भाग ४ - मुल्हेरच्या वाटेवर… मुघलांच्या प्रदेशात प्रवेश…

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
2 Feb 2019 - 2:58 am
गाभा: 

भाग ४
मुल्हेरच्या वाटेवर… मुघलांच्या प्रदेशात प्रवेश….

1
मालवाहकांसमावेतील महाराजांच्या सैनिकांची दक्षता पथके मिळवलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा करत असतील. सोबत असे अनेक लोक कामांच्या बहाण्याने ज्या मालवाहू जनावरांच्या जवळ सोने-चांदीच्या, हिरेमोत्यांच्या जाडजूड चामड्याच्या बॅग्ज, रोकड थैल्या, रेंगाळत असावेत. उदाहरणार्थ मशालची, दुभाशे, आसपास भागात जाऊन जनावरांना चारा व सैनिकांसाठी भोजन-पाण्याची सोय करणारे - भिस्ती, याशिवाय बाणांचे गठ्ठे, शस्त्रे दुरुस्ती आणि पात्यांना धार करणारे, संदेशांना विविध तर्‍हेने वाजवून तुतारी-शंख फुंकणारे, ऐनवेळी पकडून आणलेले हमाल, जनावरांचे पाठीवरून माल वाहतूक करण्यात दरिद्री, खडतर जीवनयापन करताना येण्या जाण्याच्या सरावाच्या रस्त्यातील धोके, लपवायच्या जागांची खडानखडा माहिती असलेल्या लबाडांच्याशी लाडीगोडी लाऊन काही ठरत असेल तर आपल्याला माहित नाही असे नको म्हणून सलगी करून असतील, हल्लाबोल करताना जखमी, भाजलेले सैनिक ज्यांना घरापर्यंत सुखरूप जाऊ अशी खात्री नव्हती असे, तर काही कावेबाज, संधीसाधू सैनिक आणि सगळांना आपल्या बरोबर काय काय अत्यंत गबर श्रीमंतांच्या घरातील कधी न पहायला मिळणारे वैभव घेऊन चाललोय याची मनोमन खात्री होती. थोडाही हात मारायची संधी असेल तर कशी साधावी अशी मनोरथे सगळे रंगवत असावेत.
याच्या विपरीत महाराजांच्या सोबतच्या निश्चयात्मक सरदार आणि महाराजांच्या कार्यातील उदात्तता मान्य होती अशा हजारोंच्या मावळे सैनिकांच्या खांद्यावर विश्वासाने हात टाकून महाराज असल्याने ही संपत्ती घरपोच होईल याची खात्री होती.
घोडेस्वार डोक्यावर फेटा, पांढऱ्या रंगाचा अंगरखा, कमरबंद, काचा मारलेले धोतर किंवा विजार, कमरेला तलवार व खंजीर, खांद्यावर ढाल, खोगिरापाशी धनुष्यबाण असे मराठे सज्ज असावेत. खुद्द महाराज बरोबरच्या मालवाहकांसमावेतील लोकांशी ते कुठले, कसे आहात वगैरे आपुलकीने बोलून ते करत असलेल्या जोखमीच्या कामातील गांभीर्य तेही समजून आहेत. ते परततील तेंव्हा त्यांना भरपूर मेहनताना दिला जाईल याची जाणीव मुद्दाम करून देत असावेत.

2

बारडोली मागे पडून गेल्यावर तो हजारो जनावरांवरून संपत्ती मुल्हेरकडे घेऊन चाललेला तांडा गावांना वळसा देत शक्यतो सामोरे न जाता वांकानेर, शिकेर, वलोड, बुहारी, डोलावण पार करून उनई पाशी नदी आली. हळूहळू चढ लागला. जनावरांचा वेग मंदावला. हळूहळू जात जात अशा टप्प्यात आला जिथून जंगलातील चिंचीगावठापाशी वळसेदार चिंचोळ्या वाटेत विश्रांतीला जनावरांच्या अंगावरून उतरवून ठेवणे अवघड होऊ लागले असेल. नदी ओलांडायला सकाळी जायचे ठरल्यावर रात्रीच्या काळोखात जनावरांच्या अंगावरील पडशा रात्रीच्या विश्रांती साठी काढून ठेवल्यावर काहींनी आपल्या हुशारीने काही बोचक्यातील सामान पटापट काढून त्या ऐवजी वजनदार दगड माती भरून ठेवली असावीत. ती बोचकी झाडे व नदीच्यापात्राची खूण धरून पुरायसाठी काहींनी तत्परता दाखवून आम्ही तुम्हाला हे काम करताना पाहिले असल्याचे सांगून गुपचुप आपला वाटा त्यात असल्याचे मानायाला लावले असावे. त्या 2-3 किमी पेक्षा लांब लटांबरात जंगलाच्या वाटेतील अनेक वळणावर रातोरात असे हातचलाखीचे प्रयोग चालू असणार. जे काम करायचे त्यासाठी हीच संधी असे मानून रात्री पडल्या पडल्या हातात पैसै पडले की परतताना या वाटेवरच्या खुणेने पुरलेल्या घबाडाने आपले उर्वरित जीवन जगायला घरी परत न जाता कुठेतरी पसार होणे ठीक होईल असे मनसुबे रचले जात असावेत.
पहाटे उठून रस्त्यावर आल्यावर अनेकांना धरून पिटाई करून उंचीवरून नदीत ढकलून अंत होताना पाहून काय प्रकार आहे ते कळल्यावर कालचा लपवलेला माल खोदून पुन्हा भरायला लागलेले दृष्य दिसायला लागले असेल. भावंदागढ गेले.
2
बारदा धबधब्याच्या पाण्यात थंडावा घेऊन अहवा गावात पोहोचायला रात्र झाली असेल. नंतरच्या सकाळी म्हणजे सूरत 6 ऑक्टोबरला सोडल्यावर 12 तारखेला खरा चढ लागला. चिंचली पासून खडा चढ चढताना जनावरे घामाघूम झाली. महाराजांना तोवर बातमी लागली की मुल्हेरच्या पायथ्यापाशी असलेल्या बाजारपेठेत धुमाकुळ घातला तरी साल्हेरच्या किल्ल्यावरून सैन्य जमवून घेऊन यायच्या आत आपल्याला बराच माल हस्तगत करता येईल.
12 तारखेला सुरतहून आलेल्या मालवाहू थकलेल्या जनावरांची बदली होणे ठरलेले होते. त्या प्रमाणे महाराजांच्या आघाडीच्या पलटनीने आधी जाऊन जनावरांच्या मालकांशी व कंत्राटदारांच्या मध्यस्थीने शेकडो जनावरांची गाड्यांची सोय करायला सुरवात केली असावी. सुरतहून आलेले गुजराती भाषी सगळे आपल्याला मिळालेल्या सढळ बिदागीवर खूष होऊन सलाम करून आपापली जनावरे हु्र्र...र्र हुश्श... करत परतली असतील.
येथून बैलगाड्यांनी पार आग्र्याला जायला यायला, हजयात्रेला सूरतला जाण्यासाठी, व्यापारी लोकांच्या आरामदायक प्रवासाची सोय पुर्वापार चालत आली असल्याने गाढवांसारखी खडी जनावरे व योग्य बैलगाड्यांचा बंदोबस्त करून सामानाची अदला बदल करायचे काम करवून घेत 2 दिवसांची विश्रांती झाली असावी. 10 हजार घोडदळ, हजारांपेक्षा जास्त पायदळ घेऊन ‘सिवा’ आपल्या किल्ल्यावर केंव्हाही चाल करून येऊ शकतो. म्हणून मुल्हेर किल्लेदाराने लपून बसणे शहाणपणाचे ठरेल असा विचार करून तो रक्षणाची जबाबदारी टाळून बसलेला समजताच महाराजांनी मुल्हेरच्या बाजारपेठेत पुकारा करून बऱ्याबोलाने आपल्याकडील संपत्तीचा भरणा करावा आणि माझ्या राज्याची चौथाई मान्य करून यापुढे माझ्यातर्फे पाठवलेल्या वसूली कारभाऱ्यांना कर भरणा करावा. आपण काहीही करू शकतो हा धाक निर्माण करायला त्यांनी काहींना शारीरिक इजा करून घबराट उडवून दिली असेल. अनेकांनी मागितलेली रक्कम देऊन जीव वाचवला असेल. व्यापारी वर्गावर वचक ठेऊन असावे पण त्यांना व्यापार करायला भय वाटून त्यांची हिम्मत कचरेल असे करणे चुकीचे ठरेल. असा विचार करून महाराजांनी आधीच्या मालात भर टाकून नव्या दमाच्या जनावरांसह नेकनाम खानाला साल्हेर किल्ल्यातून मुल्हेरला यायच्या भानगडीत पडायच्या आत निघणे पसंत केले असावे.

3

आपल्या येण्याची बातमी बऱ्हाणपुरला व दक्षिणेचा सुभेदार औरंगजेबाचा मुलगा मुअज्जमला औरंगाबादेला पोचली की त्यांच्या सैन्याचे वेगवेगळ्या सरदारांचे संचलन आपल्याला वाटेत गाठेल. असलेल्या प्रचंड मालमत्तेला घेऊन पुढे जावे का मागे ठेऊन लढून परत येऊन मग कूच करावे किंवा तांड्याचे विभाग पाडून वेगवेगळ्या मार्गाने जायला पाठवावे? तसे केले तर नंतर भेटावे कुठे? काही कारणांनी तशी भेट झाली नाही तर हा माल कुठल्यातरी किल्ल्यावर बंदोबस्तात ठेवायला हवा आणि मग राजकारणाची हवा कशी वाहते याचा अंदाज घेऊन मग पुढची आखणी करावी असे अनेक पर्याय त्यांनी विचारात घेतले असावेत. आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला काय पडतो? सेनेला धोक्यात घालावे किंवा नाही यावर विचार विनिमय करून पुढची चाल महाराजांनी काय ठरवली असेल?
भाग 5 पुढे चालू...