मूर्तीपूजा
सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).
देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही. 'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत. आधुनिक काळात 'ओ माय गॉड' सारखे चित्रपट येतात जातात, देव मूर्तीत नाही म्हणून सांगतात पण ते तात्पुरतेच. या विरुद्ध बोलायचे म्हणजे रूढीभंजनाचा, पाखंडीपणाचा आरोप पत्करायचा, कदाचित 'हिंदुद्वेष्टे'पणाही स्वीकारायचा. तोही स्वीकारायला हरकत नाही पण उगीच कटुता आणि तेढ वाढते, जे उद्दिष्ट नाही.
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार.
आज महाराष्ट्रातल्या काही चळवळी मूर्तीपूजेला दुसरा काही सशक्त पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत पण आधी म्हटले तसे त्यांना विरोधही प्रचंड आहे.
पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, स्पिरिचुअलिटीच्या (रिलिजन नव्हे) खर्या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे हिंदू लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)
वाचन
33113
प्रतिक्रिया
0