गोपाला गोपाला... देवकीनंदन गोपाला......!
लेखनविषय:
द्वापारयुगी मथुरानगरीचा राजा होता 'कंस'.....
सदा छळे तो सज्जना, करी अति विध्वंस....
अत्याचारांचा भार न पेलवला धरणीमातेला....
दुष्टाच्या निर्दालना, जन्म घेण्या...ती विनवी प्रभुला...
या कंसाची, पाठची बहीण होती 'देवकी'...
पुढे 'वसुदेवा'ची ती राणी झाली लाडकी...
वरातीच्या रथाचे सारथ्य पत्करले होते कंसाने...
बहिणीची पाठवणी करत होता मानाने....
इतक्यात, घनगंभीर आवाजात, एक आकाशवाणी वदली...
ऐकून ती, कंसाची जणू पाचावर धारण बसली...
"कंसा, तुझी लाडकी बहीण आता तुझीच वैरिणी बनेल.
देवकीच्या 'आठव्या' गर्भाकडून तुझा मृत्यू घडेल."
ऐकून ती आकाशवाणी, चवताळला, संतापला कंस...
नवपरिणित दांपत्याला मग घडला बंदिवास
यथावकाश, 'देवकीराणी' ला लागले पहिले डोहाळे....
कंसाला जणु, त्याच्या मृत्यूचा पहिला सांगावा मिळे....
नवमासांती, एक सुंदर अर्भक जन्मले...
देवकीचे मातृत्व जणू भरून पावले....
पण हे जन्म-वृत्त जेव्हा कंसाला कळले....
शिळेवर आपटुनी, बाळाला जणु काळाने गिळले...
देवकीची अशी सहा बाळे, मारिली कंसाने अतिक्रूरपणे...
पण तो कर्दनकाळ, जणू रचत होता स्वतःच्याच चितेची सरपणे...
वसुदेवाची अजून एक पत्नी होती, नाव तिचे 'रोहिणी'...
गोकुळात ठेऊन घेतले होते, तिला नंदा-यशोदेने...
पण सातव्या गर्भाच्या वेळी एक चमत्कार घडला....
देवकीचा गर्भ, जणू आतल्या आतच जिरला....
पण तो ठेविला, परमात्म्याने गुप्तपणे 'रोहिणी'च्या उदरी...
जो वाढला सुरक्षितपणे, नंद-यशोदेच्या घरी...
कंसाला वाटे, आपल्या भीतीने सातवा जन्मलाच नाही...
पण प्रभू ची ही गुप्त करणी, त्याला उमगलीच नाही...
राम-अनुज, उर्मिला-पती, 'लक्ष्मण' जो होता त्रेतायुगी...
जन्मला तो हलधर-'बलराम', रोहिणी-उदरी ,द्वापारयुगी...
इकडे मथुरेत देवकीला, लागले 'आठवे' डोहाळे अनोखे...
हरी-स्मरणी रत राहूनि, ती परमात्म्याची दिव्य आभा देखे...
शुभ-संकेतांनी वसुदेव-देवकी त्यांचे दु:ख विसरुनि जात....
जणू देई तो अनिरुद्ध ग्वाही: "'मीच " आठवा , मी येणार- हे निश्चित!..
कंसाला मात्र मृत्यूच्या भयचक्राने ग्रासले...
त्याच्या दरबारी दिवसा, घुबड रडू लागले...
कर्कश्श टिटवी ओरडून, जणू त्याची मृत्यूघंटा वाजवी...
त्याचा मुकुट खाली पडून, अपशकुनांचा तंटा माजवी...
गर्भाचे तेज देवकीच्या मुखावर विलसू लागले....
साक्षात परमात्म्याच्या मातृत्वाचे सुख बरसू लागले...
असीम परमानंदी रंगले वसुदेव-देवकी, होऊनि अभय....
प्रभूने पाळले वचन दिलेले, धरणी झाली निर्भय...
नवमास आले भरत देवकीचे, मन तिचे पूर्ण 'हरी-रुप' झाले....
पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी, 'भगवान विष्णु' अधीर झाले....
कंस दटावे सेवकांना, "आठव्या ची विसरु नका आठवण"....
वैरभावाने का होईना.. पण कंसाकडून घडले 'हरी'चे चिंतन....
श्रावणातल्या कालाष्टमीची, ती रात्र होती अति मनोहारी...
एका अनमिक चैतन्याच्या चाहुलीने, न्हाऊन निघाली सृष्टी सारी...
सौदामिनीने ललकारी दिली रोहिणी नक्षत्रावर, मेघ-मल्हाराने छेडला झंकार....
आणि.... देवकीच्या 'आठव्या' बाळाने घेतला भू-तलावर पहिला हुंकार...
धन्य जाहले देवकी-वसुदेव, पाहुनी ते सावळे-गोजिरे रुप...
साक्षात परब्रह्माने धारण केले होते, त्यांच्यासाठी बाल-स्वरूप...
अवतरला आमचा कैवारी, चराचराने जयघोष केला.....
जय गोपाला गोपाला,जय देवकीनंदन गोपाला....
आणि निमिषात, तेथे चतुर्भुज होऊनि 'महाविष्णु' अवतरले...
पटुनि साक्ष प्रभु-वचनाची, देवकी-वसुदेव नतमस्तक झाले...
विष्णु वदले वसुदेवाला..," गोकुळी जाऊन ठेव मज यशोदेच्या कुशी,
आणि तिच्या बालिकेला, योगमायेला घेऊन ये पुन्हा देवकीपाशी"
नमुनि आपल्या माता-पित्याला, भगवान अंतर्धान पावले...
आठवुनी 'त्या'चे अभय-वचन, 'वसु'-'देवकी' गहिवरले....
मुख कुरवाळित, आपल्या पुत्राचे, वसुदेव बोले, " बाळा,
बंधनात अडकलो आम्ही, कसे नेऊ तुला गोकुळा?"
इतक्यात, दयाळु देवाने सर्वत्र आपल्या मायेचे आवरण घातले...
साखळी तुटुनि, तुरुंगाचे कवाड आपोआप उघडले...!
हातातील लोखंडी बेडी, जणू हलकेच गळून पडली....!
कंसासहित, सर्व पहारेकर्यांना कधी नव्हे ती शांत झोप लागली...!
पाझर फुटला देवकीला, धन्य होई ती परमात्म्याची जननी...
लाडक्या बाळाचे सुख चिंतुनी, तिने निरोप दिला साश्रू नयनांनी...
गुंडाळुनि बाळाला मऊ कापडाने, वसुदेवाने ठेविले 'सुपा'त...
'हरी' च्या रक्षणासाठी, 'हरी'चेच स्मरण करुन धरली गोकुळाची वाट...
आपल्या लाडक्या, प्रभुच्या स्वागतासाठी अविरत बरसत होता वरुण...
"यमुने"लाही येई प्रभु-प्रेमाची भरती, वाहू लागली होती ती ओसंडून...
पाहुन 'विष्णु'चे ते बालरुप, आकाशीचा चंद्र मनी तृप्त झाला...
न कळून ही निसर्ग-भाषा, वसुदेव सोईवर 'सूप' घेऊनि चालु लागला...
आसुसली प्रभूच्या स्पर्शासाठी... यमुनेला उधाण आले....
जाणुनि तिचे मनोगत, प्रभूने आपुले चिमुकले पाऊल हळूच सुपाबाहेर काढले...
हरीची ही लीला पाहून, यमुनाई आली अधिकच उचंबळून.....
हरीने मग आपल्या पदस्पर्शाने केले त्या 'कालिंदी'ला पावन....
पोचला वसुदेव गोकुळात, गेला नंदाच्या घरी....
तिथेही 'योगमाये' ने भूल पाडली होती सर्वांवरी...
उचलुनि तिला यशोदेच्या कुशीतूनि, ठेविले आपल्या तान्हुल्याला...
डोळे भरुनि पाहिले, अन साठविले मनात त्या कान्हुल्याला....
परतला मथुरेला, बंदीवासात नेले त्या 'चिमुकली'ला...
आपोआप अडकला बंधनात तो, धन्य धन्य प्रभो तुझी लीला...
बालस्वभावास अनुसरून, ती बालिका रडू लागली...
ऐकून तिचे रुदन, कंस आणि सेवकांची झोप उडाली...
चवताळून धावला कंस, तिला ठार मारावया....
आपल्या मृत्यूदात्याला, समूळ नष्ट करावया....
त्या क्रूराने घेतले तिला, आपटावया शिळेवरी...
इतक्यात निसटली ती 'आदिमाया' , उडाली उंच अंबरी...
वदली ती मूळमाया-महामाया, धीरगंभीर आवाजात...
'कंसा, नांदतोय तुझा वैरी आनंदाने गोकुळात.."
ऐकून तिचे बोल, बघुनि तिचे रुप, कंस होई स्तंभित...
न कळे हा जगदंबेचा खेळ कधीही, त्याची होई मती कुंठित....
तिकडे गोकुळी मात्र, जणू स्वर्गच अवतरला...
नंद-यशोदेच्या पोटी, तेजस्वी पुत्र जन्मला ....
उधळुनी फुले, उजळुनी ज्योती, नाचती वृज-नर-नारी...
"जन्मोत्सव" होई साजरा, उल्हासे घरोघरी...
"कृष्ण"असे नाव ठेविती बाळाचे, श्रेष्ठ गर्गमुनी..
ऐकुनि अद्भुत भविष्य 'कृष्णा'चे, आनंद वर्धला मनी...
धन्य होई नंद-यशोदा, धन्य गोप-गोपिका...
अधुरे जिचे जीवन कृष्णाविना, धन्य होई राधिका...
दुर्जन-संहारा अवतार घेसी, हे देवकीच्या जीवना...
मुखी विश्वरुप दावी यशोदेला, हे नंदाच्या नंदना...
बासरीचे सूर आळविसी, राधेच्या मन-रंजना...
गोपींसवे रास क्रीडसी, चांदण्यात वृंदावना...
दुर्जन-संहारा अवतार घेसी, हे देवकीच्या जीवना...
मुखी विश्वरुप दावी यशोदेला, हे नंदाच्या नंदना...
बासरीचे सूर आळविसी, राधेच्या मन-रंजना...
गोपींसवे रास क्रीडसी, चांदण्यात वृंदावना...
विषाचे अमृत बनविसी, मीरेच्या मन-मोहना...
घट फोडुनि नवनीत भक्षिसी, केशवा कमललोचना...
हलहल-मुक्त करिसि कालिंदी, करुनि कालियामर्दना...
अभय देसी गोकुळाला, करांगुले पेलिसी गोवर्धना....
कुब्जेचे व्यंग नष्टुनि, बनवी तिज सुंदरांगना...
मुक्त होई मथुरानगरी, जेव्हा करिशी कंसासुरकंदना...
चौसष्ठ कलांचा होसी अधिपती, वंदुनि गुरु सांदिपना....
सागरातील मृत-पुत्र जीवित करुनि, देसी तू गुरूदक्षिणा....
स्यंदनातुनि रुक्मिणी पळविसी, स्मरुनि 'वृंदे'च्या वचना...
शिशुपाला शतदा माफ करुनि, मग शिर उडविसी सुदर्शना...
सोळा सहस्र नारी वरिसी, करवूनि नरकासुरदहना...
तरीही 'ब्रह्मचारी' म्हणवुनि घेसी, अष्टनायिकांच्या रमणा...
मुचकुंदाला पीतांबर दाखविसी, भस्म करुनि कालयवना...
मूठभर पोह्यांनी संतुष्ट होसी, मग सुदामा बसे राज्यासना...
महावस्त्र पुरवुनि द्रौपदीला, लाज राखिसी वस्रहरणा...
राजसूय यज्ञात उष्टी काढिसी, मान देऊनि ब्राह्मणा...
कुरुक्षेत्रे युद्ध मांडिसी, ध्वजे प्रस्थापुनि हनुमाना...
अर्जुनाचे सारथ्य पत्करुनि, "गीता" कथिसी रणांगणा...
भगवद्गीता ती होई जगन्माता, उद्धारी जगज्जीवना...
युगे-युगे अवतार घेसि, जाणुनि भक्तांच्या अंतर्मना...
विश्वप्रेरका, विश्वपालका, विश्वंभरा तू विश्वजीवना...
सुष्टोद्धारका, सुजन रक्षका, धावत येसी दुष्ट-खंडना...
तृप्त होसी केवळ 'तुलसीपत्रे', न वांछिसी तू कांचना...
ना कोणी तुज रोखू शकले, ना रोखणार, तू अनिरुद्ध नंदारमणा...
|| ओम नमो भगवते वासुदेवाय ||
वाचन
7313
प्रतिक्रिया
0