मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आणखी बुडीत खाते ('त्या' बुडीत खात्यांशी संबंध नाही)

नितिन थत्ते · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बुडीत खात्यांची चर्चा चालू आहे म्हणून माझा वेगळा अनुभव. शीर्षकातच डिस्क्लेमर आहे. सुमारे २० वर्षांपूर्वीची गोष्ट. कंपनीच्या कामासाठी एकटाच मद्रासला गेलो होतो. एग्मोर भागात कंपनीचे गेस्टहाऊस होते. तेथे रहात होतो. नेहमी २-३ दिवसांसाठी जातो तेव्हा तडतड करून, रात्री उशीरा काम करण्याची पद्धत असते. पण यावेळी चांगला १०-१२ दिवसांचा मुक्काम होता त्यामुळे थोडा निवांतपणा होता. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर इकडे तिकडे भटकणे, मग जेवण आणि झोपणे असा कार्यक्रम होता. एके दिवशी संध्याकाळी असेच फिरताना लोकांकडे पहात पहात चाललो होतो. कसे काय ते माहिती नाही पण जवळच असलेल्या एका इसमाशी नजरानजर झाली. नजरानजर होताच तो म्हणाला, "साब, हिंदी जानते क्या?". बहुधा मद्रासमध्ये त्याला भाषेची फारच अडचण येत असावी. "हां, जानता हूं", मी. "मैं महाराष्ट्रसे आया हूं". महाराष्ट्रातून आला म्हटल्यावर मी मराठी सुरू केले. "हं. मी पण मराठीच आहे. बोला" "साहेब, मी अकोल्याचा. माझं नाव अमुक अमुक". एव्हाना एक लेकुरवाळी बाई कडेवरच्या मुलासोबत पुढे आली. त्याच्याबरोबरच असावी. माणसाच्या हातात एक पिशवी होती. बाकी काहीही सामान नाही. माणसाचे एकूण स्वरूप एखाद्या कामगारासारखे किंवा प्यून वगैरे असावा तसे" "बरं मग?" मी. "साहेब, अकोल्याहून इकडं मदुराईला देवीच्या दर्शनाला आलो होतो". "बरं". "तिकडून रात्री गाडीने येताना माझे सामान चोरीला गेलं". "अरेरे" "त्यात पैसे आणि जायची गाडीची तिकिटं होती". "मग?" "आता परत घरी जायला तिकिटाला पैसे नाहीत" आता ती बाई पण सुरू झाली. "सकाळपासून काय खाल्लं नाही, पोर पण उपाशी आहे" "अहो पण तुम्ही वरच्या खिशात काहीतरी थोडे पैसे वगैरे ठेवले नाही?" "नाही ना. आज सकाळपासून इकडे कोण मदत करेल म्हणून भटकतोय. इथं कुणाला भाषा पण कळत नाही. काय करावं काय कळत नाही. आता तुम्ही भेटले म्हणून बरं झालं" ती बाई परत बोलली, "तुम्ही मदत करा आम्हाला जेवायला आणि तिकिटाला पैसे द्या". "तुमचा पत्ता देऊन ठेवा साहेब. परत गेल्यावर मी नक्की मनी ऑर्डर करून पैसे पाठवून देईन". "नाही हो. असे कसे देऊ पैसे?" "तुम्ही अगदी देवासारखे भेटलात बघा. तुमचे फार उपकार होतील आमच्यावर". च्यायला, तो पाय वगैरे धरायला लागला. मी दुविधेत. पैसे परत मिळण्याची शक्यता नव्हतीच. अगदी त्याने त्याचा पत्ता दिला तरी मी काय अकोल्याला पैसे मागायला थोडेच जाणार होतो. जरा वेळ विचार केला. ५० रुपये काढून त्याला दिले. (तेव्हाच्या हिशेबाने माझा एक दिवसाचा टूर अलाऊन्स होता. आणि ५० रुपयात त्या दोघांना दोन वेळा तरी जेवता आले असते). "हे बघा मी आत्ता एवढेच देऊ शकतो. या पैशाने तुम्ही जेवण करा." "साहेब जेवण होईल पण आम्ही परत जायचं कसं? अजून दिले असते तर बरं झालं असतं" "माझ्याकडे देण्यासारखे एवढेच आहेत. माझ्याच सारखा अजून कोणी भेटेल. त्याच्याकडे असतील तर तो देईल" "अहो साहेब, इथे कोण भेटणार आणखी. आख्खा दिवस घालवल्यावर तुम्ही भेटलात". मग बराच वेळ तो विनवत राहिला. शेवटी मी म्हटले, "हे पहा, मला जे करण्यासारखे होते ते मी केले". असे म्हणून मी तेथून कटलो. तेथून निघून मी ही जेवण वगैरे केले आणि गेस्ट हाऊसवर आलो. मग डोक्यात विचार चालू झाले. तो माणूस खरे सांगत असेल का? की बनावट स्टोरी असेल? पुढचे विचार आले ते म्हणजे तो खरे सांगत असेल तर त्याला मद्रासमध्ये आणखी कोण मराठी माणूस भेटेल. बरे तो भेटला तरी मदत करेलच असे नाही. काय करतील दोघं? वगैरे. मी आणखी पैसे द्यायला हवे होते का? आणखी ५० रु दिले असते तर कदाचित पॅसेंजर वगैरे गाडीने घराच्या दिशेने जाऊ शकला असता. कदाचित कर्नाटकापर्यंत पोचला तर कोणी मराठी माणसं भेटू शकतील. दुसरीकडे वाटे की "काय माहिती; खरेच सामान चोरीला गेले का?" खूप दिवसांनी विचार आला, त्याच्याकडून त्याच्या एखाद्या नातेवाईकाचा पत्ता फोन घेऊन मद्रासहून त्याला फोन लावता आला असता आणि त्याला पैसे घेऊन इकडे ये असे सांगता आले असते. त्या काळी पब्लिक एस टी डी नुकतेच सुरू झाले होते. "छे !! करायचीच तर पुरती मदत करायला हवी होती" असे वाटू लागले. बराच काळ ही घटना माझ्या डोक्यात फिरत होती. तो माणूस खोटे सांगत होता याची खात्री अगदी अलिकडे पटली. आणंदला विद्यानगरमध्ये चौकात एका मनुष्याची अशीच भेट झाली. तो जळगावचा होता. तशीच कडेवर मूल असलेली बाई. तशीच एक पिशवी. सगळे तसेच. आणंद जवळ वडताल येथील स्वामी नारायण मंदिरात आले होते. बाकी सर्व स्टोरी सेम. पण खरी गंमत तर पुढेच आहे. मागील विचारप्रक्रियेनुसार त्याला फोन नंबर वगैरे विचारला. तेव्हा "मी काम करतो त्या शेठचा नंबर होता हो पण ती डायरीपण त्या सामानातच होती"असे उत्तर मिळाले. खोटे बोलत असल्याची जवळ जवळ खात्री असूनही मी याही माणसाला तिकिटासाठी ५०० रु दिले. फक्त यावेळी जळगावला जायला पुरतील एवढे पैसे दिले. एरवी मिसळपाव वर किंवा इतरत्र "देवाच्या दर्शनाला आलात आणि असं कसं झालं? देवाने तुमच्या सामानाचं रक्षण केलं नाही का?" अश्या टाईपचे प्रतिसाद लिहिणारा मी त्यावेळी अडचणीत आहे असे सांगणार्‍याला नकार देऊ शकलो नाही. खरेच परमुलुखात अडचणीत आला असेल तर? हा विचार बलवान ठरला.

वाचन 18737 प्रतिक्रिया 0