नमस्कार.
बऱ्याच दिवसांनी मिपावर आलो आहे. डोक्यात एक विषय घोळत आहे त्याविषयी लिहितोय.
प्रश्न - भारताबाहेरच्या विकसित म्हणाल्या जाणाऱ्या जगात नोकरीची संधी आल्यावर भारत सोडावा ?
एक जवळचा मित्र सध्या भारतातच एका शहरात राहतोय. खाऊन पिऊन सुखी म्हणता यावे इतके उत्पन्न आहे. नौकरीही चांगली आहे. त्याचे आणि बायकोचे आई बाबा काही तासात घरी येऊ शकतील हि सोय हि आहे. लहान मुलगी आहे, तिच्यासाठी व्यवस्थित सपोर्ट सिस्टिम तयार केली आहे दोघे नौकरी करत असल्यामुळे. तो राहतो ते शहर दोघांनाही आवडते. त्यांचे आई वडीलही येऊन भरपूर दिवस राहतात.
युरोपमधल्या एका चांगल्या शहरात नौकरी त्याला स्वतःहून, न शोधता मिळत आहे. पगाराविषयी काही माहिती नाहीये, पण किती असेल तो अंदाज आहे.
सुरुवातीला दोघेही खुश होते पण आता विचार करताय तेव्हा तितकेसे खुश नाहीत.
+ कारणे ( महत्वाच्या क्रमानुसार)
दोघांना फिरण्याची खूप आवड आहे. पूर्ण युरोप तिथे राहून फिरून होईल असे वाटते. ते काय इथून जाऊन होणार नाही
पोरीला एक जागतिक अनुभव मिळेल, मित्रालासुद्धा - पुढे करियर मध्ये कामाला येईल
नवीन भाषा, संस्कृती आणि पाककृती
- कारणे
दोघांच्या आई वडिलांपासून दूर राहावे लागेल.
इथे जी सपोर्ट सिस्टिम आहे ती काही तिथे उभी राहणार नाही.
नवरा बायको दोघेही तसे इन्ट्रोव्हर्ट असल्यामुळे मित्रमंडळी कमी आहेत, तिथे गेल्यावर हे अगदीच एकटे पडायची हि शक्यता.
दोघांनाही एकाच वेळी नोकरी मिळाली नाही तर उत्पन्न कमी होऊ शकेल काही दिवस . ( हे सगळ्यात कमी महत्वाचे. उत्पन्न वाढेल हि पण तो सध्या तरी डिसिजन फॅक्टर नाहीये )
आणि- सगळे व्यवस्थित चालले असतांना स्वतःचा देश सोडावा का?
मिपाकरांपैकी कोणी हा डायलेमा अनुभवाला आहे का? असल्यास काय तोडगा काढला? इतर काही गोष्टींचा विचार केला पाहिजे?
धन्यवाद...
प्रतिक्रिया
13 Feb 2019 - 6:01 pm | टवाळ कार्टा
दोघांचा एकत्रित पगार कमी होऊन भागणार असेल
+ पालक स्वतः हिंडू फिरू शकत असतील
+ डोक्यावर मोठ्ठे लोन नसेल
+ भरपूर भटकायची आवड असेल
तर अशी संधी सोडू नये
14 Feb 2019 - 3:34 pm | खंडेराव
सगळेच मुद्दे बरोबर! लोन चा यादीत ऍड करतोय..
13 Feb 2019 - 6:18 pm | सुबोध खरे
सर्वात पहिल्यांदा :-- आपण देश सोडून जात आहोत म्हणजे काही महापाप करीत आहोत, आई वडिलांना म्हातारपणी एकटे टाकून जात आहोत किंवा देशद्रोह करीत आहोत हि खंत/ अपराधीपणाची भावना बाजूला ठेवा
(असली भंपक ढकलपत्रे जालावर सतत वाहत असतात आणि त्यामुळे हि अपराधीपणाची भावना निर्माण होते /वाढीस लागते).
वास्तववादी विचार करा आणि तारतम्य ठेवून अंतिमतः काय सोयीचे आहे तो निर्णय घ्या.
13 Feb 2019 - 8:39 pm | फेरफटका
अगदी समर्पक आणी छान लिहीलयत. १००% सहमत.
14 Feb 2019 - 3:41 pm | खंडेराव
अगदी सहमत. हे भावनिक उमाळे खोटे सगळे, जर त्यात तथ्य नसेल तर ..
13 Feb 2019 - 7:04 pm | मराठी कथालेखक
त्याच्या पत्नीला तिथे नोकरी मिळणे शक्य आहे का ? म्हणजे तिच्या क्षेत्रात तिथे नोकर्या उपलब्ध आहे का ? नसल्यास तिच्या करिअरमध्ये खंड पडेल हे तिला मान्य आहे का ? इथे मी फक्त पगाराचे नुकसान या अर्थाने म्हणत नाही तर करिअर करण्याची इच्छा असून संधी न मिळाल्याने होणारे करिअरचे नुकसान.
घरची सगळी कामे स्वतःला करावी लागतात (खास करुन साफ सफाई , भांडी घासणे, स्वयंपाक) या कामांना तिची/दोघांची तयारी आहे का ?
भारतात आई-वडीलांच्या (दोघांच्या) अडीअडचणीच्या वेळी तातडीने मदत करेल असे कुणी आहे का ? (हॉस्पिटलायजेशन वगैरे झाले तर)
प्रदीर्घकाळ वा कायमस्वरुपी तिकडे राहण्याची मानसिक तयारी आहे का ? माझे वैयक्तिक मत की उगाच दोन-तीन वर्षाकरिता जावू नये जावे तर कायमचे जावे. दोन-चार वर्षे जाणारे इकडे येवून इथल्या आयुष्याशी पुन्हा जुळवून घेताना त्रासून जातात शिवाय इकडे राहणार्यांच्या (माझ्यासारख्यांच्या) दृष्टीने असे लोक इकडे येवून उगाच महागाई वाढवतात. त्यापेक्षा तिकडे गेलात तर कायम तिकडेच रहा, तिथेच घर खरेदी करा :)
14 Feb 2019 - 6:34 am | एमी
> त्याच्या पत्नीला तिथे नोकरी मिळणे शक्य आहे का ? म्हणजे तिच्या क्षेत्रात तिथे नोकर्या उपलब्ध आहे का ? नसल्यास तिच्या करिअरमध्ये खंड पडेल हे तिला मान्य आहे का ? इथे मी फक्त पगाराचे नुकसान या अर्थाने म्हणत नाही तर करिअर करण्याची इच्छा असून संधी न मिळाल्याने होणारे करिअरचे नुकसान.
घरची सगळी कामे स्वतःला करावी लागतात (खास करुन साफ सफाई , भांडी घासणे, स्वयंपाक) या कामांना तिची/दोघांची तयारी आहे का ? > हे अतिशय महत्वाचे. इंट्रोव्हर्ट बाईला तिकडे नेऊन, केवळ घरात बसवून ठेवून, घरकाम-मुलंबाळ यातच समाधान मानायला लावल्यास/तसा प्रयत्न केल्यास त्याचे कल्पनातीत दुष्परिणाम होऊ शकतात.
14 Feb 2019 - 3:51 pm | खंडेराव
दोघांचे मुद्दे महत्वाचे आहेत. विशेषतः इथे काम करणाऱ्या बाईला काम ना मिळणे आणि फक्त घरी बसावे लागण्यातून होणार त्रास. हे मी यादीत टॉपला टाकतो. मित्राकडे हा पर्याय आहे कि बायकोनेही काम शोधावे तिथे याचे प्रोसेसिंग होई पर्यंत.३-४ महिने सर्व प्रोसेस मध्ये सहज जातील, आणि तोपर्यंत बायकोला काम शोधात येईल. किंवा, यांना प्रोसेस उशिरा सुरु करण्याचाही पर्याय आहे.
13 Feb 2019 - 7:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी खुशाल जावे असे आमचे मत. अनेकांना जायची ईच्छा असते पण संधी न मिळाल्याने ते येथेच "मेरा भारत महान" म्हणतात. युरोपची संस्कृती 'बिघडलेली' नाही . मुलीला युरोपियन संस्कृती अनुभवता येईल. पश्चिम युरोपचे लोक पाट्या टाकणार्यांपैकी नाहीत. मित्राला करियर्मध्ये नक्कीच फायदा होईल.
14 Feb 2019 - 3:53 pm | खंडेराव
हा देशही छान आहे अगदी युरोपच्या नकाशावरील टुरिस्ट सर्किट मध्ये..
13 Feb 2019 - 7:58 pm | गवि
रोचक परिस्थिती..
विषय इंटरेस्टिंग आहे. मतं वाचायला आवडतील.
13 Feb 2019 - 8:24 pm | कानडाऊ योगेशु
म्हणजे कुटुंब सध्या सुखी समाधानी आहे (म्हणजे आतापावेतो होते) असे लिहिले आहे.
एकुण प्रकार मला "प्रॉब्लेम ऑफ ९९" सारखा वाटत आहे.
बाकी मित्राला मिपाच्यावतीन शुभेच्छा द्या.
14 Feb 2019 - 3:55 pm | खंडेराव
तीच तर अडचण आहे. जाणे हे जरुरी नाही, तर डिस्क्रेशन वर आहे, त्यामुळे निर्णय अवघड झालाय!
13 Feb 2019 - 8:25 pm | कानडाऊ योगेशु
म्हणजे कुटुंब सध्या सुखी समाधानी आहे (म्हणजे आतापावेतो होते) असे लिहिले आहे.
एकुण प्रकार मला "प्रॉब्लेम ऑफ ९९" सारखा वाटत आहे.
बाकी मित्राला मिपाच्यावतीन शुभेच्छा द्या.
13 Feb 2019 - 9:00 pm | यशोधरा
इतरांनी त्यांच्या मतानुसार, तेही परिस्थितीचे जेमतेम आकलन असताना दिलेले सल्ले वा मांडलेली मते ह्याचा तुमच्या मित्राला कितपत उपयोग होईल? त्यालाच त्याची परिस्थिती वा भले, वाईट कळेल ना? झालेच तर घरातील व्यक्तींशी चर्चा करावी, आणि निर्णय घ्यावा आणि एकदा निर्णय घेतला की त्याची जबाबदारी घेऊन इतर कोणाला दोष ना देता तो निभावावा.
इतरांच्या ओंजळीने मित्र किती दिवस पाणी/ दूध इत्यादि पिणार? त्यात काय हशील?
14 Feb 2019 - 3:58 pm | खंडेराव
त्या कुटुंबातले हे बाहेर जायचा विचार करणारे पहिले. अशात कुटुंबाला सारासार विचार करायला आवश्यक असणारे ज्ञान आणि माहिती हि कमी पडते. इथे बघा, किती वेग वेगळे पैलू बाहेर आलेत. प्रत्येक प्रतिसादाने नवीन विषयाला स्पर्श केलाय. आणि जर जमलंच नाही जाऊन, तर तो परत येऊन थोडी मिपावर दोष देणार? वयाने प्रौढ लोक सल्लामसलत करतात पण निर्णयाची जबाबदारी स्वतः: घेतातच..
14 Feb 2019 - 4:55 pm | यशोधरा
काही प्रमाणात हे ठीक पण, आज आंतरजालावर खूप माहिती मिळून जाते. दुसरे म्हणजे, तुमच्या मित्राला स्वतःचा प्राधान्य क्रम आधी ठरवावा लागेल, नाही का? एकदा कशाला प्राधान्य द्यायचे हे ठरले की निर्णय घेणे सुकर होऊ शकते. त्यासाठी मनाशी अत्यंत प्रामाणिक राहून आपल्याला आत्ता काय महत्त्वाचे आहे/ पुढील 3-4 वर्षात काय महत्त्वाचे वाटेल, हे तेच ठरवू शकतात.
जितके जास्त सल्ले, सुचवणुकी तितके गोंधळ वाढत राहतो.
14 Feb 2019 - 7:00 pm | टवाळ कार्टा
माझा इथला प्रतिसाद उडवला गेलाय
=))
13 Feb 2019 - 10:33 pm | अर्धवटराव
नव्हे... युरोप धरावा.
आर्थीक बाबतीत फार ओढाताण होणार नसेल आणि बाकि काहि वैयक्तीक कंपल्शन नसतील तर हि युरोप संधी अवष्य साधावी. युरोपात राहुनच युरोपची असली मजा घेता येईल. वेगवेगळ्या सीझनमधला युरोप अनुभवता येईल. लहानग्यांचा शैक्षणीक अनुभव समृद्ध व्हायला देखील मदत होईल. नाहिच पटलं तिथलं वास्तव्य तर रिटर्न मारता येतोच कि. पण आलेली संधी सोडु नये.
19 Feb 2019 - 11:21 am | खंडेराव
हा ज्याला २ वे डोर म्हणत्यात त्यातला प्रकार आहे. परत येणे सोपे नाही, पण शक्य आहेच..लहानग्यांसाठी मोठी संधी आईबाबा पेक्षा, एक नवीन भाषा शिकली तर ती आयुष्यभर कामाला येईल..
14 Feb 2019 - 12:14 am | डाम्बिस बोका
नक्की जा. मेरा भारत महान, भारतीय संस्कृती वगैरे सल्लागारांपासून सावधान.
जीवनात नेहमी संधी मिळेल असे नाही. मध्यम वर्गीय असाल तर संधीचे सोने करा. वेगळा जीवन अनुभव घ्या
नाहीच आवडले तर परत येत येते, तुमच्या मनाच प्रश्न आहे.
स्वतःसाठी पण जागा थोडे.
19 Feb 2019 - 11:22 am | खंडेराव
खरोखर कठीण आहे नेहमी नेहमी..हजार गोष्टी जुळून याव्या लागतात..
14 Feb 2019 - 1:30 am | बन्या बापु
माझा व्यतिगत अनुभव..
२००७ साली मी आयर्लंडला जॉब स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आम्ही ( मी, बायको आणि ९ महिन्याचा मुलगा) तेव्हा बंगलोरमध्ये स्वतःच्या घरात राहत होतो, आई वडील पुण्यात आणि सासर नागपुर. केवळ चांगली संधी मिळत आहे आणि एक प्रगतीचे पुढचे पाऊल म्हणून आम्ही त्याकडे बघत होतो.
घरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या.
आई : तुम्ही काही ऐकणार नाहीत. पण एवढेसे ते रोप ( म्हणजे माझा मुलगा) तिकडे रुजेल का ? ह्याचा विचार करा.
बाबा: कशाला उगाच उपद्व्याप ? आहे ते चांगला चालले आहे. त्यात काय तुम्हाला सुख बोचत आहे का ?
जवळचे नातेवाईक: भारत सोडून कशाला जाताय? तुमच्या मुलाला आपली संस्कृती कशी कळणार ? त्याला मराठी तरी बोलता येईल का ?
असे अनेक मते ऐकून घेतली.....
आज आम्ही कॅनडा मध्ये स्थायिक आहोत. माझा मुलगा अस्क्खलीत मराठी बोलतो. रामरक्षा, स्तोत्र सगळे तोंडपाठ आहे. आई वडील येऊन जाऊन असतात. त्यांना पण विविध देश फिरवले गेल्या १० वर्षात.. आमची आर्थिक, सांस्कृतिक, वाढ उत्तम झाली आणि सर्वात महत्त्वाचे कुठेही मनामध्ये किंतु नाही आहे..
अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती.. ज्याला जे रुचेल, पटेल ते त्याने करावे.. स्वतः वर विश्वास असेल तर जगात कुठे राहा.. सुखी राहाल..
19 Feb 2019 - 11:24 am | खंडेराव
तुमचा अनुभव शेर केल्याबद्दल धन्यवाद..
कुठेही मनामध्ये किंतु नाही आहे..
स्वतः वर विश्वास असेल तर जगात कुठे राहा..
हे दोन्ही खूप महत्वाचे, मित्रालाही वाचायला लावले..
14 Feb 2019 - 12:21 pm | Rajesh188
भारताची लोकसंख्या खूपच जास्त वाढली आहे .त्या मुळे जे देश सोडून जात आहेत ते देशाचं bhalach करत आहेत .
सरकारनी प्रोस्थाहान दिले पाहिजे पण ऐक अट जरूर टाकावी परत हया मागास देशात येता येणार नाही जायचं आसेल तर कायम स्वरुपी जावे
14 Feb 2019 - 1:13 pm | प्रमोद देर्देकर
माई मोड ऑन
" अरे बाबा राजेश , तू असं का बरे बोलतोयस ?"
"पुढील सर्व आयूष्यभर तू का जेवायला घालणार आहेस त्यांना ? " .
आणि लोकसंख्येचे म्हणत असशील तर तू लग्नच करू नको बरं .
माई मोड ऑफ.
14 Feb 2019 - 4:25 pm | खंडेराव
" अरे राजेश, बाबा सरकारने शिक्षणाला प्रोत्साहन दिले तर प्रोस्थाहान हा शब्द सगळे प्रोत्साहन असा लिहितील :-) "
हलके घ्या राजेश साहेब.. ६९ बिलियन डॉलर २०१७ मध्ये बाहेर काम करणाऱ्या भारतीयांनी देशात पाठवले.
१ बिलियन डॉलर म्हणजे 71,08,55,00,000 इतके रुपये.
14 Feb 2019 - 4:00 pm | स्वधर्म
तुमच्या मित्रासाठी मुलगी लहान असल्याने स्थलांतर खिडकी अजून उघडी अाहे. त्यांचे वय ४० पर्यंत अाणि मुलीचे वय १२-१५ पर्यंत कुठेही अवश्य जावे असा सर्वसाधारण अनुभव अाहे. ४५ नंतर मात्र अाईवडीलांच्या जबाबदार्या वाढतात, मुलांचे शिक्षणहि महाग होते अाणि त्यांना स्वत:ला सामाजिक नाती पैसा किंवा करीयर पेक्षा जास्त महत्वाची वाटू शकतात. मी पाहिलेले परदेशात स्थायिक झालेले बरेच लोक फक्त भारतीयांच्या कंपूतच सामाजिक नातेसंबंध करू शकले अाहेत.
14 Feb 2019 - 5:31 pm | चौथा कोनाडा
+१
महत्वाचे मत मांडलेत.
14 Feb 2019 - 4:01 pm | विजुभाऊ
बिंधास्त जा हो.
एका नव्या देशात राहिल्याने बरेच वेगळे अनुभव मिळतात.
आपण इन्डिपेन्डन्ट होतो.
देश चांगला वाटला तर रहा. नाहीतर काय परत यायचे स्वातंत्र्य आहेच की.
इथे काय अन तिथे काय .........शेवटी माणसेच आहेत की.
( हे गल्फा ला लागू होत नाही तो अनुभव वेगळा असू शकतो. )
19 Feb 2019 - 11:26 am | खंडेराव
विजुभाऊ..हो, हे खरे आहे. सगळी सपोर्ट सिस्टिम जी इथे उभी आहे ती नसतांना सुद्धा बाहेर लोक मुले मोठी करतातच ना. इंडिपेंडंट होणे महत्वाचे..
14 Feb 2019 - 5:38 pm | गवि
मनाची तयारी बरीचशी झालेली वाटते. जाण्याच्या बाजूने कल बराच बनलेला दिसतो. फक्त कोणाच्या तरी एका लहानश्या "जा" अशा निर्णायक "पुश"चा इंतजार असतो.
इथे तसं आहे असं उगीच वाटतंय. (धागाकर्त्याचे प्रतिसाद जाऊ की नको प्रश्न पडलेल्या मित्राशी मॅचिंग असतील असं मानून)
अशावेळी सरळ जाणं उत्तम.
19 Feb 2019 - 11:27 am | खंडेराव
शेवटी सध्याचे स्टेटस टाकतोय आता!
14 Feb 2019 - 6:51 pm | Blackcat (not verified)
जा
14 Feb 2019 - 7:44 pm | समीरसूर
खूप उत्तम संधी आहे. नक्कीच जावे. काही काही प्रसंगांमध्ये निर्णय घेणे अवघड जाते. कुठून तरी आपण एक शिक्कामोर्तब होण्याची वाट बघत असतो. थोडं प्रोत्साहन पाहिजे असतं. कुणीतरी आपलेपणाने आपल्यावर विश्वास दाखवण्याची गरज भासत असते. हे अगदीच नॉर्मल आहे. साधा शर्ट घेतांना आपण कुणाच्या तरी पसंतीची वाट बघत असतो; हा तर खूप मोठा निर्णय आहे. अशा प्रसंगी निर्णय बरोबर ठरेल की नाही हे आपल्याला माहित नसते. या बाबतीत तर निर्णय चुकीचा ठरणारच नाही. नाहीच जमलं तर परत येता येईलच की. अशा संधी आता गेल्या वीस वर्षात मिळायला लागल्यात आणि अशाच संधींमुळे मध्यमवर्गीय लोकांचे जीवनमान उंचावले आहे. एक सुवर्णसंधी म्हणून या संधीकडे पाहिल्यास किती फायदे आहेत बघा. उत्तम पद्धतीचं सुखकर जीवन, नवीन देश, नवीन लोक, नवीन अनुभव, उत्तम नोकरी, चांगल्या कमाईची संधी, आई-वडिलांना नवीन देश दाखवण्याची संधी...सगळ्या बाजूंनी अगदी सकारात्मक अशी ही संधी दिसतेय. सगळं व्यवस्थित होईल. बिनधास्त जा म्हणावं. त्यांना शुभेच्छा! :-)
14 Feb 2019 - 8:19 pm | गवि
+१
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्यात जितक्या स्थानबदल करण्याच्या संधी मिळतील तितक्या जास्तीतजास्त घ्याव्यात. एकाच ठिकाणी टिकून जमून राहण्यात काय मजा?
अगदी फॉरेन संधी नसलेल्यानी देशातच शहरे गावे जमेल तेव्हा बदलावीत. नवे लोक, नवे रस्ते, नवी हवा, नवा परिसर , नवा निसर्ग. अतीव रोचक प्रकार.
19 Feb 2019 - 11:32 am | खंडेराव
माझा स्वतःचा भारतातील अनुभव असाच आहे, मी चार वेळा शहरे बदलली, आणि दर वेळेस मागच्या शहरापेक्षा नवीन आवडले. बायकोला पुणे आठवते अधून मधून, मला नाही :-)
15 Feb 2019 - 9:29 am | Rajesh188
इथे आयआयटी करणार देशात पहिला येणारा अत्यंत हुशार भारतीय विद्यार्थी अतिशय हुशार आदे dr शिकले इथे पण नोकरी amerike मध्ये करतात वर वर पाहता हयात काहीच गैर नाही .पण आसा पण युक्तिवाद आहे की लायकी नसताना सुधा अमेरिकन लोकांनी भारता मधल्या हुशार लोकांना खूप मोठा पगार देवून आपल्या कडे घेचून घेतलं आणि त्यांचे टॅलेंट स्वतः chya देशासाठी वापरून घेतलं .अपेक्षे पेक्षा जास्त पगार असल्या मुळे ही लोक दुसऱ्या कोणासाठी तरी नोकरी करू लागले मेहनत ह्यांची पण अधिकार amerikecha आशि परिस्थिती आहे .त्यामुळे मातृभूमी ल ह्या हुशार लोकांचं काही ही उपयोग झाला नाही आणि कूटनीती मध्ये भारत परत हरला
15 Feb 2019 - 12:42 pm | तिता
नक्की जा. जीवन समृद्ध होईल. कदाचित दोघेही इन्ट्रोव्हर्ट राहणार नाहीत. नोकरी करताना घरचेच संबंध टिकवताना ओढाताण होते. नवीन नाती कशी वाढवणार. बाहेर पडले की पर्याय नाही. फक्त आई वडील यांना गृहीत धरू नका. त्यांचा होकार असेल तर प्रॉब्लेम नाही. अन्यथा रोज हाच विषय मानसिक त्रास देतो. तसेच ते तिथे येऊन घरकाम करतील अशीही अपेक्षा ठेवू नका. भारतीय संस्कृती बाहेर राहूनही चांगली आत्मसात करता येते. चिंता नको.
17 Feb 2019 - 7:00 am | बजरन्ग
अनुभव जरूर घ्यावा
19 Feb 2019 - 11:30 am | खंडेराव
तुमच्या प्रतिसादातून बऱ्याच महत्वाच्या बाजू कळल्या, आणि मित्राचा निर्णय पक्का व्हायला मदत झाली..
सध्याची परिस्थिती - त्याने होकार कळवला आहे, आणि २ शहरांविषयी चर्चा सुरु आहे - लंडन आणि व्हिएन्ना..यापैकी एक नक्की होईल :-)
20 Feb 2019 - 12:46 pm | सुबोध खरे
व्हिएन्ना उत्तम आहे सर्वच दृष्टीने -भाषेचा प्रश्न सोडला तर
इंग्लंड भयंकर महाग आहे आणि वातावरण भिकार पासून महा भिकार पर्यंत असते १२ महिने.
6 Apr 2019 - 2:34 pm | स्वामि १
त्याने परदेशात जावेच.... पण आपल्याला असे नाही वाटत का युरोपियन देशा प्रमाणे आपला महाराष्ट्र ही औद्योगिक क्रांती ने संपन्न होऊन आपल्या तरूणांना त्यांच्या कतृवा प्रमाणे येथेच नोकऱ्या मिळव्यात.
6 Apr 2019 - 3:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकदा जायचं ठरलंच असेल आणि भविष्य उज्वल असेल तर खुशाल वाटेल तिथे जावं. हॅपी जर्नी.
आपण भावनिक बिवनिक लै गुंता वाढवून ठेवलेला असतो. मुख्यत: आई वडील यांचं कसं होईल. घरची माणसं सोडून राह्यचं म्हटलं की पोटात खड्डाच पडतो.
-दिलीप बिरुटे
-
7 Apr 2019 - 9:01 am | जेम्स वांड
काही दिवस अगोदरच असाच आमच्या एका युके मधील क्लायंट सोबत गप्पा सुरु होत्या, तो तक्रार करत म्हणाला, आजकालची पोरे लैच इन्स्टंट आहेत अन आपल्या सोयीनुसार सगळं हवंच असतं त्यांना, मग म्हणाला
"आता बघ ना वांड्या, माझी पोरगी चांगली १८ ची घोडी झालीये, तिला म्हणलं घरात राहायचं असेल तर महिना ७५ £ भाडं टाक नाहीतर स्वतःची सोय बघ, तशी आपल्या आजीचा वशिला लावून भाडं ७० £ करवून घेतलं अन तरीही , मला महाग पडतंय म्हणून रडारड सुरू"
सगळं काही दृष्टिकोन आहे बरंका!
28 Apr 2019 - 1:03 pm | चौथा कोनाडा
:-)
मार्मिक !
28 Apr 2019 - 11:30 pm | Rajesh188
भारत सोडून गल्फ मध्ये जाणारे हे मुख्य ता कष्टकरी वर्ग आहे
बिगारी,ड्रायव्हर, नर्स आणि कमी दर्जाचे कामं करणारे गल्फ मध्ये जातात .
कारण त्यांना इथल्या पेक्षा जास्त पगार भारतीय चलनात
मिळतो.
अमेरिकेत जाणारे हे उच्य शिक्षित
आणि हुशार लोकं असतात पण
त्यांची हुशारी भारतातील भ्रष्ट लोकांना आवडत नाही त्यामुळे त्यांची योग्य संधी नाकारली
जाते म्हणून ते अमेरिकेत जातात तिथे त्यांना
योग्य मान मिळतो
30 Apr 2019 - 5:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
गैरसमजूतीवर/अज्ञानावर आधारलेला प्रचंड गैरसमज !!! याबद्दल काही संदर्भ?!
भारत सोडून गल्फ मध्ये जाणारे हे मुख्य ता कष्टकरी वर्ग आहे
बिगारी,ड्रायव्हर, नर्स आणि कमी दर्जाचे कामं करणारे गल्फ मध्ये जातात .
खाडी देशात अनेक क्षेत्रांत... इंजिनियर्स, डॉक्टर्स, मॅनेजर्स, व्यवसायधंदा चालवणारे इतर व्यावसायिक, अगदी सरकारी ऑफिसांतले तज्ञ/तंत्रज्ञ, इत्यादी सर्व स्तरांमध्ये... भारतीय आहेत आणि तेथे सन्मानाने काम करत आहेत व उच्च्पदेही भूषवित आहेत. उद्योधंद्यात यशस्वी होऊन अमेरिकन डॉलर्समध्ये मल्टीबिलियनेर झालेले भारतीयही तेथे आहेत. किंबहुना, बहुतेक सर्व खाडी देशांना विकसित करण्यात सर्व स्तरांच्या भारतियांचा हातभार लागला आहे.
"खाडी देशांमध्ये, लहान पासून उच्च अश्या सर्व व्यवसाय/नोकरीच्या स्थरांतील लोकांची गरज भागवली जाते", हे सर्वसामान्य ज्ञान, खूप अभ्यासाने नाही तर, केवळ वर्तमानपत्रांतील जाहिराती वाचल्यास सहज मिळते ! खाडी देशात उच्च यश मिळवलेल्या अनिवासी भारतियांबद्दलही जालावर भरपूर माहिती आहे !! :)
अमेरिकेत जाणारे हे उच्य शिक्षित
आणि हुशार लोकं असतात पण
त्यांची हुशारी भारतातील भ्रष्ट लोकांना आवडत नाही त्यामुळे त्यांची योग्य संधी नाकारली
जाते म्हणून ते अमेरिकेत जातात तिथे त्यांना
योग्य मान मिळतो
अमेरिकेत जाणारे सगळेच उच्चविद्याविभूषित नसतात तर सर्वच स्तरातले असतात, हे जालावर सहज उपलब्ध असलेल्या अमेरिकेन सरकारच्या इमिग्रेशन पॉलिसीबद्दल थोडेसे वाचन केले तरीही ध्यानात येते. किंबहुना, अमेरिका हा असा एक विशेष विकसित देश आहे की जेथील लिगल इमिग्रेशन सिस्टिममधून तेथे जाणार्या बहुसंख्य लोकांना त्यांच्या पात्रतेवर (मेरीट) नाही तर इतर, राजकिय-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर-अमेरिकेची गरज, इत्यादी मुद्द्यांवर स्विकारले जाते. या पॉलिसीवर, त्या देशातील स्थानिक उच्चतांत्रिक उद्योगधंद्यांकडून, सतत टीका होत असते.
तुमचा गैरसमज, "अमेरिकेचे H1B आणि Green Card हे व्हिसा, केवळ संगणकशास्त्रातील पदविधरांना मिळतात", या गैरसमजूतीवर आधारीत असावा असा अंदाज आहे.
सन २००० ते २०१० मध्ये सुमारे १.४ कोटी, म्हणजे दर वर्षी सरासरी १२.७ लाख लोक अमेरिकेत स्थलांतरीत झाले. त्यापैकी, सन २००३ मध्ये सर्वात जास्त म्हणजे १,९५,००० (एकूणाच्या सुमारे १५%) H1B व्हिसा दिले गेले. ते प्रमाण २००४ मध्ये ८५,००० (६५,००० सर्वसाधारण आणि २०,००० उच्च्विद्याविभूषित, म्हणजे एकूणाच्या सुमारे ६.७%) असे खाली आणले गेले आहे व ते या वर्षीपर्यंत (सन २०१९) तसेच कायम आहे. अमेरिकेला गरज असलेले मानवी संसाधनाला आकृष्ट करण्यासाठी H1B व्हिसा निर्माण झाला आहे व त्यासाठी शिक्षण ही 'मूलभूत अट' नसून 'देशात उपलब्ध नसलेले मानवी संसाधन आयात करणे' ही आहे... मुख्य म्हणजे H1B व्हिसा केवळ संगणकतज्ञांसाठी नसून त्यात नर्स, शिक्षक, वेटर, आचारी, हॉटेलमधील सेवांसाठी लागणारे कर्मचारी, इत्यादी अनेक व्यवसाय अंतर्भूत आहेत. सद्या, अमेरिकामान्य शिक्षण असलेल्या नर्सेसना H1B ची पायरी ओलांडून सरळ Green Card (जे फक्त मुख्य उमेदवारासाठी नसून, त्याच्या सर्व कुटूंबासाठी, म्हणजे पती/पत्नी आणि २१ वर्षाखालील मुले यांना एकाच वेळी, मिळते), किंबहुना त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण घेण्यासाठी, नोकरी देणार्या संस्थेकडून, मदतही मिळते आणि नोकरीसाठी आवश्यक परिक्षांची केंद्रे भारतात उघडली आहेत ! त्याविरुद्ध, Green Card मिळण्यासाठी डॉक्टर्ससाठी अनंत अडचणी आहेत आणि दहा-पंधरा वर्षे लागतात ! :)
अमेरिकेत स्थलांतरीत होणार्या लोकांमध्ये उच्चशिक्षित लोकांचे प्रमाण असे आहे :
(संदर्भ : https://www.pewresearch.org/fact-tank/2018/09/14/education-levels-of-u-s... )
सन १९६० साली हे प्रमाण २.६% पदव्युत्तर शिक्षण आणि २.५% पदवी शिक्षण असे होते. ते हळू हळू वाढत सन २०१६ मध्ये केवळ १२.८% पदव्युत्तर शिक्षण आणि १७.२% पदवी शिक्षण इतकेच वाढलेले आहे. थोडक्यात, सद्या अमेरिकेत स्थलांतरीत होणारे ७०% लोक अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतात ! :)
कोणत्याही गंभीर/महत्वाच्या विषयावर विनाधार धोपट विधाने करण्याऐवजी, थोडासा अभ्यास करून विधान केले तर बरे. :)
आता थोडेसे, "परदेशात स्थायीक झाल्यानंतर किंवा तेथे कामासाठी दीर्घ वास्तव्य असताना", लोकांत मिळणार्या मानाबद्दल,
या पृथ्वीवर उत्तम आणि वाईट अशी वागणूक सर्वच ठिकाणी बाजूबाजूला आस्तित्वात असते... मग तो भारत असो की इतर कोणताही देश.
त्या वागणूकीचा प्रकार खालील गोष्टींवर अवलंबून असतो :
१. तुम्ही कोणत्या संस्थेत (ऑर्गॅनायझेशन) काम करत आहात
२. तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात
३. तुम्ही आपल्या कामातली आपली पात्रता आणि तिची संस्थेला असलेली गरज, आपल्या कामाच्या प्रतीने, किती प्रमाणात पटवून दिलेली आहे.
बाकी सगळ्या अंधश्रद्धा आणि कुरबुरी आहेत. पूर्णविराम.
6 May 2019 - 5:51 pm | शलभ
याबद्दल जरा अधिक माहिती, संस्थांची लिंक असं काही देता येईल का?
6 May 2019 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
या बाबतीत अनेक संस्था कार्यरत आहेत. तरीही सर्वोत्तम असे होईल की US सरकारच्या अधिकृत संस्थळांवरुन किंवा सरकारमान्य संस्थांच्या संस्थळावरून माहिती मिळवणे जास्त योग्य होईल.
यासाठी खालील शब्द वापरून जालावर चौकशी करा...
१. nurses and us green card
२. https://www.ncsbn.org/nclex.htm
३. https://www.ncsbn.org/testing-locations.htm
The National Council of State Boards of Nursing (NCSBN) provides education, service, and research through collaborative leadership to promote evidence-based regulatory excellence for patient safety and public protection.
NCLEX हे एका आवश्यक परिक्षेचे नाव आहे. ही परीक्षा जरा कठीण आहे (तडक ग्रीन कार्ड मिळते म्हणजे असणारच, नाही का?). पण, बी एससी (नर्सिंग) पास केलेल्या व चांगल्या संस्थेत दोन-तीन वर्षांचा अनुभव असलेल्या नर्सला ती पास होणे फार कठीण जाऊ नये.
फार महत्वाचा धोक्याचा इशारा : अमेरिकन व्हिसासंबंधी विषय असल्याने अनेक फसव्या व्यक्ती/संस्था असण्याची शक्यता आहे... तेव्हा, वर म्हटल्याप्रमाणेच, निवड व निर्णय करताना, US सरकारच्या अधिकृत संस्थळांवरुन किंवा सरकारमान्य संस्थांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.
30 Apr 2019 - 4:25 pm | मराठी_माणूस
गैरसमज
30 Apr 2019 - 7:25 pm | Rajesh188
माझा असा समज होता
कारण गल्फ मध्ये सहज जावू शकतो पण अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी जरा जास्तच kadak नियम आहेत .
त्या मुळे चाळणी लावून ठराविक लोकच अमेरिकेत प्रवेश करत असावीत असा समज होता .
चुकीच्या पोस्ट बध्दल क्षमस्व
1 May 2019 - 10:36 am | धर्मराजमुटके
काय झालं शेवटी ?
सोडला की नाही भारत ?