मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतातील अधुनीक दहशतवादाची मुळे

विकास · · काथ्याकूट
मुंबईत जे आत्ता अतिरेकी हल्ले झाले, तसेच गेल्या दशकापासून जे अनेक अतिरेकी हल्ले मुंबईत आणि भारतातील इतर शहरात झाले त्यासंदर्भात आपण येथे बर्‍याच चर्चा करत आहोत. त्याचे मूळ शोधताना हे जणू काही १९९२ सालानंतर अचानक चालू झाले असा सूर लागतो. आता त्यासंबंधात मी मला माझ्या काही माहीतीवर आधारीत जे काही माहीत आहे ते येथे लिहीत आहे. त्यात तथ्य आहे अथवा नाही हे तुम्हीच ठरवा. मात्र जे काही लिहायचे असेल ते भावनाप्रधान होऊन लिहीलेत तर चालू शकेल पण न आवडणार्‍याविरुद्ध भावनाशुन्य आणि आपल्याला जे वाटते तेच खरे असे भावनाविवश होऊन कृपया लिहू नये ही विनंती. आधीच्या चर्चेत दाउद ने जे मुंबईत १९९३ साली बाँब उडवण्याचे कारस्थान रचले तें बाबरी मशिदीच्या विरोधात होते असा सूर आला आहे. त्या संदर्भात विचार केल्यास काय जाणवते? सर्व प्रथम दाउदने अथवा कुठल्याही मुसलमान (अतिरेकी अथवा तात्कालीन विरोधक) संघटनेने असे कुठेही म्हणलेले नाही की हे बाबरी मशिदीच्या घटनेमुळे झाले आहे म्हणून. या संबंधात फक्त इतकेच म्हणले जाते, "असे समजण्यात येते की ही स्फोट मालीका बाबरी मशिदीमुळे झाली" अर्थात तसे झाले असे क्षणभर धरले तरी त्याचे समर्थन करायचा प्रश्न येत नाही. नाही तर तसे काय रामजन्मभूमीचा ४०० वर्षाचा हट्ट (आणि स्वातंत्र्यानंतर जा-ये करत गेलेला हट्ट) हा अचानक इतका मोठा होण्यास शहाबानो प्रकरण आहे ज्यात अयोग्य घटनादुरूस्ती करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून एका अर्थाने स्त्रीच्या आणि मानवी हक्कांवर गदा आणली असे येईल. पण मी असल्या कुठल्याच समर्थनात पडू इच्छित नाही. दुसरा भाग म्हणजे, दाउद हा ना धार्मिक मुसलमान आहे ना धर्मांध मुसलमान आहे. तो फक्त माफिया आणि स्मग्लर होता आणि आहे. जुगार, वेश्याव्यवसाय आणि ड्र्ग्ज ह्यावर त्याने साम्राज्य तयार केले. या तिन्ही गोष्टींना इस्लाम मधे बंदी असल्याचे माहीत असेलच. त्याचे आणि मुंबई पोलीसांचे युद्ध हे अनेक वर्षे चालले होते. त्याने या काळात अनेकांना मारले होते पण शेवटी पोलीसांना यश येऊ लागले. तेंव्हा दाउद १९८६ साली म्हणजे मुंबई बाँबस्फोट मालीकेच्या आधी जवळपास ७ वर्षे दुबईला जाऊन बसला. अर्थात त्याचे साम्राज्य तो रिमोट कंट्रोलने चालवत होताच. या काळात पण अनेक एन्काउंटर होऊन त्याचे डावे-उजवे सहकारी मेले होते. दाउद स्वतः कधी काळी स्थानीक होता आणि त्याची टोळी ही स्थानीकच होती. त्यामुळे मुंबई पोलीसांना आणि पर्यायाने भारताला धडा शिकवण्यासाठी त्याने अतिरेकी कारवाया चालू केल्या कारण तो पूर्ण "कॉर्नर" झाला होता. कदाचीत त्याला असेही वाटले असेल की पाकीस्तान सरखे भारतात वरकरणी सरकार आणि आतून निर्नायकी होईल. सुदैवाने आपल्याकडे लोकशाही रुजली आहे त्यामुळे तसे झाले नाही आणि या माफियाकिंगला कायमचा अज्ञातवास नशिबी आला. आजता गायत दाउदने कधिही धर्माच्या नावाने काही केल्याचे ऐकलेले नाही, त्यामुळे त्याच्याकड सामन्य मुसलमान जसे एक वेळ बीन लेडन कडे त्यांच्या मसीहासारखे बघत असतील तसे बघत असणे संभवत नाही. आता हे होण्या आधी ८०च्या दशकाच्या शेवटाला (व्हि पी सिंग पंतप्रधान झाल्यापासून) काश्मिर प्रश्नावरून पाकीस्तानने अतिरेकी तयार करणे हे जोरात मनावर घेतले. त्याचे परीणाम आधी काय झाले याचा विचार केल्यास काय दिसते? तर ३ ते ४ लाख काश्मिरी पंडीतांवर स्वतःच्या घरातून बाहेर पडायची आणि स्वतःच्याच देशात निर्वासीत म्हणून रहायची वेळ आली. त्याच काळात अनेक अत्याचार झाले ज्याचे वर्णन मी येथे करत नाही तसेच हिंदूंच्या म्हणून ज्या काही वास्तू असतील त्यांना भग्न केले गेले. अर्थात त्याकडे आपण (म्हणजे तुम्ही-आम्ही सर्वचजण) दुर्लक्ष करत होतो. कारण जळत असली तरी ते आपले नव्हते अशी भावना आणि आलटूनपालटून जी कुठली टोपी आहे त्याप्रमाणे एकदा नेहरूंनी तयार केलेला आंतर्राष्ट्रीय काश्मिरी मुद्दा आणि आता तो पाळला पाहीजे म्हणणारे, दुसरीकडे तेथील मुसलमानांच दोषी ठेवणे तिसरीकडे राजकारण्यांना नावे ठेवणे आणि आपण काय करणार असे म्हणत पण एकंदरीत दुर्लक्ष करणारे सर्व इतर सामान्य भारतीय...पण यात फार कमी विचारांनी दहशतवाद म्हणून लक्ष दिले. सरकारने तर पूर्णपणे दुर्ल़क्ष केले. पण असा हा काश्मिरमधील दहशतवाद वाढायचे कारण तरी काय होते? बाबरी मशिद? ती तर तेंव्हा उभीच होती... मग त्या भागातील हिंदू-मुसलमान? पण ते देखील स्वातंत्र्यापुर्वी आणि नंतरदेखील तेथे बहुतांशी गुण्यागोविंदाने रहात होतेच की. मग असे काय होत होते? कडवे हिंदू चिथावत होते? ... विचार करा परत, की हे कधी चालू झाले त्याचा - ज्याला अपसर्ज असा शब्द आहे तो प्रकार चालू झाला तो ८०च्या दशकात. त्याच वेळेस पाकीस्तानच्या दुसर्‍या बा़जूस म्हणजे अफगाणिस्तानच्या बाजूस काय होत होते? अमेरिकेने रसद पुरवून बिन लादेन आणि त्याचे सहकारी तयार केले होते - मुजाहीदीन हा त्याकाळात प्रकर्षाने प्रचलीत झालेला शब्द आहे. हे सर्व अफगाणिस्तानात बाहेरून लढायला आलेले होते. त्यांचे युद्ध रशिया विरुद्ध अफगाणिस्तानात चालू होते. बघता बघता ते वरचढ होऊ लागले. मला लहान होतो तरी देखील चांगलेच आठवते आहे की त्या काळात अफगाण पंतप्रधान की राष्ट्राध्यक्ष - त्याचे नाव आत्ता आठवत नाही, पण इंदीरा गांधी मुळे भारतात बर्‍याचदा दिसायचा आणि अर्थातच सोव्हीएट पपेट होता, त्याला या मुजाहीदीनने सरळ पकडून फासाला लटकावले. आश्चर्य म्हणजे हे त्या वेळीस दुरदर्शनवर त्याचे लटकणारे पाय दाखवले होते (कदाचीत प्रणव रॉयच्या "द वर्ल्ड धिस वीक" मधे असेल). तर अशा या वरचढ झालेल्या मुजाहीदीनपुढे आधीच इतरत्र आणि घरात डळमळीत झालेल्या सोव्हीएट राज्यास रहाणे हे "कॉस्ट बेनिफीट"चा विचार करता अवघड वाटू लागले आणि ते सोडून गेले. अमेरीकेचा अफगाण स्ट्रॅटेजीत विजय झाला. तो काळ होता १९८७ चा रेगनचा... त्याच काळात अमेरिकेत "ग्रेटेस्ट रिसेशन ऑफ १९९०ज " चालू झाले होते. तेंव्हा माकडीने स्वत:ला वाचवायच्या भानगडीत या मुजाहीदीनच्या पिल्लाला ढकलून दिले. त्याचा व्हायचा तोच परीणाम झाला. आता हे निव्वळ युद्धावर जगणारे मुजाहीदीन आणि त्यांच्याकडची शस्त्रे ही पाकीस्तान काबीज करायला लागली. बीन लेडन मात्र तो पर्यंत नेता होऊ लागला होता... अर्थात त्याला इष्टापत्ती समजत तत्कालीन हुकूमशहा झिया उल हक यांनी त्यांना "काश्मिरीच्या लढ्यासाठी"पाठवले. पुढचा इतिहास आणि त्यातील परीणाम वर सांगितल्याप्रमाणे आहेत. काश्मिरवर हल्ले सुरू झाले, पंडीत निर्वासीत झाले वगैरे वगैरे...चीन मधे पण यातून काही प्रकरणे झाल्याचे या संदर्भात आठवते, पण चीन काही कुणाचे ऐकणार नाही आणि आपले कम्युनिस्ट त्यांकडे दुर्ल़क्ष करणार हे ठरलेलेच असते. पण राक्षसी भूक आणि महत्वाकांक्षा थांबवल्याशिवाय थांबत नसते आणि त्याला जसे राक्षसाला हाताळायचे असते तसेच हाताळावे लागते हा युगानुयुगे जगभर चालत आलेला नियम आहे. त्याला हे मुजाहीदीन तरी कसे अपवाद असणार? पण दुर्दैवाने अनेक कारणाने आपण त्याला महत्व दिले नाही आणि डोळ्यावर कातडे ओढून बसलो. आज हा राक्षस आपल्याला जे दार होते तेथून आत येऊन घरात आला आहे... याचेच अजून एक उदाहरण पहा. शिवसेना-भाजपाचे जेंव्हा राज्य होते तेंव्हा बाळासाहेब ठाकरे हे बांग्लादेशींच्या घुसखोरीवरून त्यांच्या पद्धतीत ओरडत होते. अर्थातच प्रचंड बोंबाबोंब झाली. त्यात आघाडीवर अर्थातच बंगाली कम्युनिस्ट पण इतर स्वतःला सेक्युलर समजणारे आणि काँग्रेस होतेच. पण गेल्या काही वर्षात विलासराव कितीवेळा तेच म्हणालेत अथवा ते पहा. आता बंगाली कम्युनिस्टपण तेच म्हणत आहेत. पण त्यावेळेस दुरक्ष केल्याने आजपण आसाम मधे बाँबस्फोट होत आहेत आणि मुंबई सकट अनेक शहरे ही या नवीन दहशतवादी गुन्हेगारीच्या सावलीत आहेत. पण हे सर्व का झाले? कारण सवंग राजकारण आणि सेक्युलॅरीझमचा जप करत धार्मिकतेच्या चष्म्यातून गुन्हे आणि गुन्हेगार हे दानव आहेत का मानव ते ठरवणार... म्हणजे हिंदू असतील तर "हिंदू" असे म्हणत त्यांना राक्षस म्हणणार आणि "मुसलमान" असतील तर मात्र "त्यांना तसे म्हणायचे नाही" असे म्हणत त्यांना अडाणीच ठेवणार. थोडक्यात आधीपण इतरत्र म्हणलेले आहेच पण पुनरुच्चार करत मला काय वाटते ते सांगतो, " आजच्या दहशतवादाचे आणि दहशवाद्यांचे मूळ हे जसे आंतर्राष्ट्रीय सीमेच्या सभोवताल होत असलेल्या भूराजकीय घटनांशी जोडलेले आहे, तसेच त्याचा वेळीस अंदाज न घेता योग्य निर्णय न घेण्याच्या कमकुवत नेतृत्वाशी आणि "आपण बरे आणि आपले पोट बरे" म्हणत जगणार्‍या समाजवृत्तीशी आहे."

वाचन 31070 प्रतिक्रिया 0