मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे खाद्य-पेय जीवन-१

सन्जोप राव · · जनातलं, मनातलं
'गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉईल्ड इट बाय अ‍ॅडींग अ टंग इन इट' हे बायकांच्या आड्यन्सला चिडवणारे वाक्य फार पूर्वी ऐकले होते. जिभेचा हा गुण जरी नवीन असला तरी सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला जरा जास्तच नखरेल जीभ लाभली आहे, हे जन्मानंतर लवकरच लक्षात आले होते. त्यातून आई, बहीण, आजी हा घरातला समग्र स्त्रीवर्ग खाना बनवण्यात आणि खिलवण्याचा शौकीन असल्याने जिभेचे मुद्दाम लाड करावे लागले नाहीतच; ते आपोआपच झाले. सणवार, व्रतवैकल्ये आणि त्यांची उद्यापने, गावच्या जत्रा आणी शेतावर होणारा विहिरीच्या पूजेचा तो कार्यक्रम 'पारडी' या विविध निमित्तांनी घरात आणि घराबाहेर खाल्लेल्या विविध पदार्थांच्या आस्वादाला चटावलेली आणि सोकावलेली जीभ पुढे मुर्गीमटणातही रमली. आदल्या दिवशीचा उरलेला सत्यनारायणाचा प्रसाद दुसर्‍या दिवशी जितका चविष्ट लागला, तितकाच कडक रोटीबरोबरचा पाकिस्तानी हाटेलात सकाळीसकाळी खाल्लेला झणझणीत लालभडक खिमाही. घासागणिक एक असे तुपाची टोपी घातलेले गरमगरम मोदक ज्या रसिकतेने हाणले, त्याच रसिकतेने कडाक्याच्या थंडीत पंजाबमधल्या ढाब्यावर कुरकुरीत भाजलेली मसालेदार कोंबडीही चापली. वर काजू बदामाची पेरणी केलेली बरेलीतली मलईदार 'दीनानाथ की मशहूर लस्सी पिऊन जसा संतोष झाला, तसाच कोल्हापुरातल्या 'ओपल' मधला कडकडीत पांढरा रस्सा पिऊनही. आता खाण्यात इर्षा करण्याचे दिवस मागे पडले. जीभ अजूनही चावट आहे, पण आता 'क्वांटिटी' पेक्षा 'क्वालिटी' ला अधिक महत्व देण्याचे दिवस आले. आजही मुर्ग-मसालाबरोबर पचडी तशीच लागते, पण आता कोंबडीच्या त्या घासांबरोबर 'फायबर' हा विचारही चावला जातो. आजही सुका मेवा तितकाच चविष्ट लागतो, पण तो खाताना 'अक्रोड हार्टला बरे म्हणे!' हे मनात आल्याशिवाय राहात नाही. पण ते असो. कधीतरी या लाडावलेल्या जिभेलाच आता 'काय तुझा तेगार' म्हणून विचारावे असे वाटले आणि आजवरच्या आयुष्यातल्या खाण्यापिण्याच्या या रंगरंगिल्या प्रवासवाटेवर मन मागेमागे रेंगाळत गेले. कुणाकुणाला म्हणे आपले स्वतःचे उष्टावणही आठवते. कुणाला स्वतःच्या बारशात वाटलेल्या घुगर्‍यांची चवही आठवत असेल, काय सांगावे! मला असले काही आठवत नाही. पण खान पान यात्रेची (हा शब्द 'भारतीय रेल' कडून साभार!) सुरवात होते ती चहापासून. मुखमार्जनानंतर (हा शब्द 'सारे प्रवासी घडीचे' मधून साभार!) काही क्षणांतच वाफाळता चहाचा मोठा मग समोर आला नाही तर सगळे जग व्यर्थ वाटू लागते. दुधा-दह्याच्या प्रदेशात बालपण गेले असल्याने लहानपणी या चहात चहा नावापुरताच आणि भरघोस दूध असायचे. कपातल्या गोडमिट्ट चहावर खापरीसारखी दाट साय ही कल्पना आज ओशट वाटते, पण अंगाभोवती पांघरुण घट्ट गुंडाळून घेऊन असा चहा चाखतमाखत पिणे आणि रिकामा कप कुठेतरी भिरकावून परत पांघरुणात गुडुप होणे यापरते सुख नसे. शहरी चहात चहाचा स्वाद वगैरे महत्वाचा, पण गावाकडच्या आतिथ्याच्या कक्षा चहातल्या साखरेच्या प्रमाणानुसार रुंदावतात. 'खडे चम्मचवाली चाय' ही काही उत्तर भारतीयांची मक्तेदारी नव्हे. गावाकडच्या चहात एकवेळ चहा लहान चमच्याने पडेल, पण साखर पडते ती मुठीने. पुढे मग तारांकित हाटेलातला उंची पण मचूळ चहा, गुजरातमधली गोड आणि सुगंधी 'मसालानु चाय', तीन आकडी किंमत असलेला 'ब्लॅक' किंवा 'आईस टी' असले अनेक प्रकार चाखले, पण चहा तो चहाच. सकाळी सहा आणि दुपारी तीन या वेळी ज्यांना न मागता कपभर गरम चहा मिळतो, तेचि पुरुष भाग्याचे. रविवारी बाकी चहाच्या तीन-चार फेर्‍या व्हाव्यात. शब्दकोडे सोडवताना न मागता अर्धा कप चहा बायकोने हातात आणून दिला की हातातला पेपर खाली ठेवून तिच्या कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत 'कशी गं माझी बाय गुणाची!' म्हणावेसे वाटते! कॉफी - तीही आसक्या दुधातली आणि वेलदोडे जायफळ घातलेली- कधीकधी मजा आणून जात असे. विशेषतः गावाकडच्या तंबूतला शिणेमा बघून रात्री परत आल्यावर असली कॉफी केवळ अफलातून लागे. कॉफी हे उच्चभ्रू लोकांचे पेय आहे आणि चहा हे जनतेचे, हा सूक्ष्म फरक कळायला बराच वेळ लागला. न कळणार्‍या चित्रांचे वातानुकूलित प्रदर्शन बघताना त्या वेळी लोक कॉफी पीत असत. (आता वाईन पितात!) नुकत्याच प्रेमात पडलेल्या (किंवा नुकतेच लग्न ठरलेल्या) युगुलांना हाटेलात जाऊन चहा पिणे जरा कमीपणाचे वाटे; म्हणून असे लोक महागड्या हाटेलांत जाऊन न परवडणारी कॉफी पीत असत. डोळ्यांत डोळे घालून बघणे, चोरटे स्पर्श, 'एक मुलगी हवीच हं मला.. आणि नावही ठरवून ठेवलंय मी - नेहा!' वगैरे सगळ्या साईड डिशेस. एकंदरीत काय, तर कॉफी जराशी शिष्टच. चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही. पुढे 'ब्रिष्टॉल - विल्स - गोल्ड फ्लेक' या प्रवासाला साथ दिली ती तर केवळ चहानेच. 'चहा-बिडी' हा शब्दप्रयोग काळाच्या ओघात टिकून आहे ही तर अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावावी अशी दैदिप्यमान घटना आहे! चहा-कॉफी हे मानाचे गणपती सोडले तर कोको, बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकलेट, हॉर्लिक्स वगैरे काही राखीव खेळाडूही होते, पण त्यांच्याशी कधी फारशी दोस्ती झाली नाही. बोर्नव्हिटा चॉकलेटच्या स्वादाचा म्हणून जरा बरा वाटे पण हॉर्लिक्स, प्रोटिनेक्स वगैरे मंडळी आजारीपणाची कडवट आठवण घेऊन येतात. कोको ही तर शुद्ध फसवाफसवीच होती. शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ,शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ असले तळ्यात-मळ्यात खेळणारा कोको. तात्पर्य काय, की कोणताही ऋतू असावा, विचारहीन शांत झोप व्हावी, 'आज आपण जग जिंकणार' या आत्मविश्वासाने जागे व्हावे आणि तोंड खंगाळेपर्यंत हातात ते ताम्रवर्णी अमृत हजर व्हावे. घोटाघोटांनिशी आयुष्याचा अर्थ पटत जातो! 'उत्तेजक पेयांपासून दूर' असणारे लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. शेवटी 'कंबख्त तूने पीही नही' हे काय फक्त वारुणीलाच लागू आहे? 'कंबख्त तूने चाय पीही नही' हेही तितकेच समर्पक आहे की! आणि व्याकरणदृष्ट्या बरोबरही! (क्रमशः)

वाचन 22518 प्रतिक्रिया 0