ज्ञानेश्वरीतली मराठी क्लिष्ट का वाटते? यावर आमच्या मित्रांच्या समुहात लहानशी चर्चा झाली. खाली देत आहे. मिपा करांना काय वाटते?
------------------------------------------------
सदस्य १: माझ्या मनात एक शंका गेली किमान 50 -55 वर्षे घर करून आहे.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत जनाबाई समकालीन असूनही ज्ञानेश्वरीची भाषा इतकी वेगळी का? या उलट संत नामदेव आणि संत जनाबाई यांचे अभंग आजसुद्धा सहजपणे समजतात.
माझ्या या शंकेचे समाधान आजपर्यंत झाले नाही.
सदस्य २: जातीचा फरक हे कारण असू शकते का? आत्ता सारखेच त्या कालातील उच्च वर्णीय लेखनासाठी प्रमाण भाषा वापरणे योग्य समजत असावेत.
सदस्य ३ : जातीचा फरक हा काही मुद्दा नसावा....
सदस्य १ : तसे नाही वाटत. कारण ज्ञानेश्वरीत वापरलेली भाषासुद्धा त्या काळातील प्रमाणभाषा वाटत नाही.
सदस्य ४ : तोच मुद्दा आहे असे वाटते. आजही खेड्यात इतर लोक स्थानिक बोलीभाषा वापरत असले तरीही उच्चवर्णीय लोक मराठी बोलताना दिसतात.
आता त्या काळातील प्रमाणभाषेची खात्री करायला इतर कोणते लेखन उपलब्ध आहे असे वाटते? ?
सदस्य १: संस्कृत तत्सम शब्दांचा जास्तीत जास्त वापर प्रमाण भाषेत असतो. तो प्रकार ज्ञानेश्वरीत दिसत नाही.
सदस्य ४ : पण ज्ञानेश्वरांना नेमके संस्कृतपासुनच ज्ञान मुक्त करायचे होते ना? म्हणुन कदाचित त्यांनी नवीन शब्दांची निर्मिती केली असावी.
सदस्य १: नवीन निर्माण केलेले शब्द लोकांना कसे कळणार? ते त्यांच्या रोजच्या व्यवहारातलेच असावे लागतील.
सदस्य २: जर त्यांनी नवीन शब्दांची निर्मिती केली असेल तर ते लोकांच्या तोंडी रुललेले नसल्याने भाषेत पुढे संक्रमित झाले नसावेत.
सदस्य ४ : हि शक्यता दिसते !!
प्रतिक्रिया
15 May 2017 - 3:34 pm | पैसा
मुख्य कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या आणि वेगवेगळ्या जातीतल्या बोलींमधे नेहमीच दिसून येणारा फरक हे आहे. त्या काळातही लिखाणाची आणि बोलण्यातली भाषा वेगवेगळी असू शकेल. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या शिक्षणातील फरकामुळेही भाषेत फरक पडणे शक्य आहे. मराठी काळाबरोबर सतत बदलत आली आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा शिवाजी महाराजांच्या पत्रातील मराठी वेगळी दिसेल. पेशवाईतली त्याहून वेगळी तर इंग्रजी अमलातली त्याहून वेगळी.
गोवा एका बाजूला पोर्तुगीजांच्या ताब्यात अलग राहिल्याने इथल्या कोकणीत तेवढा प्रचंड फरक पडला नाही. कोंकणी आणि मराठीची जी मूळ एक प्राकृत असावी तिच्याशी कोंकणी मराठीहून जवळ आजही आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीची भाषा कोंकणीला बरीच जवळची भासते. काही लोक तर ज्ञानेश्वरी कोंकणीत असल्याचा दावा करतात म्हणजे बघा!
15 May 2017 - 4:16 pm | सागर
सदस्य ४ : पण ज्ञानेश्वरांना नेमके संस्कृतपासुनच ज्ञान मुक्त करायचे होते ना? म्हणुन कदाचित त्यांनी नवीन शब्दांची निर्मिती केली असावी.
वरील मुद्द्याशी असहमती दर्शवतो.
बोलीभाषा ठिकठिकाणची वेगवेगळी असते... असावी...
ज्ञानेश्वरांचा हेतू लोकांना सोप्या भाषेतून गीता समजावून सांगणे हा होता. ज्ञान मुक्त वगैरे हे तर्क आज करता येऊ शकतात. त्या काळात सर्वसामान्यांना रुचेल असे गीतेचे निरुपण करणे हाच हेतू असणे शक्य आहे. आजचे प्रवचनकार देखील तेच करतात.
दुसरे असे की ज्ञानेश्वरी तितकी क्लीष्ट नाहिये जितकी वाटते. आजच्या मराठीशी तुलना केली की ज्ञानेश्वरी बोजड वाटणारच.
लक्षात घ्या तेराव्या शतकातली मराठी आहे ही. इथे आपल्या लहानपणची मराठी आज बदललेली आपण पाहतो.
जसे कारस्थान या शब्दाचा अर्थ जुन्या मराठीत वेगळा होता. आज तो कट-कारस्थान या अर्थाने घेतला जातो.
भाषा ही प्रवाही असते व तशीच ती कालानुसार बदलत जाते. न बदलणारी भाषा नष्ट वा त्याज्य होते हे आपण संस्कृत वरुन पाहू शकतो,
15 May 2017 - 6:45 pm | प्रचेतस
क्लिष्ट नाही, थोडीशी संस्कृतप्रचुर आहे इतकेच.
तुम्ही जर तत्कालीन शिलालेख पाहिलेत किंवा महानुभवी साहित्य वाचलेत तर ते मराठी किती क्लिष्ट होते ते कळून येईल.
15 May 2017 - 7:28 pm | संजय क्षीरसागर
तो नेहेमीचा मिपा काथ्याकूट होईल (म्हणजे कुटला खूप पण दोर बनला नाही :) !
तुम्हाला नक्की कोणते (महत्त्वाचे) शब्द अडलेत ते सांगितलंत तर काही श्लोकांची उकल (इथल्या सदस्यांकडून) होऊ शकेल.
16 May 2017 - 1:34 am | सुचिकांत
प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे. ज्ञानेश्वरी अवघड वाटते पण इतर समकालीन संतांचे अभंग तुलनात्मक दृष्ट्या सोपे वाटतात. दोन्हींचा टार्गेट ऑडियन्स सारखाच असून भाषेत एवढा फरक कसा? हा प्रश्न पडतो.
16 May 2017 - 8:21 am | माहितगार
@ सुचिकांत गूगलवर "ज्ञानेश्वरीतील व्याकरण site:shodhganga.inflibnet.ac.in" असा शोध देऊन पाहील्यास काही पिएचडी प्रबंधांचे पिडीएफ (काहीसे विस्कळीत) दुवे मिळतील.
एक पिडीएफ डाऊन लोड करुन वाचली पण नेमकी कोणत्या दुव्यावरुन घेतली तेच विसरलो. (त्यामुळे डाउनलोड उपलब्ध असूनही संदर्भदुवा नमुदकरणे कठीण जात आहे) त्यात ज्ञानेश्वरीच्या सर्व उपलब्ध झालेल्या हस्त लिखीतांचा आणि त्यातील कोणती प्रत मुळाबर हुकूम असल्याचा इतर अभ्यासक विरुद्ध राजवाडे वादाचा उल्लेख आहे. हा वाद यासाठी महत्वाचा की राजवाडेंच्या पुर्वी मुद्रीत(प्रकाशित) सर्व प्रती असुद्ध आहेत आणि स्वतःस मिळालेली पाटांगण प्रतच शुद्ध असल्याचा दावा राजवाड्यांनी केला. राजवाड्यांचा दावा तकालीन महानुभावी मराठीच्या तौलनीक व्याकरण तसेच हस्त लिखीत कुणा व्यक्तीकडून कुणाकडे हस्तांतरीत अथवा पुर्नलिखीत होत गेले आणि पुर्नलेखनातील कटाक्ष यावरुन होता. पण राजवाड्यांच्या समकालीन इतर अभ्यासकांनी त्यांच्याकडचे हस्तलिखीत पडताळणीसाठी उपलब्ध करण्याची गळ घातली तर राजवाड्यांनी कसल्याशा रागात मुळ हस्तलिखीत उपलब्ध होणार नाही याची तजविज केली. राजवाडेंच्या नंतरच्या काळात राजवाडेंचा दावा व्याकरणाच्यादृष्टीने तर जुळतो पण खातर जमा करण्यासाठी राजवाडेंना मिळालेली प्रत उपलब्ध होत नाही अशी काहीशी अभ्यासकांची स्थिती झाली.
हा वाद एवढ्यासाठी महत्वाचा की इतर हस्तलिखीते पुर्नलेखन होताना काही प्रमाणात पुर्नसंपादीतही होतात आणि पुर्नसंपादनात संपादकाच्या कालीनभाषेचे प्रतिबींब एंट्रीमारु शकते. असो. एवढे सगळे सांगीतले यासाठी की राजवाडेंचा तत्कालीन व्याकरणाबद्दल अभ्यास होता आणि त्यांनी ज्ञानेश्वरीतील मराठीचे 'तत्कालीन नागर मराठी' असे वर्णन त्यांच्या प्रस्तावनेत केलेले आहे. (चुभूदेघे- संदर्भदुवा तत्काळ न जोडता आल्याबद्दल क्षमस्व)
16 May 2017 - 8:27 am | माहितगार
हा दुवा बरोबर आहे का डाऊनलोड करुन पडताळून पहावे लागेल. पुन्हा डाऊनलोड करुन पडताळण्यासाठी वेळ नसल्यामुळे क्षमस्व.
26 May 2017 - 3:27 pm | दिपुडी
पसायदान चा सोप्या मराठीतील अर्थ कुठे मिळू शकतो