लॉकडाऊन: पाचवा दिवस
लाॅकडाऊनमध्ये लोकांना आपली राहती जागा सोडून गावी का जायचा अट्टाहास का असतो हे कळत नाही. मेडिकल सुविधा आणि ट्रान्सपोर्टेशनचा विचार करता आत्ताच्या स्थितीला गावांपेक्षा, मेट्रो शहरं ही सर्वात जास्त सुरक्षित आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे.
गावच्या भूमीत करोनाची लागण होणारच नाही अशी सुरक्षिततेची(?) भावना किंवा मुंबई-पुण्यातल्या लहानश्या घरात बसून कंटाळवाणे दिवस काढण्यापेक्षा शेतीत कामे करून वेळ सत्कारणी लावावा ही कारणे त्यामागे कदाचित असू शकतील. कारण काहीही असो, सद्य स्थितीमुळे गर्भगळीत झालेली ही लोक अगदी कुठल्याही मार्गाने का होईना गावी जायचेच या हट्टातून मिळेल त्या गाडीने, हवे तेवढे पैसे खर्चून, किंवा अगदी चालतही गावच्या दिशेने निघाली आहेत.
अशा कठीण प्रसंगी, गावाच्या आसऱ्याला आलेल्या लोकांची मदत करण्याचे सोडून, गावी पोचलेल्या या लोकांना, त्यांचे स्वतःचे गावबांधव गावात उभे करत नाहीयेत, संसर्ग होईल या भितीने सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी भरू दिले जात नाहीये, त्यांच्यासोबतचे सगळे व्यवहार बंद करून अस्पृश्यासारखे वाळीत टाकले जातेय आणि हे सर्वात जास्त धक्कादायक, त्याचबरोबर माणूसकीला काळीमा फासणारे सुद्धा आहे.
लोकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे खरं तर! सद्य परिस्थिती खूप गंभीर तशीच नाजूकही आहे. आपण सगळे मिळून या परिस्थितीचा सामना नक्कीच करू शकतो. त्यासाठी खालील गोष्टी करण्याची नितांत गरज आहे.
१. या लाॅकडाऊनमध्ये आपले राहते घर ही सर्वात सुरक्षित जागा आहे हे ध्यानात ठेवून आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घेणे.
२. गावी स्थलांतर केलेल्या लोकांनी आपल्या स्थलांतराची माहिती स्थानिक प्रशासनाला आवर्जून द्यावी.
३. खोकला, किंचितसा ताप ही लक्षणे जाणवू लागल्यास त्वरीत जवळच्या रूग्णालयात तपासून घ्यावे.
४. स्वतःची योग्य ती काळजी घेत, मास्कचा वापर करून आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे.
५. समाजमाध्यमांवर अफवांचा प्रसार करणे प्रकर्षाने टाळावे, त्यामुळे प्रसंग आणखी बिकट होण्याची शक्यता होऊ शकते.
वाचन
16869
प्रतिक्रिया
0