म. सु. पाटील : उत्तुंग समीक्षक आणि माणूस

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Jun 2019 - 3:13 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

दिनांक 31 मे 2019 ला रात्री अकरा वाजता म. सु. पाटील सर उर्फ बाबा यांचं निधन झालं. ही दु:खद बातमी समजताच सरांशी झालेल्या पहिल्या भेटीपासून तर आतापर्यंतच्या त्यांच्या समग्र आठवणी अगदी कालच घडल्यासारख्या मनात सहज तरळून आल्या.
म. सु. पाटील सरांशी माझी पहिली प्रत्यक्ष भेट मनमाडला 1985-86 च्या दरम्यान झाली. (त्या आधी सरांशी आणि पुपाजींशी मी आठवीत असतानापासून पत्रसंवाद होता. ‘अनुष्टुभ’ नियतकालिकामुळे.) मनमाड महाविद्यालयात सर प्राचार्य होते. त्यांच्या निरोपानुसार त्या रविवारी सटाण्याहून डॉ. मोहन माजगावकर दादा आणि आम्ही काही मित्र (प्रा. शं. क. कापडणीस, डॉ. एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंडगे आणि मी) मनमाडला गेलो होतो. कॉलेजच्या त्यांच्या निवासस्थानावर पोचलोत. (तेव्हा मी विद्यार्थी होतो. पण पाटील सरांच्या वर्गातला विद्यार्थी नव्हतो.) मुंबईहून अरूण म्हात्रे, रविंद्र लाखे, अशोक नायगावकर आलेले होते. प्रा. प्रभाकर बागले, गो. तु. पाटील, विजय काचरे सरही होते. मनमाडहून खलील मोमीन, देविदास चौधरी हे ही आले.
सकाळच्या गप्पात हॉलमध्ये घरगुती पध्दतीने खाली टाकलेल्या सतरंज्यावर (सरांसह) भिंतींच्या कडेकडेने बसत आम्ही प्रत्येकाने आपापल्या दोन दोन कविता वाचल्या. कवितांवर ‘व्वा व्वा, क्या बात है’ वगैरे नेहमीची ठरलेली उडती दाद न येता धीर गंभीर प्रतिसाद मिळत होते. म. सु. पाटील सर अशा गंभीर प्रतिक्रियांना सुरूवात करत. मोजकेच आणि अनौपचारिक बोलत. फक्त कविता वाचनाचेच असे दोन तीन राऊंड आणि अनौपचारिक चर्चा झाल्यावर दुपारी साधं पण चवीष्ट जेवण झालं. घरगुती जेवणाची खास तयारी सरांनी आत करून घेतली होती. (सर मनमाडला एकटेच असत. परिवार मुंबईला होता.)
दुपार नंतरच्या अनौपचाणरिक सत्रात पाटील सरांनी ‘विदुषकी कविता’ शीर्षकाखाली अनेक कवींच्या कवितांवर लिहिलेली त्यांची समीक्षा वही अतिशय संयत, सावकाश आणि संथ गतीने वाचून दाखवली. ह्या समीक्षेला खास म. सु. टच होता. ही समीक्षा म्हणजे एक दीर्घ कविताच असल्याचं लक्षात येत होतं. समीक्षेतही सृजन असतं, हे या समीक्षेतून दिसून येत होतं. खुद्द सरांच्या तोंडून त्यांची समीक्षा ऐकण्याचा तो योग अपूर्व होता. कवितेसारखी कवितेच्या समीक्षेलाही दाद देता येते, असं पहिल्यांदा वाटू लागलं. नंतर ही समीक्षा पुस्तक रूपाने पुढे येणार होती. या आधी सरांचे ‘अनुष्टुभ’ मधील आदिबंधात्मक समीक्षा लेख प्राधान्याने वाचत होतो. ‘आदिबंधात्मक समीक्षा’ ही संकल्पना मराठीत आणण्याचं श्रेय पाटील सरांनाच जातं.
या नंतर नाशिकच्या सावानातील जिल्हा साहित्य मेळाव्यातही आमची एकदा भेट झाली होती. सोबत नीरजा होत्या. सरांनी नीरजांशी ओळख करून दिली. 1985 ते 1990 च्या दरम्यान मी तीन-चार वेळा नाशिकच्या साहित्य मेळाव्यात गेलो आहे. नंतर जाणं बंद झालं.) पाटील सरांना त्यांचे बहुतेक विद्यार्थी बाबा म्हणत. मी मात्र त्यांना कायम ‘सर’ म्हणूनच हाक मारत आलो.
सरांच्या सेवा निवृत्तीच्या‍ निरोप समारंभावेळी 1989 ला मनमाडलाच आमची तिसरी भेट झाली. सरांच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी या निरोप समारंभाला साहित्यिक संमेलनाचं स्वरूप दिलं होतं. तात्यासाहेब (कुसुमाग्रज) प्रमुख पाहुणे होते. धुळ्याहून पुपाजीही (पुरूषोत्तम पाटील) कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमात चेतश्री प्रकाशनातर्फे सरांचं पुस्तकही प्रकाशित झालं. (‘बालकवींचे काव्यविश्व’ हे ते पुस्तक असावं.) बाबांचे अनेक माजी विद्यार्थी म्हणजे तेव्हाचे प्राध्यापक लोक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. पुपाजी आणि तात्यासाहेब (कुसुमाग्रज) यांची संयुक्तीतक भाषणं झाली. तात्यासाहेबांच्या हस्ते सरांचा सत्कार झाला. या नंतर सर मुंबईला स्थायिक झाले.
द. ग. गोडसे यांच्या कलामीमांसेचा मी अभ्यास करत होतो. 28, 29 फेब्रुवारी 1990 या दोन दिवसांचे मुंबई विद्यापीठ आणि देवरूख (जि. रत्नागिरी) येथील आठल्ये- सप्रे महाविद्यालय यांच्या संयुक्ती विद्यमाने द. ग. गोडसे यांच्या वयाच्या पंचाहत्तर वर्षांनिमित्ताने त्यांच्या कलामीमांसेवर चर्चासत्र आयोजित केले होते. संस्थेचे अध्यक्ष अरूण आठल्ये, प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, मुंबई विद्या‍पीठाच्या मराठी विभाग प्रमुख सरोजिनी वैद्य हे संयोजक होते. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील एकूण पस्तीस अभ्यासक निमंत्रित होते. त्यात म. सु. पाटील सर आणि मी ही निमंत्रित होतो. दुर्गा भागवत, कमल देसाई, प्रभाकर मांडे, पुष्पा भावे, आलोचनाचे संपादक वसंत दावतर, वसंत पाटणकर, उषा देशमुख, हरिश्चंद्र थोरात, दिपक कन्नल, सीताराम रायकर, रामदास भटकळ, अलका मटकर, रोहिनी भाटे, म. द. हातकणंगलेकर, प्रकाश खांडगे, अशोक निरफराके आदी साहित्यिक आणि विविध कला क्षेत्रातले दिग्गज लोक या चर्चासत्रासाठी निमंत्रित होते. (या सर्वांत वयाने लहान मीच होतो. शेवटच्या दिवशी महेश केळुस्कर आणि श्रीधर तिळवे यांची भेट झाली. श्रीधर तिळवे त्या वेळी कवी म्हणून कोणाला माहीत नव्हते.)
देवरूख कॉलेजच्या पटांगणात मंडप देऊन त्याखाली पलंग टाकून आमची राहण्याची सोय निसर्गरम्य परिसरात केली होती. मी आणि पाटील सर एकत्रच असायचो. आमचे पलंगही शेजारी एकमेकांना लागून होते. पहिल्या‍ दिवशी पाटील सरांचं टिपण वाचून झाल्यानंतर सायंकाळी मी माझं टिपण सरांना वाचायला‍ दिलं. चर्चासत्रात माझा सहभाग दुसर्यार दिवशी होता. म्हणालो, ‘सर, माझ्या टिपणावरून जरा नजर फिरवाल. संपूर्ण टिपण वाचावं का काही टाळावं? माझा निर्णय होत नाही.’ सरांनी माझं संपूर्ण टिपण काळजीपूर्वक वाचलं, पैकी एक मुद्दा मी मांडू नये असं त्यांनी सुचवलं. याचं कारण हे चर्चासत्र म्हणजे पंच्याहत्तरी निमित्ताने गोडसेंचा सत्कार कार्यक्रम होता. आणि माझ्या या मुद्द्यात गोडसेंच्या कलामीमांसेवर थोडी कठोर टीका होती. मी तो मुद्दा दुसर्याा दिवसाच्या माझ्या सादरीकरणात टाळला.
द. ग. गोडसे यांच्या कलामीमांसेवर मला पुणे विद्यापीठाची पीएच. डी. (1998) मिळाल्याचं समजताच सरांचं मला पत्र आलं. त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं: ‘सुधीर, तू निवडलेला विषय फार किचकट होता. समीक्षेची समीक्षा तू करत होतास. त्यातून तू कसा मार्ग काढलास आणि शेवटी कसा योग्य त्या शोधावर येऊन पोचलास हे तुझं तुलाच माहीत. खूप अवघड विषयाचं शिवधनुष्य तू पेललंस. यासाठी तुझं त्रिवार अभिनंदन.’
2001 साली अहिराणी बोलीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्याच्या समितीवर भालचंद्र नेमाडे सर, डॉ. मु. ब. शहा सर व मी असे तिघं होतो. (मी सटाण्याहून तर शहा सर धुळ्याहून रात्रीच दादरला पोचलोत. मुंबई मराठी साहित्य संघाच्या विश्रामगृहात आम्ही दोघं थांबलो होतो.) दुसर्याा दिवशी दादरच्या ऑफिसातली आमची एकमुखी निर्णयाची बैठक संपल्यावर शहा सर व मी पाटील सरांना भेटायला त्यांच्या घरी जाण्याचं ठरवत होतो. पण ते वेळेअभावी शक्य नसल्याने आम्ही बुथ वरून सरांशी टेलिफोनने बोललो. (तेव्हा मोबाईल नव्हते.) आम्ही कोणत्या कामासाठी मुंबईत आहोत हे ऐकून त्यांना आनंद झाला. फोनवरच बराच वेळ साहित्य क्षेत्रातलं बोलणं झालं. पण यावेळी प्रत्यक्ष भेट घेता आली नाही.
2004 साली मला पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार जाहीर झाला. ‘कला आणि संस्कृती : एक समन्वय’ या माझ्या पहिल्या समीक्षेच्या पुस्तकासाठी मला हा पुरस्कार मिळाला होता. या संस्थेकडून या आधी कोणाकोणाला हा पुरस्कार‍ मिळाला आहे, त्याची यादीही या संस्थेने पाठवली होती. त्यात डॉ. म. सु. पाटील हे नाव वाचून मला आनंद झाला. (पाटील सरांच्या नावांसोबत म. वा. धोंड यांच्यासह अजून काही दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला होता.) म. सु. पाटील सरांना हा पुरस्कार या आधी मिळाला आहे आणि आपल्यालाही तो मिळतोय, म्हणून त्यांच्या पंक्तीरत जाऊन बसण्याचा मला साहजिक आनंद होत होता. मी पाटील सरांना रात्री फोन केला. या पुरस्काराबद्दल सांगितलं. ‘पुरस्कार घ्यायला जाऊ का?’ विचारलं. सर म्हणाले, ‘हो अवश्य जा. चांगले लोक आहेत. पुरस्कार देण्यामागे त्यांचा हेतू चांगला आहे.’ मी पुरस्कार घ्यायला गेलो. आणि योगायोगाने तो पुरस्कार मी प्रा. गंगाधर पाटील सर यांच्या हस्ते स्वीकारला. (डॉ. म. सु. पाटील आणि प्रा. गंगाधर पाटील यांना मी समांतर सूर असलेले सहयोगी समीक्षक मानतो.)
27 फेब्रुवारी 2016 च्या सायंकाळी दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात सरांशी माझी शेवटची प्रत्यक्ष भेट झाली. ‘लांबा उगवे आगर’ या त्यांच्या आत्मचरित्रासाठीचा पुरस्कार घेण्यासाठी ते तिथं आले होते. आणि मी ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’ या माझ्या भाषाविषयक पुस्तकासाठीचा ‘नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार’ (दोन्ही महाराष्ट्र शासनाचे) घेण्यासाठी सटाण्याहून मुंबईला गेलो होतो. रस्त्यातल्या ट्रॅफिक जॅममुळे कार्यक्रम सुरू होण्याच्या फक्त पाच मिनिट आधी सर पोचले. म्हणून जास्त बोलता आलं नाही, तरी आम्ही त्या भेटीत खूप बोललोत असंच म्हणावं लागेल. त्यानंतर दोन तीनदा फोनवर बोलणं झालं.
माझा एक विद्यार्थीमित्र मुंबईला नोकरी करतो. त्याला एकदा सरांकडे मी पाठवलं होतं. सरांशी झालेली चर्चा त्याला इतकी भावली की तो नेहमी सरांकडे जाऊन काव्यशास्त्रावर चर्चा करू लागला, साहित्यावर बोलू लागला आणि सरांनाही त्याचं त्यांच्याकडे येणं आवडू लागलं. सरांची त्या विद्यार्थ्याशी थोड्याच काळात खूप चांगली गट्टी जमली. सरांचा स्वभाव ‍प्रेमळ, निर्मळ, निगर्वी असल्याने कोणीही नवखा माणूस त्यांच्याशी तात्काळ तादात्म्य पावत असे. सरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वाटेवर न चालता कोणी स्वतंत्र वागला तरी सर मनात त्याच्याविषयी कोणताही किंतु कधी मनात ठेवत नसत.
पाटील सरांना 2018 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. प्रामुख्याने सर कवितेचे मर्मग्राही समीक्षक म्हणून सर्वत्र विख्यात झाले. काव्यासोबत संत साहित्य, दलित साहित्याचेही ते मर्मग्रहण करीत असत. जवळजवळ पन्नास वर्षांपासून ते मराठी समीक्षा प्रांतात ठळकपणे ओळखलं जाणारं व्यक्तीमत्व आहे. (होतं नाही. आहे. पाटील सरांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचं अस्तित्व. त्यांचं अस्तित्व कोणाला पुसता येणार नाही. म्हणून इथं भुतकाळात उल्लेख न करता वर्तमानकाळात करतो.)
सरांनी 1988 पर्यंत अध्यापन केलं. प्राचार्य पदावरून ते 1989 साली निवृत्त झाले. त्यांची एकूण फक्त सत्रा (17) पुस्तके प्रकाशित असली तरी ती अक्षर वाड्‍.मयात गणली जातील अशी आहेत.
2014 आणि 2018 असे दोन साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या त्यांच्या ग्रंथाला 2018 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. समीक्षा क्षेत्रात त्यांच्या कार्याची सर्वदूर म्हणता येईल अशी योग्य दखल नक्कीच घेतली गेली आहे.
कविता म्हणजे काय, कविता का लिहावी, कवितेचे अस्तित्व, कविता आस्वादायची कशी, कवितेची सौंदर्यस्थळे म्हणजे काय, कविता आणि अकविता आदी गोष्टी काव्य प्रकारात शोधण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांच्या कडून मार्गदर्शन मिळावे म्हणून अनेक नवोदित त्यांच्याकडे सतत येत-जात असत. आणि त्यांच्याकडे गेलेले आणि त्यांना अनुसरणारे नवोदित कधीही साहित्य प्रांतात अपयशी ठरले नाहीत.
मराठीत ‘आदिबंधात्मक समीक्षा’ व ‘तृष्णेचे काव्यशास्त्र’ या दोन नवीन संकल्पना मांडण्याचं श्रेय म. सु. पाटील सरांना जातं. प्रा. गंगाधर पाटील आणि डॉ. म. सु. पाटील यांनी मराठी समीक्षेत समीक्षक म्हणून ‘पाटील युग’ सुरू केलं. (कुलकर्णी युग संपलं आणि पाटील युग सुरू झालं असं साहित्य-समीक्षा क्षेत्रात गांभीर्याने म्हटलं जाऊ लागलं.) पाटील सर माणूस म्हणूनही उत्तुंग व्यक्तीामत्व होते. त्यांची समीक्षा किचकट- अवजड- अवघड शब्दांची नसून सहज सोपी सर्जनात्मक आहे. अगदी अलीकडे त्यांनी ‘बदलते काव्यसंवेदन’ नावाचा समीक्षा ग्रंथ सिध्द केला. तो प्रत्येकाने जरूर वाचला पाहिजे.
डॉ. म. सु. पाटील सर आपल्यातून गेले असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या ग्रंथ संपदेतून ते यापुढेही आपल्याशी हितगुज करत राहणार आहेत हे नक्की.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

व्यक्तिचित्रणलेख

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

15 Jun 2019 - 3:17 pm | महासंग्राम

सत्रा (17) असं का लिहिलंय हि वेगळी पद्धत आहे का

नवीन असल्यास माहिती दिलीत तर उत्तम

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

15 Jun 2019 - 3:42 pm | डॉ. सुधीर राजार...

मार्गदर्शन करावे ही विनंती

महासंग्राम's picture

15 Jun 2019 - 3:56 pm | महासंग्राम

अहो डॉ. सुधीर मला खरंच माहिती नाही म्हणून मी गंभीरपणे विचारलं होतं. पण तुम्हांला तुमच्या लेखाची भर बाजारात सगळ्यांनी इज्जत काढावी अशी इच्छा दिसते. हरकत नाही ती हि पूर्ण करू. तसंही समर्थानी म्हंटल आहे ठकासी व्हावे ठक, खटासी व्हावे खट, यापुढे अगदी तसेच वागू.

कसं लिहू
15 Jun 2019 - 3:42 pm | डॉ. सुधीर राजार...
मार्गदर्शन करावे ही विनंती

एवढंही समजत नसेल तर नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. खिक्क...

नावातकायआहे's picture

15 Jun 2019 - 4:12 pm | नावातकायआहे

भालेराव साहेब,

क्षमस्व, "पण तुम्हांला तुमच्या लेखाची भर बाजारात सगळ्यांनी इज्जत काढावी अशी इच्छा दिसते"
हे टाळता आले असते असे वाटते.

महासंग्राम's picture

15 Jun 2019 - 4:29 pm | महासंग्राम

मालक, तुम्ही म्हणता ते काही प्रमाणात बरोबर आहे. पण मी प्रश्न अत्यंत सभ्यपणे विचारला होता कारण खरच त्या पद्धतीने लिहितात का हे मला माहिती नाही. पण उत्तर काय आलं हे तुम्ही पाहता आहातच ?

लेखक ? महोदयांचं हे आजचंच नाही या आधीचे लेख पाहिल्यास इतर सदस्यांनी नम्रपणे विचारलेल्या प्रश्नांना मुद्दामहुन अशी उत्तर दिलं गेल्याचं दिसत आहे. अश्या लोकांना कसं उत्तर द्यावं आता तुम्हीच सांगा ?

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Jun 2019 - 5:39 pm | श्री गावसेना प्रमुख

सतरा(१७)

अभ्या..'s picture

15 Jun 2019 - 6:38 pm | अभ्या..

कुलकर्णी युग संपलं आणि पाटील युग सुरू झालं असं साहित्य-समीक्षा क्षेत्रात गांभीर्याने म्हटलं जाऊ लागलं.

बररर.
लवकरच देवरे युगही सुरु होइल, कदाचित झालेही असावे. शुभेच्छा त्यासाठी.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Jun 2019 - 7:40 pm | हणमंतअण्णा शंकर...

माझ्या अल्प माहितीप्रमाणे असं गंमतीने म्हंटलं जायचं. याला विखारी जातीयवादाची झालर अजिबात नव्हती. गांभीर्याने वगैरे नाही.
पुपाजींबद्दल मी याच वर्षी ऐकलं. त्यांच्या एकदोन कविता संग्रहात आहेत, खानदेशी साहित्यिक पुपाजींना बरेच मानत असं दिसते आहे.
म सु पाटील, रा गा जाधव 90 नंतर जन्माला आले असते तर शक्यतो 'मी यशस्वी होणारच' छाप युपीएस्सी क्लासेस मध्ये वर्षे जाळीत बसले असते.