राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे.
भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी जनसंघ नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. जनता पक्षाच्या कडबोळी सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या इंदिरा गांधींच्या करिश्माच्या आणि इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानभुतीच्या लाटेत भाजप या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती.
राजीवगांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते
पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला.
भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी?
बाबरी मशीद पाडण्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण बाबरी मशीदीचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. भाजप च्या राजकीय फायद्या साठी बाबरी मशीदीचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते .
दुर्दैवाने बाबरी मशीद कारसेवकानी पाडली. ( संघाचा कारसेवकांशी संबन्ध नाही)
आणि तो मुद्दा भाजपच्या हातून निसटला.
मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले.
भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी मनमोहनसिंगांचा विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत संसदेत भाजपने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. कंदहार प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर भाजपच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले.
मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले.
स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे.
बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे.
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे
हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे.
वाचन
63501
प्रतिक्रिया
0