कवी ग्रेस यांना प्रतिष्ठेचा नागभूषण पुरस्कार
सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.
कवी ग्रेस यांच्या अनेक कविता त्यांच्यातील गूढार्थासाठी अनेकांना प्रिय वाटतात. अनेकांचा असा अनुभव आहे, की जेव्हा त्यांची कविता वाचल्यावर "अच्छा, असे आहे होय!" या कविता कळल्याच्या समाधानापाशी आपण येऊन पोचतो, तेव्हाच त्याच कवितेतील अशी एखादी ओळ किंवा शब्द तुम्हाला पुनर्विचार करण्यास उद्युक्त करतो - आणि परिणामी कविता "कळल्याचे" समाधान हिरावून घेतो. सरधोपटपणे "ग्रेसची कविता कळतच नाही" असे म्हणणारे रसिकही आहेत. अनेक प्रयत्नांती ते या निष्कर्षाप्रत येऊन पोचतात किंवा ग्रेसच्या कविता अनाकलनीय असल्याचा पूर्वसमज पूर्वग्रहात रुपांतरीत करून ग्रेसच्या कवितांच्या वाटेला जाण्याचे टाळतात.
अनाकलनीय लेखनाच्या बाबतीत बरेचदा ग्रेसची गुलजारशीही तुलना केली जाते. परंतु एक सामान्य रसिक म्हणून मला गुलजारच्या कवितांमध्ये जी टोकाची प्रतिभा आणि आविष्कार दिसतात, तशी टोके गाठलेली ग्रेसच्या कवितेत पहायला मिळत नाहीत. म्हणजे "इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते" लिहिणाराही गुलजार आणि "आँखे भी कमाल करती हैं, पर्सनल से सवाल करती हैं" किंवा "आजा आजा दिल निचोडे" लिहिणाराही गुलजारच. आणि त्यातही "पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में तिनकों के नशेमन तक इस मोड से जाते हैं" हे वाचून "म्हणजे काय?!" अशी तात्कालिक प्रतिक्रिया हे नवल नाहीच. ग्रेसच्या बाबतीतही असे "म्हणजे काय" स्वरूपाचे प्रश्न बरेचदा पडत असतातच. जसे - "झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया" यातून काय सांगायचे असेल बरे?
इतके असूनही व्यक्तिशः मला ग्रेसच्या कविता वाचणे, अर्थ लावण्याचा नि समजावून घेण्याचा प्रयत्न करणे (पक्षी झगडणे) आवडते. तुमचा या बाबतीत काय अनुभव आहे?
ग्रेसच्या कवितांशी रसिकांचे असे झगडणे, कविता कळण्यातील आव्हान, यांतील खुमारी तुम्ही अनुभवली आहे का? असल्यास या काथ्याकुटाच्या निमित्ताने तुम्हांला आवडलेली ग्रेसची कविता, तिचा थोडक्यात अर्थ किंवा तुम्हांला सर्वाधिक आवडलेल्या तिच्यातील एखाद्या कडव्याचा भावार्थ येथे सांगावा. तुम्हांला त्यांच्या कविता वाचण्याची संधी मिळाली आहे का? नसल्यास सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून तुम्ही ग्रेसच्या कविता वाचाल का?
वाचन
12612
प्रतिक्रिया
0