निष्काळजीपणा
लेखनप्रकार
निष्काळजीपणा
१) एक २३ वर्षाची मुलगी आली होती. पोटात दुखतंय म्हणून. हि माझी जुनीच रुग्ण आहे. तिला गेली काही वर्षे मुतखडा होण्याचा त्रास आहे. एकदा दुर्बिणीतून शल्यक्रिया करून झाली आहे. तिला अनेक वेळेस सांगून झाले आहे कि तुझे पाण्याचे प्रमाण कमी झाले तर लघवी जास्त संतृप्त (घट्ट) झाल्यामुळे त्यात मुतखडा होतो आहे तेंव्हा दिवसात किमान ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. कितीही कळकळीने सांगितले तरी हि मुलगी पाणी पीतच नाही.आई म्हणते कि कितीही सांगितले तरी मुलगी ऐकतच नाही.
२) एक ५० वर्षांच्या स्थूल बाई आहेत. मधुमेहामुळे त्यांची मूत्रपिंडे खराब होण्याच्या मार्गावर आहेत.त्यांना तीन वर्षांपासून सांगतो आहे कि काहीही करा पण मधुमेह नियंत्रणात ठेवा अन्यथा मूत्रपिंडे खराब होतील. बहुधा एका कानाने ऐकून घेतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. मला आश्चर्य वाटते कि इतके परखड शब्दात सांगितले अगदी काही वेळेस कठोर शब्दात सांगितले तरी परत परत माझ्याकडे कसे काय येतात.
३) हीच स्थिती असलेले एक "अहं" असलेले गृहस्थ मोटर सायकलने आले होते. त्यांना पण सांगितले कि "काहीही करा पण आपला मधुमेह नियंत्रणात ठेवा". त्यावर ते मलाच म्हणाले कि डॉक्टर मी काही माझी साखर सहा आठ महिने वर्षभर सुद्धा तपासत नाही. मी शांत पणे त्यांना म्हणालो साहेब तुम्ही वर्षभर चाकात हवा न भरता मोटर सायकल चालवता का? का-ही होणार नाही फार तर एखादे वेळेस पंक्चर होईल. पहिल्यांदाच हे गृहस्थ विचारात पडलेले दिसले.
४) श्री जठार (नाव बदलले आहे) याना त्यांची बहीण घेऊन आली होती. पोट बिघडलंय म्हणून. यकृत पाहिल्यावर त्यांना विचारले, "साहेब दारू पिता का?" त्यावर बहीण म्हणाली ते रोजच दारू पितात. श्री जठार यांचे लग्न झालेले नाही. वडिलोपार्जित घरात एकटे राहतात. नोकरी आनो, ती झाल्यावर रोज संध्याकाळी गुत्त्याकडे जातात. मी त्यांना माझ्या दवाखान्यात असलेला श्री गणपतीचा २ फुटाचा फोटो दाखवून म्हणालो, साहेब "एवढा मोठा फोटो" काढून ठेवा. कारण तुम्ही असेच दारू पीत राहिलात तर तीन चार वर्षात फोटो घरी भिंतीवर टांगायला लागेल. यानंतर त्यांचे दारू या विषयावर प्रबोधन केले. आपला अहवाल घेऊन ते गेले.
दोन महिन्यांनी श्री जठार बहिणीबरोबर परत हजर. आल्या आल्या बहीण माझ्या पाया पडू लागली. मला अतिशय कानकोंडे झाले. मी फार ओशाळून म्हणालो आहि माझ्या पाया कसले पडताय? त्यावर ती बहीण साश्रू नयनांनी म्हणाली डॉक्टर तुम्ही सांगितल्यावर गेल्या दोन महिन्यात त्याने दारूला हातही लावलेला नाही. आजपर्यंत एवढे उपाय केले पण ते फोल ठरले. मला अर्थातच आनंद झाला. "कुणाच्या का कोंबड्याने पण उजाडल्याशी मतलब" या न्यायाने. नंतर सहा महिन्याने श्री जठार परत आले होते सध्या ते संपूर्ण व्यसनमुक्त आहेत आणि त्यांचे यकृत जवळ जवळ उत्तम स्थितीत आले आहे.
५) असेच एक "अहं" ६५ वर्षाचे खाऊन पिऊन सुखी असलेले गृहस्थ( श्री माने --नाव बदलले आहे) पोट बिघडल्यामुळे माझ्याकडे आले होते. वजन १०८ किलो. सोनोग्राफी करताना यकृतात भरपूर चरबी भरलेली दिसत होती. मी त्यांना सांगत होतो कि साहेब तुमचे वजन, रक्तदाब आणि यकृतात चरबी हे हृदय विकाराला आमंत्रण देणारे आहेत.तुम्हाला मधुमेह आहे का? ते माझ्याकडे तुच्छपणे पाहत म्हणाले "मी असलं काही तपासून पाहत नाही आणि माझं कसं छान चाललं आहे".
मी त्यांना कळकळीने म्हणालो साहेब तुमच्यासारखे लोक पटकन हृदय विकाराला बळी पडतात तेंव्हा काळजी घ्या.
ते म्हणाले, मला "सध्या काय आहे" ते सांगा. अर्थात त्यांना अन्न विषबाधा झाली होती. ते सांगितले, अहवाल दिला आणि ते गेले. त्याच वेळेस( ते बाहेर जाताना) त्यांच्या शेजारी असलेली एक मुलगी ( हि माझ्याकडे मूल होण्यासाठी सोनोग्राफीसाठी येत असे) तिचे आणि त्यांचे बोलणे झाले.
हीच मुलगी पुढच्या महिन्यात परत तपासणी साठी आली असताना म्हणाली डॉक्टर, ते माने काका आले होते ना? मागच्या महिन्यात ते १५ दिवसापूर्वी हृदय विकाराने वारले.
मला धक्काच बसला. मला "बत्तीशी वठली" म्हणतात तशी भावना आली.
आजही हा विचार मनात आला कि मला कसं तरी होतं. कितीही कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पड्ली म्हणावं तरी असं परखड बोलावं कि नाही या संभ्रमात मी आहे.
वाचन
28861
प्रतिक्रिया
0