शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)
लेखनप्रकार
मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे. त्याची आई जेव्हा त्याला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगते तेव्हा हा चिमुरडा स्वतःला शिवाजी समजून काल्पनिक घोड्यावर स्वार होऊन सह्याद्रीच्या कडे-कपारीतून दुश्मनांचा नायनाट करून विजयश्री खेचून आणतो. तेव्हा त्या निरागस चेहर्यावरचा आवेशपूर्ण भाव मनाला स्पर्शून जातो. चित्रपटात जेव्हा शिवाजी महाराज विषण्ण होऊन "वेडात मराठे वीर दौडले सात...फक्त सातच? बाकीचे कुठे गेले?" असा खडा सवाल करतात तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना टोचते. मोगलांना धूळ चारून एकसंध राज्य स्थापन करण्याच्या महाराजांच्या बुलंद इराद्याची आणि अतुलनीय पराक्रमाची कथा आपल्या थंड झालेल्या रक्ताला जिवंत करणारी एक स्फूर्तीगाथा आहे असे मी मानतो. मी ब्राह्मण आहे हे सत्य या सगळ्या भावना माझ्या किंवा माझ्या पुतण्याच्या मनात उचंबळून आणण्यात अडथळा ठरत नाहीत. मी मराठी आहे; महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि माझ्या मातीने आणि माझ्या संस्कारांनी मला शिवाजी महाराजांवर प्रेम करण्याचा आणि त्यांच्या पराक्रमातून बोध घेण्याचा हक्क दिलेला आहे. माझ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर सर्व किंबहुना भारतातील सर्व जनतेला तो अधिकार आहे. ज्याच्या मनात स्वतःच्या मातीविषयी, आईविषयी, अस्मितेविषयी, भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी प्रेम आणि पराकोटीचा आदर आहे त्यांना सगळ्यांना तो अधिकार आहे असे मी मानतो. स्वत:च्या संस्कृतीविषयी प्रेम असणे; आदर असणे म्हणजे इतरांच्या श्रद्धांना, आदरस्थानांना लाथा-बुक्क्यांनी बदडून काढणे आणि हाणामारी करून "तुम्ही आमच्यातले नाहीत" असे ठणकावून सांगणे म्हणजे गुंडगिरीखेरीज दुसरे काहीच नसून खुद्द शिवाजी महाराजांनी कधी अशा रानटी प्रेमाचे समर्थन केले नाही हे सर्वश्रुत आहे. 'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड' च्या पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे, प्रवीण गायकवाड या मराठी मनात दुहीची विषवल्ली पेरणार्या शिवाजी महाराजांच्या ठेकेदारांनी जो अश्लाघ्य प्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुठल्याश्या समितीवरील निवडीच्या वादावरून सुरु केला आहे आणि त्याला सुसंस्कृतपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडून रस्त्यावर उतरून बाबासाहेबांसारख्या वयोवृद्ध आणि सगळे आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिलेल्या 'सभ्य' अभ्यासकावर भ्याड हल्ले करण्याची भाषा वापरून हिडीस स्वरूप दिलेले आहे ते अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. गुंडगिरी हे एकमेव धोरण असणार्या या संघटनांना शिवाजी महाराज किती माहित आहेत? ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिले; ज्या व्यक्तीने आजच्या तरूण पिढीला 'जाणता राजा' सारख्या महानाट्यातून शिवाजी महाराजांच्या अभेद्य इराद्यांचे बाळकडू पाजले त्या व्यक्तीवर तुम्ही हल्ला करण्याच्या गोष्टी करता? शिवाजी महाराज हे काय या संघटनांची आणि त्यांच्या या उद्दाम नेत्यांची 'रजिस्टर्ड ट्रेडमार्क' असलेली मालमत्ता आहेत? "वेडात मराठे वीर दौडले सात" यातले मराठे म्हणजे काय फक्त जातीने मराठा असलेले मराठेच आहेत काय? मी ब्राह्मण असून महाराष्ट्रात जन्मलो, मराठी बोलतो आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्फूर्ती घेतो म्हणून मी स्वतःला मराठा समजतो. जे मराठी आहेत, ज्यांना महाराष्ट्रधर्माची चाड आहे ते सगळे मराठे आहेत असे मी मानतो. कुठल्यातरी क्षुल्लक कारणांवरून एवढे वादंग उभे करण्यात कसले आले आहे शिवाजी प्रेम?
खुद्द बाबासाहेब पुरंदरे या सगळ्या वादावर मौन ठेवून आहेत. हा त्यांचा सुसंस्कृतपणाच म्हणावा लागेल. वाद आणखी चिघळू नये म्हणून त्यांचे हे मौन खरच प्रशंसनीय आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत घेतलेली भूमिका देखील समंजसपणाची आहे. कदाचित बाबासाहेब या दोन संघटनांच्या आवेशाला घाबरून गप्प बसले आहेत असे उद्दामपणे म्हणायला देखील हे शिवाजी महाराजांचे ठेकेदार कमी करणार नाहीत. ते कदचित खरे असेल देखील आणि त्यात वावगे काहीच नाही. रात्री रस्त्यावरून एकटे जातांना ५-७ माथेफिरू गुंडांनी अडवले तर कुठली ही व्यक्ती घाबरून सगळा ऐवज त्यांच्या स्वाधीन करेल. पण म्हणून त्या गुंडांच्या पराक्रमाचे कौतुक होणार नाही; त्यांच्या शौर्याला कुणी सलाम करणार नाही. त्याचप्रमाणे 'मराठा सेवा संघा'च्या किंवा 'संभाजी ब्रिगेड'च्या शिवाजी महाराजांचे चरित्र अगदी मुखोद्गत असणार्या विद्वान कार्यकर्त्यांनी उद्या खरेच त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांच्या या पराक्रमाचे कौतुक फक्त पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे आणि प्रवीण गायकवाड यांनाच असणार आहे. कुठलाच सुसंस्कृत माणूस गुंडप्रवृत्तीने एका वयोवृद्ध अभ्यासकावर केलेल्या हल्ल्याचे कौतुक करणार नाही.
मराठे-ब्राह्मण हा वाद खूप जुना आहे आणि तो मुख्यत्वेकरून मराठी ब्राह्मणांच्या बुद्धीचा कस लागणार्या तथाकथित क्षेत्रांतील वर्चस्वातून जन्मलेला आहे असे म्हटले जाते. तसं पाहिलं तर ब्राह्मण ही जात शांतताप्रिय (सहसा हाणामारी, गुंडगिरी, गुन्हेगारी यात न गुंतणारी) आणि थोडीशी संकोचप्रिय आहे. नाकाच्या सरळ रेषेत आयुष्याचा प्रवास करायचा, कुणाला लुबाडायचे नाही, फसवायचे नाही, कुणाच्या भांडणात पडायचे नाही, प्रत्यक्ष मारामार्या, गुंडगिरी यापासून शक्य तेवढे लांब रहायचे आणि शांत जीवन जगायचे आणि मुख्य म्हणजे जगू द्यायचे असा मराठी ब्राह्मणांचा जगण्याचा मध्यममार्ग आहे. आकाराने लहान असलेला हा वर्ग संस्कांरानी देखील बांधलेला असतो. शिवाय अंतर्गत दुहीमुळे 'एकीचे बळ' ही संकल्पना फक्त पुस्तकातच वाचलेली असल्याने 'आपला कुणी वाली नाही' या रास्त भावनेमुळे हा वर्ग समाजात वावरतांना थोडा घाबरूनच असतो. मराठ्यांच्या अंतर्गत दुहीचा पण स्वतंत्र असा इतिहास आहे. या सगळ्या गोष्टींचा राजकारणात येथेच्छ वापर करण्यात येतो आणि राजकारणी आपल्या स्वर्थाची पोळी सुखेनैव भाजून घेत असतात हे देखील सर्वश्रुत आहे.
ब्राह्मणांना जेवढे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर, ना. गोखले, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, राजगुरु, सेनापती बापट, संत ज्ञानेश्वर प्रिय आहेत तेवढेच शिवाजी महाराज, म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील (हे जैन होते), संत गाडगेबाबा, संत तुकाराम प्रिय आहेत हे मात्र मी छातीठोकपणे सांगू शकतो. आमच्या घरी संपूर्ण तुकाराम गाथा आहे, शिवचरित्र देखील आहे आणि पुतण्याला सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या गोष्टी अजून तरी नसून शिवाजी महाराजांच्या आहेत. ब्राह्मण हिंदूच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि इतर सगळ्या धर्मांविषयी सारखाच सलोख्याचा दृष्टीकोन बाळगून असतात. भगवान बुद्धांची तर मी कित्येकदा प्रार्थना म्हणतो आणि भगवान महावीरांची "णमो अरिहंताणम..." ही प्रार्थना देखील मी बर्याचदा म्हणतो. अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांनी गायिलेलं "खुदा से करता हूं मैं ये दुआ मदिने में..." हे नितांत सुंदर मुस्लिमधर्मीयांचं भजन ऐकून सगळी मानवजात कशी एक आहे याची खात्री पटते. या पार्श्वभूमीवर 'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड' यांनी एकाच मार्गाने निष्कारण पोसलेलं हे जातीयवादाचं भूत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे हे निश्चित.
'मी शिवाजीराजे...' मध्ये चर्चिले गेलेले मुद्दे किती महत्वाचे आहेत हे या सतत हाणामारीची भाषा करून हिरो ठरू पाहणार्या नेत्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मराठी माणूस का मागे पडतो? मराठी माणसाला उत्तर भारतीयांच्या खमक्या दुनियेत का अजिबात स्थान नसते? मराठी माणूस का नेहमीच बापडा आणि बिचारा असतो? मराठी माणूस का नेहमीच भेदरलेला, चाचरत लाचारपणे अशुद्ध हिंदी बोलणारा असतो? मराठी माणूस का मोठ्या हुद्द्यांवर नसतो? मराठी माणसाचे उद्योग क्षेत्रातले स्थान का नेहमीच हास्यास्पद विषय ठरतो? मराठी माणूस का नाही मल्होत्रा, खन्ना, अगरवाल, ओबेरॉय असल्या दमदार नावांच्या यादीत स्थान पटकावू शकत? फॅशन, मॉडेलिंग, अभिनय, मीडिया या व अशा ग्लॅमरस क्षेत्रांमध्ये मराठी माणसाचा कुठेच मागमूस का नसतो? मुंबईतला मराठी माणूस का नेहमी बदलापूर, खारघर ला जीवन कंठण्याच्या गोष्टी करत असतो? इथे मराठी माणूस म्हणजे समस्त महाराष्ट्रवासी अभिप्रेत आहेत. मराठा, ब्राह्मण, वाणी, शिंपी, चांभार, न्हावी, माळी असे सगळे मराठी या समाविष्ट आहेत कारण या सगळ्याच मराठी जनांची अवस्था वर नमूद केल्याप्रमाणेच आहे. कुठल्याच जातीत जन्म घेणे हे कुणाच्या हातात नसते आणि तो दोष तर अजिबातच नसतो. राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाला माझा आक्षेप आहे. ते म्हणतात की बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण म्हणून जन्मले हा त्यांचा दोष नाही. त्यांच्या समंजस भूमिकेतले हे विधान खटकले. मी ब्राह्मण कुटुंबात जन्मलो, माझ्या शिक्षक आई-वडिलांनी हजारो मुलांसारखेच मला ही चांगले संस्कार दिले आणि मान ताठ ठेवून सचोटीने जगण्याचे बळ माझ्या मनगटांमध्ये भरले याचा मला रास्त अभिमान आहे. ब्राह्मण कुटुंबात जन्माला येणे हा दोष कसा असू शकतो? किंबहुना कुठल्याही जातीत जन्माला येणे हा दोष कसा काय असू शकतो?
पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे आणि प्रवीण गायकवाड यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून विनाकारण जातीद्वेषाची ही बीजे रुजविण्याचे निंदनीय प्रकार ताबडतोब बंद करावेत असे मला वाटते. आपण जर काही विधायक कार्य करून महाराष्ट्रधर्म पुढे नेऊ शकत नसू तर निदान निव्वळ गुंडगिरी करून आणि आढ्यताखोरपणा करून जातीयतेची विषवल्ली तरी पेरू नये. या स्वतःला मराठ्यांचे स्वयंघोषित नेते म्हणवणार्या नेत्यांना शिवाजी महाराज किती कळले आहेत? साहित्य, समाजसेवा, कला, वैद्यकक्षेत्र आदि कुठल्या क्षेत्रात यांनी जनतेची निस्वार्थ सेवा केलेली आहे? बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रातले जाणते शिव-अभ्यासक आहेत आणि त्यांचे शिवाजी महाराजांविषयीचे संशोधन आणि ज्ञान हे खचितच इतर कुणाही लुंग्या-सुंग्यापेक्षा जास्त आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्रातल्या जनतेला एकत्र घेऊन पुढे जाणे हे सध्याच्या काळात सगळ्यात महत्वाचे आहे हे ही न कळण्याइतपत या संघटना जात्यांध झालेल्या आहेत? असे जर असेल तर ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल. आधीच महाराष्ट्रात परप्रांतियांच्या आक्रमणाचे संकट तोंडाशी येऊन ठेपलेले आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मराठी माणसाचा आवाज आणि मराठीची हाक क्षीण होत चालली आहे. परप्रांतीयांचे हे आक्रमण नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव, अहमदनगर सारख्या शहरांमधूनही जोमाने फोफावते आहे. ५-१० वर्षात या सगळ्या शहरांची आणि आपल्या अस्सल मराठी गावांची अवस्था मुंबईप्रमाणे झाली तर कदाचित शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याच मराठी भूमीत पोरके होईल. बाहेर सगळीकडे हिंदी बोलावे लागेल आणि या लोकांच्या दंडेलीला आपल्याच घरात सहन करत बसावे लागेल. परंपरेप्रमाणे दुहीचे आणि स्वार्थाचे राजकारण करून पुन्हा महाराष्ट्रधर्म बुडवू नये अशी विनंती मी त्यांना करतो. त्यापेक्षा काहीतरी विधायक कार्यात जर ही शक्ती आणि ऊर्जा वापरली तर त्याचा महाराष्ट्राला आणि मराठी जनतेला नक्कीच फायदा होईल. उगीच गुंडगिरी आणि दंडेलशाही करून काहीही साध्य होणार नाही. कदाचित बाबासाहेब कुठल्या त्या समितीवर नेमले जाणारही नाहीत पण त्यामुळे मराठीची आणि महाराष्ट्राची यत्किंचितही प्रगती होणार नाही. नेहमीसारखे दुहीचे आणि स्वार्थाचे राजकारण करून या संघटना आणि त्यांचे भेदभाव पाळणारे दूरदृष्टीहीन नेते महाराष्ट्राची आणि मराठीची आणि तमाम मराठी जनतेची कवडीचीही मदत करत नाही आहेत. उलट सामान्य जीवन ढवळून काढण्याचे आणि शांतता आणि सलोखा भंग करण्याचे कार्य मात्र ही मंडळी अगदी मनापासून करत आहेत हे नक्की. सामान्य जनता या गुंडगिरीच्या प्रवृत्तीला आणि दुहीच्या विषवल्लीला अजिबात भीक घालणार नाही हीच अपेक्षा आणि आशा!! जय महाराष्ट्र!!!
--समीर
वाचन
54832
प्रतिक्रिया
0