मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

मुक्त विहारि · · काथ्याकूट
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचन 367024 प्रतिक्रिया 0