युगांतर-आरंभ अंताचा भाग २७

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
11 Aug 2019 - 8:10 pm

दुर्दैव आणि शाप एकाच घराण्याला गिळंकृत करू पाहत होते. एकीकडे कुंती वनवास भोगत होती आणि दुसरीकडे तिचा चुलत भ्राता वासूदेव, कारावास ! माता पित्यांपासून दूर देवकीनंदन कृष्ण गोकुळात वाढत होता आणि त्याचा आत्मबंधु युधिष्ठिर आणि सोबत वायुपुत्र भीम राजमहालापासून दूर वनातल्या कुटीत.
कुंतीने मंत्रशक्तीने इंद्राला पाचारण केले.
काळंभोर ढगांची गर्दी झाली आणि शुभ्र विजेचा झोत येत तेजस्वी रुप समोर आले.
"प्रणाम इंद्रदेव!"
"कुंती, कश्या पुत्राची अपेक्षा आहे तुला?"
"तो....जो मानव म्हणून उत्कृष्ट असेल. तहानलेली धरा आणि रूक्ष झालेल्या वृक्षांना पाहून जसा तुम्हाला पाझर फुटतो तसाच त्याच्याही मनात करुणता आणि मानवतेचा निर्झर अखंड असावा."
"तथास्तू!"
हातातले बाळ नाजूक आणि दिसायला सुंदर होते. साक्षात इंद्राचं रूप! कुंती आणि पंडु बाळाला घेऊन कुटीत आले. माद्री स्वयंपाकात गर्क होती. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून तिने कुंती कडे पाहीले.
कुंतीने स्मित हास्य ठेवत बाळाला तिच्या हातात ठेवले. माद्रीने बाळाला छातीशी धरले. lतिच्या डोळ्यात अश्रू आले.
"माद्री, काय झालं?"
"काही नाही ताईश्री!" तिने बाळं कुंतीच्या हातात ठेवत डोळे पुसले. "खूप गोड आहे तुमचा पुत्र ताईश्री!"
मनाचा मोह चेहऱ्यावर दिसू द्यायचा नाही, असा पक्का निश्चय करून तिने सुती कापडाची घडी उलगडून बाळाभोवती लपेटले.
पंडू काहीवेळ बाळाशी खेळून त्याला झोपवून शेताकडे गेला. कुंती माद्री जवळ येऊन बसली.
"काय झालंय माद्री?"
"कुठे काय? काहीच नाही." चुकून पुन्हा डोळे भरून तर आले नाहीत ना? तिने तपासले.
"अश्रू लपवशील तू. खुशाल लपव. पण कारण नको लपवूस!"
माद्रीला भरून आलं. 'काय कारण सांगू? हे की तुम्हाला तीन पुत्र रत्ने मिळाली आणि मी....? असहाय्य. एकटी. मेघ धुसमुसून बरसत असतानाही कोरडी ठक्क! नाही.... माद्री दुसऱ्यांवर जळणारी, कमकुवत हृदय असणारी नाही. मन घट्ट ठेव, माद्री. तुझ्या भाळी एकटेपणा असेल, तर त्याला ताईश्री तरी काय करणार? त्यांना मिळालेली संताने त्यांच्या चांगल्या कामाचे श्रेय आहे. पुण्य आहे, आशीर्वादांचं संचित आहे. आपल्या दु:खात त्यांना ओढून परिवाराचा आनंद गिरावण्याचा अधिकार नाही तुझा, माद्री. ज्या क्षितिजाची आस लावते आहेस, तो केवळ आभासी छळ आहे.' माद्रीने स्वतःलाच दटावले.
माद्री काही बोलत नाही हे पाहून कुंती विचारात पडली. 'काय झालं असेल? गेले कैक दिवस माद्री शांत शांत असते.... का? तिला आपल्या परिवारात नवीन सदस्य आले म्हणून वाढलेल्या कामाचा त्रास वाटतं असेल का? पण माद्रीला तर व्यस्त राहायला आवडते. युधिष्ठिर आणि भीमचं सारं तर स्वतः करते आनंदाने. मग?'
तिला एकदम लक्षात आले.....
"माद्री, एक संधी आहे अजून."
"कश्याची संधी ताईश्री?"
"पुत्रप्राप्तीची!"
"आजचं पुन्हा करायचा विचार आहे का?"
"नाही. मी नाहीच करणार."
माद्री गडबडली. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
"मग?"
"तू करायचायसं!"
"मी?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यासोबत असंख्य प्रश्नांची लागलेली रांग कुंतीने हेरली.
"हो, तू. चल माझ्या सोबत."
"कुठे?" माद्री गोंधळलेली होती.
कुंतीने तिला नदीकाठी नेले. पाणी ओंजळीत भरत तिने ते माद्रीच्या तळहातावर धरले. डोळे बंद केले. 'हे परमेश्वर..... मला मिळालेल्या वरदानाचा शेवटचा मंत्र आणि मंत्रफळ माद्रीला देत आहे.' पाण्याचा शेवटचा थेंब कुंतीच्या ओंजळीतून खाली पडला. आपण हे नक्की जे केलयं ते सफल झालयं का नाही पाहायला तिने मंत्र आठवून पाहिला. पण तिला एक शब्दही आठवेना. डोळे उघडून तिने माद्री कडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आनंद, कृतज्ञता... सगळे भाव दाटले होते.
माद्रीने कुंतीला घट्ट मिठी मारली.
"ताईश्री.... "
"माद्री, तुझा निस्तेज चेहरा पाहवतं नाही मला."
"मी हे कधीच विसरू शकणार नाही. तुमच्या या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही ही माद्री!"
आनंदाने माद्रीच्या डोळ्यांत उभे राहिलेले अश्रू तिने गाल भिजवून कुंतीच्या खांद्यावर आले. कुंतीने तिला मिठीतून सोडवत तिचा चेहरा निरखला. माद्रीचा आधीच सुंदर ! त्यात आनंदाने चेहऱ्यावर पसरलेली लाली ! स्वर्गलोकीच्या अप्सराही लाजतील इतके तिचे सौंदर्य अप्रतिम भासत होते. तिने कुंतीच्या पायांना स्पर्श केला.
"मला तुझं हे असं हर्षभरित मुखकमल पाहायचं होतं. आता मी निश्चिंत झाले."
दोघींनी कुटीची वाट धरली.
'ताईश्री, आज मला जाणवलं तुम्ही फक्त नात्याने, अधिकाराने नाही, श्रेष्ठत्वाच्या बाबतीतही खूप जेष्ठ आहात. तुमच्या पुण्याची फळे माझ्या पदरात टाकलीत. तुम्ही मला मातृत्व देऊ केलेत. पण जेष्ठत्व.... हे तुमच्याच पुत्रांकडे राहिल. ही माद्री तुमचा आणि तुमच्या पुत्रांच्या सन्मान अबाधित ठेवेल आणि माझे पुत्रही!'

हस्तिनापुरात पांडु आणि कुंतीला पुत्रप्राप्तीची बातमी कळली.
"प्रणाम महाराज!"
"शकुनी."
"होय महाराज."
"बोल."
"महाराज, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. आपली अनुमती असेल तर....."
"विचार."
"महाराज, आपल्या अनुजावर आपला किती विश्वास आहे?"
"म्हणजे?"
"म्हणजे तो नक्की वनात वनवास करायला गेला आहे, हे खरे वाटते तुम्हाला?"
"त्यात असत्य काय असू शकते ? शकुनी, वनात राजपरिवाराचे सदस्य केवळ दोन कारणांसाठी जातात. एक म्हणजे शिकार आणि दुसरे म्हणजे वनप्रस्थासन. आणि वन्यजीवांची शिकार न करण्याची प्रतिज्ञा केली होती त्याने वनात जाण्याआधी." शकुनीला काही बोलण्याचा वेळ न देता धृतराष्ट्र पुढे म्हणाला, "प्रतिज्ञेच्या बाबतीत तो भीष्माचाऱ्यांच्या पदचिंन्हांवर चालतो, शकुनी. काहीही झालं तरी तो प्रतिज्ञा मोडणार नाही."
"वन्यजीवांची शिकार करणार नाही, असं म्हणलेत ते महाराज. माणसांची शिकार करणार नाही असं कुठे म्हणालेत?"
"शकुनी, स्पष्ट बोल."
"महाराज, मी ऐकलंय की पंडुला तिसरा पुत्र झाला आहे. तेही इंद्र देवा कडून!"
"मग ही तर आनंद वार्ता आहे, शकुनी."
"महाराज, तुम्हाला ही आनंद वार्ता वाटते?"
"मला जेष्ठ पुत्र दुर्योधन आणि त्याचे ९९ अनुज असे १०० पुत्र आहे शकुनी. पंडुला झालेल्या तिसऱ्या पुत्रप्राप्तीचा मला त्रास का वाटावा?"
"शत्रू सैन्य जमावतो आहे, महाराज."
"शकुनी...."
"महाराज, जर वनातच राहायचे आहे तर युधिष्ठिराला लहान वयातच भाला चालवण्याचे शिक्षण का देतो आहे तुमचा अनुज?"
धृतराष्ट्राला राग आला.
"गांधारी...."
"महाराज, बोलावलंत?"
"गांधारी, हे पाहिलेस काय होते आहे.... तू कारणीभूत आहेस या सगळ्याला."
"काय झालं महाराज?"
"तू वेळेवर मला पुत्र दिला असतास तर आज ही भिती राहिलीच नसती."
"कसली भिती महाराज?"
"हीच, की पंडू त्याच्या जेष्ठ पुत्राला राजा बनवण्याचा प्रयत्न करेल..... तो तयारी करतोय, गांधारी! माझ्या पुत्रांचा अधिकार काढून घेण्याची. त्याच्या पुत्राला राजगादीवर बसवण्याची. आपल्या पुत्रांना सिंहासनाचा दास बनवण्याची. आणि ह्याला तू आणि केवळ तू जवाबदार आहेस."
गांधारी घाबरून निरुत्तर उभी राहिली. कुंतीच्या पहिल्या पुत्रप्राप्तीची वार्ता ऐकून स्वतःच्या उदरावर पर्यायाने गर्भावरच केलेला आत्मघाव तिला आठवला. तिने असे का केले याचे खरे उत्तर ती स्वतःलाच देऊ शकली नव्हती.
'मी दुसरे काय करु शकणार होते, नाथ..... तुमच्या अपेक्षाभंगाला जवाबदार ठरणार म्हणून स्वतःला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला होता मी! कदाचित कुंतीचा लोभही वाटला असेल.... पण काय मिळाले हाती? भीष्माचार्य आणि व्यासांनी वाचवले म्हणून.... नाहीतर आजही मी निसंतान असते, आर्य. आणि आज तुम्ही मला जवाबदार ठरवता आहात?' मनातल्या मनात ती दुवे:खी होतं राहिली.
"पण महाराज...."
"शकुनी.... एक शब्द बोलू नकोस. निघून जा आत्ताच्या आत्ता!"
आपण पंडुवर चालवू पाहिलेला बाण असा आपल्या भगिनीलाच जखमा करेल असे त्याला चूकूनही वाटले नव्हते. शकुनी आपल्या कक्षात जाऊन आसनावर बसला. खूणगाठ आरक्त करायला त्याने सुरा उचलला. गुडघ्यावरची जखम भरून त्यावर चढू पाहणाऱ्या खपलीला फाडत नसा कापत सुऱ्याने जखम ताजी केली. "आह्....." डोक्यात वेदनांच्या असंख्य कळा गेल्या. डोळ्यांत असहाय्यपणा आणि रागाची मिश्र भावना झळकली.
'पंडुला झालेल्या पहिल्या पुत्राची शिक्षा माझ्या भगिनीने भोगली.... स्वतःच्या एकमेव परिचारिकेला आपल्याच पतीपासून दिवस गेलेत, हे माहित असतानाही त्याच गर्भार परिचारिकेला सतत आसपास पाहण्याची शिक्षा! काय यातना झाल्या असतील माझ्या भगिनीला तिच्या परिचारिकेच्या पुत्राला पाहून! केला कोणी याचा विचार? एक राजाने असा बदला घ्यावा? तोही स्वतःच्या पत्नीचा? ही तीच नारी आहे जिने तिचे सुंदर, मृगाक्ष तुमच्या करता अंधारात लोटून दिले.... अगदी कायमचे! ही तीच भार्या आहे तुमची जिने असह्य वेदना सहन करून, सामान्य काळाहून जास्त स्वतः उदरात तुमच्या १०१ आपत्यांना जगवले. प्रसव वेळेत झाले नाही म्हणून तुम्ही इतका भयंकर दंड देऊन मोकळे झालात? यावर खुद्द महामहीम भीष्मही गप्प राहिले? मानले, की त्यांना राजाज्ञा दिली गेली. पण विदुर? ते तर धर्मात्मा म्हणवतात ना स्वतःला तुम्ही तरी का गप्प राहिलात? चिंता करू नकोस, गांधारी! मी या सर्वांचा बदला घेईन. सर्वांचा! तुझ्या या जखमेच्या वेदनांची धग त्या प्रत्येक अधर्मी आणि अन्यायी माणसाला लागेल. त्या प्रत्येकाचा अंत करेल, ज्यांनी तुझ्या आयुष्याची अशी हालत करून ठेवली.' शकुनीच्या मनात घोळणारी भावना प्रतिशोधाची होती की न्याय मिळवण्याची..... त्याने हा विचार केव्हाच मागे टाकला होता.

©मधुरा

धर्मलेख

प्रतिक्रिया

आत्ता पर्यंतचे सर्व भाग वाचले, छान लिहित आहात.
पुढील लेखनास शुभेच्छा!

मृणालिनी's picture

12 Aug 2019 - 8:03 am | मृणालिनी

धन्यवाद टर्मिनेटरजी :)