डॉक्टर
नमस्कार मिपाकरांनो,
थोड्या दिवसांपुर्वी माझ्या लहान भावाबरोबर एक चर्चा केली आणी त्यातुन मिळालेली माहिती आणी अनुभव इथे लिहित आहे.
तर माझा लहान भाऊ बी. फार्मसी पदविका घेऊन उत्तीर्ण झाला आणी पुढे व्यवस्थापन शास्त्राची पदवी घ्यायची म्हणुन तयारीला लागला आणी तोपर्यंत काहीतरी नोकरी करायची म्हणुन मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव (एम आर) पदावर एका कंपनीत रुजु झाला होता. तर माझे काही आणी त्याला/ त्याच्या मित्रांना त्या कालावधीत डॉक्टरांचे आलेले काही अनुभव इथे मांडत आहे.
*************************************************************
तर डॉक्टर, फार महत्वाची व्यक्ती. जन्मापासुन मृत्युपर्यंत ज्याची गरज भासते अशी व्यक्ती. ज्याच्याशी नेहमी खरेच बोलावे लागते अशी विश्वासु व्यक्ती. मला कसलेही दुखणे खुपणे आले तर माझा डॉक्टर मला बरा करेल असा प्रत्येकाला विश्वास. असो....
तसे डॉक्टर बनणे सुद्धा काही सोपी गोष्ट नाही म्हणा. दहावीपासुन जो त्याचा अविरत अभ्यास सुरु होतो तो आयुष्य संपेपर्यंत चालुच असतो. इतक्या किचकट शरिराचा अभ्यास करायचा, चित्रविचित्र लोकांच्या आगळ्यावेगळ्या रोगांवर प्रेमाने आणी त्यांचा विश्वास जिंकुन उपचार करायचा हे तंत्र आत्मसात करणे कुण्या साध्या माणसाचे काम नव्हे. त्यामुळे मला डॉक्टरांचा नेहमीच आदर वाटतो. एक वेगळेच तेज आणी आत्मविश्वास नेहमी पहावयास मिळतो त्यांच्या चेहर्यावर.
तर आता मानवी शरीराचा आणी वैद्यकशास्त्राचा थोडा विचार करुया.
कोट्यवधी माणसे, त्यांची राहणी, आचार विचार, आहार, अनुवांशिकता आणी यावरुन घडलेली त्यांची भिन्न प्रकारची शरीरे.
सांगाडा जरी सारखा असला तरी प्रत्येकाचे शरीर कैक प्रकारे भिन्न असु शकते. आता अभियांत्रिकी सारखी कोणतीही परिमाणे उपलब्ध नाहीत मानवी शरीरासाठी. उदा. हृदयाचे ठोके ७२ असावेत किंवा रक्तदाब ८०-१२० असावा याला काहीही ठोस आधार नाही. सर्वसाधारण निरोगी माणसांचे हे आकडे असतात म्हणुन त्याचे परिमाण झाले. तसेच कोणत्याही आजाराला हेच औषध योग्यच आहे हे नक्की सांगता येत नाही. त्यामुळे फार्मास्युटीकल कंपन्या दरवर्षी नवनविन शोध लावुन औषधे निर्माण करुन बाजारात आणत असतात.
एखादा रुग्ण दवाखान्यात येतो आणी स्वतःचे दुखणे डॉक्टरला सांगतो. डॉक्टर प्राथमिक तपासण्या करुन औषधे लिहुन देतो आणी ३-४ दिवसांनी पुन्हा भेटायला सांगतो. ३-४ दिवसांनी रुग्ण बरा झाला नाही तर मग डॉक्टर औषधे बदलुन देतो आणी जोपर्यंत रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत हा खेळ चालु असतो. कारण प्रत्येक डॉक्टर आयुष्यभर एखाद्या नवख्या अभियंत्यासारखा प्रॅक्टीस करत असतो औषधे बदलुन देण्याचे कारण हेच आहे की डॉक्टरला रोगाचे निदान झालेले नसते. (डॉक्टरला कितीही वर्षे अनुभव झाला तरी मी अमुक ठिकाणी प्रॅक्टीस करतो असेच ऐकायला मिळेल.)
तसेच रोगांचे निदानही खुप सोपे नाही कारण प्रत्येक रोगाचे/शरीराच्या भागाचे विषेशज्ञ डॉक्टर असतात. कितीतरी वेळा आजाराचे निदान होईपर्यंत बराच काळ लोटलेला असतो.
आता डॉक्टरने जर तुम्हाला फसवायला सुरुवात केली तर तुम्हाला कधीही ते कळणार नाही किंवा कदाचित विश्वास सुद्धा बसणार नाही. आजकाल देवाच्या नावाखाली सुद्धा बाजार केलेला आहे लोकांनी त्याला डॉक्टर तरी कसे अपवाद राहणार म्हणा.
तर असंख्य अशा फार्मास्युटीकल कंपनीज् बाजारातील स्पर्धेमुळे त्यांचा माल कसा खपेल याचाच विचार करत असतात. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतात. प्रसिद्ध डॉक्टरांना लाखो रुपयाचे धनादेश, महागड्या वस्तू, परदेशवारी, दिल्या जातात.
काही डॉक्टरसुद्धा या मोहाला बळी पडतात आणी मग सुरु होतो पैशांचा, स्वर्थीपणाचा खेळ. आपल्या कंपनीची औषधे लिहावीत म्हणुन डॉक्टराना विविध आमिषं दाखवली जातात. खुप मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जातो. पण हा पैसा य्तो कुठुन? तर हा पैसा आपणच पुरवतो. होय आपणच. एक रुपयाची गोळी आपल्याला पाच रुपयाना विकली जाते आणी आपण कोणतेच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. एम आर डॉक्टराना भेटतो म्हणजे काय तर आम्ही ह्यावेळी तुम्हाला काय देणार आहोत किवा तुम्हाला ह्यावेळी काय हवे आहे ते विचारण्यासाठी आणी नविन औषधाचे नाव पोहोचवण्यासाठी. कित्येक डॉक्टर मग डोळे बंद करुन ही औषधे लिहायला सुरुवात करतात. ज्या कंपनीने जास्त पैसे दिले आहेत त्या कंपनीची औषधे प्रिस्क्रिप्शनमधे लिहिली जातात. बरेच डॉक्टर एम आर आला की त्यांनी घरात घेतलेल्या वस्तुंची बिलं त्यांच्या हातात ठेवतात. मग तो एसी असो किंवा एखादी देशाबाहेरची पिकनिक. डॉक्टरची मर्जी राखण्यासाठी काहीही न बोलता ही बिले स्विकारली जातात. एक विचित्र माहीती अशी की भारतात अनेक अशा छुप्या कंपन्या आहेत की ज्या ड्युप्लीकेट औषधे बनवतात. आणी अशी औषधेही आहेत की ज्यात खरे औषधच नाही, म्हणजे जी गोळी घेतो त्यात नुसती पावडरच आहे आणी आपण मात्र आठवण ठेवुन डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे नियमित औषधांचे सेवन करत असतो. आपल्या घरातल्या व्यक्तीला गोळी विसरला तर रागावतो.
गरीब लोकांनी काय करायचे हो? कर्ज काढुन कितीतरी लोक दवाखान्याचा खर्च करतात. ऐपत नसताना महागडी औषधे खरेदी करतात. गरीबांचेच काय म्हणा कोणाचाही पैसा हा मेहनतीनेच कमावलेला असतो. असो..
हॉस्पिटल मधे तर आणखीनच भयानक प्रकार आहे. एखाद्या रुग्णाला साधारणसा आजार आहे हे माहित असताना देखील ऍडमिट करुन घेतले जाते, विविध प्रकारच्या महागड्या तपासण्या करायला सांगितल्या जातात, औषधे मागविली जातात आणी मग जीवाच्या भितीने आपण जे सांगितले ते लहान मुलासारखे गुपचुप ऐकुन घेतो.
माझ्या बंधुच्या आणी त्याच्या मित्रांच्या मते फक्त १०% डॉक्टर आहेत जे कधीही पैसा, वस्तु मागत नाहीत आणी दिली तर घेतही नाहीत. प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्यातच धन्यता मानतात. आजकाल गरोदर स्त्रियाना तर मुद्दाम घाबरवुन सिझेरिअन ऑपरेशन करायला सांगतात. (कारण त्यात नॉर्मल डिलीवरीपेक्षा जास्त पैस मिळतो.) कारण एकच आहे. डॉक्टराना किंबहुना वैद्यकशास्त्रालाच चॅलेंज नाही. चुक की बरोबर सांगणारा एकच व्यक्ती आणी तो म्हणजे डॉक्टर. त्यांना कुणी उलट प्रश्न विचारला तर राग येतो आणी डॉक्टर मी का तुम्ही असा टोला लगावला जातो, काय करणार आपल्याला गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही.
अजुनही खुप लिहिण्यासारखे आहे पण आता ईतक्यावरच थांबतो. बाकी जाणकार अजुन प्रकाश टाकतील अशी आशा आहे.
तात्पर्य एकच, कोर्टाप्रमाणेच हॉस्पिटलची पायरी चढण्याचा योग येऊ नये आणी आलाच तर मग त्या १०% डॉक्टरांपैकीच एक कोणीतरी आपल्याला भेटावा.
आपला,
मराठमोळा.
वाचन
19703
प्रतिक्रिया
0