व्यावहारिक नुकसान काय?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
27 Feb 2019 - 12:57 am
गाभा: 

आज 'मराठी राजभाषा दिन'.नेहमीप्रमाणे मराठीची काळजी करण्याचा दिवस. :)
दरवेळी भावनिक आवाहन करुन मराठी जपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा यावेळी थोडासा उलटा विचार करुन पाहिला तर?
म्हणजे मराठीत बोला,मुलांना मराठी शाळेत घाला,आपली मातृभाषा आहे वगैरे वगैरे भावनिक आवाहन करण्यापेक्षा मराठी भाषा येत्या १०० वर्षात लोप पावली तर व्यावहारिक/आर्थिक स्तरावर(भावनिक नव्हे)काय नुकसान होईल याचा अंदाज बांधला तर? की केवळ सांस्कृतिक नुकसान तेवढंच होईल आणि व्यावहारीक नुकसान होणारंच नाही?

म्हणजे बघा,मोगल काळापासून मराठीत फार्सी शब्द आलेत.फार्सी ही मूळ भारतीय भाषा नाहीये.खरंतर ती भारतावर परकीय शासकांनी लादलेली भाषा आहे.ही भाषा त्याकाळी भारतीयांनी(इथे मराठी भाषिकांनी) स्वत:हून स्विकारलेली नव्हती.तत्कालिन शासकीय कारभाराची भाषा,मोगल शासकांची भाषा यातून ती पसरत गेली आणि अगदी आजही बरेच फार्सी शब्द मराठीत आहेत.यामुळे मराठी भाषा समृद्ध झालेली नाहीये.मूळ मराठी शब्दांची हकालपट्टी होऊन फार्सी शब्द त्या जागी आले.अन्यथा सावरकरांना भाषाशुद्धीसाठी प्रयत्न करावे लागलेच नसते.

अशाच प्रकारे इंग्रजीचं गारुड मराठी भाषिकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसंच सर्वाधिक बोलली जाणारी भारतीय भाषा म्हणून जोडीला हिंदीचंही आक्रमण मराठीवर येत्या काळात वाढू शकतं.
हे असं काही होईल असं म्हणण्याला, वाढणार्‍या इंग्रजी माध्यमाच्या शाळा,त्यातही अशा शाळांमधे मराठी भाषा सक्तीची नसणं,मुला-पालकांकडूनही दुसरी भाषा म्हणून जर्मन,फ्रेंच अशा पैसा मिळवायला उपयोगी ठरणार्‍या भाषा निवडलं जाणं,महानगरांमधे वाढणारा हिंदीचा प्रभाव आणि त्यामुळे बोलली जाणारी हिंदीमिश्रित/हिंदीप्रभावित मराठी, इंग्रजी सफाईदारपणे बोलता आल्याने लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळण्याची अधिक शक्यता,जागतिक स्तरावरच्या अधिक संधी उपलब्ध होणं यामुळे पुष्टीच मिळत नाहीये का?
हे दिवसेंदिवस वाढत आहे.याला टक्कर द्यायला मराठी कमी पडतेय.कमी पडत जाणार हे उघड आहे.

कशी असेल येत्या १०० वर्षानंतरची मराठीची स्थिती? भरमसाठ इंग्रजी आणि हिंदी शब्दांनी भरलेली असेल की केवळ भरमसाठ इंग्रजी शब्दांनी भरलेली असेल? कारण इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने आणि तिचा आर्थिक प्राप्ती वाढण्याशी जवळचा संबंध असल्याने कदाचित हिंदीचीसुद्धा वाट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण पैसा,अधिकाधिक पैसा हा नेहमीच मानवाला आकर्षित करत आलाय. :)
मग अशी जी मराठी असेल ती मराठी म्हणण्याच्या पात्रतेची असेल का?

आज भारताची लोकसंख्या वाढती असली तरी ती सदोदित वाढतच नाही राहणार.कुठेतरी स्थिरावेल.पण जेव्हा स्थिरावेल तेव्हाही ती कमी नसणारंच आहे.मग या अफाट लोकसंख्येला पोट भरण्यासाठी अखिल जगात कुठंही जावं लागू शकतं.म्हणजेच पर्यायाने इंग्रजीचा संबंध आलाच.मजुरी काम आज जरी काही प्रमाणात मानवी श्रमांद्वारे केलं जात असलं तरी भविष्यात ते मोठ्या प्रमाणात यंत्रांकडून केलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.मग उरतील ती थोडी वरच्या स्तरावरची कामं.जिथे इंग्रजीचा आधार घेऊनच काम करणं अनिवार्य असेल.
तर त्याकाळी आपण मराठीपासून बर्‍यापैकी दूर गेलेलो असू.

म्हणजे आज या घडीला तरी अापण मराठी चांगल्याप्रकारे बोलता,लिहीता न आल्याने भविष्यात मराठी माणसांचं व्यावहारीक नुकसान काहीच होणार नाहीये असं ठामपणे म्हणू शकतो.भविष्यातही हे व्यावहारिक स्तरावर न अडणं कायम राहील की अडावं अशी काही आत्ता ज्ञात नसलेली परिस्थिती निर्माण होईल?

प्रतिक्रिया

१) नॅट जिओ,हिस्ट्री चानेल्सवर आताच हिंदी किंवा तमिळ बांगला भाषांतून तोच कार्यक्रम ऐकता येतात. मराठीचा विचारही करत नाही गुगल.
२) मराठी मालिका कलाकार, कथालेखक यांना बरे उत्पन्न मिळणार नाही.

थॉर माणूस's picture

1 Mar 2019 - 1:15 am | थॉर माणूस

काही वर्षांपुर्वी मराठीचा पर्याय ठराविक वाहिन्यांनी दिला होता, मी काही महिने वापरले होते. भाषांतराचा खर्च आणि वापरकर्त्यांची संख्या यांचा मेळ जुळला नसावा.

गुगल मराठीचा विचार करत नाही? नक्की कुठल्या अंगाने म्हणताय ते लक्षात येत नाहीये. पण गेली किमान ५ वर्षे मी जी-मेल मराठीमधे वापरत आहे. गुगल सर्च आणि युट्यूब वगळता गुगलचे बरेचसे अ‍ॅप मराठीमधे वापरून पाहीले आहेत. गुगल ट्रांसलेट तर इंस्टंट ट्रांस्लेशन (कॅमेरा कुठल्याही इंग्रजी शब्दावर फिरवलात कि तिथेच मराठी समानार्थी शब्द उमटतो) सुविधा सुद्धा देते मराठी मधे.

आपण भाषेचा जितका जास्त वापर करू तितके जास्त पर्याय उपलब्ध होत जातात. उदाहरणच घ्यायचे झाले तर मराठी वाहिन्यांकडे बघा, एक काळ होता जेव्हा मराठी वाहिन्या आतबट्ट्याचा व्यवहार ठरतील असे भाकित करून कुणीच उतरत नव्हते स्पर्धेत. आता ढीगभर झाल्यात.

उपयोजक's picture

1 Mar 2019 - 8:50 am | उपयोजक

तुम्ही इतकं मराठी वापरता हे पाहून अभिमान वाटला.

तुषार काळभोर's picture

28 Feb 2019 - 3:34 pm | तुषार काळभोर

अजून काही दशके तरी मराठी आताच्या पातळीच्या खाली जाणार नाही असे वाटते.

मराठीची ट्रॅजेडी हा अरुण साधू यांचा लेख पाहा.
लेख सारकास्टिक आहे.
पण तो तेवीस वर्षांपूर्वी लिहिलेला आहे.
सारकॅजम अपेक्षित असल्यानं थोडी अतिशोयक्ती गृहित धरली तरी लेखाच्या तेवीस वर्षांनी देखील परिस्थिती चांगलीच आहे.
लेखासारखी भाषा अति-अति-उच्चभ्रु किंवा पेज३ प्रकारच्या मराठी लोकांत असेल.
पण उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित कुटुंबांपासून ते तळागाळापर्यंत अजूनही सामान्य मराठीच बोलली जाते.
(कधी कधी Elephantने शी केली असं बोललं जाताना दिसतं, पण ते न्यूनगंडातून असतं)
अगदी कॉन्वेन्ट/सिबीएसई/आयसीएसई मध्ये शिकणारी मुले असली तरी घरात वातावरण आणि भाषा मराठीच असते.
पुण्यात तरी (जिथे परप्रांतीयांचं प्रमाण मागील दोन दशकात खूप वाढलंय) मराठी पेपर इंग्रजी पेपरपेक्षा जास्त विकले जातात. सकाळ ६ लाख, लोकमत ३.५ लाख अन् टाईम्स १.८ लाख.
माझ्या जवळची उदाहरणं अर्धशहरी-अर्धग्रामीण भागाची प्रातिनिधिक आहेत - पुण्याच्या लगतचा ग्रामीण भाग, तालुक्यांची ठिकाणं.
पण शहरात आणि शहरी उपनगरात (कोथरूड, सहकारनगर इत्यादी) देखील मराठीची स्थिती मला तरी चिंतनीय वाटत नाही.

सगळं आलबेल आहे असं नाही.
दोन गोष्टींची काळजी वाटते. एक म्हणजे मराठीमधील लेखन, साहित्य, पुस्तके आणि दुसरं म्हणजे जाणीवपूर्वक हिंदाळलेलं बोलणारी माध्यमे.
२००० नंतर मराठीतलं ललित लेखन जाणवण्याइतकं कमी झालंय.
आणि
माध्यमांतील भाषा - लोकमतची सीएनएक्स पुरवणी एकदा वाचा. कचाकच दातात काचा आणि खडे आल्यासारखं वाटंल.

एवढे दोन प्रॉब्लेम सोडले तर मला मराठीची आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक काळजी वाटत नाही.
(सामाजिक दृष्ट्या मराठीला किंमत नाही, पण त्याला मराठी अ‍ॅज ए भाषा कारणीभूत नसून आपला - मराठी माणसाचा भीडस्त/नेमस्त स्वभाव कारणीभूत आहे.)

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2019 - 4:09 pm | चौथा कोनाडा

समर्पक प्रतिसाद, पैलवान.

मराठीच्या भवितव्याची चिंता सतत आपल्या समुहाला पोखरत आहे हे वेदनादायी बाब आहे.

उपयोजक's picture

1 Mar 2019 - 12:00 am | उपयोजक

धन्यवाद!अरुण साधूंचा लेख वाचतो.

स्मिता.'s picture

1 Mar 2019 - 4:40 am | स्मिता.

आजच हा लेख वाचनात आला. अस्ताला जाणार्‍या सर्वात जास्त भाषा भारतात आहेत हे वाचून वाईट वाटलं.

विजुभाऊ's picture

1 Mar 2019 - 2:12 pm | विजुभाऊ

हिंदीने ही भाषा तीच्या बहुतेक बोलीभाषांना गिळंक्रुत केलेलेच आहे
मराठीला जर सर्वात जास्त धोका असेल तर तो हिंदी भाषीकांकडून
आपण त्यांच्याशी हींदीत बोलतो. आणि आपली मात्रुभाषा विसरत जातो

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Mar 2019 - 2:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नुसती भाषिकांची संख्या वाढली म्हणजे भाषा टिकली असे नाही. केरळची लोकसंख्या ३.५ कोटी आहे तर महाराष्ट्राची ११ कोटी. कथित न्युनगंड असलेली महाराष्ट्रा सारखी १/२ राज्य सोडली तर अशी भीती ईतरत्र भारतात नाही असे आमचे मत. बंगालमधे हिंदीही बोलले जाते पण बंगाली नष्ट होईल ही भीती नाही. तेलंगणातही हिंदी बोलले जाते पण तेलुगु नष्ट होईल ही भीती नाही.
द्वेष पसरवून काही होणार नाही.

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2019 - 11:50 pm | मराठी कथालेखक

मराठीचा व्यहवारात उपयोग काय असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले, मोठ्या कंपनीत काम करणारे यांना असा प्रश्न पडण्म साहजिक आहे.
पण व्यहवारात अनेक ठिकाणी मराठीचं महत्व अबाधित आहेच आणि राहिलही.
१) सरकारी पातळीवर - राज्य सरकारी कार्यालयात मराठीतून कामकाज चालते
२) मराठी वृत्तपत्रे
३) मराठी वाहिन्या
४) न्यायालयीन कामकाज ( जिल्हा, सत्र न्यायालय ई. उच्च न्यायालयाचे कामकाज मात्र इंग्लिशमधून चालते)
याशिवायही काही क्षेत्रांत मराठी येणे (महाराष्ट्रात काम करताना) गरजेचे वाटते
उदा: डॉक्टर - डॉक्टरला रुग्णाशी त्याच्या भाषेत संवाद साधता येणे गरजेचे वाटते (मला नेमका काय त्रास होतो आहे वा काय लक्षणं दिसत आहेत हे मलातरी एखाद्या डॉक्टरला हिंदी वा इंग्लिशमध्ये समजावणं कठीण वाटेल - अगदी पायाला मुंग्या येतात इतकं साधं समजावतानाही खूप श्रम पडतील)
लेखक म्हणतायत तसे जगात काम करण्याकरिता इंग्लिश उपयोगी पडते पण सगळीकडेच नाही. जपान, युरोपातली काही राष्त्रे येथे इंग्लिशचा उपयोग खूपच कमी होतो. झालेच तर भारताची लोकसंख्या कितीही वाढली तरी आपल्या राज्यातून वा आपल्या देशातून बाहेर पडणारे लोक फारतर २-५ % असतील. बाकी लोकांना
आपल्याच गावात (वा शरात ) राहून उपजीविका करायचीये. त्याकरिता इतरांशी संवाद साधता येणे महत्वाचे आहे.

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2019 - 11:56 pm | मराठी कथालेखक

अरे हो.. मराठी चित्रपट विसरलोच की.. मराठी चित्रपटसृष्टी वाढते आहे. प्रिया़ंका चोप्रा, अजय देवगण यांना मराठीत चित्रपट काढावेसे वाटलेत. अनेक चांगल्या कंपन्या (यूटीव्ही , वायाकॉम १८ वगैरे) मराठी चित्रपट बनवत आहेत.