते माहीत होते खानसाहेबांना. पण मुशर्रफनी त्यांना खोट्या आरोपांत गोवून त्यांचा जाहीरपणे अपमान केला होता आणि ISI कडून त्यांचा छळही केला होता.

सगळ्या महत्वाच्या व्यक्ती अटकेत होत्या. मुशर्रफनी सर्वाची हकालपट्टी केली होती त्यामुळे हा घोळ साफ करू शकेल असा कुणी अनुभवी माणूसच कहूताला नव्हता. शेवटी मुशर्रफ घाबरून इतके निराश झाले झाले कीं ते खानसाहेबांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली कीं त्यांनी सगळ्या शास्त्रज्ञाना बरोबर घेऊन कहूताला परत यावे. जर त्यांना अटकेतून दोन आठवड्याची मोकळीक मिळाली तर ते हे काम करतील असे खानसाहेबांनी मुशर्रफना सांगितले. 'अडला हरी' न्यायाने मुशर्रफ तयार झाले. पण झालेल्या अपमानामुळे संतापलेल्या खानसाहेबांनी आपला शब्द पाळला नाहीं. त्यांना आपल्याला वेढून अपमानित केलेल्या माणसाला मदत करवेना. त्याचा बदला म्हणून खानसाहेबांच्या आयेशा नावाच्या मुलीला त्यांना भेटायची सवलत मुशर्रफनी काढून घेतली!

शेवटी अननुभवी इंजिनियर्सना संरक्षक कपडे चढवून आत पाठविण्यात आले. खानसाहेबांच्या सहय्यकाने त्याना बसमधून उतरताना पाहिले. या नेतृत्वहीन गटाला कामा माहीत नव्हते. त्यातले बरेच दगावले. कहूताला मार्गावर यायला खूप काळ लागला. पण सार्‍या जगाला परमाणूप्रकल्पातील अपघाताची नाचक्की करणारी बातमी जगाला सांगण्याची वेळ मुशर्रफ यांच्यावर आली नाहीं कारण खानसाहेबांनी अतिशुद्धीकृत युरेनियमचा भरपूर साठा बनवून ठेवला होता म्हणून कहूता बंद पडल्याची बातमी दडपता आली.

पुढच्याच मार्चमध्ये बुश-४३ वरकरणी जरी भूकंपग्रस्तांच्या मदतीबद्दल चर्चा करण्यासाठी आणि मूलगामी इस्लामला आवर घालण्यात पाकिस्तानकडूनच्या अपेक्षांबद्दल बोलायला आले असले तरी खरा उद्देश अमेरिकेच्या भारताबरोबरच्या परमाणूकराराबद्दल माहिती देऊन पकिस्तानचा विश्वास पुन्हा संपादण्यासाठीही होता. बुश-४३ यांनी भारत व पाकिस्तान वेगळे देश असून त्यांचे इतिहास आणि त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत असे इस्लामाबादला पोचल्यावर निवेदन केले होते. पण भारताबरोबरचा हा करार मुशर्रफ यांच्याबाबतीत मोठी अनर्थकारक घटना होती. या आधीची तीस वर्षें परमाणूप्रकल्पाकरता साधनसामुग्री विकत घेतल्याबद्दल छळ सहन केलेल्या पाकिस्तानला डावपेच, वाणिज्य आणि लष्करी या तीन्ही बाबतीत फायदेशीर असलेला सौदा आपल्या सीमेपलीकडील कट्टर वैर्‍याला दिल्याचे पहावे लागत होते. मुशर्रफना व त्यांच्या विरोधकांना बुश-४३ नवे मित्रराष्ट्र शोधत असल्यासारखे वाटले.

बुश-४३ यांच्या आगमनाआधी कांहीं दिवस मुशर्रफ यांनी भारताबरोबरच्या व्यवहाराची बरोबरी करण्यासाठी बुश यांच्याकडे काय मागणी करावी खानसाहेबांचा सल्ला विचारला होता. खानसाहेबांनी त्यांना सांगितले कीं ते मुशर्रफना मदत करू शकत होते पण त्यांनी मदत द्यायचे नाकारून त्याऐवजी बुश यांचे बूट चाटायचा सल्ला दिला[१४]. बुश यांची भेट पाकिस्तानच्या पदरात कांहींही न पडता संपली. बदल्याच्या भावनेने मुशर्रफनी खानसाहेबांचे उरलेसुरले समर्थकही कहूतापासून दूर केले. त्यांचे उत्तराधिकारी जाविद मिर्झांना १ एप्रिल २००६ला सेवानिवृत्ती दिली. मोहम्मद करीमना त्यांच्याहून १३ ज्येष्ठ अधिकार्‍यांना डावलून कहूताप्रकल्पाचे प्रमुख नेमण्यात आले, पण करीम एक साधारण कर्तृत्वाचे अधिकारी होते, पण मुशर्रफना जवळचे होते आणि त्यांना त्या कामाची फारशी माहिती नव्हती. खानसाहेबांच्या सेवानिवृत्तीपासून आणित्यांच्या स्थानबद्धतेपासून सुरू झालेली कहूतातील सत्तास्पर्धा शेवटी अशा तर्‍हेने संपली पण प्रकल्प A/B मध्ये अजून धुगधुगी होती.

जानेवारी २००६मध्ये जर्मन, ब्रिटिश, फ्रेंच आणि बेल्जियन या देशांनी आपली गुप्तहेरांकरवी मिळविलेली माहिती एकत्र करून एक मोठा अहवाल IAEAला सादर केला ज्यात अण्वस्त्रांच्या बेकायदा संशोधन आणि खरेदी करण्याबाबत आरोप असलेल्या दर्शनी कंपन्यांच्या नावाच्या याद्या, ठिकठिकाणचे दूतावास, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालयें आणि सेवाभावी संस्थांची तपशीलवार माहिती होती. ते अण्वस्त्रप्रसाराचे प्योंग्यांगपासून बेजिंगपर्यंत, सोफियापासून तेहरान, सीरिया, इजिप्त, सुदान ते इराण-उ.कोरियापर्यंत असे जगभर पसरलेले प्रचंड जाळेच होते! युरोपमधील अभियांत्रिकी कंपन्याना या यादीतील कंपन्यांपासून दूर रहाण्याची ती एक ताकीदच होती. त्यांच्याशी दुहेरी उपयोगाच्या गोष्टी विकायचा व्यवहार केल्यास याबाबतचे अज्ञान आता त्यांना उपयोगी पडणार नव्हते. या अहवालात मुशर्रफ यांच्यासाठी एक वाईट बातमी होती! पाकिस्तान अद्यापही गुप्तपणे परमाणू तंत्रज्ञान विकत घेत होता व विकत होता. खानसाहेबांच्या कबूलीनंतर परमाणू क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर चाललेल्या खरेदीबद्दलच्या नोंदी झाल्या होत्या. त्यानुसार वेगवेगळे साहित्य आणि घटकभाग ज्या प्रमाणावर आयत होत होते ते इस्लामाबादच्या जरूरीपेक्षा खूपच जास्त होते. यावरून त्यांची आयात पुनर्निर्यातीसाठी होती आणि आता तरी ही निर्यात दुष्ट शास्त्रज्ञांच्या नावाने खपविली जाणे शक्य नव्हते!
खानसाहेबांना घालवून दिल्यावर आणि त्यांच्या वारसाला सक्तीची सेवानिवृत्ती दिल्यानंतरसुद्धा कहूता प्रकल्पातून युरोपमधील आखाती देशातील, दक्षिणपूर्व देशातील दर्शनी कंपन्यांद्वारे गिर्‍हाइकाची खोटी नांवे लिहिणे, निर्यातीचे खरेखुरे शेवटचे स्थान न लिहिणे, कस्टम्सच्या कागदात हेराफेरी करणे हे उद्योग चालूच राहिले. लिबियासाठी अल्युमिनियमचे पाइप्स बनविणार्‍या नव्या कंपनीशी व्यवहार चालूच होता. खानसाहेबांना बाजूला केल्यानंतर मुशर्रफ यांच्या मर्जीतले लोक अधिकाराच्या जागांवर होते आणि गद्दाफींनी आपला परमाणूप्रकल्प २००३मध्ये बंद केला होता त्यामुळे नवे गिर्‍हाईक कोण होते हे कुणालाच माहीत नव्हते!

पाकिस्तान-उ.कोरियामधील संबंध चालूच होते. अहवालानुसार शस्त्रास्त्रांची निर्यात हा उ.कोरियाचा कमाईचा मुख्य उद्योग बनला होता आणि इजिप्त, इराण आनी सीरियाबरोबर पाकिस्तान त्यांचे मुख्य गिर्‍हाईक होते. तीसपेक्षा जास्त दर्शनी कंपन्या आणि संघटना शस्त्रास्त्रविक्रीच्या या जाळ्यात होत्या. पण पाकिस्तानने उ.कोरियाला परमाणूसंबंधीच्या पश्चिम युरोपीय खरेदीजाळ्यात माल आणि मशीनरी यांच्या खरेदीसाठी गोवले होते. तिथे स्वस्तात घटकभाग बनत होते आणि पाकिस्तान ते इतर गिर्‍हाइकांना विकत होता.

नव्वदीच्या दशकाच्या शेवटी ताहीर यांनी शहा आलम या मलेशियातील एका मोठ्या शहरात सेंट्रीफ्यूजेसचे घटकभाग बनवायचा कारखान उघडला होता आणि त्यातील गुंतागुंतीचे घटकभाग दक्षिण आफ्रिकेतील आणि युरोपमधील कंपन्यात बनवून घेऊन ते सारे दुबईला आणले जात होते. आता उ.कोरियानेही हाच मार्ग अवलंबला होता व कांहीं भाग चीनमधील सरकारी अभियांत्रिकी कंपन्यात बनवून घेणे सुरू केले. यातील कांहीं कंपन्यांवर डिसेंबर २००५ पासून अमेरिकेने निर्बंधही घातले गेले होते.

चीन-पाकिस्तान-उ.कोरिया हे त्रिकूटही अद्याप अभंगच राहिले होते. या तीन देशांचा युरेनियम अतिशुद्धीकरणाच्या घटकभागांचा, प्रक्षेपणास्त्रांबद्दलच्या तंत्रज्ञानाचा आणि नेहमीची शस्त्रास्त्रे यांचा व्यापार इराण, सौदी अरेबियासारख्या जुन्या गिर्‍हाइकांबरोबर तसेच इजिप्त, सीरियासारख्या नव्या गिर्‍हाइकांबरोबर चालूच होता.

सगळ्यात भीतीदायक शोध होता कीं खानसाहेबांनी जमविलेले लाखों घटकभाग ते सेवानिवृत्त झाल्यापासून गायब झाले होते. १९९८ ते २००१च्या दरम्यान हरवलेल्या घटकभागांचा ३२ कोटी डॉलर्सचा द्व्यर्थी सामुग्रीचा सगळ्यात मोठा हिस्सा लिबियासाठी बनविलेला होता पण सुदानच्या गुदामात ठेवला होता. २००६साली आणखी एका पाकिस्तानी संस्थेने त्याचा सामुग्रीचा ताबा घेतला होता आणि तिला दुसरीकडे पाठविले होते. तो ना सुदानमध्ये होता, ना लिबियात! गुप्तचरसंघटनांनी सुचविले कीं तो कहूतानेच पुन्हा हाताळला होता व आता तो तेहरानमध्ये असावा. याचा अर्थ आता हा व्यापार मुशर्रफ यांच्या देखरेखीखाली सुरू झाला होता.

लिबियाला पाठविलेल्या P-2 जातीच्या सेंट्रीफ्यूजेसच्या नऊ फिरणार्‍या भागांपैकी (rotors) दोनच भाग लिबियात सापडले पण मलेशियातून दुबईला सर्व नऊ आले होते. लिबियामधील नरसंहारक्षम शस्त्रान्वेषकांना शंका होती कीं ते कुणा नव्या गिर्‍हाइकाला पाठविले गेले होते. ताहीर म्हणाले कीं ते नष्ट झाले. पण ते खरे नसावे असेच अन्वेषकांना वाटले.

खानसाहेबांचा काटा काढण्याचा कट बुश-४३ यांच्याबरोबर मुशर्रफ न्यूयॉर्कमध्ये शिजवत असतानाच पाकिस्तानी लष्कराने अण्वस्त्रांसाठी लागणारे भाग विकत घेण्याचा विकत घेण्याचा मुर्दाड प्रयत्न इस्लामाबादस्थित एका कंपनीद्वारा केला होता. खानसाहेबांच्या सेवानिवृत्तीनंतर एक वर्षापेक्षा जास्त वेळ गेल्यावर हा सौदा सुरू झाला होता. त्यात पाकिस्तानच्या लष्कराशी बराच मोठा धंदा करणार्‍या हुमायून खान नावाच्या व्यावसायिकाने दक्षिण आफ्रिकास्थित एका इस्रायली व्यावसायिकाशी सौद्यासाठी संपर्क साधला होता. त्यानुसार केप टाऊन येथील टॉप-केप टेक्नॉलॉजी या अमेरिकेतून इलेक्ट्रॉनिक माल दक्षिण आफ्रिकेत आणणार्‍या कंपनीच्या आशर कामी यांना अमेरिकेत बनविलेले ३६ ऑस्सिलोस्कोप मिळविण्याची १३ लाख डॉलर्सची ऑर्डर मिळाली. एरवी किरकोळ कामासाठी वापरले जाणारे हे ऑस्सिलोस्कोप अण्वस्त्रांच्या चांचणीत त्यांची परिणामकारकता मोजण्यासाठी उपयुक्त होता. हे सामान विकत घेण्याचे पाकिस्तानने आधीही प्रयत्न केले होते व हे सामान नियंत्रित होते. पण दक्षिण आफ्रिका अण्वस्त्रधारी राष्ट्र नसल्यामुळे हे निर्बंध त्या सौद्याला लागू नव्हते आणि त्यामुळे ते भाग अमेरिकेतून काढता येतील अशी आशा होती.

या मालाची वाट पहात असताना २००३च्या वसंत ऋतूत हुमायून खाननी कामी यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि २०० ट्रिगर्ड स्पार्क गॅप्सही मागवले. हे मूत्रपिंडातील खडे नष्ट करण्याकरता वैद्यकीय क्षेत्रात वापरले जातात पण ते अण्वस्त्रांत प्रज्वलक म्हणूनही वापरता येतात. पाकिस्तानने मागविले असते तर त्याला निर्यात परवाना लागला असता म्हणून हुमायूनखाननी कामींना या मालाचे अंतिम मुक्कामाचे ठिकाण जाहीर न करण्याबाबत सांगितले.

१७ जून २००३ला कामींनी हुमायूनना कळविले कीं ज्या फ्रेंच कंपनीकडून हा माल यायचा होता त्यांनी निर्यात परवाना नसल्यामुळे ते सामान देण्यास नकार दिला होता. पण हुमायूननी कामींना कसेही करून ते मिळविण्यास सांगितले. २४ जूनला मुशर्रफ कँप डेव्हिडला बुश-४३ना भेटायला आलेले असताना कामींनी हुमायूनना आपल्या यशाची बातमी कळविली व प्रत्येक नगाला ९५० डॉलर्स पदतील असे सांगितले.

२८ ऑगस्टला कामींच्या गुदामातून दोन ऑस्सिलोस्कोप पाकिस्तानला दुबईमार्गे पाठविण्यासाठी DHLने उचलले. १५ सप्टेंबरला हुमायूननी स्पार्क गॅप्स्ज कधी येतील याबाबत ई-मेलद्वारा चौकशी केली. आठ दिवसांनंतर मुशर्रफना बुश-४३कडून न्यूयॉर्क येथील वॉलडॉर्फ-अ‍ॅस्टोरिया हॉटेलमध्ये खानसाहेबांच्यावरून समोरासमोर निकराच्या चर्चेसाठी बोलावणे आले. दुसर्‍या दिवशी CIAच्या जॉर्ज टेनेट यांच्याबरोबरच्या बैठकीत टेनेटनी मुशर्रफना पाकिस्तान करत असलेल्या अण्वस्त्रांच्या काळ्याबाजाराबद्दल पुराव्यावर पुरावे दिले. पण मुशर्रफनी अजाणतेपणाचे सोंग घेऊन कानावर हात ठेवले. पण या व्यवहारामुळे पाकिस्तान अद्यापही या काळ्या धंद्यात गुरफटल्याचे स्पष्ट झाले. चार दिवसांनंतर ६६ स्पार्क गॅप्स दक्षिण आफ्रिकेत ६ ऑक्टोबरला आले व त्याच दिवशी आर्मिटेज व मुशर्रफ खानसाहेबांचा कसा बकरा बनवायचा याचा कट शिजवत होते. या तारखांवरून पाकिस्तानचा व मुशर्रफचा दुटप्पीपणा व बेडरपणा दिसून येतो.

पण दक्षिण आफ्रिकेतील कामींच्या हितशत्रूने कस्टम्सच्या अधिकार्‍यांना याबद्दल टिप दिली होती आणि त्यानुसार कस्टम्सवाल्यांनी मुशर्रफना कळू नये म्हणून स्पार्क गॅप्सऐवजी दुसरेच निरुपयोगी भाग भरल्याचे नाटक केले. १ जानेवारीला विमानात चढत असताना कामी, त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांना डेन्व्हरच्या विमानतळावर अटक झाली. कामींच्या पत्नीने सांगितले कीं कामींची अशी धारणा होती कीं ते पाकिस्तानला अत्यंत तातडीने हवी असलेली वैद्यकीय उपकरणे पाठवीत आहेत.

सुरुवातीला अमेरिकेचे कस्टम्सचे अधिकारी कामी-हुमायून केसबद्दल जोशात होते पण नंतर हे भाग पाकिस्तानी लष्कराला पाठविले जात नव्हते व नंतर ते अण्वस्त्रांसाठी वापरले जाणार होते हे सर्व तर्कावर आधारित आहे म्हणून आम्हाला सखोल चौकशी करायची आहे असे अमेरिकन सरकारच्या उपउद्योग आणि संरक्षणमंत्र्याने ठासून प्रतिपादन केले.

पण २००५साली केस जेंव्हां न्यायालयात गेली तेंव्हां पुराव्याचा माग हरवला होता. त्यांच्या मार्गात परराष्ट्रमंत्रालयाकडूनच अडथळे आणले जात होते. वाणिज्य मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले कीं एकाएकी अमेरिकन सरकारला दहशतवादाविरुद्धच्या युद्धातल्या भागीदाराला-पाकिस्तानला-दुखावण्याची भीती वाटू लागली होती. रेगनच्या कारकीर्दीत झाले होते त्याचीच पुनरावृत्ती झाली, न्यायाधीशांनीच कामींबद्दलचे सारे पुरावे सीलबंद केले. जणू रेगनच्या काळातली रेकॉर्ड बुश-मुशर्रफ यांच्या काळात पुन्हा वाजत होती.

दहशतवादाविरुद्धच्या युद्धातील भागीदार असलेले बुश-४३ यांचे सरकार किंवा इतरही कुणी आपल्याला जाब विचारू शकणार नाही याची खात्री असल्यामुळे पाकिस्तान बिनधास्तपणे अण्वस्त्रप्रसार करीत होता. कुणीही यात आपल्याला हटकणार नाहीं या विश्वासाने लष्कर आणखीच महत्वाकांक्षी झाले व जुन्या साधनसामुग्रीची डागडुजी करून आता निर्बंध असलेला माल नव्या गिर्‍हाइकांना निर्यात करू लागले होते. ८०-९०च्या दशकांत खानसाहेबांनी युरेनियम अतिशुद्धीकरणाचे आणि अणूबाँब बनवायचे तंत्रज्ञान निर्यातीसाठी तयार ठेवले होते. पण आता कच्चा माल, मशीने आणि घटकभाग असे सगळेच निर्यातीला तयार ठेवले होते.

धातूशास्त्राची पदवी घेतल्यावर खानसाहेबांनी कराचीतील People's Steel Millकडे नोकरीसाठी वारंवार अर्ज केले होते पण दर वेळी त्यांचा अर्ज उद्धटपणे फेटाळण्यात आला होता. पण १९९४साली बेनझीरबाईंनी त्या कंपनीची सूत्रें त्यांच्याच हाती सोपविल्यानंतर त्यांनी ज्यानी त्याना नकार दिला होता त्या सर्वांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यांना या पोलादकारखान्यातून कहूताला लागणारे आणि युरोप-अमेरिकेत निर्यात निर्बंध असलेले मारेजिंग जातीचे खास पोलाद बनविण्यासाठी तिथली साधनसामुग्री सुधारायच्या प्रकल्पाचे प्रमुख बनविण्यात आले होते. CIA आणि ब्रिटिश हेरसंघटना या निर्बंधित पोलादाच्या हालचालींचा उपयोग करून अण्वस्त्रप्रसारावर नजर ठेवत असत आणि खानसाहेबांनी जरी असले पोलाद बनवू शकणार्‍या यंत्रांची आणि कच्च्या मालची आयात केली असली तरी हा प्रकल्प त्यांच्या कारकीर्दीत उत्पादनाच्या टप्प्यापर्यंत पोचला नव्हता.
१९९९साली स्वतःला राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करताच मुशर्रफनी हा पोलादकारखाना ताब्यात घेतला आणि त्याची पुनर्रचना केली. त्या भरपूर भांडवल ओतले आणि तिला एकाद्या युरोपियन पोलाद कारखान्याचे रूप देऊन तिची उत्पादनशक्तीही वाढविली. २००५ साली तेथील नव्या अभ्यासकेंद्राचे उद्घाटन करायच्या वेळी या कारखान्याला भेट देणारे ते पहिले राष्ट्रप्रमुख ठरले. राष्ट्राध्यक्षाचे स्वागत करताना पोलादकारखान्याचे अध्यक्ष ज.अब्दुल कायूम म्हणाले होते कीं मुशर्रफ यांच्या धाडसी, प्रामाणिक आणि द्रष्ट्या नेतृत्वामुळेच पाकिस्तानला तो क्षण दिसला होता. ज.आरिफ मोजून-मापून बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते. ते १९८७साली निवृत्त होईपर्यंत परिणामकारकपणे परमाणूप्रकल्पाचे नेतृत्व करणार्‍या आणि सेवानिवृत्तीनंतरही पाकिस्तानात प्रभावी भूमिका कायम ठेवणार्‍या ज.आरीफना परमाणूप्रकल्प आणि पोलादकारखान्याबद्दलचा आपला हर्ष लपवता आला नाहीं. नव्या पिढीचे आणि नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करून त्यांनी पाश्चात्यांच्या तोडीच्या नव्या प्रयोगशाळा आणि नव्या उद्योगांचे कौतुक केले. पूर्वी high-frequency inverters आणि माराजिंग प्रतीचे पोलाद मिळविण्यासाठी पाकिस्तानला खूप वणवण करावी लागायची पण आता ही उत्पादने देशात बनत असून निर्यातही होत आहेत याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.

मुशर्रफ इन्कार करत असले तरी पाकिस्तान अण्वस्त्रप्रसारात गुंतलाच होता व माहितीच्या आणि अज्ञात गिर्‍हाइकांना ते तंत्रज्ञान विकतच होता. त्याचा अर्थ होता कीं मुशर्रफ यांच्या गुप्त आशिर्वादाने हा व्यवहार चालला होता किंवा त्यांना याबद्दल खरेच माहिती नव्हती आणि परमाणूप्रकल्प त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला होता. FATA[१५]मधील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील त्यांनीच उभी केलेली जिहादींची टोळकीही आता अल कायदात विलीन झाली होती आणि त्यांच्या नियंत्रणाखाली नव्हतीच.

अमेरिकन आणि ब्रिटिश नेते जेंव्हां मुशर्रफ यांचा उल्लेख दहशतवादाविरुद्धच्या युद्धातला महत्वाचा सहकारी असाकरीत तेंव्हां त्याचा खरा अर्थ होता कीं ते त्यांचे या भागातील एकुलते एक मुस्लिम सहकारी होते आणि जोवर त्याना आणखी दुसर्‍या कुठल्या तरी मुस्लिम राष्ट्राचे पाठबळ मिळत नाहीं तोपर्यंत पाकिस्तान असेच दहशतवादाच्या केंद्रस्थानी असलेले आणि एक बोट अण्वस्त्रांच्या सुकाणूवर असलेले कपटी राष्ट्रच रहाणार!
सुन्नींच्या जहालमतवादाची वाढती कमान आणि परमाणू तंत्रज्ञानाची वेगाने होणारी निर्यात यांच्या संयोगाने जगाचा प्रलयंकारी विनाश कधीही होऊ शकेल असे वाटते. १९७९मध्ये पाकिस्तानच्या परमाणू महत्वाकांक्षांकडे काणाडोळा करायचा सल्ला सर्वप्रथम देणार्‍या कार्टर यांच्या भूतपूर्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रेझिन्स्कींनी २००७च्या मार्चमध्ये अशी ताकीत दिली कीं जर बुश सरकारने सध्याच्या इराण व इराकबाबतच्या धोरणात बदल केला नाहीं तर अमेरिकेला वीसेक वर्षें इराण, इराक, अफगाणिस्तान आणि कदाचित् पाकिस्तानबरोबर युद्ध लढावे लागेल आणि त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेचे जागतिक श्रेष्ठत्व संपुष्टात येईल.

पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचा त्या प्रकल्पाच्या मुलतान येथील १९७२ साली झालेल्या जन्मापासून मागोवा घेणारे आणि बुश यांचे नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबाबतचे भूतपूर्व सल्लागार रॉबर्ट गालुच्ची याहीपुढे जाऊन म्हणतात कीं पाकिस्तानचा जगाला सगळ्यात जास्त धोका आहे. जर अमेरिकेवर किंवा युरोपवर अण्वस्त्र हल्ला झाला तर सर्वांचे डोळे पाकिस्तानकडेच वळतील.
---------------------------------------
टिपा:
[१] पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख बेग आणि ISIचे प्रमुख ज.जाविद नासिर यांनी ही प्रक्षेपणास्त्रें अफगाणिस्तानमधील युद्धसमाप्तीनंतर परत मिळवून देण्यात मदत नाकारली होती.
[२] भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांचे मध्य-पूर्व व दक्षिण आशियातील बाबींबद्दलचे अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा समितीवरील एकेकाळचे सल्लागार. यांच्या नावाचा उल्लेख आधीच्या प्रकरणांतसुद्धा आलेला आहे.
[३] याचे उत्तम उदाहरण म्हणजे न्यू यॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'मध्ये बाँब उडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला फैसल शहजाद. एक वर्षापूर्वीच अमेरिकेचे नागरिकत्व पत्करून अमेरिकेशी एकनिष्ठ रहाण्याची शपथ घेतलेल्या शहजादने पाच महिने पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन परत आल्यावर बाँबहल्ला करायची असफल योजना कार्यान्वित केली.
[४] LeT म्हणजे लष्कर-ए-तोयबा व JeM म्हणजे जैश-ए-मुहम्मद. या दोन्ही संघटनांवर वरकरणी बंदी असली तरी त्या नव्या नावांनी कार्यरत आहेत.
[५] हेकमतयार यांच्याबद्दल अधीक माहिती वाचा http://en.wikipedia.org/wiki/Gulbuddin_Hekmatyar आणि http://news.bbc.co.uk/2/hi/middle_east/2701547.stm या दुव्यांवर. अल-झरकावी व अल-मकदीसी यांची माहिती १९व्या प्रकरणात आलेली आहे. अल झरकावी पुढे इराकमधील अल-कायदाचे प्रमुख होते व एका अमेरिकन हल्ल्यात ते मारले गेले.
[६] नकाशा पहा.
[७] International Crisis Group
[८] यांना २०१०साली तालीबान्यांनी ठार मारले. http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-47 इथे माझे नवहिंद टाइम्समधील या विषयावरचे पत्र वाचा (त्या पानावर चौथे)!
[९] आजही हे प्रश्न आहेतच!
[१०] १९व्या प्रकरणात यांच्याविषयी विस्तृतपणे माहिती आली आहे.
[११] हलवायाच्या (अमेरिकेच्या) घरावर तुळशीपत्र!
[१२] डिसेंबर ९९ला यांनाच भारत सरकारने हावईचांच्यांनी पळविलेल्या IC184 च्या प्रवाशांच्या सुटकेच्या मोबदल्यात (त्यावेळी) तालीबानच्या ताब्यातील कंदाहारला नेऊन सोडले होते.
[१३] म्हणूनच मी मुशर्रफना सरड्याची उपमा देतो. कधी कुठला रंग धारण करतील ते सांगणे कठीण. पण पंतप्रधान/राष्ट्राध्य्क्ष कांहीसे असेच धूर्त असायला हवेत!
[१४] खरे तर खानसाहेबांनी याहूनही अश्लील सल्ला दिला होता!
[१५] Federally Administrered Tribal Areas

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

8 Aug 2010 - 11:12 pm | जयंत कुलकर्णी

सगळे भयंकर आहे. मला एक शंका आहे हे पुस्तक आपल्या रजकारण्यांनी वाचले असेल का ? नसल्यास त्यांनी ते वाचावे यासाठी काय करावे लागेल ?

आपण ज्या चिकाटीने हे भाषांतर पूर्ण केले आहे ते खरोखरच ग्रेट आहे. आणि एक भारतीय म्हणून मी आपले आभारही मानतो.

माझ्या (कांहींना हास्यास्पद वाटणार्‍या) संवयीनुसार मी "हे पुस्तक प्रत्येक संरक्षणमंत्र्याने, परराष्ट्रमंत्र्याने, प्रत्येक IFS/IAS अधिकार्‍याने व प्रत्येक पंतप्रधानाने curriculum म्हणून वाचलेच पाहिजे अशी सक्ती करावी" अशा अर्थाचे पत्र पंतप्रधानांना पाठविले आहे.
ओबामा व हिलरी क्लिंटन यांनाही अशीच पत्रे लिहिली आहेत व पूर्वीच्या administrationsनी केलेल्या चुका तुम्ही तरी करू नका असे आग्रहपूर्वक लिहिले आहे. (त्या दोघांनी वाचणे भारताच्या जास्त हिताचे आहे.)
अर्थातच तिघांचेही उत्तर आलेले नाहीं. (मगर हम छोडेगा नहीं जी!)
जकार्ता राजदूतावासातील बर्‍याच अधिकार्‍यांना ज्यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखतो त्यांनाही सांगितले आहे आणि "जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर"च्या प्रमुखांना (ज्यांनाही मी वैयक्तिकरीत्या ओळखतो) या पुस्तकाची प्रत केंद्राच्या समृद्ध असलेल्या पुस्तकालयासाठी घ्यायची शिफारसही केली आहे. त्यातल्या कांहींना मी असे भाषांतर करत असून हे पुस्तक वाचण्याची गरज आहे हे पटलेही आहे. पण राजदूतावासात या पुस्तकाची प्रत सध्या तरी उपलब्ध नाहीं.
बघू येते का ती इथे आणि कधी!

अर्धवटराव's picture

10 Aug 2010 - 7:27 am | अर्धवटराव

काळे काका,
तुम्ही केव्हढ्या मेहनतिने हे काम तडीस नेले. ही ठिणगी हस्ते परहस्ते अनेकांच्या हाती जाईल. आणि कोणि अज्ञात व्यक्ती या माहितीचा उपयोग करुन निर्णायक क्षणी एक असा निर्णय घेईल जो अनेकांचे प्राण वाचवेल. नियतीने दिलेले कर्तव्य तुम्ही ज्या विवेकबुद्धीने पार पाडले, त्याला तोड नाहि.
सलाम !

(विनम्र) अर्धवटराव