मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म

यनावाला · · काथ्याकूट
......... सजीव येई जन्मासी ।अटळ असे मृत्यू त्यासी ।जाणीव प्रत्येक व्यक्तीसी ।जी का असते सज्ञानी ॥१॥ अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन । निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥ सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ । सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥ व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्‍या-गाई-गुरे । मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥ पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण । परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप पैं सातवा ॥५॥ यांसी म्हणितले चिरंजीव ।कल्पना केवळ मानीव । त्या त्या काळी सजीव ।ते असतील सातही ॥६॥ परंतु काळीं सांप्रत । या सातांतील जिवंत । कोणीही नसे निश्चित । वैज्ञानिक सत्य हे ॥७॥ देव मानिले अजरामर । नाही मरण नसे आजार । स्वर्गीं तयांचा संचार । सारे कल्पित डोलारे ॥८॥ तैसेचि ते अमृतसत्त्व। नाही तयासी अस्तित्व । मानव इच्छिती अमरत्व । मानसिकता ऐसी दिसे ॥९॥ मरण अटळ सर्वां पटे । परी अंतरी भीती दाटे । मरणासंबंधी शब्द वाटे । अशुभ, अभद्र, अमंगळ ॥१०॥ मयत-प्रेत-मढे- स्मशान । चिता-मर्तिक आणि सरण । तिरडी-गोवर्‍या-मसण । ऐशा शब्दां घाबरती ॥११॥ दशक्रिया-अकरावे-बारावे । शब्द अपवित्र न उच्चारावे । शुभकार्यीं अवश्य टाळावे । पाळिती संकेत अलिखित॥१२॥ भान औचित्याचे असावे । भय शब्दांचे नसावे । कोठे काहीही बोलावे । ऐसा अनर्थ न घ्यावा ॥१३ ॥ घडण्याची जें निश्चिती । टाळणे न कोणा हाती । तयाविषयीं ऐसी भीती । वाटे कोण्या कारणे ?॥१४॥ विवेकी व्यक्तीस ऐसे भय ।अनावश्यक अशोभनीय । मरणी भयदायक काय ।घटना एक नैसर्गिक ॥१५ ॥ वेदकाळी वदले चार्वाक । मरणीं गूढ न काही एक । जीवनी भोगावे सुख । आनंदाने मनुजाने ॥१६॥ यद्यपि मरण नैसर्गिक । जगावे काळ अधिकाधिक । प्राणिमात्रासी प्रत्येक । स्वाभाविक ऊर्मी ही ॥१७ ॥ म्हणौनि मृत्यू अप्रिय । टाळण्या सजीव सक्रिय । परंतु मानवा मरणभय । कदापीही नसावे ॥१८॥ प्रत्येकासी येते मरण । याचे जैविक कारण । जीवशास्त्रज्ञां उमगले जाण । सर्वमान्य असे हे ॥१९ ॥ टेलोमियर-जिनोम-जीन । गुणसूत्रे पेशी विभाजन । जिनोम लांबी त्रुटीकरण । प्रकरण ऐसे बिकट हे ॥२० ॥ द्यावे इथेच सोडोन । परी ऐसे जाणोन । नैसर्गिक मरणाचे कारण । ज्ञात आता मानवा ॥२१ ॥ अटळ मरण नि:संदेह । कांही न उरे जाता देह । जगाचा ऐसा चिर विरह ।असह्य वाटे मनुजासी ॥२२॥ यास्तव आत्मा असे अमर । ऐसा रचिला विचार । नाशवंत केवळ शरीर ।आत्मा जन्मे पुन:पुन्हा ॥२३॥ आत्मयासी शस्त्र छेदीना ।आत्मयासी अग्नी जाळीना । आत्मयासी पाणी भिजवीना । ऐसी ख्याती आत्मयाची ॥२४॥ आत्मा नाही देहीं कोठे । आत्म्याचे अस्तित्वचि खोटे । परी श्रद्धाळूंसी सारे पटे । कारण अमरत्व इच्छिती ॥२५ ॥ शरीर म्हणजे मी नोहे । ओळख माझी आत्मा आहे । तो अमर म्हणौनि पाहे । मीही अमर जाहलो ॥२६॥ विचार करिता खोटे सारे । श्रद्धावंता वाटे खरे। जगी वेगे असत्य पसरे । सत्या लागे विलंब ॥२७॥ संतवाणी- कथा -कीर्तने । गोष्टी-गाणी- आख्याने । नाटके-चित्रपट-प्रवचने । अनेक माध्यमे प्रभावी ॥२८॥ यांद्वारे पुनर्जन्म संकल्पना ।सातत्याने जनमना--। वरती बिंबविली भावना । मनी ठसोनी दृढ झाली ॥२९॥ असोनी असत्य आघवे। सश्रद्ध मानिती भावे । शंका काही न उद्भवे । सत्यासत्याविषयींची ।।३० ॥ आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म । त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥ आपण प्रयत्‍न करावे । गतजन्मीचे काही आठवावे । तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥ याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देतील लोक । पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥ गतजन्मीचे काहीही । आठवते ना कोणाही । पुनर्जन्म कल्पना ही । सत्य कैसी मानावी ? ॥३४॥ अपत्यरूपे माता-पितरे । पुन्हा जन्मासी येती खरे । जनुक-संक्रमण आधारे । मानणे हे शक्य दिसे ॥३५ ॥ परंतु माता-पितयाचा । अर्ध-पुनर्जन्मचि साचा । अपत्यजनुकीं दोघांचा समान वाटा निश्चित ॥३६ ॥ जिवंतपणी माय-तात । अर्धपुनर्जन्म देखतात । अपत्य पाहते प्रत्यक्षात । गतजन्म दोन अर्धेची ॥३७ ॥ शरीरशास्त्रग्रंथी देख । आत्म्याचा ना नामोल्लेख । इंद्रियांचे कार्य हृदयादिक । तयांचे वर्णन परिपूर्ण ॥३८॥ शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती ।शल्यकर्म यशस्वी करिती । परी आत्म्याचे ना नाम घेती । कधीही देहीं न दिसे तो ॥३९॥ यापरी आत्मा नाही नाही । कोणाच्याही हृदयीं देही । तैं पुनर्जन्म कोण घेई । असत्य पुनर्जन्म संकल्पना ॥४०॥ पहिला तैसाचि शेवटचा । एकचि जन्म प्रत्येकाचा । गतजन्म-पुनर्जन्म कोणाचा । शक्य नसे कालत्रयी ॥४१॥ जाणावे आपण सर्वांनी । शंका असली काही मनीं । विचारे विवर-विवरोनी । निरसन पूर्णत्वे करावे ॥४२॥ असे सत्य वैज्ञानिक । जाणिती मानिती जे विवेक । पूर्वग्रहपीडित भाविक । अज्ञानासी कवटाळिती ॥४३॥ आत्मा-पुनर्जन्म-संचित ।अज्ञान सारे खचित । यास्तव याची संगत । निश्चये आपण सोडावी ॥४४॥ वृथा भीती मरणाची ।काढून टाकावी अंतरीची । अंतिम घटना आयुष्याची । काही न राही नंतर ॥४५॥ अर्चिरादि मार्ग सूर्यलोक । चंद्रलोक-विद्युल्लोक । पितृयान- देवयान -ब्रह्मलोक ।कल्पित सार्‍या भरार्‍या ॥४६॥ जाणणे हे आवश्यक । मानव प्रजातीं जन्म एक । लाभला गेला निरर्थक । ऐसे होईल अन्यथा ॥४७॥ ...................................................................................

वाचन 25167 प्रतिक्रिया 0