कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८
आधीचा भाग: कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७सकाळी आठ वाजता उठून तयारी झाल्यावर नाश्त्याला दही आणि टोमॅटो केचपच्या साथीने मेथीचे पराठे खाऊन आम्ही साडे नऊच्या सुमारास करमळी पासून ४६ कि.मी. अंतरावरच्या 'हळर्ण' किल्ल्यापासून (अलोर्ना किल्ला / Alorna Fort ) सुरुवात करून नंतर 'कोलवाळ', 'शापोरा' आणि 'अग्वाद' हे उत्तर गोव्यातील चार किल्ले आज पाहायचे असे ठरवून निघालो.
सोमवारची सकाळ असल्याने कामावर जायला निघालेल्यांची वाहने रस्त्यावर मोठ्या संख्येने होती त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिक जॅम झाले होते, परिणामी मांडवी नदीवरचा पूल ओलांडायलाच वीस-पंचवीस मिनिटांऐवजी पाऊण तास लागला. सव्वा अकराच्या सुमारास हळर्ण किल्ल्याच्या आधी चौदा किमी. वर असलेल्या कोलवाळ गावात पोचलो तेव्हा उजवी कडे वळल्यास 'थिवीचा किल्ला' (Thivim Fort) म्हणूनही ओळखला जाणारा 'कोलवाळ किल्ला' (Colvale Fort) अगदी जवळ असल्याचे गुगल मॅप दर्शवत होता म्हणून आधी तो बघायचे ठरवले.
मॅप फॉलो करत थोडे पुढे गेल्यावर गावातून जाणाऱ्या एका अरुंदशा रस्त्याच्या डावीकडे हि 'कोलवाळ किल्ला' नावाची पार खंडर स्वरूपात अस्तित्वात असलेली वास्तू दृष्टीस पडली.
उत्तर गोव्यातल्या बार्देश तालुक्यातील कोलवाळ गावाच्या परिसरात सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी तीन किल्ले बांधले होते. त्यातले दोन किल्ले कालौघात पूर्णपणे नष्ट झाले असून हा कोलवाळ किल्ला तेवढा चिऱ्याच्या (जांभा) दगडांत बांधलेला एक बुरुज आणि अन्य बांधकामाचे किरकोळ भग्नावशेष अशा स्वरूपात शिल्लक उरला आहे.
कोलवाळ किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो
थोडेफार भग्नावशेष सोडून ह्या लहानशा किल्ल्यात पाहण्यासारखे खरंतर काही नाही. आतली एकमेव विहीर देखील दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचऱ्याने तुडुंब भरलेली आहे. एकंदरीत इथे जे काही पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याच्या गतवैभवाबद्दल कुठलीही कल्पना येत नाही आणि किल्ल्याची दुरावस्था बघता स्थानिकांची आणि सरकारची उदासीनता त्याला कारणीभूत असावी हे लक्षात येते. पुरातत्व खात्याने हा किल्ला संरक्षित स्मारक असल्याचा छोटासा बोर्ड बाहेर रस्त्यावर लावला असला तरी मुळात जतन/संवर्धन करण्यासारखे विशेष काही उरलेच नाहीये.
काल पाहिलेल्या 'बेतूल' किल्ल्याचा पण केवळ एक बुरुज तेवढा शाबूत होता पण किमान तिथली लांब पल्ल्याची तोफ आणि आजूबाजूचा परिसर तरी अतिशय प्रेक्षणीय असा होता, पण इथे अक्षरशः काहीच बघण्यासारखे नसल्याने वेळ वाया गेल्यासारखे वाटले.
असो, बाराच्या सुमारास इथून चौदा किमी वर असलेला 'हळर्ण किल्ला' पाहायला आम्ही निघालो. पंधरा मिनिटांत आठएक किमी अंतर पार केल्यावर भावाला चहा प्यायची इच्छा झाल्याने 'पिर्णा' (Pirna) गावातल्या चौकात एक थांबा घेतला.
फेब्रुवारीच्या त्या पहिल्याच दिवसाने गोव्यातल्या थंडीचे सूप वाजल्याची जाणीव करून दिली होती. एकतर दुपारचा सव्वा बाराचा सुमार, त्यात गेल्या बारा दिवसात कधीही जाणवला नव्हता असा उकाडा जाणवत होता त्यामुळे मी चहा पिण्याऐवजी चहावाल्याच्या शेजारीच असलेल्या 'रुक्मिणी बार अँड रेस्टॉरंट' मध्ये जाऊन मस्तपैकी चिल्ड बिअर पिणे पसंत केले. तसाही काल संकष्टी असल्याने बहिणीच्या इच्छेचा मान राखत चक्क गोव्यात असून सुद्धा 'ड्राय डे' पाळला होता. त्याची कसर आज भरून निघणे स्वाभाविकच होते 😀
पाऊण वाजता तिथला कार्यक्रम आटपून निघालो आणि एक वाजण्याच्या सुमारास हळर्ण किल्ल्या (Alorna Fort) जवळ पोचलो.
वळणावरून दिसणारा किल्ल्याचा कॅप्सूल बुरुज
किल्ल्याच्या अगदी समोर असलेली शापोरा नदी
हळर्ण किल्ल्याचे प्रवेशद्वार
आत प्रवेश करताच दुतर्फा ठेवलेल्या तोफा
प्रवेशद्वारातून आत शिरताच उजव्या बाजूच्या तोफेच्या मागच्या अंधाऱ्या देवडीत आराम करण्यासाठी पहुडलेल्या किल्ल्याच्या सुरक्षारक्षकाने डाव्या बाजूच्या तोफेवर ठेवलेल्या रजिस्टर मध्ये नाव, गाव, फोन आणि गाडी नंबर अशी माहिती लिहून आत जाण्याचे फर्मान सोडले. त्याप्रमाणे करून आम्ही आत प्रवेशकर्ते झालो आणि किल्ला पाहायला सुरुवात केली.
सावंतवाडीचे संस्थानिक 'खेम सावंत' ह्यांचा १७०९ साली मृत्यू झाल्यानंतर गादीवर बसलेले त्यांचे पुतणे 'फोंड सावंत' ह्यांनी आपल्या शासनकाळात पोर्तुगीजांना शह देण्यासाठी त्याकाळी सावंतवाडी संस्थानाच्या अधिपत्याखाली असलेल्या हळर्ण ह्या गावी सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शापोरा नदीच्या किनाऱ्यावर हा भुईकोट किल्ला बांधला होता. पुढे १७४६ साली तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी किल्ल्याचे नूतनीकरण केल्याच्या खुणाही आढळतात जसे की खास पोर्तुगीज शैलीत नंतर बांधून काढलेला कॅप्सूल बुरुज.
जांभ्या दगडाचा वापर करून चहुबाजूने बांधलेली मजबूत तटबंदी, चारही कोपऱ्यांत चार बुरुज आणि बुरुजांवर तोफा चढवण्यासाठी चढावाच्या मार्गिका अशी ह्या किल्ल्याची संरक्षणात्मक रचना आहे. आतली अनेक बांधकामे कालौघात नष्ट झाली असली तरी एक तीन खोल्यांची बैठी चाळवजा इमारत, विहीर, किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही सुस्थितीत आहेत. तसेच आजूबाजूचा परिसरही प्रेक्षणीय आहे आणि खाजगी वाहन असल्याशिवाय इथे पोचणे बरेचसे अवघड असल्याने गर्दीही नसते त्यामुळे शांतपणे आजूबाजूचा निसर्ग अनुभवत खूप मोठाही नाही आणि लहानही नाही असा हळर्ण किल्ला पाहणे हा एक छान अनुभव ठरतो.
हळर्ण किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो
सुंदरसा हळर्ण किल्ला पाहून आम्ही इथून जवळपास ३० किमी अंतरावर असलेला शापोरा (Chapora Fort) हा पुढचा किल्ला पाहायला मार्गस्थ झालो.
चाळीसेक मिनिटांचा प्रवास केल्यावर चांगलीच भूक लागली असल्याने दुपारी सव्वा दोनच्या सुमारास म्हापसा येथील गोविंद फॅमिली रेस्टॉरंट येथे जेवणासाठी एक थांबा घेतला. तिथे पंजाबी थाळी आणि लस्सीचा आस्वाद घेऊन भरल्या पोटाने शापोरा किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आणि साडेतीनच्या आसपास किल्ला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंग लॉट मध्ये बाईक लावून टेकडी चढायला सुरुवात केल्यावर पंधरा-वीस मिनिटांत शापोरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो.
शापोरा किल्ल्याचे प्रवेशद्वार
तटबंदीवर उजवीकडे दिसणारा कॅप्सूल बुरुज
सोळाव्या शतकात उत्तर गोव्यातील आजच्या बार्देश (बारदेश/Bardez) तालुक्यात शापोरा नदीच्या नदीमुखाजवळच्या टेकडीवर आदिलशाहीत बांधला गेलेला हा किल्ला 'शाहपुरा' नावाने ओळखला जात होता. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी त्या प्रदेशावर ताबा मिळवल्यावर त्यांच्या राजवटीत 'शाहपुराचा' अपभ्रंश 'शापोरा' असा झाला.
छत्रपती संभाजी महाराजांनी १६८३ मध्ये हा किल्ला जिंकून घेतल्यावर दिल्लीच्या तख्तावर बसण्याच्या महत्वाकांक्षेपोटी शंभूराजांशी हातमिळवणी केलेला औरंगजेबाचा बंडखोर पुत्र 'मोहम्मद अकबर' हा १६८६ साली संभाजी महाराजांनी त्याला पर्शियाला पाठवेपर्यंत काही काळ इथे तळ ठोकून राहिला.
पुढच्या काळात किल्ल्याचा ताबा सावंतवाडी संसंस्थानाकडे गेला मात्र त्यांना केवळ दोन वर्षेच हा किल्ला आपल्या अधिपत्याखाली राखता आला. त्यांच्याकडून पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर १७१७ मध्ये किल्ल्याचे मोठ्याप्रमाणावर नूतनीकरण केले आणि खास पोर्तुगीज धाटणीचे कॅप्सूल बुरुज व आणीबाणीच्या काळात निसटून जाण्यासाठी खाली समुद्र किनारा आणि शापोरा नदीच्या काठापर्यंत जाणारे भुयार असे काही वैशिष्ट्यपूर्ण बदल किल्ल्याच्या रचनेत केले.
१७४१ मध्ये सावंतवाडी संस्थानाच्या अधिपत्याखालील पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्याने त्यांच्या अंमलाखालील प्रदेशाची सीमा उत्तरेकडे अधिक विस्तारली गेल्याने ह्या किल्ल्याचे लष्करीदृष्ट्या महत्व कमी झाले. पुढे १८९२ मध्ये पोर्तुगीजांनी शापोरा किल्ल्याचा वापर पूर्णपणे थांबवल्यावर मात्र त्याची रया गेली असली तरी आजघडीलाही ह्या भव्य किल्ल्याच्या मजबूत तटबंदीचा बराचसा भाग, कॅप्सूल बुरुज आणि किल्याचे मुख्य प्रवेशद्वार शाबूत आहे.
पूर्ण स्वरूपातला 'किल्ला' म्हणून इथे फार काही बघायला मिळत नसले तरी ह्या प्रशस्त किल्ल्याचे आवार आणि आजूबाजूला दिसणारे समुद्र, वॅगॅटोर बीच,शापोरा नदी आणि वनराईचे नयनरम्य असे देखावे मात्र खूपच प्रेक्षणीय आहेत.
शापोरा किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो
शापोरा किल्ला पाहून साडेचारच्या सुमारास आम्ही आजच्या दिवसात पाहायचा ठरवलेला शेवटचा किल्ला म्हणजे 'अग्वाद किल्ला' पाहायला निघालो. सहा वाजता किल्लाप्रवेश बंद होत असल्याने अधे मध्ये कुठेही न थांबता कांडोळी (Condolim), कळंगुट (Calangute) अशा गावांतील गजबजलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढत पस्तीस चाळीस मिनिटांत सतरा कि.मी. चा प्रवास पूर्ण करत किल्ल्याच्या समोरच्या पे अँड पार्क मध्ये बाईक लावून सव्वापाचच्या सुमारास तिकीट काउंटर गाठले पण प्रवेश मोफत होता.
अग्वाद किल्ल्याचे तिकीट काउंटर
पोर्तुगीजांच्या समुद्रमार्गे चालणाऱ्या व्यापाराच्या सुरुवातीच्या कालखंडात हॉलंडचे रहिवासी म्हणजे 'डच' हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. ह्या डच लोकांनी सतराव्या शतकाच्या सुरुवातीला इ.स. १६०४ मध्ये मांडवी नदीमुखात सात जहाजांच्या मदतीने पोर्तुगीजांच्या व्यापारी जहाजांची एक महिनाभर पूर्णपणे नाकाबंदी केली होती.
मांडवी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या 'रिस मागोस' (Reis Magos Fort) आणि दक्षिण किनाऱ्यावरच्या 'गॅस्पर दिआस' (Gaspar Dias Fort) ह्या पोर्तुगीजांच्या दोन्ही किल्ल्यांवर तोफा होत्या पण त्यांची मारक क्षमता कमी पल्ल्याची असल्याने नदीमुखात नांगरून ठेवलेली 'डच' जहाजे त्यांच्या निशाण्याच्या टप्प्याबाहेर होती. त्यामुळे हि नाकाबंदी भेदण्यासाठी त्यावेळी पोर्तुगीजांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले होते.
ह्या घटनेतून बोध घेऊन लगोलग त्यांनी आपली बंदरे आणि व्यापारी मार्ग सुरक्षित करण्याच्या उद्देशाने झुआरी नदीमुखावर 'मोर्मुगाओ' (मुरगाव किल्ला / Mormugao Fort) तर मांडवी नदीमुखावर 'अग्वाद' (आग्वाद किल्ला / Aguada Fort) असे दोन किल्ले बांधायला घेतले.
१६०६ साली 'अग्वाद पॉइंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरवजा टेकडीवर समुद्रसपाटीपासून ८० मीटर्स उंचीवर बांधण्यात आलेला हा 'अग्वाद किल्ला' म्हणजे सतराव्या शतकातील पोर्तुगीज संरक्षणात्मक स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. ह्या प्रशस्त किल्ल्यातील प्रमुख आकर्षणे म्हणजे इथली पाणी साठवण्यासाठी बांधलेली विशाल टाकी आणि प्राचीन 'दीपगृह'
टीप: वरील माहिती किल्यात लावलेल्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील फलकांवर लिहिलेल्या माहितीबरहुकूम आहे, जालावर मिळणाऱ्या माहितीत सनावळींमधे तफावत आढळून येते. त्या फलकांचे फोटोज खाली स्लाईड-शो मध्ये दिले आहेत.
पाणी साठवण्यासाठी बांधलेली टाकी
पोर्तुगीज भाषेतील 'अग्वाद' (Aguada) शब्दाचा मराठीत अर्थ 'पाण्याचा स्रोत' असा आहे. मांडवी नदीमुखाच्या उत्तर दिशेला असलेल्या ह्या किल्ल्यात पिण्यायोग्य गोड्यापाण्याचे अनेक नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहेत. ह्या नैसर्गिक स्रोतांतून मिळणारे पाणी ह्या विशाल भूमिगत टाकीत साठवले जात असे आणि लांबच्या समुद्री सफरीवर निघालेल्या जहाजांना पिण्याचे पाणी पुरवण्याची व्यवस्था ह्या अग्वाद किल्ल्यातून केली जात असे.
दीपगृह
दीपगृह
अग्वाद किल्ल्यात पाहायला मिळणारे १३ मीटर्स उंचीचे 'दीपगृह' (Light House) आशिया खंडातले सर्वात जुने दीपगृह मानले जाते. किल्ल्याच्या मध्यभागी १८६४ साली हे दीपगृह बांधण्यापूर्वी 'हिल ऑफ पायलट्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पणजीतल्या टेकडीवर मोठा जाळ पेटवून पोर्तुगीज जहाजांना मार्गदर्शन केले जात असे. काही तांत्रिक दुरुस्त्या करून शंभर वर्षांपेक्षा थोडा अधिक काळ हे दीपगृह वापरात होते. १९७६ साली किल्ल्याच्या उत्तरेकडे एक नवीन दीपगृह बांधून ते सेवेत आल्यावर ह्या प्राचीन दीपगृहाचा वापर बंद करण्यात आला.
अग्वाद किल्ल्याचे 'अप्पर अग्वाद' (१६०६ मध्ये बांधलेला डोंगरवजा टेकडीवरील पठारावरचा मुख्य किल्ला) आणि 'लोअर अग्वाद' (१६१२ मध्ये बांधलेला डोंगरवजा टेकडीच्या पायथ्याशी नदीमुख आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेला किल्ल्याचा भाग) असे दोन भाग आहेत.
लोअर अग्वादच्या दक्षिणेकडील (नदीमुखाकडील) भागाचा उपयोग 'अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार' (Antonio de Oliveira Salazar) ह्या पोर्तुगालच्या हुकूमशहाच्या राजवटीत त्याच्या राजकीय विरोधकांना कैदेत ठेवण्यासाठी इथल्या मूळच्या जुन्या छोटेखानी तुरुंगाचा विस्तार करून ह्या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने कारागृह म्हणूनच केला जाऊ लागला होता.
पुढे अधिकृतपणे त्याचे रूपांतर 'अग्वाद मध्यवर्ती कारागृहात' (Aguada Central Jail) झाले आणि २०१५ सालापर्यंत हे गोव्यातले सर्वात मोठे 'मध्यवर्ती कारागृह' म्हणून ओळखले जात होते. २०१५ मध्ये इथल्या सर्व कैद्यांना कोलवाळ इथल्या मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्यात आल्यावर गोवा पर्यटन विकास महामंडळाने हे कारागृह आपल्या ताब्यात घेतले आणि ह्या तुरुंगाचे रूपांतर आता गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात पोर्तुगीज राजवटी विरोधात आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या आणि बलिदान दिलेल्या अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना म्हणून केंद्र सरकारच्या 'स्वदेश दर्शन' योजनेअंतर्गत सुमारे 22 कोटी रुपये खर्चून एक 'स्वातंत्र्य संघर्ष संग्रहालयात' करण्यात आले आहे.
१९ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर हे संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पोर्तुगीज राजवटीत ह्या कारागृहात ठेवण्यात आलेल्या टी. बी. कुन्हा आणि राम मनोहर लोहिया ह्या मुक्ती सैनिकांना समर्पित केलेले दोन खास सेल ह्या संग्रहालयात आहेत.
लोअर अग्वादच्या पश्चिमेकडील (अरबी समुद्राकडील) बराचसा भाग १९७४ साली सुरु झालेल्या ताज हॉटेल्स ग्रुपच्या (Taj Hotel Group) 'ताज फोर्ट अग्वाद रिसॉर्टने' (Taj Fort Aguada Resort) व्यापलेला आहे.
अग्वाद किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो
चारशे वर्षांपेक्षा जुना असूनही छान देखभाल राखली गेल्याने सुस्थितीत असलेला हा प्रेक्षणीय असा अग्वाद किल्ला पाहून साडेसहाच्या सुमारास आम्ही ३० कि.मी. वर असलेल्या करमळीला जायला निघालो. रस्त्यात काही ठिकाणी ट्राफिक लागल्याने तासाभरात मुक्कामी पोचलो तेव्हा भाऊजीही ऑफिसहून घरी आले होते. मग फ्रेश होऊन मी, भाऊ आणि भाऊजी असे तिघे आठच्या सुमारास बाहेर पडलो आणि चालत चालत करमळी रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या 'विल्शा बार अँड रेस्टॉरंट' मध्ये प्रवेशकर्ते झालो.
रुचिपालट म्हणून मालिबु (Malibu) ह्या कॅरेबियन रम बेस्ड कोकोनट लिकरच्या जोडीला आमच्या दोघांसाठी स्टार्टर म्हणून 'तंदूर लॉलीपॉप' आणि भावासाठी 'फिंगर चिप्स' अशी ऑर्डर दिली गेली. निवांत गप्पा मारत २-२ पेग्ज झाल्यावर साडेनऊच्या सुमारास आमच्या शुद्ध शाकाहारी बहीण आणि भावासाठी ह्याच हॉटेलमधून सोलकढी, पनीर पराठे आणि काश्मिरी पुलाव पार्सल घेऊन भाऊ घरी निघून गेला तर मी आणि भाऊजी जवळच असलेल्या एका गाडीवर मिळणारे 'रस-ऑम्लेट' खायला गेलो.
जुन्या गोव्यातून करमळी स्टेशनकडे येतानाच्या रस्त्यावर स्टेशनच्या अलीकडे एका स्थानिक दांपत्याचा आपल्या घरासमोर हातगाडी लावून अंडी आणि चिकनच्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. बाकीचे पदार्थही चविष्ट असतात असे ऐकून आहे पण इथे मिळणारे 'रस-ऑम्लेट' विशेष प्रसिद्ध आहे. डबल किंवा सिंगल ऑम्लेटवर ओतलेला चिकनचा रस्सा आणि पाव अशा स्वरूपात मिळणारा हा पदार्थ खायला चार-पाच किलोमीटरच्या परिघात राहणारी कित्येक मंडळी नित्यनेमाने येतात. मी इथे पहिल्यांदाच हा प्रकार खाल्ला आणि मलाही तो आवडला.
खाणे झाल्यावर तिथून रमत गमत निघालो आणि साडेदहाच्या सुमारास घरी पोचलो. आजची ही आमची गोव्यातली शेवटची रात्र होती, उद्या सकाळी पणजीत थोडीफार निरुद्देश भटकंती आणि 'रिस मागोस' किल्ला पाहून पुढे कुडाळला जाण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती पण आज दिवसभरात केलेल्या किल्लेदर्शनाने थोडे दमायला झाल्याने झोप यायला लागली होती म्हणून फारवेळ टाईमपास न करता अकराच्या आसपास झोपी गेलो.
क्रमश: