मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक किस्सा

निनाद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एक किस्सा असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे. अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते. हाच तो हाच तो संघी बौद्धिक कावा वगैरे बोलायला लागले. आणि भारतीय लोकांना वाईट खोड आहे की जे काही जगात आहे ते भारतीय लोकांनीच शोधले - ते तडतडलेच! मी म्हणालो माझा आणि संघाचा काही संबंध नाही. ते जरा थंड झाल्यावर त्यांच्या एका ज्युनियर डाव्याने विचारले की असे कसे बोलू शकता तुम्ही? अकाऊंटींग हे ईटालियन आहे. आणि त्यांनी ही पद्धती शोधून काढली. आणि याचे पुरावे आहेत. आम्ही पुरावे नसल्यास ती गोष्ट कशी मानणार? मी म्हणालो की तुम्हाला आवडतील तेच पुरावे तुम्ही मानता. इतर सर्व सर्व समोर असेल तरी तुम्ही मानणार नाही. कारण ते तुमच्या सोईचे नसते! मग मी उदाहरण दिले की अगदी सुरुवातीच्या काळात भगवान विष्णूंनी संपत्तीचा देव कुबेर यांच्याकडून काही पैसे कर्ज म्हणून घेतले. म्हंटलं कर्ज आले म्हणजे आले डेबिट आणि क्रेडिट आणि अकाऊंटींग आले? मुळात पैसे ही कल्पनाच भारतीय आहे आणि त्यासोबतच आलेले अकाऊंट पण! ही कथा म्हणजे आर्मस्ट्राँगच्या उक्ती नुसार मॉडर्न भाषेत हे एक लहान पाऊल आहे, मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे. कारण पैसा या संकल्पनेचे हे पहिले लिखित स्वरूप मानले पाहिजे. ज्युनियर डावा म्हणतो की, या कथा आहेत. यात पुरावा कुठे आहे? आणि आम्ही देव मानत नाही तर भगवान विष्णू वगैरे कसे प्रुव करता? आणि याच्यात मॉडर्न अकाऊंटींग कुठे आहे? त्यांची दोन कॉलम केलेली वही कुठे तरी तरी असली पाहिजे होती. मी म्हणालो की तुम्ही तेच करताय की तुमच्या विचारसरणीला पूरक नसतील ते पुरावे नाहीत. आता विष्णू पुराणात ही कथा आहे पण तुम्हाला समजूनच घ्यायचे नाहीये तर त्याला मी काय करणार? मी म्हणालो, बरं ते जाऊ द्या. महाभारतात श्री कृष्णाने हुंडी घेतली-दिली त्याचे काय करणार? जर एका क्ष ठिकाणच्या व्यापार्‍याने हुंडी ही पद्धती वापरली आणि ती य ठिकाणे ऑनर झाली असा स्पष्ट उल्लेख आहे, तुम्ही शोधा. ज्युनियर डावा म्हणाला की त्या पण कथाच आहेत. महाभारत झालेच नव्हते. ईट इज ओन्ली अ फँटसी. मी म्हणालो की कथा आहे हे पण ठीक. अहो पण कथा असली तरी किमान काही हजार वर्षे जुनी आहे ना. संकल्पना कथेत तर आहेच ना? तर तो डावा म्हणतो की त्याचा वापर झाल्याचे लिखित पुरावे नाहीत. मी म्हणालो बरं ते जाऊ द्या. सातवाहन राजे झाले होते का? ते म्हणाले हो. म्हंटलं चला एक तर गोष्ट मान्य केली. त्यांनी नाशिकची पांडवलेणी खोदली हे तर मान्य व्हायला हवे कारण तसा शिलालेखच आहे. तेथे एक ग्रीक पद्धतीचे स्फिंक्स सारखे दिसणारे शिल्प खोदलेले आहे. म्हणजे सांस्कृतीक देवाण घेवाण होती? ते म्हणाले, हो सांस्कृतीक देवाण घेवाण होती. ही देवाण घेवाण व्यापारातही होती कारण सातवाहनांच्या नाणेघाटात व्यापारी गेला तर तिथे टोल द्यावा लागत असे. ही टोलची पद्धत कशी बरं चालत असेल? जमा आणि शासनाचा खर्च हा मेळ राजे गौतमी सातकर्णी कसा बसवत असतील? तो ज्युनियर डावा जरा विचारात पडला. ज्युनियर डाव्याचे विचार काहीसे बदलत आहेत हे लक्षात आल्यावर मघाचा भडकलेला डावा काका रिंगणात उतरला. मग त्याचे पुरावे असायला हवे ते कुठे आहेत? - डावे काका म्हणाले. मी म्हणालो अहो इतका मोठा रांजण खोदून ठेवला आहे ना कातळात आणि म्हणून तर नाव दिले ना नाणे घाट. व्यापारी नाणे टाकल्या शिवाय पुढे जाऊ शकत नव्हते. आजही ही सिस्टिम जगभरात टोलच्या रुपाने चालू आहे. गडक्रींनी नाही आणली ती. ही भारतात पहिल्यांदा होती आणि हा कातळात कोरलेला रांजण पुरावा आहे. पण ते डावे काका म्हणाले तो रांजण काही पुरावा नाही कारण त्याचे काहीही व्यवहार लिखित नाहीयेत. मी म्हणालो की तुमच्या विचारसरणीला पूरक नसतील ते पुरावे नाहीत हा माझा दावा तुम्ही परत प्रुव्ह करताय! मी म्हणालो अहो मध्ये आक्रमक आले त्यांनी बरेच काही जाळून टाकले आहे, असो! मी म्हणालो ते जाऊ द्या. तुमचा आवडता टॉपिक घेऊ. भारतीय सामाजिक शोषण व्यवस्था! त्यांचा चेहराच उजळला! मी म्हणालो भारतात शोषण व्यवस्था होती? ते उसळून म्हणाले होतीच होती. मी म्हणालो की सावकारी पद्धती शोषण करत होती का? आणि मग... चेहेरा पडलाच हो त्यांचा! आता ज्यांना लक्षात आले नाही त्यांच्यासाठी - सावकारी चालण्यासाठी कर्ज + व्याज ही संकल्पना आली. आणि त्याचा देण्याघेण्याचा हिशोब हवा. म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट ही सिस्टिम आलीच! अशा रितीने सिद्ध होत गेले की अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणार प्राचीन काळापासून वापरात आहे. तर हे असले डावे आणि पुरोगामी आणि त्यांचे चेले. त्याना फक्त त्यांचे युरोपीय पुरावे चालतात आपले भारतीय नाही!

वाचन 7541 प्रतिक्रिया 0