निवडणुका जवळ आल्या आहेत. भाषणबाजी सुरु झालेली आहे. आपल्या देशापुढील प्रश्नांची चर्चा जाहीरपणे सुरु आहे. पण नेत्यांना वाटणारे प्रश्न व माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटणारे प्रश्न यांत फरक असु शकतो. तर अशा संभाव्य प्रश्नांची एक जंत्रीच करायचे ठरवले तर एक मोठी यादी तयार होईल. आपणही त्यात भर घालू शकता. या प्रश्नांवर विस्तृत चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे.
देशाबाहेरील समस्या:
१. काश्मीर मधे कधीही न संपणारे अतिरेक्यांबरोबरचे युध्द.
२. पाकिस्तान कडून सतत होणार्या भारतविरोधी कारवाया
३. चीनने गिळलेला आपला प्रदेश आणि उत्तर-पूर्व राज्यांवरचा त्यांचा डोळा
४. चीनच्या आर्थिक धोरणांमुळे होणारी आपली कोंडी
५. दहशतवादाच्या निमित्ताने अमेरिकेचा भारतीय उपखंडातला वाढता प्रभाव(आज पाकिस्तानवर दादागिरी करणारे उद्या आपल्यावरही करतीलच)
६. जागतिक मंदीचा दबाव
७. आर्थिक कर्जाचा वाढता बोजा
देशांतर्गत समस्या:
१. वाढती लोकसंख्या
२. राज्याराज्यांतील भांडणे
३. बेगडी धर्मनिरपेक्षतेच्या धोरणामुळे वाढलेला धर्मवाद व जातिवाद
४. शेतकर्यांच्या प्रश्नाचे मूळ न समजावून न घेतल्यामुळे होणारी वरवरची मलमपट्टी
५.तथाकथित संस्कृतीसंरक्षकांची कायदा हातात घेण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती
६. कायदा व सुव्यवस्थेची ढासळती अवस्था
७. आर्थिक, सामाजिक व लैंगिक भ्रष्टाचार आणि एकूणच नीतिमत्तेचे अधःपतन
८. प्रादेशिक पक्षांची दादागिरी, राजकीय गुन्हेगारीकरण व सामान्य माणसाची असहायता
९. न्यायदानातील विलंब आणि त्यातील अन्याय
१०. प्रदूषण आणि पर्यावरणाचा अक्षम्य र्हास
११. यातल्या बर्याच प्रश्नांची जाणीव असूनही पूर्ण बहुमत नसल्यामुळे लोकोपयोगी कामे न करु शकणारे हतबल केंद्र सरकार.
तेंव्हा आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे की प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे आणि ते डोळस असले पाहिजे ,की जेणेकरुन केंद्रात एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल.
सध्यातरी केंद्राची जबाबदारी पार पाडू शकेल असे दोनच मोठे पक्ष आहेत - भाजप किंवा काँग्रेस, दोघेही अनेक बाबतीत नालायक असले तरी!
प्रतिक्रिया
26 Mar 2009 - 1:59 pm | सातारकर
काही प्रश्ण कळले नाहीत
देशाबाहेरील समस्या: (हा काय प्रकार आहे?)
१. काश्मीर मधे कधीही न संपणारे अतिरेक्यांबरोबरचे युध्द.
८. प्रादेशिक पक्षांची दादागिरी, राजकीय गुन्हेगारीकरण व सामान्य माणसाची असहायता
ह्या गोष्टीला, कोणत्याही पक्शाचे असल तरी, सरकार कस जबाबदार आहे किंवा ते काय करू शकणार आहे?
-----
जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)
26 Mar 2009 - 6:18 pm | हेरंब
काश्मीर जरी भारताचा भाग असला तरी त्यांतल्या समस्या या बाहेरील देश निर्माण करत आहेत. शिवाय आपण नकाशात दाखवतो तो सगळा काश्मीरचा भाग आपल्या ताब्यात नाहीच आहे. एक मोठा लचका पाकिस्तानने तोडला आहे आणि त्यातील काही भाग परस्पर चीनला बहाल केला आहे.
प्रादेशिक पक्षांच्या दादागिरीला सरकार जरी जबाबदार नसले तरी घटनेत दुरुस्ती करुन प्रादेशिक पक्षांना लोकसभेच्या निवडणुका लढवता येणार नाहीत अशी तजवीज करता येईल. असे केले तरच पूर्ण बहुमताचे सरकार केंद्रात येऊ शकेल.
जात, धर्म, मी वैयक्तिकरीत्या मानत नाही, तेवढेच मला पुरे आहे. कोणत्याही पंथात जाण्याची इच्छा नाही.
26 Mar 2009 - 9:18 pm | शिवापा
१००% असेच म्हणतो