मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कंगना राणवतची मुलाखत आणि भारतीय स्त्रीवाद

नर्मदेतला गोटा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सध्या संपूर्ण देशामधे कंगना राणावतच्या मुलाखतीच्या निमित्ताने वादविवाद आणि चर्चा सुरू आहेत. स्पष्ट सांगायचं तर एखादी महिला पुढे येऊन आपल्या आयुष्यातल्या वादग्रस्त भागावर प्रकाश टाकते तेव्हा अनेक शौकिनांना चघळायला एक विषय मिळतो. पण शौकीन स्पष्टपणे ते कसे मान्य करणार. अनेकांनी स्त्रीवादाचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा, स्त्रीमुक्तीचा बुरखा घेऊन कंगना राणावत या व्यक्तीच्या कौतुकाला सुरुवात केलेली आहे. . टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीमधे वडिलांच्या वयाच्या, ज्येष्ठ असलेल्या एका माणसाने आपल्याला कसा त्रास दिला, आपल्याला घरामधे कसे डांबून ठेवले याचा खुलासा ती करते. ती स्पष्टपणे त्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलते. या धाडसाचे खरोखर कौतुकच आहे. पुढे ती असेही सांगते की त्या माणसापासून सुटका करून घेण्यासाठी तिने पहिल्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारली. यामुळे शारीरिक दुखापत झाली. त्यानंतर तिने एका हॉटेलच्या रुमचा आश्रय घेतला पण हा मनुष्य तिथेदेखील पोचला. अखेर पोलिसांची मदत घेऊन तिने स्वतःची सुटका करून घेतली. या सर्व मुलाखतीमधे ती अनेक पुरुष अभिनेत्यांना झोडपते. त्यामधे ऋतिक रोशनचाही समावेश होतो. मुलाखतीमधे त्याच्याबरोबर असलेल्या आपल्या नात्याबद्दल ती बोलते. आपण त्याला फोन करत असू. मेलदेखील पाठवत असू. हे ती सांगते. आजही त्याने एकदा तरी आपल्या समोर येऊन आपल्याशी स्पष्टपणे बोलावे, अशी अपेक्षा ती व्यक्त करते. भले त्याला इंटरेस्ट नसेल पण आजही आपण त्याची प्रतीक्षा करतो आहोत, सात वर्षे आपले त्याच्याबरोबर अफेअर होते. हे ती अत्यंत खुलेपणाने मान्य करते. या धाडसाबद्दल तिचे कौतुकच आहे कारण एवढेही धाडस अनेकांच्या, अनेकींच्या अंगी नसते. राहता राहिला प्रश्न केवळ स्त्री आहे म्हणून तिचे कौतुक करणार्‍या तिच्या चाहत्यांचा. तिचे कौतुक करणारे लोक आपली मुलगी अशाच प्रकारे वागली तर अशाच उदार मनाने कौतुक करू शकतील का ! आपल्यावर काहीतरी अन्याय झाला आहे आणि अत्यंत धाडसाने आपण त्या अन्यायाच्या विरोधात उभे राहिलेलो आहोत. असा तिचा अभिनिवेश आहे. यातून ती देशभरातल्या महिलांना आणि मुलींना काही संदेश देण्याची भूमिका घेते. पण काही गोष्टी मात्र तितक्याशा स्पष्ट होत नाहीत. म्हणजे ऋतिकच्या विरोधात बोलणारी कंगना राणावत आजही त्याने आपल्या समोर यावे अशी अपेक्षा व्यक्त करते. त्यावेळी तिच्या बोलण्यामधे कंप असतो. आपण एका वेगळ्या भावनिक अवस्थेमधे असताना त्याला अनेक मेल्स पाठवल्या. त्याच्यावर शेरोशायरी देखील केली. हे ती सांगते याचा अर्थ आजही ती त्याच्यात तेवढीच गुंतलेली आहे, हे जाणवते. आपले त्याच्या बरोबर सात वर्षे अफेयर होते हे ती सांगते. याचा अर्थ ऋतिक रोशन हा सुजनीन या आपल्या पत्नीबरोबर विवाहित असताना देखील ती त्याच्या बरोबर रिलेशनमधे होती हे ती नकळतपणे मान्य करते. थोडीशी स्त्रीवादी भूमिका घेत आपल्यावर अन्याय झाला आहे, असे भासवत असताना आपण ऋतिक बरोबर रिलेशन ठेवताना दुसर्‍या स्त्रीवर, ऋतिकच्या पत्नीवर मात्र अन्याय करत असतो याचा तिला सोयीस्करपणे विसर पडतो. . या निमित्ताने काही प्रश्न पडतातच. त्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या रूममधे ती का रहात होती. तिला तिथे आधार का घ्यावासा वाटला ? किती काळपर्यंत ती तिथे रहात होती ? सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्या अभिनेत्याचा तिला शिडीसारखा वापर करावासा वाटला का ? आणि या सगळ्या प्रकरणांमधे त्या ज्येष्ठ अभिनेत्याची पत्नीदेखील तिच्यावर इतकी का बरे वैतागली होती ? या सगळ्याचा आजच खुलासा का व्हावा. संघर्षाच्या काळात या लढाईपेक्षा करीयर तिला अधिक महत्त्वाचे वाटले का ! कंगना राणावतच्या खुलासेदार मुलाखतीमुळे असे अनेक प्रश्न आता पडू लागले आहेत. कंगना राणावतची मुलाखत अर्थात इथे ऋतिक आणि आदित्य पंचोली यांचीही चूक नाही असे म्हणणे नाही. मुलाखतीच्या शेवटचे रजत शर्माचे वाक्य खूपसे बोलके आहे कंगना राणावत इसी तरहा हमे एंटरटेन करती रहेगी !

वाचन 10209 प्रतिक्रिया 0