दिलीप कुमारचे एवढे जबरदस्त काम क्रांतीमधे झालेले आहे की केवळ त्याच्याबद्दलच्या आदराने बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे (सुरूवातीलाच एक संवाद म्हणताना तो स्वतःच्या मुलाला कडेवर घेताना किंचित हसतो, हे इम्प्रोव्हायझेशन नक्कीच त्याचे असणार. असे अनेक सीन्स आहेत), पण हळुहळू इतर जण त्याला वरचढ होतात :). लक्ष्मीकांत प्यारेलाल ची काही श्रवणीय गाणी आहेत ("लुई शमाशा उई" जर स्वतंत्रपणे ऐकले तर "vintage LP" आहे - मस्त ठेका आणि त्याहून जबरी लताचा आवाज), काही गाण्यांतील जमून गेलेली देशभक्तीपर वाक्ये, अशा काही genuine moments चित्रपटात नक्की आहेत. त्यात तेव्हाचा हा अतिप्रचंड हिट चित्रपट. एवढ्या लोकांना काहीतरी आवडल्याशिवाय तसे होणे अशक्य आहे. मनोज कुमारच्या सुरूवातीच्या बर्याच पिक्चर्समधली त्याची गाणी नेहमीच मस्त होती. दिलीप कुमारचे काही लंबे संवाद तर जबरी आहेत, विशेषत: जेव्हा तो ओरडून बोलतो. अमिताभएवढी मूळ आवाजाची देणगी नसून सुद्धा दिलीप कुमारची संवादफेक जोरदार आहे. मात्र तो हळू आवाजात बोलू लागला की तोंडातल्या तोंडात बोलतो. थिएटर मधे काही प्रश्न येत नसेल पण टीव्हीवर बघताना, आजूबाजूला इतर आवाज येत असताना तो काय बोलतोय ते नीट कळत नाही.
असो. आता जेथे क्रेडिट ड्यू आहे तेथे ते दिल्यावर या चित्रपटातून दिग्दर्शकाला अप्रत्यक्षरीत्या काय संदेश द्यायचा होता आणि जो इतकी वर्षे कोणालाच कळाला नाही, आणि केवळ चित्रपटसृष्टीचा शोध नंतर लागल्याने भारतीय स्वातंत्रलढ्याचे नुकसान झाले, तो पाहू:
-----------------------------------------------------------
सिंपल! इंग्रजांना उल्लू बनविणे एवढे सोपे होते हे गांधीजींपासून ते सशस्त्र क्रांतिकारकांपर्यंत कोणालाही कसे कळाले नाही? हिंसक किंवा अहिंसक दोन्ही उपायांव्यतिरिक्त एक बॉलीवूडी उपाय होता असे सिद्ध झालेले आहे. क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देणार असतील तेथे "फेरीवाल्यांस सक्त मनाई" वगैरे नसल्याने तेथे चणे विकायला जायचे. त्या चण्यांत विषासारखे काहीतरी घातलेले असेल हे त्या "गोर्या बंदरां"ना मुळात कळत नाही, एवढेच नव्हे तर "मेरा चना खा गया गोरा/खाके बनगया तगडा घोडा..." किंवा "मेरा चना... गैरोंके सर को फोडेगा" ई. ऐकून सुद्धा काहीतरी गडबड आहे हे लक्षात येत नाही. बांधलेले लोक व हे नंतर उपटलेले फेरीवाले एकमेकांना डोळे मारतात तो भारतीय परंपरेचा एक भाग असावा असा बहुधा इंग्रजांचा समज असतो. म्हणजे लोक एकमेकांना भेटले की नमस्ते करतात तसे काहीतरी. फेरीवाल्यांमधे हीरॉइन्सही असतात. त्या जनतेकडे असलेल्या कपड्यांच्या चणचणीचे प्रतीक असतात. हे सगळे नाचताना इंग्रज दंग झाले की बांधलेल्या लोकांना सोडवून घेऊन जायचे.
अशा एका गाण्याच्या सुरूवातीला हेमा आरशात बघते हा वरकरणी शॉट, पण बाकी पडदा तिचा लोकांना दाखवायचा भाग व्यापून टाकतो. व पूर्ण गाणे तिचे आवश्यक त्या कोनातून घेतलेले शॉट्स दिसत राहतात. मग हळूच मनोज कुमार कडे कॅमेरा. "मेरा चना खा गये गोरे..." म्हणताना त्याचा चेहरा पाहून हे प्रतिकात्मक वर्णन नसून खरेच त्याचे चणे कोणीतरी पळवले असे वर्णन करतोय असे वाटते. हळुहळू एक एक सैनिक बेशुद्ध पडायला लागले तरी इतरांना अक्कल येत नाही आणि ते तसेच चणे खात राहतात.
मनोज कुमारची एण्ट्री तशी आधीच होते. पण त्याला एण्ट्रीगिरी करायला वेळ दिलेला नाही. एखादे एण्ट्रीवाले जोशपूर्ण गाणे नितीन मुकेशच्या आवाजात म्हंटले तर लोकांचा हा नक्की जहाल गटातील आहे की मवाळ याबद्दल गोंधळ निर्माण होईल म्हणून ते कट केले असावे. तिकडे करीम खॉ (शत्रुघ्न) ला तोफेच्या तोंडी देणार असतात, त्याची सुटका करायची असते. तेथे एक गाणे. परवीन व सारिकाचा डान्स. तेवढ्यात तोफांमधे भलतेच काहीतरी भरले जाते. पहिली तोफ उडते तर करीम खॉ च्या अंगावर एक हारच जाऊन पडतो. मग "दूसरी तोप उडा दो" वगैरे होते. तर त्यातून फुले पडतात. मग तिसरी, तर त्यातून सगळीकडेच स्फोट होतात व सगळे क्रांतिकारक पळून जातात.
क्रांतिकारकही असे की शत्रूच्या मनात धडकी भरलीच पाहिजे. सगळ्यात तरूण तडफदार लीडर नितीन मुकेशच्या आवाजात "लुई शमाशा उई, उई उई उई उई" किंवा "मितवा, तेरे बिना, लागे ना रे जियरा" अशी गाणी गातो. तो पूर्वेला असेल व तो ज्याच्याशी बोलतोय ती व्यक्ती पश्चिमेला उभी असेल तर उत्तर किंवा दक्षिणेकडे बघत नाकावर बोट ठेवून तोंडातल्या तोंडात बोलतो.
हे सर्व साधारण १८२५-१८७५ मधे घडते. रामगढचा कोणीतरी राजा असतो. प्रेम चोप्रा त्याचा मेहुणा व प्रदीप कुमार असाच कोणीतरी. शशिकला त्याची बहीण. शशिकलाला मुलबाळ वगैरे नाही हे कळाल्यावर मग चित्रपटात निरूपा रॉय कशाकरिता आहे हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे हा नुसता मल्टीस्टारर नाही तर मल्टी-मॉ-स्टारर आहे. कारण जिचा मुलगा हरवतो ती, जिला तो मिळतो ती, हे सगळे facilitate करणारी तिसरी (सुलोचना), व मनोज कुमार जिच्याकडे वाढतो ती अशा अनेक मॉ यात आहेत. निरूपा रॉय ची दोन मुले बिछडतात ("Not Again!", असे ती नक्कीच म्हणाली असेल) - एक क्रांतिकारक बनतो तर दुसरा इंग्रजांच्या बाजूचा "सेनापती".
पण शशिकलाचे वर्णन करताना राजा "तीन बार इसे मॉ बननेका मौका मिला, मग ये मॉ न बन सकी....इस बार...वरना इसके पती, फतेहगढके महाराज चंपकसिंगजी दुसरी शादी कर लेंगे (तेथे एक 'महाराज' मिशी पिळताना दाखवलाय)" असे सांगतो. तिला मूल नाही ही माहिती प्रेक्षकांना बास आहे की. बाकी डिटेल्स कशाला? का तसे सांगितले नाही तर तिच्या फेक नवर्याची त्या फेक फतेहगढ मधे हेटाळणी होणार आहे?
रामगढ मधला राजा इंग्रजांना बंदर वापरायची परवानगी देतो पण दारूगोळा आणायचा नाही या अटीवर. मग ती मोडली जाते तेव्हा त्याचा विश्वासू सैनिक दिलीप कुमार त्याला सांगायला येतो, तर प्रेम चोप्रा व प्रकु त्याला त्या महाराजांच्या खुनात गोवतात.
दिलीप कुमारला फाशी द्यायचे ठरते. पण मधे थोडा वेळ त्याला जेल मधे ठेवतात. तेथे बरेच डॉयलॉग मारून प्रेमचोप्रा निघून जातो पण आपली पिस्तुल विसरतो. नियमाप्रमाणे ती पिस्तुल जेथे ठेवलेली असेल तेथे जेमतेम पोहोचता येइल अशी उपकरणे दिलीप कुमारला उपलब्ध असतात. मग तो तेथून पळून जाताना त्याच्या होडीवर स्फोट केला जातो व तो मेला असे सगळे समजतात. तिकडे निरूपा रॉयला दुसरा मुलगा होतो. पण लहान मुले व म्हातार्यांना इंग्रज मारत असल्याने निरूपा रॉय त्याला एका टोपलीत ठेवून पाण्यात सोडून देते. मला वाटले की पुढे जंगल बुक मधे सापडलेला तो मोगली हाच की काय. पण नाही. वाहते पाणी जसे खाली जायचा सर्वात सोपा मार्ग शोधते, तसे चित्रपटातील हरवलेली बाळे ज्यांना बाळांची जास्त गरज आहे अशा ठिकाणी आपोआप जातात. त्यामुळे ती टोपली शशिकलाच्या (वरच्या मॉ-मौका फेम) गॅलरीतून सहज दिसेल असे वाहात येते.
नंतर बरीच वर्षे हे सगळे जवळपासच राहात असतात. पण कोणी आपले कुटुंब शोधायचा प्रयत्न करताना दिसत नाही. दिलीप कुमारचा इतर सैनिकांबरोबर राहिलेला मुलगा मनोज कुमार होतो. टोपलीतील बाळ शशी कपूर होतो. तो एकदा दरबारातील फिरत्या माशाला बरोबर बाण मारल्याने त्या राज्याचा सेनापती होतो (म्हणजे त्या राज्यात युसूफ पठाण कॅप्टन झाला असता ना?). दिलीप कुमार चे धोरण म्हणजे हजार इंग्रजांना धडा शिकवण्याआधी लाख फितुरांना शिक्षा द्यायची. (पण हे थोडे आईसक्रीम खाताना वितळलेला भाग आधी खात बसण्यासारखे नाही का?). मनोज कुमारचा 'हातवारे अभिनय' समजून घ्यायला मात्र अजून बरेच त्याचे चित्रपट पाहावे लागतील. नक्की कधी "आउट" सारखे एक बोट वर करून हात धरायचा, कधी आपल्या तोंडासमोर कोपरात वळवून अर्धा चेहरा दिसेल असा धरायचा, कधी दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत मिसळून खांबावर हात टेकवायचे, बोलताना कधी नाकावर हात धरायचा, तर कधी चार बोटे तोंडावर धरायची, याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे. नाहीतर दिलीपकुमारच्या अभिनय शाळेत हा फक्त पी.टी.च्या तासालाच हजर होता असा समज व्हायचा.
त्याच्या डायरेक्शनचा तर स्वतंत्र अभ्यासविषय होईल. मरणारा एक क्रांतिकारक थेट एका "क्रॉस" वर पडतो. दिलीप कुमारला गोळी लागते तेव्हा बोटीत एक "नन" प्रार्थना करताना दिसते. फाईटिंग चालू असताना मधेच स्क्रीनवर एक कोणीतरी धरलेला क्रॉस येतो. हे डायरेक्शन कळाले नाही. परवीन बाबी ची "सुरीली" जिवंत असतानाच काय पण मरताना सुद्धा तिचे शॉट्स ज्या पद्धतीने घेतले आहेत त्यावरून लक्षात येते की कहानी की माँग पूरी करणे हे एकमेव काम यात हिरॉइन्सचे आहे.
हेमामालिनी ही एक कोणतीतरी राजकन्या. या राज्यात येत असताना तिच्या रथाचे एक चाक निखळते ( शुटिंगच्या वेळेस नक्कीच तिने चुकून "चल धन्नो" म्हंटले असणार. नाहीतरी येथेही ती 'रामगढ' कडेच निघालेली असते). मग तिच्या जागी क्रांतिकाकांच्या गटातली परवीन बाबी जाते व ही क्रांतिकारकांकडे जाते. गंमत म्हणजे ही अदलाबदल झाली नसती तरी काहीच फरक पडला नसता. ज्याला आपण चोर समजलो तो क्रांतिकारक आहे हे लक्षात आल्यावर एखादी नॉर्मल राजकन्या "oh, my bad. it was nice knowing you. चला मी माझ्या राज्यात परत जाते" म्हणून निघून गेली असती. पण हेमा त्याच्या थेट प्रेमात पडते. मग "जिसने रचा संसार है ये उसकी रचना" म्हणजे "लुई शमाशा उई" हे गाणे होते, त्यानंतर "प्यार कर ले घडी दो घडी" हे होते. घडी दो घडी कसले, मधे बराच वेळ हेच होते.
रिकामा वेळ असताना मनोजकुमारला अधूनमधून तलवारीने कोठेतरी कापून आपले रक्त त्या क्रांतीच्या निशाणावर लावायची सवय असते. तसेच एकदा त्याने केले असता हेमा तेथून टपकणारे रक्त आपल्या कपाळावर लावून कोणालातरी नमस्कार करून मोकळी झालेली असते. पण मनोज कुमार जरा तयार नसतो. मग "खाओ कसम..." वगैरे झाल्यावर विमानाच्या खिडक्यांसारख्या एका नेपथ्यातून हेमा व मनोज कुमार यांचे चेहरे एकमेकांकडे सरकताना दिसतात. मग दोनच खिडक्या शिल्लक राहिल्यावर दिग्दर्शकापुढे एक चॅलेंज उभे राहते: १. मनोज कुमार हेमाच्या गळ्यात हात घालतोय असे दाखवायचे आणि २. तो हात त्या छोट्या खिड्क्यांमधून प्रेक्षकांना दिसला पाहिजे हे बघायचे. त्यामुळे तिसरेच कोणीतरी दोघांना एकत्र आणत आहेत असे वाटते. कदाचित निसर्ग निसर्ग म्हणतात तोच असावा. कारण अशा वेळेस निसर्ग आपले काम करतो असे म्हणतात. मग आजूबाजूला एकमेकांवर आपटणारी फुले नसल्याने कॅमेरा वरती जातो. तेथे एक खजुराहो शिल्प उपलब्ध असते. किती द्रष्टे शिल्पकार असतील त्या काळी!
पण क्रांतिकारकांनी खाजगी कामे गुप्तपणे करताना गुहेबाहेर आपले टांगे उभे करू नयेत हा क्रांतीचा पहिला नियम मनोज कुमार विसरतो, आणि पकडला जातो. हेमा "मै तालाब मे नहाने जा रही हू" मुळे तेथे नसते. हेमा तालाबमे, पण कॅमेरा मनोज कुमार वर, म्हणजे स्क्वेअर कट मारल्यावर डीप फाईन लेग ला कॅमेरा नेणार्या एखाद्या क्रिकेट कॅमेरामनने येथे शुटिंग केले असावे. प्रेम चोप्रा मनोज कुमारला मारणार तेव्हढ्यात शशी तेथे येतो व असे ठरते की सर्वांना जहाजावर घेऊन जायचे, गुलाम म्हणून. तेथील वादविवादांमधे स्क्रिपराईटरला सिरीयस writer's block आलेला दिसतो. कारण सुमारे पंधरा मिनीटे मदन पुरी, शत्रुघ्न, मनोज कुमार व हेमा यांचा शब्दकोष कुत्ते, कमीने व हरामजादे यापुढे जात नाही. शेवटी जो सर्वात जोरात किंवा सर्वात जास्त वेळा कुत्ते म्हणेल तो या वादात जिंकला असे समजून प्रेक्षकांनी पुढे जावे.
मग असे ठरते की टॉम ऑल्टर चा दारूचा ग्लास जेव्हा रिकामा होईल तेव्हा सर्वांना उडवायचे (आता मला लक्षात आले अर्धी दारू पिल्यावर सुद्धा 'ग्लास अर्धा भरलेला आहे' असे ऑप्टिमिस्टिक लोक का म्हणतात ते). परवीन व सारिका या अधूनमधून कहानीकी माँग पुरी करत असतात. थोडीफार हेमासुद्धा. टॉम आल्टर तिला व मनोज कुमारला तोफेच्या तोंडी देण्याआधी एक गाणे म्हणायला लावतो पावसात. आता इतक्या वेळचा अनुभव घेऊन सुद्धा त्यांच्या हे लक्षात येत नाही की कोणाला तोफेच्या तोंडी द्यायचे असेल तर आधी गाणे म्हणू देऊ नये, नंतर नक्की काहीतरी गडबड होते. जगावर सोडा, यांनी इंग्लंड मधे सुद्धा कसे राज्य टिकवले त्यांचे त्यांनाच माहीत. मग हेमाचे विविध शॉट्स सर्वांनी बघावेत म्हणून पुन्हा एकदा प्यार कर ले घडी दो घडी होते.
मग "पुराने मंदिर के पीछे" दिलीप कुमार आणि मनोज कुमार यांचा सामना. येथे केवळ तोंडातल्या तोंडात बोलण्यावरूनच हा आपला मुलगा आहे हे दिलीप कुमारने ओळखायला हवे होते. मग तेथे दोघांची फाईट सुरू होते. मग पुन्हा त्याची तलवार, याची तलवार, पहिल्या फटक्यात दोघांच्या तलवारी एकमेकांवर आपटणार, मग दोघांपैकी जो हीरो असेल तो दुसर्याला ढकलणार, मग पुढच्या फटक्यात एकाच्या तलवारीचे दोन तुकडे अशा मार्गाने लढाई चालते. या लढाईत एवढी पॉवर असते की आधी वादळ होते, मग विजा चमकतात, मग पाऊस पडतो आणि शेवटी शशी कपूरही येतो. दोघांना पकडून फासावर उभे केले जाते. तेव्हा ते "चना" गाणे होते.
नंतर प्रेम चोप्राच्या एका काडीमुळे शशी कपूर गद्दार आहे असा दिलीप कुमारचा समज होतो, व त्याला आणून फाशी देण्याचे ठरते. काल आपल्याला क्रांतीत सामील हो म्हणणारा दिलीप कुमार अचानक आपल्याला का गद्दार म्हणत आहे याचे शशीलाही काही आश्चर्य वाटत नाही. उलट तोच स्वतः फास आपल्या गळ्यात लावून घेतो. येथे खरे म्हणजे या एका संवादात काम झाले असते:
शशी: "गद्दार का म्हणून"?
दिलीप कुमार: "मी तुला सोडून दिल्यावर निघून जाताना तू मला मागून गोळी मारलीस"
शशी: "ती मी नव्हे, प्रेम चोप्राने मारली"
दिलीप कुमार: "ओह, ऊप्स! सॉरी. गद्दार पदवी कॅन्सल!"
पण नाही. त्याऐवजी १५-२० लंबेचौडे डॉयलॉग मारले जातात.
मग तेथे मनोज कुमार टपकतो. मग आणखी डॉयलॉग. क्रांतीचे नियम व क्रांतिकारकांनी दिलेल्या वचनांची वैशिष्ठ्ये एकमेकांना सांगितली जातात. मग इंग्रज येतात. त्यांना डॉयलॉगबाजीची सवय नसल्याने एकदम गोळीबार होतो. शेवटी इंग्रजांच्या किल्ल्यावर हल्ला करायचे ठरते. तेव्हढ्यात अजून एक गाणे घालायचे राहून गेल्याचे सर्वांच्या लक्षात येते. त्यामुळे आधीच एक जश्न होतो. तेथे हेमाने "दिलवाले, तेरा नाम क्या है..." अशी सुरूवात केल्यावर मग हजर लोकांपैकी प्रत्येकाचे नाव, गाव, इमान, पैगाम, पॅन नं "क्रांती" हेच आहे असे जाहीर होते. मग जंगी युद्ध होते. बरेच क्रांतिकारक मारले जातात. येथे दिलीप कुमारचा एक मल्टीगन शॉट आहे. म्हणजे सहा बंदुका एकीशेजारी एक लावून एकाच काठीने सगळ्यांचे ट्रिगर तो दाबतो. काठीचा "lever" सारखा उपयोग करून सुद्धा सहाच्या सहा बंदुकांचे ट्रिगर तो एकाच दिशेला दाबू शकतो (रजनीला अजून बरेच शिकायचे बाकी आहे). तसेच एक फुटाच्या अंतराने समांतर उडणार्या सहा बंदुकांतील गोळ्यां मुळे शंभर दीडशे फूट पांगलेले इंग्रज मरतात.
मग मला सर्वात आवडलेला शॉट म्हणजे क्लायमॅक्सला दिलीप कुमार आणि प्रदीप कुमार समोरासमोर येतात तो. दिलीप कुमार त्याला बंदुकीने गोळी मारायच्या आधी बराच वेळ थांबलेला दिसतो. कदाचित विचार करत असेल, "गोली की क्या जरूरत है, तेरे लिये तो मेरी अॅक्टिंग ही काफी है"!
मग येथे फ्लॅशबॅक परत येतो. कुणाल गोस्वामी सुरूवातीलाच दाखवला आहे. तो कॅमेर्याकडे जसा बघतो त्यावरूनच तो मनोज कुमारचा मुलगा आहे हे लक्षात येते. मनोज कुमार पिक्चर्समधे कधीकधी जेव्हा पूर्ण डोळे उघडतो आणि कॅमेर्याकडे बघतो ती नजर तमाम तरूणींच्या हृदयाची धडकन आहे असा पक्का समज झाल्याने कुणालही ही प्रयत्नपूर्वक तसाच बघतो.
मग त्याला ही हकीकत कळाल्यावर त्या माळरानातून तो जी उडी मारतो ती थेट प्रेम चोप्राच्या बेडरूममधे, आणि त्याला तेथेच मारतो. मग युनियन जॅकला उडवून तेथे क्रांती ही अक्षरे हिन्दी व उर्दूतून लिहीलेला झेंडा धनुष्यातून बाणासारखा मारून थेट उभा करतो. मग उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर अशा क्रांतीतून पुढे भगतसिंग ते गांधीजींपर्यंत अनेक लोक कसे पुढे आले वगैरेचा आढावा घेतला जातो. फक्त यातील इंग्रजांविरूद्ध हुकमी जिंकण्याचा "चणे, गाणे व नाचणार्या हिरॉइन्स" फॉर्म्युला पुढच्या लोकांनी का सोडून दिला हे गूढच राहते.
प्रतिक्रिया
6 Mar 2012 - 1:07 am | अर्धवटराव
मनोज कुमारने जर हे परिक्षण वाचलं तर ओम शांती ओम ला तो " फारच सौम्य" म्हणुन क्षमा करेल.
बाकी लक्ष्या बेर्डेचे "आईन्ग " चे प्रेरणास्थान श्री श्री पेंटल बद्द्ल एकही कौतुकास्पद शब्द न लिहील्याने आम्ही फारएण्ड साहेबांचा निषेध करतो ;)
अर्धवटराव
6 Mar 2012 - 3:30 pm | गणपा
अगदी अगदी. :)
बाकी ते "लुई शमाशा उई" हे आजवर 'उई तमाशा उई' असच ऐकत आलोय. (बालपणीच्या मराठी तमाशा पटांचा पगडा दुसर काय?)
6 Mar 2012 - 10:24 pm | प्रास
माझाही हाच समज होता. :-p
बाकी "लुई शमाशा उई" म्हणजे काय हे कळत नै ब्वॉ... :-o
7 Mar 2012 - 1:18 am | अर्धवटराव
आयला...मला पण ते "ऊई" च वाटायचं...
अर्धवटराव
6 Mar 2012 - 1:20 am | रेवती
धन्य धन्य हो फारएन्ड.
फिदीफिदी हसत होते वाचताना.
6 Mar 2012 - 1:27 am | मैत्र
__^__
"स्क्वेअर कट मारल्यावर डीप फाईन लेग ला कॅमेरा नेणार्या एखाद्या क्रिकेट कॅमेरामनने येथे शुटिंग केले असावे"
" मग हेमाचे विविध शॉट्स सर्वांनी बघावेत म्हणून पुन्हा एकदा प्यार कर ले घडी दो घडी होते."
"रजनीला अजून बरेच शिकायचे बाकी आहे). तसेच एक फुटाच्या अंतराने समांतर उडणार्या सहा बंदुकांतील गोळ्यां मुळे शंभर दीडशे फूट पांगलेले इंग्रज मरतात."
"एखादे एण्ट्रीवाले जोशपूर्ण गाणे नितीन मुकेशच्या आवाजात म्हंटले तर लोकांचा हा नक्की जहाल गटातील आहे की मवाळ याबद्दल गोंधळ निर्माण होईल म्हणून ते कट केले असावे"
" पण बाकी पडदा तिचा लोकांना दाखवायचा भाग व्यापून टाकतो. व पूर्ण गाणे तिचे आवश्यक त्या कोनातून घेतलेले शॉट्स दिसत राहतात"
दंडवत !! फारेन्ड कोहली !!
6 Mar 2012 - 2:01 am | भडकमकर मास्तर
:)
बेष्ट
6 Mar 2012 - 2:35 am | आबा
जबरदस्त :)
6 Mar 2012 - 2:37 am | प्राजु
चौफेर फटकेबाजी!!
जाम हसले...!
6 Mar 2012 - 2:43 am | शुचि
=)) =)) =))
मस्त मस्त मस्त
6 Mar 2012 - 2:58 am | मराठे
आवरा !!!! /____/\____\
6 Mar 2012 - 3:25 am | हुप्प्या
सिनेमा परीक्षण ह्या विषयात ही एक क्रांतीच म्हटली पाहिजे! असो. उत्तम परीक्षण.
मनोजकुमारचे उत्तरेकडील माणसाशी बोलताना पूर्व वा पश्चिमेकडे बघणे हे अचूक निरीक्षण. त्याच प्रमाणे ह्याच्या सिनेमाचे शूटिंग करताना कॅमेरामन झोपाळ्यावर बसून हेलकावे घेतात की काय असे वाटते. कॅमेरा अचानक कुठल्यातरी विचित्र दिशेनेच हलत असतो. बहुधा "ते" चणे खाऊनच शूटिंगला बसत असावेत.
असल्या भयानक ष्टोरीची टर उडवू नये म्हणून मनोज कुमार सायनिंगच्या वेळेस एक मोठी जादा रक्कम कलाकारांना देत असेल. नाहीतर असले दिग्गज असली ष्टोरी ऐकून काहीच कसे बोलत नाहीत?
5 Mar 2016 - 11:17 pm | अशोक पतिल
अगदी खुशखुशीत परिक्षण ! हसुन हसुन पुरेवाट झाली !!!
6 Mar 2012 - 4:07 am | पारुबाई
अफलातून
धमाल आली वाचायला
6 Mar 2012 - 4:46 am | निनाद मुक्काम प...
मनमुराद हसलो. अफलातून परीक्षण आहे.
प्रत्येक काळात गल्ल्यावर लक्ष ठेवून ठराविक फोर्मूले व मालमसाला ठासून सिनेमे बनल्या गेले आहेत. व पुढील पिढी त्यांच्या ढीग भर उणीवा काढू शकते.
मी लहान पणी महेश. लक्ष्या . सराफ प्रभूतींचे सिनेमे आवडीने पहिले. आता मात्र त्यांच्या सिनेमांवर विडंबन आले तर हसू येते कारण ते सत्यावर आधारीत असते
पण त्यातल्या त्यात एक समाधान की मनोज कुमार आपल्या सिनेमातून क्रांतीकारांकांचा नेहमी उल्लेख करायचा.उदा
. लंडन मध्ये आल्यावर तो सायरा ला सांगतो ""पहिले मला ती जागा दाखव जेथे उधम सिंह ने आपली शप्पथ पुरी केली"
नेहमी नेहमी ते दे दि हमे आझादी ......
सारखे प्रकार पाहून उबग यायचा
6 Mar 2012 - 6:45 am | ५० फक्त
मस्त लिखाण, अगदी व्यवस्थित मीटर मध्ये बसलेलं, धन्यवाद.
6 Mar 2012 - 8:14 am | मराठमोळा
जबराट!!
=))
धो धो आणि खो खो..
आजपर्यंतचे सर्वात जबरदस्त कॉमेडी परीक्षण.
१ नंबर अमोलभाई.. लगे रहो. :)
6 Mar 2012 - 8:35 am | प्रचेतस
भारीच!!!
6 Mar 2012 - 9:26 am | प्यारे१
टोप्या पडल्या. मस्तच. एकापेक्षा एक 'कोटेबल कोट्स' आहेत.
6 Mar 2012 - 11:59 am | सोत्रि
सहमत!
- (क्लर्कच्या परिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेला) सोकाजी
6 Mar 2012 - 9:34 am | अन्या दातार
हाण्ण तिचायला! मनोज कुमार, दिलीप कुमार या लोकांना कुणीतरी हे वाचायला द्या हो!
6 Mar 2012 - 11:25 am | गवि
अगागागागागा..
पुन्हा एकदा गाफीलपणे हपीसात वाचायला घेतलं आणि स्वतःची वाट लावून घेतली...
हे राम... श्वास कोंडला हसून .. तेही हपीसात गंभीर शांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तोंड दाबून दाबून हसायचं..... छळवाद...
6 Mar 2012 - 5:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अगदी हेच म्हणतो.
गरिबाची नोकरी घालवणार तुम्ही!! :(
6 Mar 2012 - 11:32 am | प्रास
फारएन्डबुवा, आज बहुतेक आम्हाला या पृथ्वितलावरून अन्तर्धान करायचा चंग बांधलाय वाटतं. काय ते स्टोरी-टेलिंग आणि काय ते स्टोरीचं रसग्रहण...! टोटल धम्माल!
आजही कंटाळा आला की यू ट्यूबवर क्रांती आणि क्लर्क हे दोन्ही चित्रपट बघतो. सुमारे तीन मिनिटात पोट दुखून कंटाळा कुठच्याकुठे पळून जातो.
असेच लिहा, धन्यवाद!
6 Mar 2012 - 11:36 am | यकु
______/\______ !!!!
ह. ह. पु. वा.
>>>>मग हजर लोकांपैकी प्रत्येकाचे नाव, गाव, इमान, पैगाम, पॅन नं "
खॉक्!!! खी: खी: खी:
6 Mar 2012 - 12:17 pm | दिपक
=)) =)) =)) हसवुन हसवुन मारणार का भौ !
ह्याच चित्रपटात तोफेला भोकं असतात म्हणुन शत्रुघ्न त्या तोफेवर झोपतो आणि भोकं मिटली जातात. तोफ पेटवली जाते.
6 Mar 2012 - 12:14 pm | सुहास..
किल्लासच !!
6 Mar 2012 - 12:30 pm | डॉ.श्रीराम दिवटे
चित्रपट बाकी फर्मास होता हं! त्याकाळी खूपच गाजला होता म्हणे. एकदाच पाहण्यात आला पण हा लेख वाचून आणखी पडताळणी कराविशी वाटतेय.
6 Mar 2012 - 1:10 pm | चिगो
पुरता मेलोय ही चिरफाड वाचून.. सॉलिड फाडलाय..
हे तर लई खंग्री.. :D
च्यायची त्या मनोजकुमारच्या.. लोकांच्या नजरेत क्रांतीकारकांना पार हास्यास्पद बनवून टाकला त्या येड्याने.
6 Mar 2012 - 1:36 pm | मुक्त विहारि
छान जमला आहे हा लेख....
6 Mar 2012 - 1:58 pm | नगरीनिरंजन
दहावीची परिक्षा संपल्यादिवशी वर्गातले वीसेक मित्र मिळून गेलो होतो क्रांती पाहायला. तेव्हाची मजा हा लेख वाचून पुन्हा ताजी झाली.
धन्यवाद.
सारिका,हेमा आणि परवीनचे काही सीन्स पाहून काहिंच्या भावविश्वात क्रांती झाली होती ;-)
21 Mar 2013 - 10:51 pm | निनाद मुक्काम प...
कॉफी विथ करन च्या एका भागात हेमाने तुला इंडस्ट्री मधील खुपलेल्या गोष्टी कोणत्या असे करन ने आपल्या शैलीत विचारले ,
तेव्हा तिने त्याकाळात काही निर्माते कॅमेरामन च्या मानगुटीवर बसून त्यांच्या सोयीने अभिनेत्रीचा अंगेल टिपायचे व बहुतेक वेळा ह्याची पूर्वकल्पना किंवा माहिती अभिनेत्रीला नसायची , आता करतात कि नाही ते माहित नाही पण आताच्या अभिनेत्रीला त्याचे काही वाटत नसावे,
6 Mar 2012 - 2:20 pm | स्मिता.
फारएन्डचा लेख म्हणून ज्या अपेक्षेने धागा उघडला होता ती अगदी पूर्ण झाली. दिलीप कुमार आणि मनोज कुमारच्या 'क्रांति'च्या पार चिंध्या केल्यात हो!
हा सिनेमा मी बरीच लहान असताना पाहिला असल्याने बरेच तपशील आठवत नव्हते आणि त्यावेळी माझ्या अल्पबुद्धीमुळे ते एवढे निर्बुद्ध वाटलेही नसतील. आता करमणुकीकरता पुन्हा बघेन ;)
6 Mar 2012 - 2:59 pm | राघव
पोट असण्याची जाणीव एवढ्या जोरात होईल असे वाटले नव्हते कधी.. म्हंजे आपलं.. हसून हसून पोट दुखतंय म्हणून म्हटलं.. गैरसमज नसावा! वारल्यात जमा आहे... :)
(ठार) राघव
7 Mar 2012 - 4:19 pm | सांजसंध्या
आवडेश :)
8 Mar 2012 - 11:19 pm | पैसा
अक्षरशः चिंध्या! मी हा सिनेमा नवीन होता तेव्हा पूर्ण बघितला होता आणि संपता संपेना म्हणून इतका कंटाळा आला होता की बस रे बस! आज तो सिनेमा पाहिल्याचं सार्थक झालं!! :D
21 Mar 2013 - 3:12 pm | पिलीयन रायडर
आई ग्ग्ग्ग्ग्ग....
माझं पोट दुखतय आणि हापिसात लोक मला "वेडं लागली काय एक्दाच" अशा नजरेने बघतयत..असं मैत्रीण सामगतेय कारण मला काहिहिहि दिसत नहिये कि मे काय लिहितेय करन डोळ्यात तुन पाणी आलय.. आणि मी पुर्ण लेख अजुन वाचलाच नाहीये...
देवा....... वाचव....
21 Mar 2013 - 3:18 pm | पिलीयन रायडर
आई ग्ग्ग्ग्ग्ग....
माझं पोट दुखतय आणि हापिसात लोक मला "वेडं लागली काय एक्दाच" अशा नजरेने बघतयत..असं मैत्रीण सामगतेय कारण मला काहिहिहि दिसत नहिये कि मे काय लिहितेय करन डोळ्यात तुन पाणी आलय.. आणि मी पुर्ण लेख अजुन वाचलाच नाहीये...
देवा....... वाचव....
21 Mar 2013 - 8:04 pm | संदीप चित्रे
नेहमीसारखा 'एकदम झकास' लेख मित्रा :)
21 Mar 2013 - 8:19 pm | मी-सौरभ
फुटलो =))
21 Mar 2013 - 9:42 pm | हारुन शेख
इतकं झकास परीक्षण मिळणे दुर्मिळ. मनसोक्त हसलो आणि त्याकरिता तुमचा ऋणी आहे. :)
24 Mar 2013 - 6:52 am | योगी९००
हहपुवा..
मनसोक्त हसलो...ज्यांना ज्यांना मी हे परीक्षण पाठवले (नॉन मिपा मेंबर) त्यांनी मला हे फारएन्ड कोण हो असे विचारत आहेत. एकाने तर मला यांनी अशा चित्रपट परीक्षणांचे पुस्तक लिहीले आहे काय असेही विचारले..
बाकी मला ही "उई तमाशा उई" असेच वाटायचे.. लुई शमाशा उई चा अर्थ काय?
बाकी मला या चित्रपटात आवडला तो म्हणजे आपला प्रेम चोप्रा. "शंभूसिंग का दिमाग तो दुधारी तलवार है" हा डायलॉग आवडला होता.
24 Mar 2013 - 8:07 am | धमाल मुलगा
प्रखर देशभक्तीचे पुरस्कर्ते,जाज्वल्य देशाभिमानी श्री.श्री.श्री. मनोजकुमारजीसाह्बे ह्यांच्याबाबत आणि त्यांच्या सिनेमाबाबत अशा रितीने मत व्यक्त केल्याबद्दल अखिल भारतीय मनोजकुमार फॅनक्लबच्या वतीने मी फारएन्ड ह्यांचा झाईर निषेध करतो. ;)
4 Mar 2016 - 6:15 pm | मन
film actor manoj kumar get dada saheb falke award:
इथल्या सर्व कलासक्तांचे खुप खुप अभिनंदन.
4 Mar 2016 - 6:21 pm | खेडूत
बातमी वाचून हाच लेख आठवला! :)
मनोज् भाऊंचे अभिनंदन!
4 Mar 2016 - 6:57 pm | सुमीत भातखंडे
एकदा ह. ह. पु. वा. =))
4 Mar 2016 - 7:45 pm | चलत मुसाफिर
मनोजकुमारला दादासाहेब फाळकेऐवजी सेनापती बापट पुरस्कार जास्त शोभून दिसला असता
4 Mar 2016 - 8:21 pm | यशोधरा
=))
5 Mar 2016 - 2:27 pm | पद्मावति
=)) तूफान लिहिलंय.
5 Mar 2016 - 4:48 pm | बाबा योगिराज
असलं कै च्या कै लिहिता का?
मध्येच जोरजोरात हसायला येतंय.
गिऱ्हाईक काय म्हणत्येन आमच्ये?
मामा, आमचा सॅल्यूट स्वीकार करा. भेष्ट लिवलंय.
पुन्हा कदी त्या हनुमाच्या शिनेमाबाबत लिवा.
(सीनुमाच नाव लक्ष्यात न्हायी, पण शेवटी भारत कुमार हुनुमान बनून उडून जात्येंत असलं कई तरी हाय.)
5 Mar 2016 - 5:41 pm | चलत मुसाफिर
कलयुग और रामायण
6 Mar 2016 - 1:55 pm | स्वाती दिनेश
परत एकदा वाचून परत हसत बसले आहे. क्रांती बघावाच लागणार आता ह्या अँगलने.. ;)
स्वाती
7 Mar 2016 - 6:14 am | निनाद मुक्काम प...
ह्या लेखावर आधीच प्रतिसाद दिले होते.
मी जेव्हा हा सिनेमा केबल वर पहिला तेव्हा तो मला खटकला नाही कारण विडंबन करायचे ह्या दृष्टीकोनातून तो पहिला नव्हता
मनोज कुमार म्हणजे सत्यजित रे नव्हे
त्याने तत्कालीन काळात सिनेमा बनवनिण्याचे जे मापदंड होते ते पाळून सिनेमे केले.
आपल्याकडे मध्यमवर्गीय एक गट आहे जो मनोज कुमारच्या सिनेमांची नेहमीच टिंगल करतात.
जसे काय तोच एकटा असे शिनेमे बनवतो व त्याचे समकालीन मात्र प्यासा सारखे क्लासिक वर्षाला किमान ५ तरी देत होते.
सध्या कन्हय्या ला जो अंतरीम जमिन मिळाला आहे त्यावर जी निरीक्षणे नोंदवली त्याची सुरवात उपकार मधील गाण्याच्या दोन ओळींपासून झाल्याचे वाचले
आजही क्रांती हा सिनेमा पाहीला तर वरील लेखाची आठवण येउन हसू येईल
मात्र पूर्वी व तेव्हा सुद्धा त्यातील एक प्रसंग पाहिला त्यातील शत्रुघ्न एक डायलॉग ज्या तडफेने म्हणतो तेही अश्या काळात जेव्हा अहिसंक होते तेच खरे स्वातंत्र्य सैनिक असे मानण्याचा काळ होता
तो संवाद असा आहे
शत्रुघ्न सिन्हा मनोज कुमारला सांगतो
तो झाशीच्या राणीचा सैनिक होता व पहिल्या युद्धात हरल्यावर राणीचे जे मुठभर सैन्य उरले होते त्यांना गोळा करून
झाशीची राणी आम्हाला म्हणाली
अपनी लाशो से तारीख को हम आबाद रखे, वो लढाई हो जिसे अंग्रेज याद रखे
ह्या क्लीप च्या १.५२ वेळी तो प्रसंग आहे
तो पाहीला कि वाटते मनोज कुमार तुम्हे सो खून माफ
17 Mar 2019 - 1:33 am | गवि
प्रचंड हसवणारे काही धागे उत्खनन करुन वर आणण्याचा प्रयत्न..
14 Oct 2021 - 2:29 am | diggi12
जबरदस्त
14 Oct 2021 - 5:22 pm | विवेकपटाईत
मस्त. असाच लेख बाजीराव मस्तानी वर लिहा.