आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी . डोक्याला मुंडास अंगात बनियन आणि खाली पंचा असा त्याचा पोशाख असायचा . शेतीची आणि कलमाची सगळी काम बघणे तसाच गुरांकडे बघणे हे त्याचे मुख्य काम . खर तो आजच्या भाषेत सांगायचे तर manager होता . त्याच्या हाताखाली कमीतकमी २ ३ जन कामाला असायचे आणि त्यांच्याकडून सगळ काम व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे करून घेण हि त्याची जबाबदारी आसायाची . अजिबात न शिकलेल्या या माणसाच डोक मात्र अजब चाले . शेती संदर्भात कोणतेही निर्णय घेण्याची त्याला मुभा असे . उलट कधी बाबा काका काही वेगळ म्हणाले तरी तो त्याचं ऐकत नसे . नांगरणी कधी कारायची , कोणती मानस सांगायची , कोणत खत आणायचं इथपासून कोणाला किती मजुरी द्यायची हे सगळ तोच ठरवी . या बदल्यात त्याची पगाराव्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा नव्हती . रोज सकाळ संध्याकाळ आमच्याकडे जेवायला असायचा . त्याची बायको सुद्धा सकाळी घरी कामाला येई . आंब्याच्या बाबतीत तो फारच काटेकोर असे . माझे बाबा आणि गुण्यादादानि मिळून आमची आमराई लावली , फुलवली होती . त्याच्या दृष्टीने ती आमराई हेच त्याच घर असे . एक मात्र होत त्याचा काकांपेक्षा माझ्या बाबांवर जीव जास्त होता . अर्थातच त्याला कारणही तसाच होत . बाबा सुद्धा त्याला मोठ्या भावाप्रमाणे वागवायचे . गणपती दिवाळी आणि शिमगा त्या सणांना त्याला महिण्याचा पगार जास्त द्यायचे . आपल्याप्रमाणे त्यांच्याही घरी आनंदाने सन साजरा होऊ दे असे त्यांचे म्हणणे असायचे . आजी आईसुद्धा सणासुदीला गोड धोड केले कि आमच्याप्रमाणे दुपारी त्यांच्याही ताटात वाढत . शिवाय मुलांसाठी न्यायला वेगळी पुडी बांधून देत . आई नेहमी म्हणायची आपण खाल्यानंतर आपली भांडी घासताना त्यांना आपण काय खाल्ले याचा अंदाज येणार आणि आपल्याला मिळाले नाही याच दुखः होणार . त्यापेक्षा देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही मग त्यानाही दिल तर उलट दिल्याच समाधान मिळेल . पगार हा आपण देतोच पण अशाप्रकारच देन घेण त्यांच्या जास्त लक्षात राहत .त्यांच्या कधी अडी अडचणीला लागले तर बाबा लगेच पैसे काढून देत . घरात चार चाकी गाडी असल्याने कधी लागली तरी त्यांच्यासाठी गाडी काढायला पण बाबाची ना नसे . आंब्यांच्या बाबतीतही हीच कथा . आंब्याची शेवटची काढणी झाली कि मग सगळ्यांना आमराईत एकदा जेवण . गरम मसाल्याची आमटी भात आणि भरपूर आमरस . अगदी सगळ्या गड्यांच्या मुलांसकट सगळ्यांना जेवण . शिवाय गुण्यादादाला दरवर्षी 50हापूस ani 50 इतर प्रकारचे आंबे बाबा देत असत . गुण्यादादा शेताला कुंपण घालीत असे ती बघण्यासारखी असे . माडाच्या झावळ्या आणि बाकी झाडाचा पाला मिळून तो सगळीकडून गच्च कुंपण उभारत असे . एकदा दादा आंब्यावर चढला असताना फांदी मोडून तो खाली पडला तर गुण्यादादाने त्याची चौकशी काराय ची सोडून आधी झाडाची फांदी मोडली म्हणून ओरडून घेतालन . इतका तो झाडांना जपायचा . कधी घरातल्याच लग्नकार्यासाठी सर्वाना घराबाहेर पडण आवश्यक असे तेव्हा गुण्यादादाला घरी राहायला बोलवत असत . घर त्याच्या ताब्यात देऊन सगळे निश्चिंत मने बाहेर पडत . (अर्थातच जाण्याआधी गुण्यादादासाठी जेवणखाण्याची व्यवस्था करूनच )
आज गुण्यादादाचा मुलगा आमची सगळी शेती बघतो . कृष्णा नाव त्याच . तो अगदी गुण्यादादाच्या पावलावर पाऊल ठेवून आमची आणि शेतीची कलजी घेतो . गुण्यादादा मला "बयो" म्हणून हाक मारायचा कृष्णासुद्धा मला "बयो" च म्हणतो . गेल्यावर हातात पैसे ठेवयला बघितले तर हात आखडून घेतो . मला म्हणतो आम्ही लेकीकडून नाही घेत . तुझा बाबा देतो तेव्हढ पुरत मला . मग काहीतरी निमित्त काढून मी तेच पैसे त्याच्या मुलांच्या हातावर ठेवते . त्याला अवघादाल्यासारख होत . पण यानेच त्याच्या लहानपणासून आमच्या बागेकडे शेतीकडे लक्ष दिले मग थोड तरी उतराई व्हायला हव ना ?
प्रतिक्रिया
20 Apr 2014 - 1:09 am | यसवायजी
स्वागत. पु.ले.शु.
20 Apr 2014 - 1:19 am | खेडूत
पहिला लेख आवडला. लवकर आटोपता घेतलात असं वाटलं.
काम करणारया माणसाना पारखून घेणं, घरगुती वागणूक देणं आणि आयुष्यभर जोडून ठेवणं- ही कला आमच्या पेक्षा आधीच्या पिढीत जास्त होती असं वाटतं.
(गुण्यादादाच्या शोधात असलेला)खेडूत
20 Apr 2014 - 1:43 am | शुचि
मालविका, आपन रेखाटलेले गुण्यादादाचे शब्दचित्र मला मनापासून आवडले. विशेषत: त्याना देण्यात येणारी आपुलकीची व सन्मानाची वागणूक मनाला भावली. आपले मिपावाराती स्वागत आहे. पुलेशु.
20 Apr 2014 - 2:02 am | प्रभाकर पेठकर
लेखन आवडले.
20 Apr 2014 - 7:36 am | अत्रुप्त आत्मा
क्लाsssस!!!
20 Apr 2014 - 8:44 am | बहुगुणी
मिपा वर स्वागत.
20 Apr 2014 - 8:49 am | पैसा
छान लिहिलंय. असे गडी पाहिले आहेत. ते गडी म्हणण्यापेक्षा घरातला सदस्यच असायचे.
20 Apr 2014 - 8:57 am | स्पंदना
आमच्याकडचे "गणपू दादा, बाळु दादा" एक एक गोष्ट त्यांच्या शिवाय हलत नसे.
मजा म्हणजे हल्ली वडिलांनी शेती सोडली, आता भाऊ बघतो. तर वडिल रोज जाऊन बाळु दादांच्या घरात संध्याकाळ घालवायचे. त्यांच्याशी गप्पा मारत टिव्ही पहात, बर्याचदा तेथेच जेवुन परत.
पण बाहेर्च्या लोकांना हे संबंध समजण मुश्किल असत. त्यांना या नात्याच नाव फकत दिसतं. त्या आडचे गुंफलेले सहज सुंदर नात्यांचे गोफ नाहीत दिसत.
20 Apr 2014 - 8:53 am | आतिवास
लेख आवडला. थोडा सविस्तर अजून आवडला असता.
21 Apr 2014 - 4:41 pm | मालविका
माझ्या पहिल्याच लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद . आपण केलेल्या सूचनांचे नक्की पालन केले जाईल. असेच मार्गदर्शन अपेक्षित आहे. पुन्हा एकदा धन्यवाद .
21 Apr 2014 - 5:21 pm | ऋषिकेश
छान
व्यक्तीच्या भोवतालच्यांच्या वर्णनासोबत, स्वतः व्यक्तीचेही वर्णन आले असते तर अजून आवडले असते. पुलेशु
लिहित रहा!
23 Apr 2014 - 4:17 am | अर्धवटराव
अवांतरः एखाद्या गुण्यादादाने स्वतः किंवा आपल्या मुलाने स्वतःची शेती करायची तयारी केली असती तर त्याचं कौतुक झालं असतं का? शेती विषयक एव्हढं ज्ञान मिळवुन गुण्या शेवटपर्यत गडी म्हणुनच जगतो.
माझा एक बिहारी मित्र आहे. स्वतः मस्त आयटी च्या मार्गाने अमेरीका वारी करतो. आणि त्याची तक्रार काय, तर त्यांची शेती सांभाळायला गडीमाणसं मिळत नाहित. म्हणे कि सब सालोको शहर जाके बाकि धंदे करनेका इंट्रेस्ट है. हे महाराज स्वतःला क्षत्रीय म्हणवतात. बापजाद्यांकडुन अफाट शेती चालत आलि घरी. हे शहरात राहणार, आधुनीक व्ययसाय करणार. आणि यांना इमानी गडी हवेत शेती सांभाळायला.
23 Apr 2014 - 10:14 am | सुबोध खरे
मान गये.
असेच माझी आजी म्हणत असे.आमच्या पानात जे अन्न असे तेच अन्न आमच्या गड्यांच्या पानात असे हे मी बघितलेले आहे.
उत्तम लेख लिहित्या रहा
23 Apr 2014 - 8:15 pm | शुचि
मलादेखील हा मुद्दा फार आवडला. किती माणुसकी अन चांगले संस्कार दर्शवितात.
23 Apr 2014 - 12:59 pm | दिव्यश्री
मस्त लिहिलंय ... आवडलं . :)
कोणतही नात हे दोन्ही बाजूने तितकीच आपुलकी , जिव्हाळा असेल तरच टिकत .
23 Apr 2014 - 2:31 pm | ब़जरबट्टू
मी पयला हाये, लेख वाचणारा.. ह्य ह्य.. कालच तुम्हच्या खरडवहीत वाचला नव्ह.. :)
तेथे नसतात ठेवायचा... :))
23 Apr 2014 - 2:31 pm | मृत्युन्जय
छान जमलय. थोडेंस छोटे जमलय फक्त
23 Apr 2014 - 4:11 pm | मदनबाण
लेखन आवडले. :)