नाडीग्रंथ ताडपट्टीच्या त्या फोटोचे इतके महत्व ते काय ?
नाडीग्रंथ ताडपट्टीच्या त्या फोटोचे इतके महत्व ते काय ?
नाडी ग्रंथांच्या ताडपत्रावरील मजकुराबाबत चर्चेचा विषय लाऊन धरलेला काही वाचकांचा अपवाद सोडता फारसा विचारात घेण्यासारखा किंवा वैचारिकतेने आनंददायी वाटत नाही.
याचे कारण म्हणजे त्यांची ज्योतिषशास्त्राबाबत नकारात्मक मते आहेत. त्यांच्या वैचारिक बैठकीमुळे फलज्योतिषाला वा अन्य भविष्यकथनाच्या विधांना विरोध करणे स्वाभाविकपणे घडते. अशा मनोधारणेतून त्या लोकांना नाडी ग्रंथ हे भविष्यकथनाचा प्रकार असल्याने ते थोतांड असणार असे खात्रीपुर्वक वाटते वा मानावेसे वाटते. त्यामुळे या विषयावर अनेकांच्या अपेक्षित प्रतिक्रिया आल्या.
नाडी ग्रंथांवरील लेखनातून त्यातील ताडपट्टीतील मजकुरातून जे काही लेखनकार्य भविष्यकथन म्हणून केले गेलेले आहे. त्याला सध्या गौण महत्व देऊन नाडीग्रंथांतील ताडपट्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी खरेतर नकारात्मक विचारांची बैठक असलेला गटच अभ्यासपूर्ण कार्य करू शकतो. आणि त्यासाठीच जर कोणी भारतात किंवा परदेशातील तज्ञ मदतीचा हात पुढे करत असेल तर त्यांची मदत होऊ शकेल.
तसे पाहिले तर 'या फोटोत काय दडलय?' विचारणेत तो फोटो व त्यासबतचे स्पष्टीकरण वाचून-पाहून हा फोटो फार महत्वाचा पुराचा आहे किंवा असेल असे सामान्यतः वाटत नाही हे खरे.
ते बरोबरही आहे. काय लावलय हे ओकंनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे. तथापि जी शंका उपस्थित केली गेली त्याचे निराकरण करणे आगत्याचे ठरते.मात्र खोलवर विचार केल्यावर ही बाब वाटते तितकी हलकी फुलकी किंवा टाळून विचारावेगळी करायला येत नाही असे लक्षात येते. ते कसे तर ऐका तर -
पण आता खालील विचार नीट वाचल्यावर त्यातून विविध आक्षेपांच्या संदर्भात काय काय उपस्थित होते याची झलक मिळेल.
1. पहिला आक्षेप असा असतो की या ताडपट्ट्यात काहीही लिखाण कुठल्याही भाषेत केलेले नसते. त्या कोऱ्याच असतात. भासवले असे जाते की नाडीवाचक त्यात पाहून त्यातील मजकूर वाचतो आहे.
उत्तर - आता त्या ताडपट्टया कोऱ्या असतात की कि काहीतरी का होईना लिहिलेल्या असतात हे शोधणे हे काम केले पाहिजे. ते काम नाडी भविष्य केंद्रातजाऊन प्रत्यक्ष शोधकरून त्यांच्याकडील उपलब्ध ताडपट्टया पडताळाव्या लागतील. प्रस्तूत लेखकाने असे अभ्यासकार्य केले आहे. तसे केले असता त्या संपूर्णतः कोऱ्या नसतात. त्यावर मजकूर लिहिलेला असतो. हे लक्षात येते. त्यामुळे या आक्षेपातील खोटेपणा सिद्ध होतो.
2. दुसरा आक्षेप असा असतो की चर्चेसाठी जरी त्या ताडपट्ट्यात मजकूर असतो असे मानले तरी त्यातून नेमकी कुठली भाषा असते याचा अर्थबोध होत नाही.
उत्तर - यावर सोपे उत्तर असे की सध्या जे नाडी ग्रंथ पट्टीवाचनाचे काम करतात ते सर्व तमिळभाषी आहेत. ते यातील मजकूर वाचून दाखवतात अणि तो मजकूर परत एका ४० पानी वहीत सध्याच्या प्रचलित तमिळ लिपित पुन्हा लिहून काढतात. यावरून त्या मजकुराची भाषा तमिळ का अन्य कोणती असावी याची खात्री करता येते. या उलट ताडपट्ट्यांचे वाचन करणारे तमिळभाषिक सोडून अन्य भाषिकांतर्फे होते वा केले जाते असा पुरावा उपलब्ध करावा लागेल. तो होत नाही. आक्षेप असा खोडून निघतो.
3. तिसरा आक्षेप असा की जरी मानले की ताडपट्टी मजकूर लिहिलेला असतो. त्याची भाषा तमिळ असते तर ती सामान्य तमिळ भाषिकाला का वाचायला येत नाही? त्या अर्थी नाडीपट्टी वाचन हा एक तमिळ नाडीवाचकांचा देखावा असतो.
उत्तर – असे लक्षात येते की सामान् तमिळभाषिकांना या ताडपट्ट्यांवरील मजकूर वाचायला येत नाही किंवा आला तरी अर्थबोध होत नाही. याचे मराठी भाषिकांना पटेल असे स्पष्टीकरण असे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला गेला आहे. तरीही त्यातील छापील मराठीतील ओव्यांचा अर्थ सर्वसामान्य मराठी समजणाऱ्याला समजायला कठीण जाते. आता तीच ज्ञानेश्वरी जर मोडी भाषेत लिहून सध्याच्या मराठी वाचकाला दिली तर त्याची काय अवस्था होईल? त्याला नेमके काय लिहिलेले आहे याचा अर्थ बोध होणार नाही पण कोणी ती मोडी लिपि-भाषातज्ञ वाचायला लागले तर थोडा थोडा अर्थ कळेल. तोच अर्थ ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेल्या जाणकार मंडळींनी फोडकरून सांगितला की 'ओहो, असा अर्थ आहे!' असे उद्गार ओठी येतील. नेमके तेच सामान्य तमिळ भाषिकांचे होते असे अभ्यास करता जाणवते. त्यामुळे या आक्षेपात काही तथ्य नाही. हे लक्षात येते.
4. आक्षेप चौथा असा की सामान्य तमिळांना जरी ती वाचता आली नाही तरी ती तमिळ भाषातज्ञांनी तरी वाचून कुठे मान्य केली आहे?
उत्तर – या तऱ्हेचे अभ्यासकार्य अनेक वेगवेगळ्या तमिळ भाषा तज्ञांकडून विविध ठिकाणी झाले आहे. तथापि अजूनही त्यांच्याकडून ते आणखी पद्धतशीरपणे व्हावे यासाठी प्रयत्न करणे जरूरी आहे. श्री लंकेतील डॉ. अरसे कुलरत्ने अणि लंडनस्थित डॉ. एस. संबंधम या दोघांनी अत्यंत परिश्रमपुर्वक एक अभ्यास निबंध सन २००२ मधे लिहून प्रकाशित केला. त्यात त्यांच्या शोधाचा महत्वाचा भाग होता की खरोखरच नाडीच्या ताडपट्ट्यात त्यांच्या संबंधातील नावे कोरलेली होती.त्यांनी तो शोध निबंध आभिप्रायार्थ पुनर्जन्मावर आयुष्यभर काम केलेल्या डॉ. आयन स्टीव्हन्सन यांना अमेरिकेत पाठवला होता. त्यात त्यांनी असे म्हटले होते की मी यावर तत्वतः विश्वास ठेऊ शकत नाही. तरीही असा नाडी ग्रंथांचा पुरावा खरोखर असल्यास तो अविश्वसनीयच नव्हे तर सध्याचे प्रस्थापित शास्त्राचे नियम उलथुन टाकणारा आहे असे सिद्ध होईल. तथापि यावर आणखी अभ्यास कार्य करावे लागेल.
या पुराव्यांच्या संदर्भात विशेष उल्लेख करावा लागेल की नाडी ग्रंथ भविष्याच्या दि १४ ऑक्टोबर २००७ साली पुण्यात झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद चेन्नईच्या इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडीज या तमिळ भाषेतील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या व विशेषतः ताडपत्रांच्या ग्रंथांवर शोधकाम व त्यांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक, चालक डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी स्वीकारले होते. त्यांच्या सोबत त्याच संस्थेच्या ताडपत्रशोध विभागाच्या प्रमुख तमिळतज्ञ श्रीमती लक्ष्मी यांनाही बोलावले गेले होते. त्यांनी उपस्थितांसमोर त्या पट्टीतील अणि अन्य एका नाडीपट्टीतील मजकूर व विशेषतः नावे वाचून ती खरोखरीच ताडपट्टीत कूट तमिळ भाषेत कोरून लिहिलेली आहेत असा असल्याचा निर्वाळा दिला.
जर्मनीत थॉमस रिटर नावाच्या एका नाडी भविष्यावर जर्मन भाषेत पुस्तके लिहिलेल्या व्यक्तीने तेथील तमिळ भाषेतील तज्ञाकडून नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टीतील मजकूर वाचून तो भविष्य कथन सोडून अन्य धार्मिक लेखन नसल्याचा निर्वाळा दिला असा उल्लेख त्यांच्या ''द सीक्रेट ऑफ इंडियन पामलीफ लायब्ररीज्" पुस्तकात केलेला आहे.
यापुढे जाऊन त्या ताडपट्ट्यात व्यक्तीच्या अन्य तपशीलाचे उल्लेख, कसे असतात याचा अभ्यास करून या ताडपट्यांचे फोटो मिळवून यावर आणखी कार्य होणे अपेक्षित आहे.
5. आक्षेप पाचवा असा की नाडी ग्रंथ भविष्य सध्याच्या प्रचलित विज्ञानाच्या विरोधात जात असल्याने त्याला कितीही पुराव्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न निष्फळ आहे.
उत्तर - मान्यता आहे की सामान्यपणे व्यक्तीचे नाव त्याचे आईवडील किंवा वरिष्ठ नातलग ठरवतात व विधिपुर्वक ठेवतात. पण जर या ताडपट्याच्या मजकुरात व्यक्तीचे नाव व अन्य माहिती त्याने ती न पुरवलेली असता, त्याच्या जन्माच्या आधीपासून केंव्हातरी लिहून तयार असेल तर त्याला काय म्हणायचे? त्याची संगती कशी लावायची? ती संगती मानवी बुद्धीच्या स्तरावर लावता येत नसेल तर त्याला मानवी विज्ञानाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच इंद्रीयगम्य ज्ञानाने ज्ञात न होणाऱ्या अदभूत शक्तीचा विलास किंवा लीला मानावे लागेल. कदाचित त्रिमितीच्या पलिकडे सध्या अज्ञात अन्य मितींच्या ज्ञानात त्या गूढाचे उत्तर सामावलेले असेल. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ असा आपण करतो तसा भेद न करता काही गोष्टी घटना ज्ञात करता येऊ शकतात याचा शोध घ्यावा लागेल. मात्र नाडी भविष्य थोतांड मानून त्याच्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून असे म्हणत बसायचे की जर आम्हा विज्ञानवाद्यांनी नाडी ग्रंथांच्या या सत्यतेला तत्वतः मान्यता दिली तर आमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पायाच निखळून पडतो म्हणून आम्हाला नाडी ग्रंथांच्या अस्तित्वाची दखल घेणे मान्य नाही. ही तर वैज्ञानिक विचारांशी प्रतारणा नव्हे काय?
वाचन
9517
प्रतिक्रिया
0