डोक्याला शॉट [द्वितीया]

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जनातलं, मनातलं
6 Aug 2019 - 9:18 pm

प्रेरणा: निवेदन आणि उपास (बटाट्याची चाळ)

रताळ्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली!

एच्च. मंगेशराव हे चाळीतले संगीतज्ञ; परंतु त्यांना कुठल्या चिजांचे अंतरे येत नाहीत हे एरवी 'गाणे संपले' एवढेच गाण्यतले कळणाऱ्या राघूनानांना देखील ठाऊक! बाबलीबाईंच्या पाटल्या गहाण पडल्याची गोष्ट गहाणखतावरची शाई वाळण्यापूर्वी सर्वांच्या तोंडी झाली. आणि रतन समेळ (न्यू गजकर्ण फार्मसीच्या समेळकाकांची मुलगी) हिने द्वारकानाथ गुप्त्यांच्या मधूला लिहीलेले प्रेमपत्र मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशीनाथ नाडकर्ण्यांच्या मुलाने गॅलरीत उभे राहून परवचा म्हणतात तसे खाडखाड म्हणून दाखवले!

सगळे बहीर्जीचे वंशज नाना जातींत आणि पोटजातींत जन्मून रताळ्याच्या चाळीत वस्तीला आल्यासारखे आले आहेत. वास्तविक माझ्या लेखन संन्यासाचा निश्र्चय मी मिपावर फक्त 'निवेदन' देण्या खेरीज येरा कोणालाही सांगितला नव्हता. पण निवेदन देऊन पुरे चार तास लोटले नाहीत तो वर्दळ सुरू झाली.

"पंत ... (मला मंडळी उगीचच पंत म्हणतात. वास्तविक 'पंत' वाटावे असे माझ्यात काही नाही. चांगला कारखानदारी फ्याक्टरी सारख्या रुक्ष वातावरणात वावरत असताना, शृंगार काव्य लेख कथा असे अनेक प्रकार हाताळणारा हौशी कवी/लेखक आहे मी. हं,...आता आपल्याला सोज्वळ / शुद्ध वगैरे लिहायला नाही आवडत हे खरे, पण म्हणून काय 'पंत'?)

पंत, हा काय साला म्याडनेस!" अशा थाटात सोकाजी त्रिलोकेकरांनी सुरूवात केली, "तुम्हाला काय वाटतं? साला तुमचा चाहता वाचकवर्ग असे निवेदन वाचून तुमचा लेखन संन्यास सॅंक्शन करेल?"

"पण माझं ऎका--" मी चार तासांच्या लेखन संन्यासानंतर क्षीण होत चाललेल्या माझ्या आवाजात सोकाजीनानांची समजूत घालू लागलो. पण नाही! सोकाजी मला 'सर्मन' देण्याचा चंग बांधून आले होते!

"माय गुड फ्रेंड-- साला निवेदन दिल्यानी काय होतं?... हा तर मुळी वाचकांना कन्व्हीन्स करण्याचा वे च नाय! लिसन -- तुम्हाला पायजे तर ष्टोरी, पोएट्री मी लिहून देतो. माझ्या कझिनचा साला एडीटर हाय. यू वि ल गेट ऍज मच कंटेन्ट यु वॉन्ट --बट साला संन्यास काय?"

"पण माझं ऎका... "

"अरे काय ऎका? तू काय सांगणार? धिस इज हंबग !"

चारपाच तासांच्या लेखन संन्यासाने माझी अशक्तता कणकण वाढत होती आणि इथे सोकाजीनानांना जोर चढत होता.

"साला लिसन... साला सोन्यासारखा संडे हाय... तू चार ओळी लिही बरं, पण तू संन्यास बिन्यास नको घेऊ!"

साधारण दिड तास त्रिलोकेकर बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले. त्यांनी तर 'एकच प्याला' तल्या 'सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ. आम्ही तुम्हांला सांगु नये; पण तुम्ही दारु सोडा!' ह्या चालीवर सुरुवात केली.

"पंत... (इथे कुशाभाऊंनी माझ्या पाठीवरुन हातही फिरवला.) पंत, ऎका माझं. दोन चार पिशाच्च कथा लिहा." (ह्या वाक्याने काही अत्यंत सुतकी संकेत माझ्या मनात डॊकावले!)

"अहो पण--"

पण नाही नि परंतु नाही. पंत... आपण चाळीत इतकी वर्षे राहिलो ते भावाभावांसारखे. आमची ही आताच म्हणाली, की तुम्ही लेखन संन्यास घेताय, जेवत होतो , तसाच उठुन आलो! नाही, पंत--तुम्ही लिहायचं नाही, तर कुणी? पंत, ऎका माझं. तुमचा मिपावरचा लेखन प्रवास आठवा . दहा वर्षे होऊन गेली. साडेतीनशे जिलब्या पाडल्या आहेत ना तुम्ही?" इथल्या 'तुम्ही' वर कुशाभाऊने एक हुंदका देखील काढला. कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबाने आत डोळे पुसले. "ते काही नाही पंत, तुम्ही लिहिलं पाहीजे--- संन्यासानं काय होणार" अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता?"

"जनोबाचा काय संबंध?" माझे हे वाक्य पुरे व्हायच्या आतच नाटकातल्यासारखा "काय संबंध!" एवढेच शब्द उच्चारून कुशाभाउ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उसासा टाकला.

"कळल्या आहेत, कळल्या आहेत मला साऱ्या गोष्टी! कथाबीजाची चोरी ती काय! अरे, जाताना बरोबर थोडीच न्यायची आहे आपल्याला ही चीजवस्तु ? सांर इथंच टाकून जायंच आहे बंर!"--कुशाभाऊ

"कथाबीज?"

"पंत नुकतीच तुम्ही प्रकाशित केलेली एक कथा तुम्ही जनोबाचं कथाबीज ढापून लिहिली आहे असा त्याचा आरोप आहे...! दीड दमडीचं कथाबीज ते काय आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर?"

"चोरी?" मला काही कळेना.

"पंत, तुम्ही नका कष्ट करुन घेऊ. मी जनोबापुढं शंभर कथाबीजे आणून टाकतो. वापर म्हणांव कुठे वापरायची ती, पण पंत, तुम्ही हा संन्यासाचा दुष्ट नाद सोडा... ही शब्दब्र्म्हाची उपेक्षा आहे, पंत...."

"अहो पण--"

"मला काही ऎकायचं नाही नि बोलायचं नाही. मला फक्त एकच पाहायचं आहे ते तुम्हांला भरपूर लिहिताना. पंत... सोडा हा नाद --नाही हो, अंतःकरण पिळवटुन सांगतो मी तुम्हांला. नका, पंत, नका ह्या लेखन संन्यासापोटी आपल्या प्रतिभेचा सत्यानाश करू..."

कुशाभाऊंना आवरणे मुश्किल झाले. शेवटी त्यांच्या गेल्याच आठवड्यात झालेल्या एका नाटकाबद्दल मी बोललो तेव्हा गाडीने रूळ बदलले. पण ते किती,अगदी थोडा वेळ, आणि गाडी पुन्हा मेनलाइनवर आली!

"नका--नका हो पंत, असं करू…

"अहो , काय करतोय मी!"

"कळतंय मला--तिळतीळ तुटतंय माझं आतडं! पण पंत, सोडा हा अविचार!"

आता मात्र मला काय बोलावे ते सुचेना. मी डोळे मिटून स्वस्थ बसलो. नाट्यभैरव कुशाभाऊ सुमारे पाऊण तास माझे अक्षरही ऎकून न घेता बडबडत होता. बाकी कुशाभाऊची ही तारीफ आहे. नाटकातदेखील उत्साहाच्या भरात त्याने स्वतःचे, स्वतःच्या नोकराचे, आणि 'पडद्यात गलबला' ही सगळी भाषणे एकट्याने केली होती.

रंगभूमीच्या दुस-या कोण्त्याही सेवकाला टिकू म्हणून द्यायचे नाही हा त्याचा संकल्प असल्यासारखा तो वागतो. चाळीतले गडी जसे दुस-या गड्याला 'टिकू' देत नाहीत त्यातलाच प्रकार! नाट्यभैरव कुशाभाऊंच्या भीमदेवी भाषणाने सा-या चाळीला माझ्या संन्यासाची वार्ता पोचली! आणि बि-हाडात हळूहळु, पावले न वाजवता, मंडळी गोळा होऊ लागली. मी तोंड उघडले की सर्व जण एकमुखाने "तुम्ही बोलू नका--तुम्हांला त्रास होईल!" अशांसारखे उद्गार काळजीयुक्त स्वरात काढायचे. आचार्य बाबा बर्व्याखेरीज सर्व शेजारी जमले.

तळमजल्यावरचा रद्दीवाला ' शा चापशी' देखील आला!

"असा कोणी लेखन/वाचन संन्यास बन्यास घ्यायला शुरवात केला म्हणजी आमाला तो लय धास्ती वाटते. आमची कच्छमदी ते एक रावळबाप्पा होता-- असाच लेखन संन्यास घेऊन तो मेला... पंत संन्यास नाय घे तू--आमाला धास्ती वाटते!"

"बरोबर आहे --- सगळ्यांनी लेखन/वाचन संन्यास घेतला तर ह्यांच रद्दीचं दुकान चालणार कसं ?" काशीनाथ नाडकर्ण्याच्या कानात जनोबा रेगे कुजबुजले. माझ्या संन्यासाचे एक सोडा, पण जनोबाला कुठल्याच प्रसंगाचे गांभीर्य कळत नाही!

मी स्वस्थ डोळे-मिटून पडलो होतो. बाकी त्याखेरीज मी काहीच करू शकत नव्हतो. मंडळी त-हे त-हेच्या मुद्रा करून माझ्याकडे पाहत होती. लहान मुले खिडक्यांच्या गजांतून आळीपाळीने डोकावत होती.

आत येणारा प्रत्येक जण "पंताना स्वस्थ पडु द्या--" असे सांगत होता, आणि आपण स्वतःच आमच्या खोलीत गर्दी करीत होता. माझ्या पाकीटातले सगळे 'पिवळे हत्ती' चौकशीला आलेल्या मंडळींनी संपवले होते. सुपा-या लांबवल्या होत्या. तबकात फक्त 'देठ, लवंगा, साली' शिल्लक होत्या. मी काहीही बोलायला तोंड उघडले की ",पंत, नका. तुम्ही स्वस्थ पडा!" असा एकमुखाने आवाज उठायचा! तेवढ्याच कुणीतरी माझ्या उशाशी उदबत्तीदेखील आणून लावली!

शेवटी अगदी कळवळून मी ओरडलो, "अहो, असं काही नाही. मी जो हा लेखन संन्यास घेतला आहे..."

"तो सोडा, पंत सोडा, तो सोडा!" नाट्यभैरव कुशाभाऊला नाटकात दुस-याची वाक्ये तोडायची इतकी भंयकर खॊड की
'भाऊबंदकी' त राघोबाचे काम करताना रामशाश्र्याच्या पार्ट्याने 'देहान्त प्रायश्रित्ता'तला 'देहान्त'म्हटल्यावर "प्रायश्रित्तावाचून गत्यंतर नाही!" हे न्यायधीशाचे उरलेले वाक्य आपण राघोबा आहोत हे विसरून त्याने स्वतःच म्हणून टाकले होते!

माझ्या भोवतालची गर्दी ह्ळूहळू वाढत होती. आमचे कुटूंबदेखील वस्तादच.आत जमलेल्या बायकांना काय काय सांगत होते परमेश्र्वर जाणे! स्वयंपाकघरातून बाहेर पडणारी प्रत्येक बाई 'हे या महाभागाचं आता अखेरचंच दर्शन!' असा चेहरा करून माझ्याकडे पाहायची आणि बाहेर पडायची.

एरवी कुठल्याही बाईने माझ्याकडे वर डोळा करून पाहील्याचे मला आठवत नाही. संन्याशांचे निराळे निराळे म्हणतात ते 'तेज' इतक्या लवकर तोंडावर चढत असेल याची मला कल्पनाही नव्हती! ह्या सा-या जमावातून माझी सुटका करायला गजेंद्रमोक्षाच्या वेळी साक्षात श्रीविष्णू धावत आले तसे एच्च. मंगेशराव सोबत तबला आणि आपल्या सुस्वर पत्नी वरदाबाई यांना घेऊन आले. वरदाबाईंच्या हातात तंबोरा होता.

"पंत, येक डिवोशनल सॉंग म्हणायचं इच्छा आहे--" अशी प्रस्तावना करून माझ्या कॉटच्या पायथ्याशी मंगेशरावांनी सपत्नीक तळ ठोकला व वरदाबाईंनी मीराबाईच्या 'तूमबिन मोरी' त तोंड घातले.

वरदाबाई 'गोवरधन गिरीधारी' पर्यंत पोचल्याही नसतील. इतक्यात सोटाछाप मलमातल्या जाहीरातीत जसे 'उंदरास पाहून मांजर' न्यायाने रोग पळतात तसे आमचे सारे शेजारी पळाले! खोलीत फक्त मी आणि हट्टंगडी कुटूंबाचे संगीत एवढेच शिल्लक राहीलो.

वरदाबाईंच्या स्वरातले आणि त्याहूनही एच्च. मंगेशकरावांच्या तबल्यातले सामर्थ्य त्या वेळी मला खऱ्या अर्थाने प्रतीत झाले! 'खडी सभामें द्रौपधी ठाडी- राखो लाज (वरदाबाई 'राकौ लाज्ज' म्हणत होत्या) अमारी' म्हणताना वरदाबाई असा एकेक सूर लावीत होत्या आणि मंगेशराव तबल्यावर अशा काही करामती करीत होते, की एखाद्या वेळी तो गोवर्धनगिरिधारी माझ्या संन्यासाची 'खबर' घ्यायला ख्ररोखरीच येईल की काय अशी धास्ती मला वाटायला लागली! माझ्या पोटात विलक्षण कालवाकालव सुरू झाली. हट्टंगडी दंपतीचे संगीत केव्हा संपले कोण जाणे, मी जागा झालो त्या वेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते.

पहिल्या दिवसाच्या लेखन संन्यासात मी फक्त एक शृंगार काव्य, एक आलिंगने / चुंबनांचा वर्षाव असलेली शृंगार कथा, जाणते राजे श्री. परचंद्र शवार यांच्यावर एक राजकीय लेख, वासनांध शिक्षकाला पंचवीस वर्षांनी त्याच्या कुकर्मांबद्द्ल धडा शिकवणाऱ्या विद्यार्थिनींची एक सूडकथा आणि लौकिक-पारलौकिक शक्तींवर आधारित एक भयनाट्य, एवढ्याच धाग्यांचे संपूर्ण कथानक मनातल्या मनात गुंफले, परंतु टंकून मिपावर प्रकाशित नाही केले.

दुस-या दिवशी सकाळी उठल्याबरोबर चाळीतले एकमेव साहित्यिक म्हाळसाकांत पोंबुर्पेकर यांनी 'चाळकरी' ह्या चाळीतल्या हस्तलिखित मुखपत्राचा अंक आणून, एखाद्या राज्याच्या सनदा अर्पण कराव्या अश्या नम्रतेने माझ्या हातात दिला.

"पंत, लेखन संन्यास-विशेषांक आहे." पोंबुर्पेकर म्हणाला.

वास्तवीक 'चाळकरी' दैनिकाचा साधा अंक अजून निघालाच नाही. प्रत्येक अंक हा विशेषांकच असतो. आज लेखन संन्यास-विशेषांक, कालचा स्वच्छता-विशेषांक, त्यापुर्वी चाळ पुनर्रचना समीति-विशेषांक (गच्ची पुरवणी सकट), एकदा भय्या-विशेषांक, दुस-यांदा भाडे-विशेषांक, नळ-विशेषांक---असे विशेषांकावर विशेषांक काढायची ह्या पोंबुर्प्याला खोडच आहे! त्यामुळे त्याच्या लेखन संन्यास-विशेषांकाचे मला विशेष काही वाटले नाही.

अंकावरील ठळक मथळा पाहून मात्र मी स्तंभीत झालो:

"मिपा वाचक वर्धनासाठी पंतांचा आमरण लेखन संन्यास"

"पोंबुर्पेकर--" मी अठरा तासांच्या लेखन संन्यासा नंतर शरीरात उरलेले सारे त्राण (महीन्याच्या शेवटी बि-हाडातल्या फणीकरंड्याच्या पेटीपासून ते रावळीपर्यंतच्या दिडक्या-आणेल्या एकवटून अखंड रुपया जमवतो त्याप्रमाणे) एकवटून ओरडलो. माझ्या ओरडण्याने पोंबुर्पेकर तिळमात्र हलला नाही. त्याच्या प्रत्येक अंकानंतर कोणी ना कोणी त्याच्यावर असेच ओरडतो!

"काय?" शांतपणे तो विचारता झाला.

"कुठल्या गाढवानं सांगीतलं, की मी मिपा वाचक वर्धनासाठी लेखन संन्यास घेतला आहे म्हणून?"

"सगळे जण असंच म्हणताहेत--" पोंबुर्पेकर उद्गारला.

"मग सगळे जण गाढव आहेत!" मी म्हणालो. इटंरला मी लॉजिक घेतले होते; त्यामुळे दोन प्रमेयांतून हा सिद्धांत सटकन बाहेर पडला आणि पोंबुर्पेकर चूप झाला.

"माझा हा लेखन संन्यास अगदी खाजगी स्वरुपाचा आहे. त्याचा मिपा वाचक वर्धनाशी काय संबंध?"

"असं कसं? समेळ काका म्हणाले, की मिपावरच्या कंपूबाजी विरूद्ध तुम्ही हे लेखन संन्यासाचं शस्र उगारलंत!"

"समेळकाका गेला खड्ड्यात!"--मी.

"ठीक आहे. पावशे म्हणाले, की वाचक तुमच्या धाग्यांवर भरपूर ट्रोलिंग करतात म्हणून लेखकूंच्या दुःखांना तोंड फोडण्यासाठी तुम्ही हा लेखन संन्यास घेतलाय !"

"पावशे गेला मसणात!"---मी

"ठीक आहे. नाट्यभैरव कुशाभाऊ म्हणतो, की जनोबा रेग्यांनी तुमच्या अशुद्ध/बीभत्स लेखनाने मिपाचा दर्जा खालावत असल्याचा आणि त्याच्या कथाबीज चोरीचा आरोप केला, म्हणून त्याच्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून तुम्ही लेखन संन्यास घेतलाय !"

"जनोबा गेला--" वरच्या दोन वाक्यांत खड्डा आणि मसण ह्या जागा भरल्यामुळे जनोबाला कुठे पाठवावे हे मला सुचेना! त्यामुळे जनोबा गेला "ह्यात", असे म्हणून मी सर्वनामावरच भागवले. परंतु पोंबुर्प्यावर परिणाम झाला नव्हता. रेफ्रिजरेटरमध्ये मेंदू ठेवल्यासारखा तो वागत होता.

"ठीक आहे! उद्याचा अंकात तुमचा खुलासा प्रसिद्ध करू."

"काही गरज नाही. माझ्या उपासाशी मिपा वाचक वर्धनाचा काही संबंध नाही."

"मग कशाशी संबंध आहे?" पोंबुर्पेकर म्हणाला.

"माझं साहित्यिक वजन वाढवण्याशी!"

"ऑं?"

"हो!"

"पण संन्यास हा मोक्ष प्राप्तीसाठी, षड्रिपूंशी सामना करण्यासाठी घेतात ना?"

"मला ठाऊक नाही. हे पाहा--" मी मिपा उघडून माझ्या धाग्यांवरची घटलेल्या प्रतिसादांची संख्या दाखवण्यासाठी फोन त्याच्या डोळ्यांपुढे नाचवीत म्हटले, "वाचा!"

"अत्यंत फालतू लिखाण आहे हे!" पोंबुर्पेकर प्रतिसाद वाचू लागला.

"ते काय वाचता? प्रतिसादांची संख्या मोजा... हे पाहा, गेल्या बारा धाग्यांवर मिळून अठरा प्रतिसाद!"

"अरे वा! अठरा प्रतिसाद पंत--"

"बारा धाग्यांवर मिळून अठरा प्रतिसाद म्हणजे प्रती धाग्यावर सरासरी प्रतिसाद किती ?"

"किती?" पोंबुर्पेकर.

"अठरा भागिले बारा म्हणजे किती?"--मी.

"किती?"--पोंबुर्पेकर

"किती?"--मी.

"किती?"--- पोंबुर्पेकर.

"किती-किती काय करता? अठरा भागिले बारा म्हणजे प्रती धागा सरासरी दीड प्रतिसाद !"

"अरे वा!"

"अरे वा काय?"... प्रती धागा दीड प्रतिसाद म्हणजे खूपच कमी आहे सरासरी"

"कुणाच्या धाग्यांवरचे प्रतिसाद आहेत हे?" पोंबुर्पेकर तोच थंडपणा चालू ठेवून म्हणाला.

"तुझ्या बापाच्या! मला दुसऱ्यांच्या धाग्यांशी काय देणे घेणे आहे? हे माझ्या धाग्यांवरचे प्रतिसाद आहेत."

"असतील!"

"असतील नाही... आहेत! आता सांग, माझ्या लेखन संन्यासाचा आणि मिपा वाचक वर्धनाचा काय संबंध? घटते प्रतिसाद बघून मला डिप्रेशन आलंय... ह्यातून उद्या मला मधुमेह होईल, ब्लडप्रेशर होईल, हार्ट ट्रबल होईल! मेलो पटकन तर कोणी येणार आहे का मदतीला?"

"का नाही येणार?" पोंबुर्पेकर म्हणाला, "पावश्यांची आजी वारली तेव्हा--"

"बाहेर हो!" त्याच्या थंडपणाचा कळस झाला होता.

"रागावू नका पंत. पण हे तुम्ही आधी का नाही लोकांना सांगितलं?"

"पण तुम्ही लोकं माझं मिपावरचं निवेदन वाचाल तर ना!"

हळूहळू माझ्या खाजगी लेखन संन्यासाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली.

पण मी कोणत्याही टिकेला भीक घालणार नव्हतो!

----------

विशेष सूचना- सदर लेखन वाचून खरोखरीच कोणाच्या डोक्याला शॉट लागल्यास लेखकाचा उत्तरदायित्वास नकार लागू :P

विडंबनविनोदप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

गुरुवर्य श्री.श्री. अकु यांच्या चरणी अर्पण.....
अकुकाका तुम्ही लेखन संन्यासाचा दुष्ट नाद सोडा ही विनंती!

जॉनविक्क's picture

6 Aug 2019 - 10:43 pm | जॉनविक्क

:D :D :D

राघव's picture

6 Aug 2019 - 10:47 pm | राघव

कोपरापासून का काय म्हणतात.. तो घ्या..!

सर्व भावना जेथे जशा पोहोचायच्या तेथे तशा नीट पोहोचल्यात! हा हा हा!! :-)

गड्डा झब्बू's picture

6 Aug 2019 - 10:56 pm | गड्डा झब्बू

जॉनविक्क & राघव :-)) :-)) :-))

जालिम लोशन's picture

6 Aug 2019 - 11:37 pm | जालिम लोशन

सोडला!

गड्डा झब्बू's picture

7 Aug 2019 - 10:09 am | गड्डा झब्बू

सोडला!

उत्तम काम केलंत... :-))

नाखु's picture

7 Aug 2019 - 10:13 am | नाखु

मस्तच, मनमुराद हसलो.
भेंडी गुरूना अशी गुरुदक्षिणा कुणीच दिली नसावी,हा एका जाज्वल्य मिपा साहित्यसूर्याचा केलेला बहुमान आहे असे वाटते.

अखिल मिपा गप्पी मासे पाळा आणि भरताड लिखाणाचा हिवताप टाळा या योजनेअंतर्गत निवडुंगाची फुले आणि बाभळीचे गुच्छ या नियतकालिकातून साभार

गड्डा झब्बू's picture

7 Aug 2019 - 10:26 am | गड्डा झब्बू

नाखू साहेब आभारी आहे __/\__

"निवडुंगाची फुले आणि बाभळीचे गुच्छ" :-)) हे भारी आहे!

जव्हेरगंज's picture

7 Aug 2019 - 11:23 am | जव्हेरगंज

=)))))
कहर..!!

गड्डा झब्बू's picture

7 Aug 2019 - 11:32 am | गड्डा झब्बू

:-)) :-)) :-))

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Aug 2019 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचताना मजा आली, थोडा वेळ घेउन, अजून थोडे डीटेलवार काम करता आले असते.
पैजारबुवा,

गड्डा झब्बू's picture

7 Aug 2019 - 3:49 pm | गड्डा झब्बू

खरे आहे पैजारबुवा! 'निवेदन' या धाग्यावर प्रतिसाद म्हणून काही ओळी लिहित होतो, पण प्रतिसाद म्हणून तो खूप मोठा वाटत होता.
त्यामुळे स्वतंत्र धागा काढला, पण विस्तार भयाने एवढ्यावरच आटपले :-))

नि३सोलपुरकर's picture

7 Aug 2019 - 1:50 pm | नि३सोलपुरकर

खतरनाक लिवलय ...मजा आगया .

गड्डा झब्बू's picture

7 Aug 2019 - 3:50 pm | गड्डा झब्बू

:-)) :-)) :-))

तमराज किल्विष's picture

7 Aug 2019 - 8:40 pm | तमराज किल्विष

अशानं विचार बदलेल त्यांचा. मग...

चालेल कि, कदाचित त्यांच्या लिखाणात चांगली सुधारणा होऊन आपल्याला चांगल्या कथा, कविता वाचायला मिळतील.
खरतर त्यांच्या कथांचे कथाबीज चांगले असते, पण त्याला फार विचित्र पद्धतीने फुलवायच्या त्यांच्या शैलीमुळे मातीमोल करून टाकतात!

तमराज किल्विष's picture

8 Aug 2019 - 4:34 am | तमराज किल्विष

हे आधीच नाही का सांगायचं त्यांना. आता डायरेक्ट संन्यास घेतला ना.

बोलघेवडा's picture

8 Aug 2019 - 2:38 pm | बोलघेवडा

हे तर सरळ कॉपी पेस्ट पुलं च्या लेखाचे!!!
काही शब्द बदलले आहेत फक्त.

निवेदन आणि उपासाची सरमिसळ आवडली :)