पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे.
वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा.
मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती.
केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली.
पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला.
तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत!
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा.
अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे?
आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे
आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं
--मुनव्वर राना
प्रतिक्रिया
26 Mar 2016 - 3:26 pm | सातारकर
वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला.
हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही.
आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा.
अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.
26 Mar 2016 - 9:32 am | टवाळ कार्टा
खिक्क...काय राव...इतक्या लौकर खेळ आटपायचा असतो का मिपावर :)
26 Mar 2016 - 1:01 am | विद्यार्थी
मी स्वतः वेगळ्या विदर्भ राज्याचा समर्थक आहे तरीसुद्धा लेखातील खालील गोष्टी विशेष मानसिकता दर्शवतात,
मला वाटते की समस्या इथेच आहे. मुंबई तत्कालीन प्रदेशातील सर्वात महत्वाचे शहर असल्याने आंदोलन तेथे झाले होते. याचा अर्थ ते फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा आणि विदर्भाचा त्याच्याशी काही संबंध नाही असा होत नाही. वैदर्भीयांना संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांनी "आमचे आंदोलन मुंबई, पुणे, बेळगाव, मराठवाडा, विदर्भ यासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आहे" अशी घोषणा करणे अपेक्षित होते का?
ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले ते फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याच करता होते हा पूर्वग्रह करून लेख लिहिला आहे असे मला वाटते. महाराष्ट्र एकीकरण समितीची निवडणुकीतली कामगिरी आणि त्यांना "केवळ" फक्त मुंबई कोकणात मिळालेले यश याचा मुद्दा मांडून वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न इथे दिसतो कारण हीच महाराष्ट्र एकीकरण समिती गेली कित्येक दशके बेळगावमध्ये महानगरपालिका निवडणूक अविरतपणे जिंकत आहे याचा उल्लेख लेखकाने सोयीस्करपणे टाळलेला दिसतो. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील लोकांनीसुद्धा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी आपला काही संबंध नाही असे म्हणावे का?
राहिला मुद्दा वेगळ्या विदर्भाच्या विषयावर पश्चिम महाराष्ट्रातून होणाऱ्या आरडा ओरड्याचा, सगळे राजकारण आहे हो. जसे विदर्भ आणि मराठवाड्यात होणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी जसा पश्चिम महाराष्ट्र जबाबदार असतो तसाच तो वेगळ्या विदर्भाच्या मागणीला होणाऱ्या विरोधालासुद्धा आहे, नाही का?
26 Mar 2016 - 8:43 am | भाऊंचे भाऊ
विदर्भातील लोकांचीमानसिकता आपण अचूक पकडलीत.
या धागालेखकापेक्षा जास्त योग्य प्रतिवाद आपले ते हे सरही करतील इतका एकतर्फी धागा आहे हां बर काही बोलले की लेखकाचे मुद्दे सिध्द करत असल्याची ओरड अन न बोलले की आपोआप सहमती लेखकाला मिलनार... वा रे वा. मला वाटते या धाग्याच्या प्रिन्ताउत काढून लेखकाचे म्हनने मान्य होस्तवर सर्व पश्चिममराठी लोकांनी पुन्हा पुन्हा वाचायला हव्यात
26 Mar 2016 - 9:48 am | घाटावरचे भट
त्यापेक्षा असं केलं तर -
कोकण, पच्चिम म्हाराश्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश अशी ५ राज्यं करून टाकू. असंही महाराष्ट्रात एक सरकारवरचा कर्जाचा डोंगर सोडला तर 'महा' म्हणावं असं काय उरलंय?
26 Mar 2016 - 11:46 am | प्रकाश घाटपांडे
मा गो वैद्य चार राज्ये म्हणतात. खानदेश कुठ त्यात?
26 Mar 2016 - 4:03 pm | घाटावरचे भट
अहो आपलं उपर एक!
28 Mar 2016 - 5:23 pm | सतीश कुडतरकर
आम्हाला कोकणाची चार राज्य पाहिजेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. :-)
26 Mar 2016 - 11:32 am | पुतळाचैतन्याचा
विदर्भ आणि मराठवाड्या बद्दल प्रत्येक मुद्द्यावर विस्तृत लिहिण्याची गरज आहे. शेवटी लोकांचे ज्यात कल्याण असेल ते करावे पण खालील मुद्दे दुर्लक्षित करण्या सारखे नाहीतच:
१) विकासाचा कालावधी:
पश्चिम महाराष्ट्राचा विकास केवळ स्वातंत्र्य नंतर झालेला नाही. शिव-काळा पासून याची सुरुवात झाली आणि एक-एक क्षेत्रात विकास होत गेला. उदा. शिव-काळा पासून नेतृत्व विकास हि प्रक्रिया सुरु झाली आणि शिंदे-होळकर- गायकवाड हे सरदार उत्तरेत निर्माण झाले. त्या शिवाय संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सामान्य जनतेने नेतृत्व करून दाखविले. अवघड परिस्थिती असताना कसे लढावे याच तंत्र पश्चिम महाराष्ट्रात रुजले. म्हणून लोकशाहीत सामान्य नेते पुढे येउन नेतृत्व करतात (यशवंतराव चव्हाण, आर आर पाटील, राजू शेट्टी, अन्ना हजारे). शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले (१८९०), कर्मवीर भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे, टिळक, आगरकर यांनी पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी पासून काम केले. याच वेळी विदर्भ मध्य प्रांत मध्ये होता आणि मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता. म्हणून तिकडे शिक्षणाचा प्रचार कमी आहे आणि उशिरा सुरुवात झालीये.थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रात विकास प्रक्रिया २०० वर्ष पासून सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भात ती आत्ता सुरु झालीये.
२) सामाजिक विकास
पश्चिम महाराष्ट्रात फक्त आर्थिक विकासावर भर नसून सामाजिक विकास हा त्याच्या केंद्र स्थानी आहे. उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान: गाडगेबाबा विदर्भातले पण त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान आर आर पाटीलांनी सुरु केले. कोणत्याही विदर्भ किंवा मराठवाड्यातील नेत्याला हि योजना का सुचली नाही? १९७२ च्या दुष्काळात आणलेली रोजगार हमी योजना जी आज म न रे गा म्हणून अख्या देशाने स्वीकारली ती वि स पागे (सांगली) यांची कल्पना आहे. जातीय आरक्षण हे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पहिल्यांदा दिले. विदर्भ आणि मराठवाड्यात मागासवर्गीय जास्त असताना तिकडे कोणी का अशा योजना आणू शकले नाही. फडणवीस सरकारची जाल्युक्त शिवार हि मागील सरकार च्या शेततळे उपक्रमाची कोपी आहे.सहकार पश्चिम महाराष्ट्रात जसा रुजला तसा तो विदर्भात का नाही रुजला? सहकारातून ग्रामीण रोजगार मोठ्या प्रमाणावर आहे. सामाजिक सुधारणांची जी मोठी पार्श्वभूमी पश्चिम महाराष्ट्राला आहे तशी तिकडे नाही.
३) तंत्रज्ञान
तंत्रज्ञान सर्वाना समान आहे.पण ग्रामीण भागासाठी शेतीची उपकरणे तयार करणारे किर्लोस्कर कुठे तयार झाले? भारत फोर्ज कुठली? अशा किती कल्पना तिकडे तयार झाल्या? नागपूर चा पर्सिस्तंत सोफ्टवेर वाला पुण्यात का कंपनी काढतो? त्याला विदर्भात लोक मिळत नाहीत का? विजय भाटकर नागपूरचे. पण पुण्यात का राहावे लागते? कुठे तरी मूळ तंत्रज्ञान पुण्यात होते आणि संधी होत्या म्हणूनच. असे मूळ तंत्रज्ञान कुठेहि निर्माण होऊ शकते. ते तिकडे का केले जात नाही हा पश्चिम महाराष्ट्राचा दोष नाही.
chaitanya wingkar
Mar 23 (3 days ago)
to Sunil
तंत्रज्ञान सर्वाना समान आहे.पण ग्रामीण भागासाठी शेतीची उपकरणे तयार करणारे किर्लोस्कर कुठे तयार झाले? भारत फोर्ज कुठली? अशा किती कल्पना तिकडे तयार झाल्या? नागपूर चा पर्सिस्तंत सोफ्टवेर वाला पुण्यात का कंपनी काढतो? त्याला विदर्भात लोक मिळत नाहीत का? विजय भाटकर नागपूरचे. पण पुण्यात का राहावे लागते? कुठे तरी मूळ तंत्रज्ञान पुण्यात होते आणि संधी होत्या म्हणूनच. असे मूळ तंत्रज्ञान कुठेहि निर्माण होऊ शकते. ते तिकडे का केले जात नाही हा पश्चिम महाराष्ट्राचा दोष नाही. कापूस पिकतो विदर्भात पण कापूस एकाधिकार योजना बनवायला पश्चिम महाराष्ट्राचा सहकार मंत्री व्हावा लागला तेव्हा ती योजना झाली. कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योगाच तिकडे नाहीत. संत्री, कापूस बाहेर पाठवावा लागतो यांना. उलट इचलकरंजी मध्ये कापूस पिकत नसताना प्रक्रिया केंद्र उभी केली ती बुद्धीच्या जोरावर.
४) मुलभूत क्षमता:
प्रत्येक प्रदेशाची मुलभूत बलस्थाने आणि कमतरता असतात. त्याचा योग्य वापर करणे राज्यकर्त्यांना जमावे लागते. उदा. गोव्याला निसर्ग आहे म्हणून पर्यटन व्यवसाय आहे.कोकणात का नाही एवढा व्यवसाय? कारण तशी दृष्टी नाही. राजस्तान आणि गुजरात कडे पाणी नाही पण एकाने इंडस्ट्री आणि दुसर्याने पर्यटन विकसित केले. पश्चिम महाराष्ट्रात आज उस, साखर, गुळ, हळद, द्राक्षे, डाळिंब, दारू, सोफ्टवेर, मेटल-कास्टिंग, चादर आणि टेक्स्तैल असे अनेक उद्योग आहेत. नाशिक ला द्राक्ष होतात, कोकणात आंबे, नागपूर ला संत्री. मराठवाड्या बद्दल असे एक प्रोडक्ट सांगू शकाल? ज्या-त्या भागातील मुलभूत क्षमता ओळखून विकास करणे गरजेचे आहे. पाणी नसताना पण उसाच लावू हा अट्टाहास मराठवाड्याने का केला? स्वताच्या क्षमता माहित नसताना केवळ पैशासाठी हे उद्योग केलेत. मुद्दा हा आहे कि स्वताची बलस्थाने आणि कमतरता लक्षात घेऊन उद्योग उभारणी केली पाहिजे.
५) इतर घटक:
कला-क्रीडा, मनोरंजन हि क्षेत्रे पण याला अपवाद नाहीत. सांगली नाट्य पंढरी आहे. कोल्हापूर हे कलापूर आहे.पुण्या मध्ये शास्त्रीय संगीत खोलवर रुजले आहे. अनेक कुस्तीपटू, धावपटू, स्वीमर्स, मल्लखांब खेळाडू, क्रिकेटर, बेड्मिन्तन, कब्बडी अशा अनेक खेळातील दिग्गज हे पश्चिम महाराष्ट्रात होतात ते त्यांच्या जिद्द आणि चिकाटीवर. अनेक गरीब कुटुंबातील मूल केवळ जिद्दीवर पुढे जातात. विदर्भ मराठवाड्यात खरा Deficit हा या जिद्दीचा आहे. दूरदृष्टीचा डेफ़िसिट आहे.
वेगळे केल्याने या दृष्टीकोनात फरक पडायची काहीच शक्यता नाही. महाराष्ट्राच्या पैशावर या प्रदेशांना थोडातरी आधार मिळेल नाहीतर इथले नादान राज्यकर्ते लूट माजवतील हे आज पर्यंतच्या राजकीय इतिहासावरून स्पष्ट आहे.
भाजपवाल्यांना हि महाराष्ट्राची नस सापडलेली नाही. शरद पवारांना हे पक्के माहित आहे म्हणून एवढे वर्ष सत्ता टिकवू शकले. हि पार्श्वभूमी विसरून भाजप काही उलटे करेल तर पुढे यश मिळायची शक्यता कमी आहे
26 Mar 2016 - 1:47 pm | अभ्या..
मनापासून मांडलेय सारे. बर्याच त्रुटी पण आहेत मराठवाड्याच्या आकलनात. उसाचा अट्टाहास हा मुद्दा सोडता जिद्द वगैरे कुणा एका प्रांताची मिरासदारी नसते. मराठवाड्याने निजामाशी जिद्दीनेच टक्कर देऊन मराठवाडा मिळवलाय. कित्येक मराठवाड्याचे लोक पुण्यामुंबईत जाउन यशस्वी झालेत. तेंव्हा जिद्द हा मुद्दा बाजूला ठेवा. दूरदृष्टीचे नेते लाभले नाहीत असे म्हणू शकतो. त्यामुळे भागाचा विकास, इन्फ्रास्ट्रक्चर आदी गोष्टी नाहीत अॅव्हेलेबल. विकास म्हणजे पुण्यामुंबईसारखेच मोठमोठे रस्ते, उड्डाण पूल, कंपन्यांचे चकचकीत आउटलेट, मॉल्स हे नव्हे. आणि तो तसा होऊ पण नये. प्रत्येक भागाची एक संस्कृती असते, त्या संस्कृतीला डोक्यात ठेउन दूरदृष्टीने विकास घडवण्याच्या एवजी राजकारण्यानी एकगट्ठा मतपेटी अशा दृष्टीने पाहिले. त्याचे दुष्परिणाम आज विदर्भ अन मराठवाड्याची जनता भोगतेय.
26 Mar 2016 - 3:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
स्वाम्या,
कामं नोत का तुले इचिभना!!!
अब्यास कर ना सायच्या!! आईएएस व्हाचं न तुले?
बापा काय इषय काळतं रे! इथं लेका मी बी प्रांतवादी सैनिक ठरतो!! तुयं लॉजिक कौन आइकन!!! सब्बन मोठे लोकं रायतेत अटीसा!!
26 Mar 2016 - 4:29 pm | ए ए वाघमारे
काहून फडफड करून र्हायले बाप्पू !
सब्बन मोठे लोकं रायतेत अटीसा!! हे कम सही बोल्ले भाउ. आपन आपलं चुपचाप कोपर्यात बसाव, मजा पहाव आनि टाईम आला की हळूचकन एक जोर्दार रट्टा हानाव.
26 Mar 2016 - 5:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
आपन आपलं चुपचाप कोपर्यात बसाव,
थेच तर नळते न भाऊ!!! आपुन अकोल्याचे लेकरं!आपल्याले दलिंद्री ज्यमत ना न भाऊ!! छाती ले माती अन नेमक्या जागी खुटे हाच आपला तेटरपना!! इकळे नथी मांगून तीर मारनारे भेटले म्हणून येणे सोल्डले अटीसा!!
26 Mar 2016 - 5:29 pm | ए ए वाघमारे
टाईम आला की हळूचकन एक जोर्दार रट्टा हानाव.
हे नाइ वाचलं वाट्टे तुमी. आता रट्टे हानायचा टाइम आला हेच तं सांगून राहलो मी राजेहो.
देवेंद्रभाउ अन नरेन्द्रभाऊ गळबळ करते वाट्टे २०१८त.
26 Mar 2016 - 4:41 pm | स्वामी संकेतानंद
आलास सायच्या!! अब तुम लढो हम कपडे संभालते है!
26 Mar 2016 - 4:47 pm | अभ्या..
लढा बाप्पू. आमी हावोत पाठिंब्याला.
निंघाला गर्दीत टांगा तर मराठवाडा बी निघन आल्लाद. ;)
26 Mar 2016 - 5:06 pm | कैलासवासी सोन्याबापु
आभारी हाय जनु मंडळ आपले! पर इच्छा नाही आता! ह्या स्वाम्या सारखे मित्र धागे टाकते झाले तर पसरतो बाकी जागी बोलायची इच्छा नसते!
26 Mar 2016 - 5:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
लाज वाटते का फोकन्या स्वाम्या!!
हरामखोरा मेगाबायटी धागे कहाड़तो अन नेमक्या जागी मले म्हावरे करतं काय चोट्ट्या सायच्या !! :D
26 Mar 2016 - 4:46 pm | संदीप डांगे
सगळे प्रांतवादी आले म्हणून आम्हालाही यावंच लागेल.
त्या सब्बन मोठ्या लोकाईच्या बैलाला होssssss
ज्यांना आपला इथला वावर आवडत नाही त्यांच्या बैलाला होssssss
26 Mar 2016 - 4:51 pm | अभ्या..
काय संदीपान्भो. दोन दिस लेट केलात जणू.
लै गिराइक होतं धुळवडीला. कट्टाळून सोडून दिलं.
जौ दे.
तवा न बोंबलाणार्याच्या बैलाला होssssss
26 Mar 2016 - 4:56 pm | संदीप डांगे
आरं बाबा. हिथं नाशकात हाय बाकी अजून धुळवड. ती असते पंचमीला. अजून आमची धूळवड सुरुच झाली नाही.
तुम्ही चालू ठेवा आम्ही आहोत बोंबा मारायला. ;-)
26 Mar 2016 - 5:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
आळवे भांदले सारे ;)
26 Mar 2016 - 6:43 pm | गॅरी ट्रुमन
लेख प्रचंड आवडला आहे.
महाराष्ट्राचा भाग असण्यापेक्षा स्वतंत्र राज्य केल्यामुळे प्रशासनिक/आर्थिक/सामाजिक फायदे होणार आहेत का एवढाच स्वतंत्र विदर्भ करावा की नाही हे ठरविण्याचा मापदंड हवा. फुकाच्या मराठी बाण्यांना अगदी फाट्यावर मारावे. हे असले बाणे मातोश्री आणि कृष्णकुंज या ठिकाणच्या डेमॉगॉगच्या राजकारणाला साजेसे आहेत. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी या असल्या भावनिक लढाईमध्ये न पडलेले श्रेयस्कर.
स्वतंत्र विदर्भ झाला तरी भारत-पाकिस्तानसारखी फाळणी थोडीच होणार आहे? विदर्भ हे भारताचेच एक राज्य म्हणून राहणार आहे ना? मग काय फरक पडणार आहे विदर्भाचे वेगळे राज्य झाले तरी?
26 Mar 2016 - 7:06 pm | तर्राट जोकर
प्रचंड सहमत. वेगळा न करताही विदर्भावर झालेला अन्याय दूर करता आला तर काही हरकत नाही.
27 Mar 2016 - 12:40 am | काळा पहाड
नको नको. वेगळाच करा काय ते एकदाच.
26 Mar 2016 - 7:51 pm | हेमंत लाटकर
वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे.
26 Mar 2016 - 7:55 pm | हेमंत लाटकर
वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे!
27 Mar 2016 - 2:03 pm | सातारकर
वरती बरेच जणांनी अस म्हटलं आहे की वेगळ राज्य मागत आहेत, वेगळ राष्ट्र नाही.
मला दोन्ही मधला गुणात्मक (qualitative) फरक जाणून घ्यायचा आहे. व्हिसा लागेल वगैरे माहित आहे, पण बाकीच्या राज्यामुळ प्रगती होत नाही (किंवा बाकीच राज्य करू देत नाही) हा नियम असाच्या असा दोन्हीकड लागू होतोच की.
शिवाय त्या जनतेला ठरवूद्या, इतरांनी नको हे देखील काही जणांनी म्हटलं आहे. हाच न्याय काश्मीर ला का लावू नये?
27 Mar 2016 - 3:05 pm | स्वामी संकेतानंद
लावायला हरकत नाही पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ते भारताला परवडणार नाही असे वाटते!
27 Mar 2016 - 4:27 pm | सातारकर
म्हणजे भारताला त्रास होउ नये म्हणून आपण तो आपल्या मांडीखाली दाबून ठेवला तरी चालेल अस म्हणण आहे स्वामींच.
28 Mar 2016 - 6:50 pm | स्वामी संकेतानंद
माण्डीखाली दाबणे चुकीचा शब्द आहे. आणि राष्ट्र आणि राज्य दोघांचे गणित वेगवेगळे असते.
27 Mar 2016 - 3:16 pm | सोत्रि
हेच तर कन्हैय्या आणि पार्टी म्हणत होते की मग! पण ते देशद्रोही ठरले.
तोच न्याय तुम्हालापण लावावा काय?
- (स्वयंघोषीत देशभक्त) सोकाजी
27 Mar 2016 - 3:25 pm | स्वामी संकेतानंद
वाहवा!
सोत्रि आले! फटाके फोड़ूच..पण आमच्या धाग्यातल्या विषयावर पण बोललात तरच! :P
27 Mar 2016 - 5:22 pm | सोत्रि
विषयावर नाना स्काॅच यांनी जे काही तारे तोडलेत त्याच्याशी सहमत आहेच!
-(स्काॅचप्रेमी) सोकाजी
27 Mar 2016 - 3:33 pm | कैलासवासी सोन्याबापु
ह्या स्वामीच्या धाग्यावरच सगळे सोयरे अन जुने हुच्चभ्रू पुंड का ब्रे भेटत असावेत असा एक प्रश्न माझ्यासारख्या सालस सज्जन मुलाला पडला आहे म्हणे मी!!
27 Mar 2016 - 4:36 pm | स्वामी संकेतानंद
तुले त माहीतच आहे का 'तिकडे' बी सब चर्चा होत रायते..
27 Mar 2016 - 4:31 pm | मित्रहो
मला वाटत भावनिक मुद्द्यांकडे जितके दुर्लक्ष करता येइल ते योग्य. जेंव्हा प्रश्न सोडवायचे नसतात तेंव्हा भावनिक मुद्दे उचलले जातात. १०७ हुतात्मे, मराठी माणसाचे तुकडे हे तसेच भावनिक मुद्दे आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रामुळे आमचा विकास झाला नाही हे विदर्भातल्या राजकारण्यांची ओरड तितकीच चुकीची आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासारखे आहे.
वेगळा विदर्भ हे आज काय परिस्थिती आहे आणि काय असावी हे बघून ठरावे. कदाचित महाराष्ट्र राज्य आज बरेच मोठे असेल. ठाणे जिल्हा मोठा होता प्रशासकीय दृष्टीने योग्य नव्हते म्हणून पालघर जिल्हा केलाच ना. तीच गोष्ट चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची. पूर्वी विदर्भातल्या लोकांचे रोटीबेटीचे व्यवहार मध्यप्रदेश, छत्तिसगड, तेलंगणातल्या लोकांशी व्हायचे आजही होतात. फार फरक पडला नाही. इतर महाराष्ट्र सोबत रोटीबेटीचे व्यवहार पूर्वी व्हायचे, आज होतात, पुढेही होत राहतील.तेंव्हा भाषा, संस्कृती असले मुद्दे बाजूला सारुन प्रशासकीय सोय, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था या मुद्द्यांकडे बघून विदर्भ किंवा इतर कुठलेही राज्य बनवताना करायला पाहीजे. राज्य वेगळे झाले म्हणून ना भाषा बदलत ना संस्कृती.
28 Mar 2016 - 3:00 pm | चिगो
हेच म्हणतो, भाऊ..
28 Mar 2016 - 5:20 pm | सतीश कुडतरकर
एक अडाणी प्रश्न!
महाराष्ट्राच्या पश्चिमेला भौगोलिकदृष्ट्या कोकण आहे. मग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर विभागाला पश्चिम महाराष्ट्र का म्हणतात? :-)
28 Mar 2016 - 6:51 pm | स्वामी संकेतानंद
कारण कोंकण 'कोंकण' आहे..