१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ?

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
10 Mar 2021 - 1:00 pm

चेन्नईच्या मरीना बीचला भटकणं एक विलक्षण अनुभव असतो. चेन्नईला कामानिमित्त राहायला असताना बऱ्याचदा या बीचवर जाणं झालं. चेन्नईकर व पर्यटक यांच्या गर्दीने बीच कायमचा गजबजलेला असतो. १०-१२ किमीची लांबलचक पुळण प्रचंड गर्दीला सामावून घेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स, छोट्या मोठ्या जत्रा, पर्यटकांचे जत्थे, खेळणारी मुले यामुळे इथलं दृश्य रमणीय असतं. इथं येऊन नुसतं इकडं-तिकडं बघत बसण्यातही भन्नाट टाईमपास होतो.

चेन्नई मरीना बीच:

Caldwell_107234

या बीचचं आणखी एक वैशिष्ठय आहे ते म्हणजे बीच परिसरात असलेली स्मारकं आणि पुतळे ! असंच भटकत असताना पुतळा दृष्टीस पडला, रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल यांचा ! तामिळनाडू राज्य शासनाने त्यांच्या सन्मानार्थ इथं स्मारक उभे केले असून त्यात काल्डवेल यांचा पुतळा "तामिळ भाषेच्या अभ्यासातील" योगदानासाठी उभारण्यात आला.

चेन्नई मरीना बीचवरील रॉबर्ट काल्डवेल पुतळा आणि त्यावरील कोनशिला:

Caldwell_101124

Caldwell_107456

मी चेन्नईला असताना तामिळ / दक्षिणी लोकांचा हिंदीला का विरोध असतो हे जिज्ञासे पोटी काही वाचन सुरू केले होते. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल मूळचे आयर्लंडचे, मग भारतात येऊन तामिळ भाषेचा कसा काय अभ्यास केला हा प्रश्न पडला. त्याच दरम्यान ऑफिस मधील एका सहकाऱ्याशी आणि काल्डवेल यांचा पुतळा आणि तमिळ भाषेविषयी चर्चा करत असताना त्याने रॉबर्ट काल्डवेल यांच्या संबंधी एक इंग्रजीमधील तीस पानी पुस्तिका वाचायला दिली. ती वाचल्यावर मागील दोन दशकातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत बरीच माहिती मिळाली. औत्सुक्याने काल्डवेल यांच्या विषयी माहिती वाचत असताना त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडत गेले.

त्यांचा ध्यासपूर्ण प्रवास प्रभावित करत गेला ! १९ व्या शतकातील काल्डवेल यांचा कालखंड आणि २० व्या शतकात रुजलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळी यांच्याबद्दल वाचन करताना काल्डवेल हे तमिळ अस्मितेचे उद्गाते असे काही ठिकाणी नमूद केल्याचे लक्षात येते. असे व्यक्तिमत्व तुमच्यापर्यंत आणावे असे वाटले नसते तर नवलच !

काल्डवेल यांचा जन्म आणि शिक्षण:

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतभर ब्रिटिशांचे राज्य स्थिरस्थावर होऊ लागल्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांचे भारतात आगमन सुरु झाले, त्यापैकीच एक रॉबर्ट काल्डवेल.

रॉबर्ट काल्डवेलचा जन्म १८१४ साली आयर्लंडमध्ये अँट्रिम इथं झाला. त्याचे आईवडील स्कॉटलंडचे. त्याचे आईवडील तो १० वर्षाचा असताना स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं परतले. त्याला नावाजलेल्या अश्या ग्लासगो युनिव्हर्सिटीच्या परिसरात विविध विषय शिकायची संधी मिळाली. इथंच त्याला पुस्तकं वाचण्याचा छंद जडला. तो १५ वर्षाचा झाला अन घरच्यांनी त्याला मोठ्या भावाकडे म्हणजे डब्लिन इथं कलामहाविद्यालयात शिकायला पाठवलं. ३-४ वर्षात त्याने पेंटिंगचा कोर्स पूर्ण केला पण पेंटिंगमध्ये त्याचं मन काही रमलं नाही. ग्लासगोला परतल्यानंतर पुन्हा वाचन सुरु केलं. ग्लासगो युनिव्हर्सिटीतल्या धर्मगुरूंच्या शिकवणीकडे आकर्षित होऊन अध्यात्मिक पुस्तकांत देखील प्रचंड रमायला लागला, इतका की त्यानं आपलं जीवन ईश्वराच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या चरणी अर्पण करायचं ठरवलं ! यातूनच तो लंडन मिशन सोसायटी (L.M.S) चा सभासद झाला.

काल्डवेल यांची जन्मभुमी आणि शिक्षणक्षेत्र:

मिशन सोसायटी (L.M.S) च्या त्याला ग्लासगो येथे धार्मिक उच्च शिक्षण तसेच इतर शिक्षणासाठी लंडनच्या उत्तरेस बेडफोर्डशायर प्रांतात मधील टर्वे इथं पाठवलं. ग्लासगो इथं लॅटिन आणि हिब्रू भाषेचा अभ्यास त्याने मन लावून केला. हा अभ्यास त्याला जड गेला, पण बरेच प्रयत्न करून त्यात उत्तम प्रगती केली. भाषा अभ्यासात रुची निर्माण झाल्याने ग्रीक, आयरिश, स्कॉटिश इ भाषा देखील शिकायला सुरुवात केली. त्याशिवाय तर्कशास्त्र, तत्वज्ञान, गृह विज्ञान आणि ग्रीक भाषा यात त्याने एवढी चमक दाखवली की पदवीधरांच्या यादीत अव्वल स्थान मिळवत त्याने रॉबर्ट पिल्स हे मनाचे समजले जाणारे पारितोषिक पटकावले !

ग्लासगो युनिव्हर्सिटीतच ग्रीक भाषेचे प्रोफेसर डॅनियल सँडफोर्ड यांच्या व्याखानांनी आणि व्यासंगाने प्रचंड प्रभावित होऊन भाषारचनाशास्त्रात (फिलॉलॉजी) झोकून द्यायचं ठरवलं. इतकंच नाहीतर भाषारचनाशास्त्रातले स्थानिक बोलीभाषा, तिची इतर रूपे, इतिहास, वेळोवेळी होत जाणारे बदल लिखित भाषा, त्यांचे व्याकरण, इतर भाषांशी तुलनात्मक अभ्यास इ. सखोल व्यासंग करून सर्वांना उपयोगी पडेल असं पुस्तक लिहिण्याचं पक्कं ठरवून टाकलं ! एकोणिसाव्या शतकात भाषा आणि साहित्याचा अभ्यास याला अतिशय महत्व होते. भाषेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल अभ्यास केला जात असे. विशीतल्या झपाटलेल्या काल्डवेलने निकराने अभ्यास करून स्वतःला सिद्ध केले !

युवावस्थेतील काल्डवेल:

Caldwell_12307

१८३७ मध्ये त्याने ग्लासगो विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. लंडनच्या मिशन सोसायटीने त्याचे पूर्ण पालकत्व स्वीकारले होते. सोसायटीने त्याची पाद्री म्हणून नेमणूक करून त्याला त्याच वर्षी भारतात मद्रासला जाण्याचे निर्देश दिले. निघताना त्याला खूप जड गेलं. कारण त्याची आई आजारी असल्यामुळे अंथरुणाला खिळलेली होती ! ठरलेल्या दिवशी आईच्या पलंगाजवळ येऊन निरोप घेण्यासाठी गुडघे टेकले, अश्रुपूर्ण डोळ्यांनी तिने त्याला मिठी मारली, गालावर चुंबन घेतले आणि म्हणाली,
" मी मनापासून तुला प्रभू येशूच्या महान कार्यासाठी सुपूर्द करत आहे. भारतात पोहचून तू येशूच्या धर्माला विजय प्राप्त करून देशील यात शंका नाही ! " ह्या निरोपानंतर रॉबर्ट काल्डवेलला उर्वरित आयुष्यात आपल्या परिवाराला पुन्हा भेटण्याचे योग कधीच आले नाहीत !

२३ वर्षांच्या युवा काल्डवेलची नोव्हेंबर १८३७ मध्ये मेरी अ‍ॅन नावाच्या जहाजातून मद्रासच्या दिशेने आव्हानात्मक प्रवासमोहीम सुरु झाली. वादळ, पाऊस, कडक ऊन, दमट हवामान यांच्याशी सामना करत "केप ऑफ गुड होप" ला वळसा घालत मद्रासकडे कूच चालू राहिली. एकदा दुसऱ्या जहाजाशी धडक झाल्यामुळे जहाजाचे इतके नुकसान झाले की जहाज बंदरात येऊन काही दिवस थांबून त्याची पूर्ण दुरुस्ती करावी लागली. दिशा चुकणे, वाऱ्यांची विपरीत दिशा, जहाजातील बिघाड, जहाजाला छिद्रं पडून जहाज बुडण्याची शक्यता निर्माण होणे या सारख्या महासंकटाशी देखील सामना करावा लागला.

मद्रासच्या दिशेने सागरी प्रवास:

Caldwell_345107

या प्रवासादरम्यान त्याची चार्ल्स फिलिप ब्राउनशी मैत्री झाली. मद्रास सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम असणारा हा अधिकारी भाषांमध्ये पारंगत होता. त्याला तेलगू आणि संस्कृत चांगल्या अवगत होत्या. त्याच्या कडून काल्डवेलने या भाषांचे ज्ञान आणि भारताबद्दल इतर विविध गोष्टी जाणून घेतल्या. याचा त्याला पुढील आयुष्यात पदोपदी उपयोग झाला. मजल दर मजल करत जहाज १८३८ च्या मार्च मध्ये म्हणजे तब्बल चार महिन्यांनी तो मद्रासला येऊन थडकला.

तात्कालीन मद्रास बंदर:

Caldwell_234107

त्यावेळी मद्रासमध्ये बरेच ब्रिटिश मिशनरी आणि सिव्हिल सर्व्हंट्स स्थानिक भाषा अर्थात तामिळ भाषा शिकण्यासाठी दाखल झाले होते. तामिळ आणि इतर स्थानिक भाषा शिकवण्यासाठीच फोर्ट सेंट जॉर्ज हे कॉलेज काही वर्षांपूर्वी स्थापन केले गेले होते. शब्दकोश, भाषांतरे या कामासाठी आणि भाषा अभ्यासकांसाठी शिष्यवृत्ती व आर्थिक पाठबळ दिले जात होते. हे कॉलेज तामिळ, तेलगू या भाषांमध्ये दिगग्ज असणाऱ्या ब्रिटिश स्थापन करून विविध उपक्रम सुरु केले होते. तरीही तामिळ व्याकरणाचे एकच इंग्लिश भाषेतील छोटेखानी पुस्तक प्रकशित झाले होते. त्यामुळे तमिळ भाषा आणि व्याकरण शिकण्यासाठी संदर्भा-पुस्तकांची वानवाच होती. तशाही परिस्थितीत भाषा अभ्यासासाठी प्रचंड धडपड केली.

मध्यंतरी काल्डवेलने ३ वर्षे प्रचंड वाचन, लेखन आदि व्यासंग करून भाषा अभ्यासात मोठी भरारी घेतली. यात त्याला तमिळ विद्वान, प्रतिष्ठित शिक्षणतज्ञ, मिशनरी आणि सिव्हिल सर्व्हंट्स यांची खुप मदत झाली. अश्या लोकांशी लोभस मैत्री करून त्याच्याकडून ज्ञान घेणे ही कला त्याला चांगलीच अवगत झाली होती ! याच दरम्यान त्याची रेव्ह. बोवर (ज्यांनी प्राचीन तामिळ संतकवी थिरुवल्लावूर मद्रासयांच्या थिरुक्कुरल (आव्या / अभंग) चा इंग्लिशमध्ये अनुवाद केला होता) आणि मि. क्लार्कशी (मदुरैचे उपजिल्हाधिकारी होते) यांच्याशी भेट झाली. (मि. क्लार्क खुप वर्षे कोडईकनल इथं, तिथली सुरुवातीची घरे देखील त्याच्या मार्गदर्शनाखाली बांधली गेली होती. काल्डवेल यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ७ महिने यापैकी एका घरात काढले) हे दोघेही तामिळ भाषेत पारंगत होते, याचीही त्याला खूप मदत झाली.

इ..स.पू ३०० ते ५०० दरम्यान रचले गेलेले तमिळ थिरुक्कुरल्ल (आव्या / अभंग):

Caldwell_543107

-----------------------------------------------------------------------------------
क्रमश:

भाषालेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

10 Mar 2021 - 2:09 pm | कुमार१

छान लेखमाला

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2021 - 5:17 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, कुमार१ !

गोरगावलेकर's picture

10 Mar 2021 - 2:20 pm | गोरगावलेकर

माहिती आवडली. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

थोडे अवांतर : थिरुक्कुरल्ल चे कवी थिरुवल्लुवर यांचा पुतळा कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ आहे. थिरुक्कुरल ग्रंथाचे तीन भाग असून एकूण १३३ अध्याय आहेत. याचेच प्रतीक म्हणून स्मारकाची उंची १३३ फूट इतकी आहे.

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2021 - 12:54 pm | चौथा कोनाडा

व्वा, दोन्ही प्रचि खुप सुंदर !

एकूण १३३ अध्याय आहेत. याचेच प्रतीक म्हणून स्मारकाची उंची १३३ फूट इतकी आहे.

हे माहित नव्हते.
धन्यू.

सुबोध खरे's picture

11 Mar 2021 - 8:03 pm | सुबोध खरे

भारत देशाच्या सर्वात दक्षिणेच्या बेटावर असलेले विवेकानंद स्मारक हे आर्यांचे प्रतीक आहे आणि आपला( द्राविड लोकांचा) पुतळा त्यापेक्षा जास्त उंच असला पाहिजे या इर्षेतून हा पुतळा त्यापेक्षा उंच बांधला गेला आहे.

श्री एकनाथजी रानडे यांच्या विवेकानंद स्मारकाबद्दल केलेल्या कामाची कुठेही प्रसिद्धी तेथे आढळत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Vivekananda_Rock_Memorial

विवेकानंद स्मारक हे १९७० साली पूर्ण झाले तेंव्हा श्री करुणानिधी हे प्रथम तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते आणि ते स्मारक त्यांना खुपत होत म्हणून १९७५ साली त्यांनी श्री तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचा घाट घातला

श्री करुणानिधी यांचा टोकाचा आर्य द्वेष प्रसिद्ध आहेच (हे ख्रिश्चन होते आणि त्यामुळे त्यांना विवेकानंद स्मारक डोळ्यात सलत होते) त्यामुळे जेंव्हा जेंव्हा सत्तेत आले तेंव्हा त्यांनी हा प्रकल्प पुढे नेण्याचा चंग बांधला होता.

बाकी श्री तिरुवल्लुवर हे तामीळमधील महाकवी आपल्या संत तुकारामांसारखे प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे असे स्मारक होणे हा त्यांचा उचित गौरव आहे यात शंका नाही.

परंतु या मागे एक द्वेष मूलक पार्श्वभूमी सुद्धा आहे

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2021 - 11:15 pm | श्रीगुरुजी

बरोबर आहे. विवेकानंद हे तामिळींच्या दृष्टीने उत्तर भारतीय. अशा उत्तर भारतीयाच्या पुतळ्याला द्रविडींचा विरोध होता. त्यामुळे अट्टाहासाने विवेकानंद स्मारकाशेजारच्या खडकावर तामिळ कवीचा पुतळा उभारला.

दोन्ही स्मारका़ना भेट देण्यासाठी स्वतंत्र नावेची व्यवस्था आहे ज्यातून एका वेळी १५०-२०० पर्यटक जाऊ शकतात. विवेकानंद स्मारकाच्या भेटीसाठी दिवसातून १५-२० नावा जातात, तर शेजारच्या तामिळ कवीच्या स्मारकभेटीसाठी फार तर १-२ नावा जातात.

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2021 - 12:48 pm | चौथा कोनाडा

खरंय. ईर्षा म्हणून तिरुवल्लुवर यांच्या पुतळा आणखी उंच उभा केला. आताच सहज म्हणून टीटीडीसीची साईट पाहिली तिथे विवेकानंद रॉक असा नाममात्र उल्लेख केला आहे आणि फोटोही टाळला आहे.

तमिळ राजकारण हे उत्तरेकडील लोक आणि हिंदी भाषाद्वेष यावरच उभा राहिलेले आहे (हा कसा वाढवला गेला हे लेखमालिकेत पुढे येईलच) .
ते लोक योग्यवेळी आणि वेळोवेळी या कार्डाचा उपयोग करतात.

@श्रीगुरुजी,
स्वामी विवेकानंद हे जागतिक पातळीवरचे अलीकडील अध्यात्मिक गुरु होते. संपुर्ण भारतभरात आणि जगात देखील त्यांच्या तत्वज्ञानाचे अनुयायी पसरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर तमिळ भाषा / लिपी हे समजत नसल्यामुळे कदाचित कवि स्मारकाला कमी पर्यटक भेट देत असावेत.

उपयोजक's picture

14 Mar 2021 - 7:47 pm | उपयोजक

ख्रिश्चन नव्हते. ते निरीश्वरवादी होते. त्यांचा पक्ष हा ब्राह्मणद्वेष्टा होता. स्वामी विवेकानंद संन्यासी असले तरी ब्राह्मण होते म्हणून हा द्वेष होता. करुणानिधी हे चिन्ना मेलम समाजाचे होते. हा समाज मुळचा तेलुगू भाषिक. तो प्रवास करत करत तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात स्थिरावला. कालांतराने इथे तेलुगू भाषिक नायक राजांचे राज्य आले. हे नायक राजे कट्टर वैष्णव होते. त्यामुळे ते येताना तेलुगूभाषिक वैष्णव ब्राह्मणांना सोबत घेऊन आले. यामुळे करुणानिधींच्या समाजाला फारसे महत्व मिळेना त्या रागातून हा ब्राह्मणद्वेष सुरु झाला.

छान लेख आणि छायाचित्रांची जोड मिळाल्यामुळे अजुनच सुंदर झालाय.
वेगवेगळ्या भाषांवर सहजी प्रभुत्व मिळवणार्‍या माणसांचा नेहमीच हेवा वाटतो.

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2021 - 5:20 pm | चौथा कोनाडा

वेगवेगळ्या भाषांवर सहजी प्रभुत्व मिळवणार्‍या माणसांचा नेहमीच हेवा वाटतो.

हो ना. विविध भाषांवर प्रभुत्व मिळवणे हे वेगळेच टॅलेण्ट आहे. आणि हा माणूस सातासमुद्रापार येऊन भारतीय भाषांचा अभ्यास करून पुस्तक लिहितो, केवढं ग्रेट !
धन्यवाद, सौंदाळा.

मुक्त विहारि's picture

10 Mar 2021 - 6:19 pm | मुक्त विहारि

वाचत आहे

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2021 - 5:24 pm | चौथा कोनाडा

👍

अर्धवटराव's picture

10 Mar 2021 - 9:26 pm | अर्धवटराव

बाकी काहि म्हणा, पण साहेब व्यासंगी होता खरा. त्याशिवाय का जगावर राज्य केले साहेबाने.

लेखमालेची सुरुवात छान झाली आहे. पु.भा.प्र.

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2021 - 1:17 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, अर्धवटराव !
🙏

कानडाऊ योगेशु's picture

10 Mar 2021 - 10:44 pm | कानडाऊ योगेशु

चैनेमध्ये पहिल्यांदी यु.एस च्या विसा ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा विसाच्या मुलाखतीच्या वेळी माझ्या पुढे एक तमिळ वृध्द जोडपे होते व एकुण देहबोलीवरुन तोडके मोडके इंग्लिशच येत असावे असे वाटत होते. मला कुतुहल होते कि ह्यांची मुलाखत कशी होईल. आणि पुढे जे झाले त्याने मी आश्चर्यचकित झालो. काऊंटर वर असलेल्या गोर्याने त्यांच्याशी चक्क अस्खलित तमिळमध्ये संवाद साधला. आजी आजोबाही ही जाम खूश झाले होते.

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा

काऊंटर वर असलेल्या गोर्याने त्यांच्याशी चक्क अस्खलित तमिळमध्ये संवाद साधला.
मानायला पाहिजे. काही लोकांचं दुसर्‍या भाषेवर प्रचंड प्रभुत्व असतं !

धन्यवाद, कायो !

कर्नलतपस्वी's picture

11 Mar 2021 - 3:13 am | कर्नलतपस्वी

मीना समुद्र किनारी जवळच एका नातेवाईक रहातात बरेच वेळा बघीतला,
लेख सुंदर आहे सामान्य ज्ञानात भर पडली. धन्यवाद

प्रचेतस's picture

11 Mar 2021 - 9:48 am | प्रचेतस

खूपच सुरेख लिहिलंय तुम्ही. काल्डवेलबद्द्ल काहीही माहिती नव्हती.

चेन्नईच्या इतर आठवणीही तपशीलवार येऊ द्यात.

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2021 - 9:02 pm | चौथा कोनाडा

😊

धन्यवाद, प्रचेतस !

बापूसाहेब's picture

11 Mar 2021 - 8:09 pm | बापूसाहेब

मस्त लेख.. आवडला.
नवीन काहीतरी वाचायला मिळतेय..

पुभाप्र

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2021 - 5:46 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद बापूसाहेब !

बबन ताम्बे's picture

12 Mar 2021 - 1:49 pm | बबन ताम्बे

खूप माहीतीपूर्ण लेख. १८३७ साली साता समुद्रापलीकडून प्रवासात वादळ वार्‍याला तोंड देऊन आलेल्या साहेबाने भारतात येऊन भाषा शिकली आणि पुढेही योगदान दिले हे आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे. पाश्चिमात्य खरेच जिद्दी.
जोडीला आपण दिलेल्या छायाचित्रांमुळे लेखाची खुमारी अजून वाढली आहे.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

गामा पैलवान's picture

12 Mar 2021 - 2:18 pm | गामा पैलवान

बबन ताम्बे,

असाच एक जिद्दी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. कान्होजी आंगरे त्याचं नाव. त्याने काढलेल्या नाविक मोहिमांमुळे अंदमान व निकोबार ही बेटं भारताच्या ताब्यात आहेत. अन्यथा इंडोनेशियाच्या खूप जवळ असल्याने तो देश त्यांच्यावर हक्क सांगंत होता.

आ.न.,
-गा.पै.

सौंदाळा's picture

12 Mar 2021 - 3:23 pm | सौंदाळा

हे माहिती नव्हते. रोचक आहे.
यावर अजुन वाचायला आवडेल, आधीच लिहिले असेल तर कृपया लिंक पाठवा.

गामा पैलवान's picture

12 Mar 2021 - 6:27 pm | गामा पैलवान

सौंदाळा,

माझी माहिती ऐकीव आहे. स्पष्ट करायला हवं होतं. राहून गेलं म्हणून क्षमस्व.

आ.न.,
-गा.पै.

अनन्त अवधुत's picture

13 Mar 2021 - 2:14 am | अनन्त अवधुत

मला पण ह्या इंडोनेशियाच्या दावेदारीची माहिती नव्हती. थोडी शोधाशोध केल्यावर क्वोरावर हे दोन दुवे मिळाले:
इंडोनेशियाची दावेदारी
अधिक माहिती

चौथा कोनाडा's picture

13 Mar 2021 - 6:06 pm | चौथा कोनाडा

भारी माहिती आहे, अनन्त अवधुत ! ही माहिती प्रथमच वाचण्यात आली.
लिंक बद्दल धन्यवाद !

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2021 - 11:44 pm | श्रीगुरुजी

पहिल्या लिंकमध्ये खालील वाक्य आहे.

Later during 17th century The Marathas used these Islands as their naval base.

कल्पनाशक्ती कितीही ताणली तरी शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रापासून किमान २००० किमी लांब समुद्रात असलेली अंदमान-निकोबार बेटे मराठ्यांचा नौदल तळ होता यावर विश्वास बसत नाही.

अनन्त अवधुत's picture

15 Mar 2021 - 1:44 am | अनन्त अवधुत

थोडी शोधाशोध केल्यावर

सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी सर्वप्रथम ह्या बेटांचा वापर नाविक तळ म्हणुन केला

ही माहिती टुरिस्ट गाईड टू अंदमान अँड निकोबार आयलंडस् ह्या पुस्तकात मिळाली.

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2021 - 11:07 am | श्रीगुरुजी

काही शंका.

महाराष्ट्रातून अंदमानला जाण्यासाठी समुद्रमार्गे साधारणपणे अलिबागपासून कन्याकुमारीला वळसा घालून पोहोचण्यासाठी सुमारे २०००+ किमी अंतर आहे. इतक्या लांंबचा समुद्रप्रवास करण्याइतक्या भक्कम नौका शिवाजी महाराजांच्या काळात होत्या का? त्या काळात इतके भक्कम नौदल होते तर मुरूडजवळील जंजीरा किल्ला महाराजांच्या नोदलाला अनेकदा प्रयत्न करूनही का जिंकता आला नव्हता? सुमारे ३५० वर्षांपूर्वी तेथील सर्व बेटांवर आदिवासी असणार. त्यांनी प्रतिकार केला नसावा का?

अनन्त अवधुत's picture

15 Mar 2021 - 12:41 pm | अनन्त अवधुत

हे थोडे आधीचे मुशाफिर यांचे प्रतिसाद. मुशाफिर येथे असतील तर त्यांनी माहितीत अजून भर घालावी ही विनंती. हा जूना लेख पण जंजिर्‍याबद्दलच आहे. गुरुजी, जंजिर्‍याबद्दलचे तुमचे शंकानिरसन कदाचित ह्या लेखात होईल.

चौथा कोनाडा's picture

15 Mar 2021 - 12:08 pm | चौथा कोनाडा

विशेष माहिती आणि रोचक चर्चा.
........... वाचत आहे.

अनुप ढेरे's picture

15 Mar 2021 - 2:12 pm | अनुप ढेरे

मराठा राज्य केवळ पश्चिम किनार्‍यावर नव्हते. दक्षिण दिग्विजयात पूर्व किनारपट्टीवर मोठा भाग शिवाजीराजांनी जिंकला होता. त्यामुळे देखील अन्दमान निकोबारपर्यन्त जाता आले असेल मेबी. (पूर्व किनार्‍यावर मराठा आरमार होते का हा प्रश्न विचारायला हवा कोणाला तरी?)