विलास मोरे दोषी आहे
अर्जंट काम निघाले असून अॉफिसला चाललोय अशी बायकोला थाप मारली.
सगळ कसं गुपचुप व्हायला हवं.
कार न्यायच्या ऐवजी बाईक काढली.
डोक्यावर हेल्मेट घातले.
तिनं दोन वाजता बोलावलं होतं मी अकरालाच निघालो.
रस्त्यातच दोन थंडगार बियर घेतल्या.
एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी.
बियर घेतल्यावर ती कशी सर्वांगात फुलते.
आज तिच्या यौवनाचा पुरेपुर आनंद लुटायचाय.
मेनरोडपासून थोडासा दूर असलेला तिचा प्रशस्त फ्लँट नजरेत आला.
बाईकचा वेग जरासा कमी केला.
तेवढ्यात गेटच्या बाहेर येणारा एक सुटाबुटातला माणुस दिसला.
हे काय? म्हंजे माझ्या आधी तिनं अजुन कुणालातरी बोलावलं होतं.
मी एकटा हिला पुरा पडत नाही काय?
सालीला जाब विचारला पाहीजे.
कोपऱ्यावर थांबून मी त्या सुटबुटवाल्याला नीट न्याहाळले. तो कार मध्ये बसून निघुन गेला.
ती बाहेर आलेली दिसली नाही.
मी बाईक आत घेतली.
मी आल्याची चाहुल बहुदा तिला लागली असावी.
कारण समोरच्या खिडकीचा पडदा हलला होता.
दार उघडेच होते मी आत गेलो.
सोफ्यावर बसलो. टेबलावर दोन्ही बियर ठेवल्या.
तिचा त्रासिक चेहरा बघुन माझा संशय दाट झाला.
"खरं सांग, त्याच्या बरोबर झोपली होती की नाही?" मी सरळ मुद्यालाच हात घातला.
"अरे तो एल आय सी एजंट होता, माझ्यावर असले आरोप करण्यापेक्षा तू इथे येऊच नको" तिच्या डोळ्यांत अंगार दाटला.
मी मुकाट्याने बियरचा निम्मा ग्लास रिकामा केला.
आजपर्यंत ही एवढी कधी भडकली नव्हती, म्हणजे हिला खरचं आपल्यापासून सुटका हवीयं. सालीचा भयंकर राग आला.
बियरची बाटली ऊचलून तिच्याकडे भिरकावली.
खरतर मला राग व्यक्त करायचा होता. पण बाटली तिच्या डोक्यातचं बसली. घाव वर्मी होता.
जागीच कोसळली.
क्षणात माझ्या अक्षम्य अपराधाची जाणीव झाली.
थोडा वेळ सुन्न बसुन राहिलो.
या अघोरी कृत्यातुन आता मार्ग काढायलाच हवा.
थंड डोक्याने विचार करत राहीलेली अर्धी बियर हळुहळु संपवली.
सभोवताली नजर फिरवली. टेबलावर एक कार्ड होते. त्या एल आय सी एजंटाचे. विलास मोरे त्याचं नाव.
डोक्याचा ताण जरासा निवळला.
हे कार्ड या भयंकर प्रकरणातुन बाहेर पडायचा एक यशस्वी मार्ग ठरणार होतं.
त्या प्रशस्त फ्लँट मध्ये आहे ती स्थिती तशीच ठेवुन व माझ्याशी संबधित बहुतांश पुरावे नष्ट करुन मी गेटच्या बाहेर पडलो.
कॉर्नर ला एक पब्लिक टेलिफोन बुथ आहे तिथे बाईक थांबवली.
१०० नंबर डायल करुन पलिकडच्या व्यक्तिस संदेश दिला.
" सौ. मनिषा कदम यांचा नुकताच खून झाला असुन विलास मोरे यांनीच तो केल्याची दाट शक्यता आहे. अमुक तमुक पत्त्यावर या" एवढेच बोलुन फोन कट केला.
मनावरचा ताण अजुनच निवळला. तरी थोडा अस्वस्थ होतोच.
दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली.
"एकट्याच राहणाऱ्या मनिषा कदम यांचा खून : संशयित विलास मोरेला १४ दिवसांची कोठडी."
आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते.
या खुनाचा निकाल लागेपर्यंत दिवस प्रचंड तणावाखाली जाणार होते.
कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीला मी जातीने हजर राहिलो.
दोन्ही पक्षाच्या वकिलांच्या बाजु मी नीट ऐकुन घेत असे.
एखादी वेळ अशी यायची की विलास मोरे निर्दोष वाटायचा. तेव्हा मी प्रचंड भयभीत व्हायचो. रात्र रात्र झोप लागायची नाही. जीवन खरतर ऊध्वस्त झाल्यासारख वाटत होतं.
खटला जसजसा पुढे सरकू लागला तेव्हा खरा गुन्हेगार म्हणजे मीच पकडला जाण्याची शक्यता वाढत चालली.
पण काहीतरी बहुदा विपरीत घडुन अखेर विलास मोरेच्या गळ्याभोवती फास आवळला जाऊ लागला.
शेवटी निकालाचा दिवस ऊजाडलाच.
कोर्टात गर्दी होती. गोंगाट चालू होता.
मी एकवार सगळ्यांकडे पाहीले.
हातातला ठोकळा टेबलावर आदळत शांतता प्रस्थापित केली.
निकालपत्रक समोर धरुन घसा खाकरुन बोललो.
"भारतीय दंडनियम ३०२ अन्वये सौ. मनिषा कदम यांच्या हत्येप्रकरणी श्री विलास मोरे दोषी आढळले असुन त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा हे कोर्ट सुनावत आहे"
-आधारित-
वाचन
9179
प्रतिक्रिया
0