मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लंगोटनगरी पोपटराजा.....

शिव कन्या · · जनातलं, मनातलं
लंगोटनगरी पोपटराजा वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या, माहित नाही खास, काय घडले विशेष! पण हाय!! लंगोट कड्यावरून घसरले, अन पोपट सगळे फांद्यांवर दिसले. जितकी विद्वत्ता जास्त, तितके त्यांचे पोपट पंचरंगी! त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला. ‘लंगोटवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’ हाती लेखण्या घेतल्या, आणि लंगोट उडवणाऱ्या वादळामागे पोपट सावरत मूढ सगळे अमाप धावले. वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले, ‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’ ......... .............. काही वीर कृतिशील! फार चळवळे! दंड केवळ बलशाली! म्हणाले, ‘आपल्या लंगोटीच्या इतक्या विसविशीत गाठी कोणी बांधल्या? शोधबिध काही नाही!! आम्हाला सगळे माहित आहे! लढा रे लढा रे! कठीण समय आला! घात त्यांनी इतका केला, घात त्यांचा करू चला!’ विवेकहीन हल्ले करता करता त्यांचे पोपट दमून गेले. त्यांचा लंगोट्याचा शोध, मग हवेत विरून गेला. ............... ...................... शुक्रतारा मंदवारा, कसल्या कसल्य फुलांच्या बागा, त्यातल्या सुन्द्र्या बाळगणारे बिनकामे! न पेलणाऱ्या वासनांचे बडबडगीत गाणाऱ्या गुलछबू पोपटांना लंगोट उडालेली हवीच होती! त्यांनी निवांत तंगड्या पसरल्या. म्हणाले, ‘बरे झाले देवा, उडाल्या त्या लंगोट्या राहिले ते पोपट, नव्या पाखरांची जरा, ओळख होईल नीट!’ .................. ....................... ज्यांचे पोट हातावर, त्यांना कष्टाशिवाय दुसरे काय ठावूक? त्यांचे पोपट उघडे काय, झाकले काय, कुठले वादळ आले काय, गेले काय, त्यांना कशाचा पत्ताच नव्हता! पोपट सलामत तो लंगोट पचास, या अनुभवसिद्ध समूहस्मरणावर त्यांची भिस्त! गाठीबिठी राहू द्या! साधे फटकूर मिळाले तरी त्यांचे चालण्यासारखे होते, त्यांचे पोपट अगदी साधे होते तेवढ्यावरती त्यांचे भागण्यासारखे होते! ......................... .......................... गावाबाहेर दूर एक फकीर रहात असे. सगळे लंगोट त्याला नीट माहित होते. पोपटांच्या नाना परी तो अचूक ओळखून होता. त्याने स्वतः कधी कोणती लंगोट वापरली नव्हती, कि कधी कोणते पोपट पाळले नव्हते! त्याच्या वाटेस कुणी कधी गेलेच तर तो हसून कलंदर उत्तर देई, ‘उखाड ले जो उखाडना है, मेरे पोपट तो लंगोट से परे हैं!’ गाव त्याला बिचकून असे, मनातल्या मनात त्याला सलाम करे! .............. ..................... बरेच दिवस तो सगळी गंमत पहात राहिला. शेवटी एकदा गावात गेला. लंगोट हरवून बसलेल्या सगळ्यांनाच तो बिनलंगोटीचा फकीर त्यादिवशी एकदम त्यांच्यातला वाटू लागला. सगळे जमले. समस्या मांडली. ‘आमचे पोपट उघडे बाबा! हरवलेली लंगोट शोधायची कशी? नवीन लंगोट विणायची कशी?’ ‘हो! हो! उतावळ्या पोपटांनो शांत व्हा!’ एका भल्यामोठ्या पाषाणावर फकीर शांतपणे बसला. जवळची भलीमोठी झोळी उघडली. त्यातनं एकेक लंगोट बाहेर काढून पाषाणावर अंथरू लागला. सगळेजण डोळे फाडफाडून पाहू लागले. ‘इथे लंगोट्या हरवल्या म्हणून, आम्ही कवाचे शोधतोय! आणि याच्याकडे पहा थप्प्या .....!’ ‘इतक्या लंगोट्या याच्याकडे कशा पण?’ ‘चोर आहे हा फकीर साला! आमच्या लंगोट्या आम्हालाच दाखवतो!’ पण तसं स्पष्ट तोंडावर बोलायची हिम्मत कुणातच नव्हती! मिळाली तर त्यातली एकतरी लंगोट, प्रत्येकालाच हवी होती! दीर्घश्वास घेऊन, लोकांवर एक बाsssssरीक नजर टाकून फकीर म्हणाला, ‘यातली, आपापली लंगोट ओळखून, ज्यानं त्यानं घेऊन जावी! पण अट एकच - जर चुकीची लंगोट उचलाल, तर त्याक्षणी तुमचे पोपट गायब होतील!’ हे ऐकताच प्रत्येकाने घाबरून आपापल्या पोपटावर हात ठेवले. प्रत्येकाचे मन धक्का लागून मागे सरकले. मी मी म्हणणारे विद्वान, पोपट हरवण्याच्या भितीने कासावीस झाले. सगळे लंगोट एकसारखे दिसत होते! ओळखायचे कसे? बराच वेळ सन्नाटा पसरला. पोपट कि लंगोट या विचारात प्रत्येकजण हरवला. फकिराने आरामात चिलीम पेटवली. म्हणाला, ‘विचार करा. घाई नाही. उद्या सगळे लंगोट घेऊन मी परत इथे येईन!’ लोक आपापल्या पोपटासह घरोघरी परतले. ............. ............. ................... तेव्हापासून आजपर्यंत दररोज तो फकीर नित्यनेमाने सगळे लंगोट घेऊन त्या गावात जातो, पाषाणावर एकएक लंगोट अंथरतो. लोकही आपापल्या पोपटासह तिथे जातात. पण, अजूनही स्वतःच्या लंगोटाची ओळख न पटल्याने दिशाहीन होऊन अंधारात सैरभैर गावभर भटकत राहतात......

वाचन 15945 प्रतिक्रिया 0