मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात.
तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या. ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे. यादगार, ओंकार जोशी, वैभव जोशी, केशवसुमार, विसुनाना, सुभाषचंद्र आप्टे आणि प्रवासी म्हणूनच मला विशेष करून आवडतात. आणि म्हणूनच कधी कधी शशांक जोशीत भरपूर प्रतिभा आहे असे मला वाटते. बाय द वे, सुरेशभट.इन वर लिहिणारे सर्वच गझलकार केवळ अप्रतिम लिहितात. कारण तुम्हाला माहीत आहेच.
मिसळपाव हॉटेलचे मालक तात्या असल्याने त्याचं लेखन मला आवडणं भागच आहे. तात्यांचं 'बसंतचे लग्न' वाचून संगीताचा आस्वाद घेण्याएवढंच लग्न करणं सहज आहे, सोप आहे किंवा लग्न केलं की माणूस आपोआप संगीताचा आस्वादक बनतो असा माझ्यासारख्या काही मूर्खांचा समज झाला होता. अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात. तर शिंत्रे गुरुजी हे पात्र तात्यांनी लिहिलंच नाही असं वाटावं एवढं उत्तम लिहिले आहे, असं कुणी कुचकटच म्हणू शकतो. तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!! मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे" असे तात्या मला कळवळून म्हणाला होता. मनोगताबद्दल, प्रशासकांबद्दल तात्यांच्या मनात एवढं प्रचंड प्रेम आहे. पण एक मानावंच लागेल की मनोगताच्या प्रशासकांनी प्रशासकीय भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. मी त्यांच्या
प्रशासकीय भाषेचा फ्यान आहे. डबक्यात डुंबूनही एखाद्याला कसं काय कोरडं राहणं जमतं ह्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं आहे, हेवा वाटत आला आहे.
तर तात्यांच्या लेखनावर जळणारे काही महानुभाव त्यांची लोकप्रिय लेखक म्हणून संभावना करतात. पण त्यात एकटे संजोप राव प्रामाणिक आहेत. संजोपराव तात्यांवर जळतात असं मला सुचवायचं नाही. केवळ संजोपरावांना तात्यांना ते लोकप्रिय लेखक आहेत असे न जळता म्हणण्याचा अधिकार आहे, असे मला सुचवायचंय. हो, संजोप आणि मी ३-४ दा भेटलो आहोत. त्यामुळे संजोपरावांच्या "मरणा काय तुझा तेगार"चा उल्लेख मला नाइलाजानं करावाच लागेल आणि त्यांचा आधीच वधारलेला भाव आणखीन वाढेल ह्याची मला काळजी वाटत नाही. पण असे मरणाबिरणावर लेखन करण्यापेक्षा चित्रपट संगीतावर, विशेषतः लक्ष्मीप्यारेवर, लेख लिहावेत, असं सुचवावंसं वाटतं. ते कदाचित अधिक मौलिक कार्य ठरेल.
आता फुडं जाऊ. कोडाबाबत काही लहान मुलांना असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन चौकस ह्यांनी एका उत्तम कथा घडविली आहे असे माझा एक कथाकार मित्र म्हणत होता. त्यानेही अशीच एक कथा लिहिली आहे फक्त त्यातल्या जयूताईला कोडाऐवजी फिट्स येतात. ह्याच मित्राला जीएसचे पॉटहोलवर भूलपाखरू ही अप्रतिम कहाणी लिहिणे बिलकुल आवडले नव्हते. "तुम्हीच सांगा पॉटहोलवर कुणी कशी कथा लिहू शकतं," असं सतत बरळत-बरळत तो अनेक दिवस वस्तीतल्या रस्त्यांवर भुलपाखरं शोधतशोधत फिरत होता. बाय द वे संजोपराव, पार्टनर ही वपुंची कथा फ्यामिली प्लानिंगबद्दल आहे असे मला अजूनही वाटते. वडुलेकरांमुळे आखातात मराठी माणूस सहज तग धरू शकतो आणि त्याच्याही सुरम्य कथा असू शकतात हे कळले. आधी विश्वास नव्हता. प्रमोदकाका ऊर्फ प्रमोद देवांनी माझे नाव त्यांच्या यादीत पहिले टाकल्यामुळे मला त्यांच्यासारखे सरळ, प्रांजळ, प्रामाणिक गद्य कुणीच लिहीत नाही असेच वाटते. (अर्थात, कदाचित प्रमोदरावांचा नाइलाज असावा.) दिगंभांचे संगीतावरचे लेख वाचून टेक्निकल डॉक्युमेंटशन लिहिणे खरेच किती सोपे आहे असे वाटले होते. जाऊ द्या लोक उगाच मात्सर्याचा आरोप करतील. अधिक काही बोलत नाही. ते, आनंदघन मला एकदा भेटले आहेत. त्यामुळे त्यांचे, म्हणजे दोघांचे, प्रतिसाद आणि लेखन तसे भारीच असते. वडिलधाऱ्यांचा मान राखावा असं आपली संस्कृतीही सांगते.आणि हो, वाचक्नवी हे बाईचे नाव असू शकते हे कळायला मला थोडा उशीरच झाला. बाई पुणे मराठी ग्रंथालयात लायब्ररियन आहेत आणि त्यांना इंटरनेटचा २४ तास ऍक्सेस असतो अशी मला शंका आहे. नुसत्या सटासट संदर्भ देत असतात बाई.
सर्किट ह्यांनी जेव्हा जेव्हा मला एखादा हरभऱ्याच्या झाडावर चढवणारा प्रतिसाद दिला आहे तेव्हा मला त्यांच्या सर्किटात प्रतिभावंताचा स्पार्क दिसला आहे. अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा. नंदनला समीक्षकाची भाषा चांगली गवसली आहे कारण त्यानं माझ्या अंधाऱ्या खोलीतली पुस्तकंही बघितली आहेत.
आता राहिली ब्लॉगांतली फुलं.ह्या ट्युलिपबाई फारच उत्तम लिहितात हो. हा नंदन सतत त्यांचा आवर्जून उल्लेख करत आला आहे. त्यांच्या लिखाणावर ब्लॉगकार , विशेषतः तरुण मुलं, फिदा आहेत. नंदन, कसे होईल तुम्हा मुलांचे!
वाचन
22832
प्रतिक्रिया
0